Sunday, 7 February 2021

ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं

*ग्रामिण मातीशी नाळ जोडणारा कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं*

            उस्मानाबाद जिल्ह्यातील आई तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर जवळच्या मंगरूळ या खेड्यात जन्मलेले लेखक रत्नाकर कमलाकर उपासे यांचा 'बदबदीची सोनपावलं' हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. मंगरूळ या गावाला कुशीत घेत हरणाई नदी पश्चिमेकडून दक्षिणेला वाहत जाते. या नदीलाच बदबदी असे म्हणतात.कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर हरणाई नदी जी पाण्याने भरलेली आहे.त्यालाच बोलीभाषेतून बदबदी म्हणत असावेत. अशा नदीचे चित्र, पाण्यावर तरंगणारे सोनपावलं म्हणजेच बदबदी नदीशी नाळ जोडणाऱ्या, जिव्हाळ्याच्या व्यक्तींचे ठसे आहेत.असे बोलके मुखपृष्ठ मनाला ओढ लावणारे आहे. याचे प्रकाशन  १० जानेवारी २०२० रोजी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे प्रकाशित झाले आहे.याचे मूल्य फक्त १५० रूपये आहे. पण यातील कथा व्यक्तिचित्रणात्मक कथातून माणसाच्या स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण व बोलीभाषा असल्यामुळे या सर्वच कथा वाचनीय आहेत.
                मंगरूळ या खेड्यात बालपण व्यतीत केलेल्या लेखक रत्नाकर उपासे यांची ग्रामीण  मातीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उपासे सरांनी बालवयापासूनच ग्रामीण जीवनाचे अनुभव घेतलेले आहेत. माणसांच्या वृत्ती- प्रवृत्तीची जाणीव अत्यंत प्रगल्भ झालेली आहे. आणि त्यातूनच साकारलेला हा कथासंग्रह विविधता आणि वेधक ता जोपासणारा आहे. या कथेमध्ये येणाऱ्या व्यक्ती मनाने धनवान आहेत. प्रत्येक कथेत वाचक स्वतः असल्याची अनुभूती घेतो. वाचकाला प्रत्यक्षदर्शी त्याच्या समोरच सारे घडत आहे अशा सर्व कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
               हसमुख नागाचा म्हातारीची साधलेला संवाद वाचकाची गोडी वाढवतो. नागाची कष्ट करण्याची जिद्द आळशी माणसाला रामबाण उपाय दर्शविणारी आहे. मंगरूळ चे गंधर्व म्हणजे देसाई काका यांच्यातला उत्तम दर्जाचा कलाकार व कलाकारातील उपस्थित गुणांचे दर्शन घडवणारी कथा वयोमर्यादेला पार करून कला जिवंत करणारी आहे. त्यात सिंधूचे पात्र वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.बिनधास्त एकनाथचे जीवन त्याला जीव लावणारी त्याची बायको ठकू आणि मोहोळ मारण्यात तरबेज असलेला एकनाथ यांच्या कथा खूप काही शिकवून जातात. अस्सल मराठवाड्याची मराठी भाषा, लकब, नुसत्या, कवा -कवा, म्हटलं, जाऊ, हाय, म्हणंजी अशा अनेक शब्दांतून गावरानी गोडवा दर्शविल्याशिवाय राहत नाही.
                 माणुसकीचे दर्शन घडवणारा कयलू आबा त्यांचा स्वभाव व मुक्या प्राण्यांविषयी अपार आदर असलेला कयलू आबा लेखकाने खूप मार्मिकपणे कथेत रंगवलेला आहे. लेखकाची साधी सरळ भाषा मनाला भुरळ घालणारी आहे. बड्या हिंमतीचा कयलू आबा यांची कथा वाचकाला प्रत्यक्षदर्शीचा अनुभव देणारी आहे. हे सर्व जणूकाही वाचकाच्या समोरच घडते आहे असे वाचकाला वाटते. मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी मायाळू गिरीजा ही कथा खुप वाचनीय अशी आहे. मालकाच्या हाताखाली शेतावर काम करणारी गिरीजा तिचा प्रामाणिकपणा आणि तिची कष्ट करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
                 काकीची लोकांना आपलेसे करण्याची कला काकी या कथेतून दिसून येते. जीवनात कितीही संकटं आली तरी हार न मानता त्याला सामोरं जाण्याचं बळ काकी कडून शिकावं. वय साठीच्या पुढे गेलं तरी कष्ट करण्याची तयारी या कथेतून दिसून येते. हरहुन्नरी नवनाथ या कथेतून शेतकऱ्याला असलेली बैलाची जाण, अहोरात्र कष्ट करणारा शेतकरी त्यांची साधी राहणी अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहे. बैलजोडी असो की बाजार असो शेतकऱ्याला व्यवहारिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे हे या कथेतून प्रकर्षाने जाणवते.
                लेखक रत्नाकर उपासे यांची ग्रामीण मातीशी नाळ जुळल्याने बदबदी काठावर येणाऱ्या मनाने श्रीमंत असणाऱ्या अस्सल ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातल्या माणसांचा मायाळूपणा आपुलकी भाव माणसाप्रति जिव्हाळा,साधी राहणी पण उच्च विचार त्यांची बोलीभाषा त्यांचे ग्रामीण भागातील जीवन जगण्याची कला, शेतकऱ्याची अपार मेहनत, अस्सल गावरान मेवा प्रमाणे फार सुरेखपणे मांडली आहे. बदबदीकाठची सोनपावलं हे पुस्तक हातात घेतल्यावर प्रत्येक कथा हृदयाला भिडून पुढच्या कथेची ओढ लावीत जातात.
                 एकनाथचे धाडस, त्याचे कौटुंबिक जीवन, कयलू आबाचे प्राण्यांविषयीचे प्रेम, त्यांचा अस्सलपणा, मायाळू गिरीज्याची कष्ट करण्याची तयारी, मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी व सत्याची कास धरून राहणारी गिरीजाचे खरंच कौतुक वाटते. काकीचे धाडस, काम करण्याची तयारी,डगमगून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी वाखाणण्यासारखी आहे. दिसायला साधा जरी असला तरी प्रत्येक गोष्टीत असलेला हरहुन्नरी नवनाथ आणि कोणत्याही गोष्टीवर मात करणारा सिल्या यांच्या सर्व कथा ग्रामीण भागातले दर्शन घडवणाऱ्या व वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या आहेत.
          बदबदीकाठची सोनपावलं या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचनीय आहेत. या कथासंग्रहात एकूण आठ कथा ग्रामीण मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत. लेखक रत्नाकर उपासे यांची लेखणी ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीशी समरूप होणारी आहे.प्रत्येक कथा वाचक वाचताना देहभान विसरून जातो.वाचतानाचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. सर्व वाचकांनी आवर्जून वाचावा असाच कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं हा कथासंग्रह होय.

           लेखक रत्नाकर उपासे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

लेखिका शिक्षिका समीक्षिका कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि. प्राथमिक शाळा. कोकलगाव
ता. जि. वाशिम
मो.9767663257

No comments:

Post a Comment