Wednesday, 10 February 2021

गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह म्हणजे-'गावठी गिच्चा'

 *गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह म्हणजे- गावठी गिच्चा*

              सांगली जिल्ह्याचे कर्नाळ गावचे सुपुत्र लेखक सचिन वसंत पाटील यांचा 'गावठी गिच्चा' गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे, ग्रामीण भागातील घरे, शेतावर जाणारा शेतकरी,त्याची बैलजोडी, बैलगाडी, शेतावर जाणाऱ्या बायका, आणि चिखलात पाय रोवून उभी असलेली व एका पायात काटा रुतलेली लक्ष्मी असे सुंदर मुखपृष्ठ वाचनासाठी उत्सुकता निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहाचे प्रकाशन तेजश्री प्रकाशन पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती १६ नोव्हेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. डॉक्टर तारा भवाळकर यांनी पाठराखण केली असून मूल्य केवळ दोनशे रुपये आहे.पण यातल्या सर्वच कथा वाचकाला वेड लावणाऱ्या आहेत.
              लेखक सचिन पाटील यांचा पहिला कथासंग्रह सांगावा, दुसरा कथासंग्रह अवकाळी विळखा. ज्याला अनेक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गावठी गिच्चा हा त्यांचा तिसरा कथासंग्रह आहे. ज्याला पंचतत्व सेवा प्रतिष्ठान सांगलीचा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. प्रत्येकाला सर्वात प्रिय आपला गाव असतो. मग तो शहरात राहायला गेलेली व्यक्ती असो किंवा गावात राहणारी व्यक्ती असो.गाव म्हणलं की त्याचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण गावाच्या मातीत त्याचं बालपण गेलेलं असतं. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याला बालपणीच्या आठवणी, गावातले खेळ, गावातले रस्ते, गावातलं बालपण, बालपणीची मौज-मजा, गावातले चौक, देऊळ,रस्ते,कट्टे, गावची नदी,बोराची झाड, गाई म्हशीचे गोठे, दुकाने सर्व आठवल्याशिवाय राहत नाही.
             लेखक सचिन पाटील यांच्या गावात फेरफटका मारण्यापुर्वीचा भाग वाचताना त्यांचे कर्नाळ गाव जणूकांही नजरेसमोर उभे राहते. वाचकाला वाचताना जणू आपण त्या गावात प्रत्यक्ष गेल्याची अनुभूती येते.लेखक सचिन पाटील यांची अस्सल ग्रामीण भाषा, मध्ये मध्येच बोलीभाषेतून मारलेला गावराणी विनोद, वाचकाला हसवून जातो. त्यांची गावाकडची साधी, सरळ, सोपी भाषा वाचकाला भुरळ पाडणारी आहे. गावाकडची साधीभोळी पण मनाने श्रीमंत असणारी माणसं, एकमेकांच्या मदतीला जाणारी, नात्यातला आपलेपणा ओळखणारी, जिवाभावाची माणसं,गावाकडची शुद्ध, मोकळी हवा, गावातली कमी शिकलेली पण आपुलकीचा झरा वाहणारी मोकळ्या मनाची माणसं हे सारं अनुभवायला मिळतं. आजही जेंव्हा कोरोना आला तेंव्हा शहराकडची बहुतांश लोकांनी आपला गाव गाठला. कधी नव्हे ते गावाकडे न जाणारी मंडळी गावचा रस्ता धरली. शेवटी आपला गावच बरा... असं वाचकाला वाटून जातं. गावठी गिच्चा या काव्यसंग्रहातील सर्वच कथा गावच्या माणसांच्या आहेत त्यामुळे त्या जिव्हाळ्याच्या आपुलकीच्या वाटतात.
                'उमाळा' या कथेतील पुष्पा अक्का जरी स्वभावाने फटकळ असली तरी तिच्या प्रेमाचा उमाळा रामभाऊनांच नव्हे तर समस्त वाचकांना बहीण-भावाच्या नात्याविषयी प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, आदर,व्यक्त करणारा वाटतो. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक वाटते. बहिण कितीही रागात असली तरी तिच्या मनातले प्रेम ती  दाखवत नाही आणि लपवत ही नाही. भावाने बहिणीची केलेली विचारपूस आणि बहिणीने भावा बद्दलचे प्रेम. तिच्या प्रेमाचा उमाळा,बहिणीचे पाणी लागेल म्हणून दिलेला आशीर्वाद वाचकाला वेड लावून जाते.
             दंगल या कथेमध्ये रेशम ची डिलिव्हरी जवळ आलेली, दंगलीत सर्वत्र कडकडीत बंद असताना त्यांना मदत करणारा ख्रिश्चन धर्माचा जेकब अॅटोवाला आपल्या जिवाचा आटापिटा करून स्वतःच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघतो.  वाटेत त्याला मदत करणारा पुढारी कार्यकर्ता राजू हा हिंदू असून देवासारखा मदतीला धावून येतो.आणि अॅम्बुलन्सची व्यवस्था करतो.जातीय दंगली पेटलेली असतानाही हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन असे धर्म वेगळे असले तरी त्यांच्यातली ही माणुसकी जिवंत असल्याचे ऐक्य साधणारी कथा खूप काही शिकवून जाते.
           सुली या कथेमध्ये सोळा-सतरा वर्षाची सुली स्वतःचं तरुणपण जपण्यासाठी, शील जपण्यासाठी रात्रभर कोपीत जागी राहते. आई गावाला गेलेली आणि बाप उसाच्या गाडीवर गेलेला सुलीच्या जवानी वर वखवखलेल्या नजरेने बघणारा मुकादम, कारखान्यावरची टवळी पोरं अचानक अंधाऱ्या रात्री सुलीच्या घरा भोवती घिरट्या घालणाऱ्या वासनांध नजरा, पळणाऱ्या पावलांचा आवाज ऐकून घाबरून गेलेली सुली कुडाला अडकवलेला कोयता स्वयंसंरक्षणासाठी हातात घेऊन झोपी जाते. आजच्या काळातील स्त्रियांना स्वयं संरक्षणाचे धाडस दाखवून जाणारी ही कथा अंगावर शहारे आणणारी आहे.डोरलं या कथेत कष्ट करणारी सवी नवरा मेल्यावर परिस्थितीने हतबल होते. पतसंस्थेच्या कर्जापायी आत्महत्येचा विचार करते पण पोटच्या गोळ्यासाठी तो विचार बाजूला सारून परिस्थितीशी दोन हात करायला शिकते. वासनांध असलेला नामदेव सावकाराचे पैसे घेणे सवीच्या सद्सदविवेक बुद्धीला पटत नाही. त्यासाठी तिच्या नवऱ्याचं डोरलं विकायला तयार होते आणि आत्मसन्मानाने जगायला शिकते. माणूस परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. हे ही कथा शिकवून जाते.
           गावचे स्टॅन्ड ही कथा वाचकाला खूप हसायला लावते. शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. ग्रामीण भागात आजही लालपरी म्हणजेच एसटीची वाट पाहणारे लोकं आणि त्यांची एसटीत चढण्याची घाई डोळ्यांसमोर दिसते. अभ्यास न करता पास व्हावे म्हणून मारुतीला नवस बोलणारा साहेब.  शेवटी नापास होतो मग त्याच्या लक्षात येतं की देव काय पास करत नाही. पास होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. सायब्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तो अभ्यासाला लागतो.साहेब ही कथा अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे. लेखक सचिन पाटील म्हणजे या कथेतील साहेब पाटलाचा दोस्त जो खूप अभ्यास करणारा असतो. आजच्या काळात चकवा म्हणजे अंधश्रद्धा कशी असते? हे सांगण्यासाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी चकवा ही कथा अंधश्रद्धेची मुठमाती करणारी आहे. 
             आदर्श गावात तंटामुक्ती योजना कशी सफल होते? हे तंटामुक्ती या कथेतून कळते. बारीकसारीक तंटे व गावकऱ्यांनी त्यातून काढलेला मार्ग वाखाणण्याजोगा आहे. टोमॅटो केचप विनोदी कथा वाचताना वाचकाचे भान हरपल्याशिवाय राहत नाही. नवरा-बायकोच्या प्रेमाची व त्यांच्यात उडणाऱ्या खटक्यांची सरमिसळ म्हणजे गावठी गिच्चा ही कथा शेवटी वाचकाला विचार करायला भाग पाडते. नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकाला कसं समजून घ्यायचं?  हे कळत नकळत शिकवून जाते.
              ग्रामीण साहित्यातले लेखक सचिन पाटील यांचा गावठी गिच्चा  या कथासंग्रहात एकूण १२ कथा वाचकाला वाचनाची ओढ लावणार्‍या आहेत. त्यांची साधी सरळ भाषा हृदयाला भिडणारी आहे. सर्वच कथेमध्ये वाचक स्वतः असल्याची अनुभूती तर येतेच शिवाय ग्रामीण भागातल्या गावचे चित्र नजरेसमोर उभे राहते. ही ताकद अस्सल गावरानी, गावाची ओढ असलेल्या, अपंगावर मात करणाऱ्या, मनाला आशेचे पंख लावणाऱ्या व सर्वांच्या पसंतीस गावठी गिच्चा उतरविण्यास भाग पडणाऱ्या दमदार उत्कृष्ट लेखनशैलीची उपजत कला असलेल्या ध्येयवेड्या लेखक कथाकार सचिन पाटील यांना कौतुकाची थाप देणा-या आहेत.
          पुढील वाटचालीसाठी लेखक सचिन पाटील यांना भरभरून शुभेच्छा....

समिक्षिका,लेखिका, शिक्षिका,कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

 पुस्तकाचे नाव-गावठी गिच्चा
 लेखक-सचिन वसंत पाटील
 प्रकाशक-तेजश्री प्रकाशन पुणे
 एकूण कथा- १२
मूल्य-२०० रूपये
लेखकाचा मोबाईल नंबर-८२७५३७७०४९

No comments:

Post a Comment