Sunday, 19 September 2021

सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय


*सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय*

       समकालीन वास्तवात सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक अंगाला भेटणार्‍या निरनिराळ्या अवस्थांच्या कविता काळजाला स्पर्श करतात तेव्हा मानवी मन अस्वस्थ होऊन जातो अशाच कवितांचा काव्यसंग्रह म्हणजे अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी पवन नालट यांचा मी संदर्भ व करतोय हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन पुणे यांनी पहिली आवृत्ती 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित केली असून प्रस्तावना दगो काळे यांची लाभली आहे या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर माणसाच्या मनाचा पक्षी अनेक जाणिवांचा अर्थ शोधणारा नावाला साजेसे संदर्भ पोखरणारा आहे या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 280 रुपये असून त्यातल्या सर्वच कविता सामाजिक राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
           कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता माणसाला विचार करायला लावणारे आहे सामाजिक-राजकीय ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आहे ती शिक्षणव्यवस्थेतील भीषण विदारक ्पष्ट करणार्‍या आहेत राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत वास्तवाच्या जाणिवेतून अस्तित्वाचा अर्थ शोधणारे आहेत कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता मुक्तछंदात असल्यातरी सुंदर व अर्थ शोधणाऱ्या आहेत माणसाला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारे आहे.

            मी संदर्भ पोखरतोय
            माझ्या मनाचा 
            असंख्य विचारांचा 
             संदिग्धतेचा
             मी निरभ्र होतोय 
             निर्विकार होतोय 
             तळ शोधतोय
             न जमणाऱ्या 
             तडजोडीचा....!!

        असंख्य विचारांचा, संदिग्धतेचा संदर्भ शोधणारा कवी पवन नालट संदर्भ शोधता शोधता निरभ्र होतोय.निर्विकार होतोय, तळ शोधत राहतोय न जमणाऱ्या तडजोडीचा त्यासाठी तो राबतोय,करपतोय, हरवतोय,जगतोय एखाद्या श्वापदाच्या सारखा. वरवर दिसणारी शांतता कवीला स्वस्थ बसू देत नाही कवीच्या आत मध्ये वादळ उठलेले आहे. त्याला कुठला संदर्भ लागत नाही त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत. जाणिवांच्या विळख्यात कवी जाळं विनतोय.न  उमजणाऱ्या संदर्भाचे. संवेदनाहीन भावविश्वाची कारणमिमांसा वरील ओळींतून कवी करण्याचा प्रयत्न करतो.

              मी जगतोय स्वातंत्र्यात 
              बघतोय गुलामी 
              स्वातंत्र्याची 
              मला नाही हक्क 
              इथल्या व्यवस्थेविरूध्द बोलण्याचा 
              तरी मी अभिव्यक्तीच्या 
             अधिकाराची मालकी 
            खिशात घेऊन फिरत असतो 

         आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा गुलामी भोगत आहेत काहीजण इथल्या व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. इथल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही आणि बोललं तर संध्याकाळपर्यंत बोलणारा जिवंत राहील याची गॅरंटी नाही तरीसुद्धा अभिव्यक्त होण्यासाठी गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी कवी अधिकारांची मालकी खिशात घेऊन फिरतो. लोकांचा प्रामाणिकपणा मोजत असतो. तिथल्या अर्थकारणाशी, समाजकारणाची, संस्कृतीशी शब्दरूपाने शस्त्र उठवत लेखणीच्या माध्यमातून कवितेच्या रूपाने व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत असतो. कारण कवीने अजून आत्म्याचा लिलाव केला नाही एकमेकांचा चोंमडेपणा करणाऱ्या भ्रष्टाचार उराशी कवटाळून माणुसकीचा खोटा आव आणणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध कवी पवन नालट वरील ओळीतून प्रहार केल्याशिवाय रहात नाही.

              कवीला लावता येत नाही
              संवेदनाच नेलपॉलिश
              शिवता येत नाहीत 
              उसवलेल्या काळजाचे टाके
              कपाळावर लावता येत नाही 
              आंदोलनाचा काळा बुक्का 
               तो वैशाख नसतो 
                तो श्रावण नसतो
                तो नसतो भैरवीतली आर्तता 
                व्यवस्थेच्या पायातले साखळदंड 
                शब्दांतून शस्त्र 
                पेरणारा कवी 
                मातीतून महावस्त्र देत असतो
                मानवतेच्या आरस्पानी देहाला....

           कवी कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी पवन नालट होय.कवीचं काळीज किती संवेदनशील असतं.कवी विद्रोही असतो.कवी संवेदनशील असतो. कवी अन्यायाविरुद्ध शब्दाच्या शस्त्राने प्रहार करणारा असतो. कवी वैशाख किंवा श्रावण नसतो. कवी व्यवस्थेच्या पायातील साखळदंड शब्दांचे शस्त्र करून पेरणारा,मातीतून महावस्त्र कवी मानवाला देत असतो. असा गहन अर्थ असणार्‍या, मानवाच्या थेट काळजाला भिडणार्‍या कविता कवी पवन नालट यांच्या आहेत.
        मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहात एकूण ६० कविता माणसाच्या मेंदू वरची मरगळ झटकणा-या, माणसाला विचार करायला लावणार्‍या,व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या, भ्रष्ट, लाचारी,गरिबी, गुलामीची चिरफाड करणाऱ्या, शब्दाशब्दांतून विद्रोह करणार्‍या,स्पष्टवक्त्या आहेत. प्रत्येक कवीने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह मी संदर्भ पोखरतोय हा आहे. शब्द न शब्द थेट काळजाला भिडणारा आहे.
       कवी पवन नालट यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
       पुस्तक मागवण्यासाठी कवीचा मो.नं ९९६०३९०७५३

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, 18 September 2021

वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*

  जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम येथील आदर्श शिक्षिका मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांना रयतेचा कैवारी शैक्षणिक डिजिटल दैनिक वृत्तपत्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त "राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने" १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले आहे.
     त्याचबरोबर त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले असून दप्तर मुक्त शाळा,गोष्टीचा शनिवार, तंबाखू मुक्ती साठी बाबास पत्र लिहा, तंबाखूजन्य पदार्थाची होळी, पक्षी वाचवा उपक्रम तसेच शैक्षणिक pdf, PPT, flipbook तयार करणे आणि राज्यभरातील शिक्षिकांना 'उपक्रमशील व तंत्रस्नेही' व्हाट्सअप समूहाद्वारे लॉकडाउन काळामध्ये ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करणे व लॉकडाऊन काळात हजारो शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून युट्युबवर प्रसारित करीत शाळा बंद पण शिक्षण आहे सुरू या सदराखाली महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर लॉकडाउन काळात माजी विद्यार्थ्यांकडून जे नोकरीवर लागले आहेत अशा विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषद शाळेचे ऋण व्यक्त करण्याकरता लोकसहभाग गोळा करून शाळेची उत्कृष्ट रंगरंगोटी केली आहे. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात नाव कमावले आहे. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यातले व जिल्ह्यातले विद्यार्थ्यांचे पहिले काव्यसंग्रह 'उमलती फुले' स्वखर्चाने प्रकाशित केले असून त्यांचे 'चिमणी पाखरं' आणि स्वराज्याचे मावळे हा ऐतिहासिक काव्यसंग्रह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, खासदार भावना गवळी, आमदार पाटणी,आमदार अमित झनक व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब (स्वराज्यरक्षक मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता )यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.त्यांचे अनेक लेख व जवळपास ४० पुस्तकावरची समीक्षेने, कविता, महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी.बी. जाधव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास रहाणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, रेतीचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती.
       मिनाक्षी नागराळे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षण वर्गाकडून तसेच माजी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर गट शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे केंद्रप्रमुख विलास गोटे जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना वाशिम तसेच मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे व सर्व शिक्षक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Wednesday, 8 September 2021

मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे कोवीड योध्दा म्हणून सन्मानित...

*मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे सन्मानित*

          मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त वाशिम येथील सर्कीट हाऊसमध्ये कोवीड १९ च्या काळात सेवा करणारे डॉक्टर्स,नर्स, पोलीस,शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांना कोरोना योध्दा म्हणून ग्रंथ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले, उद्घाटक आमदार अॅड किरणराव सरनाईक, प्रमुख अतिथी आमदार अमित झनक बाबाराव पाटील खडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश अहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद वानखेडे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.राजुभाऊ चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष सौ.संजिवनीताई बाजड,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री.नारायणराव काळबांडे, नागेश काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.त्यांनी कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळा रंगरंगोटी केली.तसेच विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून ऑफलाईन शिक्षण दिले.'शाळा बंद शिक्षण आहे सुरू' या सदराखाली अनेक शैक्षणिक पिडीएफ,पी.पीटी,फ्लीपबुक ची निर्मिती केल्याबद्दल 'कोवीड योध्दा' म्हणून मिनाक्षी नागराळे वाशिम यांना मराठा सेवा संघातर्फे प्रमाणपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाबळे सर यांनी केले,तर आभार शिवश्री नारायणराव काळबांडे यांनी मानले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील  प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिष्ठित डॉक्टर्स, पोलिस,नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,शिक्षक आदि उपस्थित होते.