Saturday, 13 February 2021

*वीरांगना झलकारीबाई*

*थोर विरांगना झलकारीबाई*

       देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारी इतिहासकालीन थोर विरांगणा म्हणजे झलकारीबाई. जिचे नाव आजही बऱ्याच स्त्रियांना माहिती नाही. झलकारी बाईचा जन्म उत्तर प्रदेशातील झांसी जवळच्या भोजला या छोट्याशा गावात कोळी समाजामध्ये झाला. वडील सदोवा सिंह आणि आई यमुना देवी यांच्या पोटी २२ नोव्हेंबर १८३० रोजी त्यांचा जन्म झाला. झलकारीबाई खूप छोटी असतानाच बालपणी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी त्यांना मुला प्रमाणे सांभाळले. स्वसंरक्षणाचे सर्व धडे झलकारीबाईना देऊ लागले. तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, भाला फेकणे, अशा सर्व युद्ध कौशल्यात झलकारीबाई पारंगत झाल्या.
           झलकारीबाई शूरवीर, धाडसी, पराक्रमी योद्धा होत्या. एकदा झलकारीबाई जंगलात गेल्या असताना अचानक त्यांच्यासमोर वाघ आला. वाघ भुकेने व्याकुळ झालेला डरकाळी फोडत धावत झलकारी बाईच्या अंगावर चवताळून येणार इतक्यात झलकारीबाईनी कमरेला अडकवलेली कु-हाड वाघावर भिरकावली. तेवढ्यात वाघ रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. स्वतःचे रक्षण करणारी धाडसी स्त्रीचा इतिहास वाचला तरी आजच्या काळातील स्त्रियांच्या अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर एक वेळ चोरांनी एका व्यापार्‍याला  लुटलं होतं. तेव्हा झलकारीबाई वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून त्या चोराच्या दिशेने जाऊन त्यांच्या सोबत लढाई करून सर्व चोरांना सळो-की-पळो करून सोडले. आणि लुटलेला माल तिथेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन चोर पसार झाले.झलकारीबाईच्या शौर्याचे किस्से पंचक्रोशीत सर्वदूर पसरले होते.
               झलकारी बाईचा विवाह तोफखान्याचे काम करणाऱ्या शूर सैनिक पुरणसिंग यांच्याशी झाला. झलकारी बाईच्या धाडसाचे, शौर्याचे किस्से राणी लक्ष्मीबाई ऐकून होत्या. एकवेळ पूजेच्या समयी दोघींची भेट झाली. आणि काय आश्चर्य राणी लक्ष्मीबाई अचंबित झाल्या. झलकारीबाई दिसायला हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. नंतर राणी लक्ष्मीबाईने स्त्री लष्करात झलकारीबाई यांना सामील करून घेतले. पुढे झलकारीबाई त्यांची मुख्य सल्लागार बनल्या.
              १८५७ च्या युद्धात जनरल ह्यू रोज या इंग्रज अधिकाऱ्याने अफाट सैन्यानिशी झांसीवर आक्रमण केले.२३ मार्च १८५८ मध्ये सैन्यानिशी झांसीवर आक्रमण करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई पेशव्यांकडून मदतीची अपेक्षा धरत बसल्या होत्या. पण कोणाचीही मदत मिळाली नाही. एवढ्या बलाढ्य सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही. असे राणी लक्ष्मीबाईंना वाटू लागले. कारण तात्या टोपे हे जनरल ह्यु रोज कडून पराभूत झाले होते. बघता बघता इंग्रजांचे सैन्य झाशीमध्ये पोहचले. इतक्यात झलकारीबाई ने राणी लक्ष्मीबाईचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः राणीच्या वेशात समोर आली. व जोरदार लढाई सुरू केली. तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई निसटून पळून जाण्यासाठी वेळ मिळाला.  इकडे युद्धात झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई सारखा वेश परिधान केल्याने व दिसायला हुबेहूब लक्ष्मीबाई सारखी दिसत असल्याने लढाई सुरू केली.आपण राणी लक्ष्मीबाईशींच लढत आहोत याचं भ्रमात इंग्रज राहिले. तेवढ्यात झलकारीबाई जनरल ह्यु रोज यांना भेटण्यासाठी गेल्या. इंग्रजांना मोठा आनंद वाटला की झांसी तर आपल्या ताब्यात आली आहे. पण त्यांची राणी सुद्धा आपल्या ताब्यात आली. तेवढ्यात तिथला एक सैनिक झलकारीबाई यांना ओळखत होता त्यांनी सांगितले की ही राणी लक्ष्मीबाई नसून त्यांची सैनिक झलकारीबाई आहे. तेवढ्यात राणी लक्ष्मीबाई सुखरूप स्थळी जाऊन पोचल्या होत्या.
        जनरल ह्युजने झलकारीबाईना  एक प्रश्न विचारले तो असा ....तुमच्या सोबत काय करायला पाहिजे? त्यावर मनाने खंबीर असणाऱ्या झलकारीबाईने उत्तर दिले की.... मुझे फासी दे दो | झलकारीबाईचे इतके साहस पाहून ह्यु रोज प्रभावित झाला आणि म्हणाला .... "यदि भारत की एक प्रतिशत महिलांये भी उसकी जैसी हो जाये, तो ब्रिटिश सरकार को जल्द ही भारत छोडना पडेगा |
        अशी धाडसी विरांगणा अखेरपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढत राहिली. त्यातच त्यांना वीरमरण आले. जेव्हा इंग्रजांना माहिती झाले की ज्या महिलेने त्यांना युद्धात सळो कि पळो करुन सोडले होते ती महिला राणी लक्ष्मीबाई नसून झलकारी राणी होती. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...भारत सदा ही अशा नारींचा सन्मान सदैव करेल...
            कवी मैथिलीशरण गुप्त यांनी तिच्या शौर्याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे. 

                "जाकर रण में ललकारी थी |
                वह तो झांसी की झलकारी ती |
                गोरों से लढना  सिखा गयी |
                 है इतिहास मे झलक रही 
                 वह भारत की ही नारी थी |"

                   अशा या महान विरांगणेचा भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी झलकारी राणीच्या स्मरणार्थ पोस्टात एक तिकीट काढले आहे. त्यांचे स्मारक अजमेर,राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारने एक प्रतिमा आग्रा येथे स्थापन केली आहे. लखनऊमध्ये झलकारीबाई वर एक हॉस्पिटल उघडण्यात आले आहे. अशा या महान विरांगणीचा इतिहास आजच्या काळातील सर्व स्त्रियांना माहीत असला पाहिजे. ८ मार्च जागतिक दिनाच्या निमित्ताने अशा धाडसी विरांगणेला माझा मानाचा मुजरा....!!
       सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

                   झलकारीचे शौर्य घे 
                   घे जिजाऊचे संस्कार 
                   आकाशाला कवेत घे 
                   कर सावित्रीचे स्वप्न साकार....!!

                    घे अहिल्येचा कणखर बाणा 
                    मुक्ता साळवेचे धाडस घे 
                    रमाईचा त्याग शिक जरा
                     ताराराणीची कार्यकुशलता घे....!!

                     अन्यायावर मात करण्या
                      कधी तानुबाई बिर्जे हो तू
                     अंध:काराला दूर सारण्या
                      हो कधी दिव्याची वात तू.....!!

                       फातिमॉं बी सारखी तळमळ ठेव  
                       रख्माबाई राऊत सारखी सेवा कर
                       सावित्रीची खरी लेक हो तू
                       अन्यायावर उठून प्रहार कर....!!

लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
फोन ९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com

No comments:

Post a Comment