Thursday, 18 February 2021

कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब..

*कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब*

           लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक कल्याण राऊत सर यांचा पहिला काव्यसंग्रह बिंब-प्रतिबिंब नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब विशाल सागरामध्ये पडल्याने सागराचे सोनेरी रूप  व सूर्यकिरणांनी खुलून आलेले नभांगण, सोनेरी झालेले रूप  मनाला मोहिनी घालणारे आहे. प्रकाशक मराठीचे शिलेदार यांनी प्रकाशन केले असून प्रथम आवृत्ती २०२० मध्ये झाली आहे. प्रस्तावना राहुल पाटील यांची असून शुभेच्छा आमदार माननीय अमित विलासराव देशमुख यांच्या लाभले आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त शंभर रुपये असून त्यातील कविता समाज मनाचा आरसा असणाऱ्या वास्तवरुपी अशाच आहेत.
       प्राध्यापक कल्याण राऊत सर यांचा जीवनसंघर्षायातून लेखणीद्वारे शब्द उमटलेले, सुरुवातीपासूनच कवितेची आवड असणारे कवी, स्वतःला साहित्याचा सेवक म्हणतो आई वडिलांप्रति जिवापाड प्रेम करणारा कवी,स्वतःचा संघर्ष आई-बाबा या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतो. सख्या तू भेटला या कवितेतून मित्र जरी मोठा झाला तरी त्याला गरीब मित्राची लाज वाटता कामा नये आणि संपत्तीचा माज ही चढू नये.मित्र म्हणजे सखा सोबती जगात सर्वात जास्त प्रिय असणारे नाते म्हणजे मैत्रीचे जेवढे मजबूत तेवढेच नाजूक. त्याला जीवापाड जपावे. स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत फक्त मैत्रीच माणसाला वाचवते असे कवीला वाटते.
             आज आपण पाहतो या मोबाईलच्या जमान्यात मनुष्य प्रत्येक पावलागणिक खोटे बोलत चालला आहे. घरी असला तरी फोनवर बाहेरगावी आहे म्हणून सांगतो. बाहेरगावी असला तर घरी म्हणून सांगतो. या बेगडी दुनियेत माणूसच माणसाला जास्त फसवत चालला आहे. सत्य बोलणे फारच कमी होत चालले आहे. इतकेच नाही तर भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा करणारे मोठ्या तोऱ्याने मी स्वतःच्या कमाईवर केल्याचे सांगतात.वडीलच मुलांना सांगतात की फोन उचल व सांग की बाबा घरात नाहीत. चांगले संस्कार करायचे सोडून कसे खोटे बोलावे याचे प्रात्यक्षिक दाखवतात. त्यामुळे येणारी पिढी आपोआपच खोटे बोलायला लागली आहे. कितीही संकटे आली तरी माणसाने सदैव खरेच बोलावे असे संवेदनशील असणारा पण सत्याच्या मार्गाने जाणा-या कविला वाटते.

             "आई तू माझी मी तुझा लाल गं
             माझ्यासाठी झेललेस दुःख, झाले तुझे हाल गं
             तळहाताचा करून पाळणा लाविलेस मला पोटी
             राबलीस माझ्यावरसाठी कष्ट दिन रात किती...!!"
 
              आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणारा कवी आई तू माझ्यासाठी किती राबलीस? किती कष्ट उपसले माझ्यासाठी कष्ट दिनरात केलेस.नेहमी दुःख झेललीस. त्यावेळी तुझे किती हाल गं झाले. तूच तळ हाताचा पाळणा करून मला पोटी लावून घेतलं. आमच्यावर योग्य संस्कार केलेस. मातृत्वाची ओढ असणारा कवी शब्दांच्या माध्यमातून आईचे ऋण व्यक्त करतो. या काव्यसंग्रहाची पहिली पुष्पमाला आपल्या लाडक्या आईस अर्पण करणारा आणि समाजातील युवकांना आईला अनाथ आश्रमात टाकण्यापेक्षा तिच्या सावलीत मोठे व्हा असे आवाहन करतो.
     
             "कोलारच्या खाणीत काम करणारे हात
             खनिजसंपत्ती नवी नवी धुंडाळतात
             तेव्हा अर्थव्यवस्थेची रेल्वे पटरीवर येते 
             भ्रष्टाचार करणारे मात्र हात धुऊन घेतात...!!"

                 कष्ट करणाऱ्या श्रमातून कामगार, शेतकरी किंवा मजूर असो त्यांच्याप्रती कवी प्राध्यापक कल्याण राऊत सर यांना सहानुभूती वाटते. कोलारचा खाणीत रात्रंदिवस कष्ट करणारे हात, पोटासाठी राब राब राबणारी मजूर, खनिजसंपत्ती साठी अथक परिश्रम करतात. शेतात कष्ट करणारा शेतकरी किंवा दोन वेळचे पोटभर घास मिळवण्यासाठी कष्ट करणारा कामगार खाणीवर काम करतात तेंव्हा कुठे देशाची अर्थव्यवस्था चालते पण भ्रष्टाचार करणारे मात्र एसीत बसून हात धुऊन घेतात हे वास्तविक सत्य मांडायलाही कविता भित नाही.

              सावित्रीच्या लेकी आम्ही 
              लागो ना अज्ञाना वारा 
              लढा स्वयं ध्येयाप्रती 
               अन्न वस्त्र आणि निवारा....!!

                 ज्या सावित्री मुळे आजच्या लेकी शिकून-सवरून शहाण्या झाल्यात. अनेक क्षेत्रात उंच भरारी स्त्रियांनी घेतली. पण त्या माईलाच विसरत चालल्या आहेत. शिकलेल्या स्त्रियांनासुद्धा अडाण्यासारखे बुवा, महाराज, वृत्त, वैकल्य, साधू, बापू च्या मागे लागलेल्या दिसतात. अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका. स्वतःच्या ध्येयप्राप्तीसाठी लढा आणि अन्न वस्त्र निवारा मिळवा. स्वतःच्या पायावर स्वावलंबी जीवन जगायला शिका. सावित्री विद्येची खरी देवता आहे तिनेच खरी मानवता शिकवली त्याच मार्गाने चला.... असे कवी राऊत आवर्जून सांगतात.
            डबघाई, आभार, काहूर,रूप पालटले, पत्रावळी समरस्ता, कर्मभूमी, जमीन, माझे अस्तित्व, विद्याधन, प्रिय मृत्यू , धुळवड, पाटलाचं गाव, घाबरलोय, मानलेलं नातं, कोरड्या मातीत, अरे शेतकरी दादा... अशा अनेक रचना विविधांगांनी नटलेल्या वास्तवता दर्शविणाऱ्या, स्वतःचे कर्तव्य सांगणाऱ्या शेती, माती, शेतकरी व त्यांचे कष्ट सांगणाऱ्या सहज साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे थेट काळजाला भिडणाऱ्या कविता आहेत. कवी मनाच्या अंतर्मनातील काव्याचे बिंब शब्दाच्या रूपाने काव्यबद्ध होऊन बिंब-प्रतिबिंब च्या रूपाने वाचकांसमोर आले आहेत सर्वांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब होय या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता मनाला साद घालणा-या आहेत.

           कवी प्राध्यापक कल्याण राऊत सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....

समीक्षिका,लेखिका, कवयित्री, शिक्षिका 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम 
मोबाईल 9767663257

No comments:

Post a Comment