Thursday, 18 February 2021

कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब..

*कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब*

           लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक कल्याण राऊत सर यांचा पहिला काव्यसंग्रह बिंब-प्रतिबिंब नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब विशाल सागरामध्ये पडल्याने सागराचे सोनेरी रूप  व सूर्यकिरणांनी खुलून आलेले नभांगण, सोनेरी झालेले रूप  मनाला मोहिनी घालणारे आहे. प्रकाशक मराठीचे शिलेदार यांनी प्रकाशन केले असून प्रथम आवृत्ती २०२० मध्ये झाली आहे. प्रस्तावना राहुल पाटील यांची असून शुभेच्छा आमदार माननीय अमित विलासराव देशमुख यांच्या लाभले आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त शंभर रुपये असून त्यातील कविता समाज मनाचा आरसा असणाऱ्या वास्तवरुपी अशाच आहेत.
       प्राध्यापक कल्याण राऊत सर यांचा जीवनसंघर्षायातून लेखणीद्वारे शब्द उमटलेले, सुरुवातीपासूनच कवितेची आवड असणारे कवी, स्वतःला साहित्याचा सेवक म्हणतो आई वडिलांप्रति जिवापाड प्रेम करणारा कवी,स्वतःचा संघर्ष आई-बाबा या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतो. सख्या तू भेटला या कवितेतून मित्र जरी मोठा झाला तरी त्याला गरीब मित्राची लाज वाटता कामा नये आणि संपत्तीचा माज ही चढू नये.मित्र म्हणजे सखा सोबती जगात सर्वात जास्त प्रिय असणारे नाते म्हणजे मैत्रीचे जेवढे मजबूत तेवढेच नाजूक. त्याला जीवापाड जपावे. स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत फक्त मैत्रीच माणसाला वाचवते असे कवीला वाटते.
             आज आपण पाहतो या मोबाईलच्या जमान्यात मनुष्य प्रत्येक पावलागणिक खोटे बोलत चालला आहे. घरी असला तरी फोनवर बाहेरगावी आहे म्हणून सांगतो. बाहेरगावी असला तर घरी म्हणून सांगतो. या बेगडी दुनियेत माणूसच माणसाला जास्त फसवत चालला आहे. सत्य बोलणे फारच कमी होत चालले आहे. इतकेच नाही तर भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा करणारे मोठ्या तोऱ्याने मी स्वतःच्या कमाईवर केल्याचे सांगतात.वडीलच मुलांना सांगतात की फोन उचल व सांग की बाबा घरात नाहीत. चांगले संस्कार करायचे सोडून कसे खोटे बोलावे याचे प्रात्यक्षिक दाखवतात. त्यामुळे येणारी पिढी आपोआपच खोटे बोलायला लागली आहे. कितीही संकटे आली तरी माणसाने सदैव खरेच बोलावे असे संवेदनशील असणारा पण सत्याच्या मार्गाने जाणा-या कविला वाटते.

             "आई तू माझी मी तुझा लाल गं
             माझ्यासाठी झेललेस दुःख, झाले तुझे हाल गं
             तळहाताचा करून पाळणा लाविलेस मला पोटी
             राबलीस माझ्यावरसाठी कष्ट दिन रात किती...!!"
 
              आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणारा कवी आई तू माझ्यासाठी किती राबलीस? किती कष्ट उपसले माझ्यासाठी कष्ट दिनरात केलेस.नेहमी दुःख झेललीस. त्यावेळी तुझे किती हाल गं झाले. तूच तळ हाताचा पाळणा करून मला पोटी लावून घेतलं. आमच्यावर योग्य संस्कार केलेस. मातृत्वाची ओढ असणारा कवी शब्दांच्या माध्यमातून आईचे ऋण व्यक्त करतो. या काव्यसंग्रहाची पहिली पुष्पमाला आपल्या लाडक्या आईस अर्पण करणारा आणि समाजातील युवकांना आईला अनाथ आश्रमात टाकण्यापेक्षा तिच्या सावलीत मोठे व्हा असे आवाहन करतो.
     
             "कोलारच्या खाणीत काम करणारे हात
             खनिजसंपत्ती नवी नवी धुंडाळतात
             तेव्हा अर्थव्यवस्थेची रेल्वे पटरीवर येते 
             भ्रष्टाचार करणारे मात्र हात धुऊन घेतात...!!"

                 कष्ट करणाऱ्या श्रमातून कामगार, शेतकरी किंवा मजूर असो त्यांच्याप्रती कवी प्राध्यापक कल्याण राऊत सर यांना सहानुभूती वाटते. कोलारचा खाणीत रात्रंदिवस कष्ट करणारे हात, पोटासाठी राब राब राबणारी मजूर, खनिजसंपत्ती साठी अथक परिश्रम करतात. शेतात कष्ट करणारा शेतकरी किंवा दोन वेळचे पोटभर घास मिळवण्यासाठी कष्ट करणारा कामगार खाणीवर काम करतात तेंव्हा कुठे देशाची अर्थव्यवस्था चालते पण भ्रष्टाचार करणारे मात्र एसीत बसून हात धुऊन घेतात हे वास्तविक सत्य मांडायलाही कविता भित नाही.

              सावित्रीच्या लेकी आम्ही 
              लागो ना अज्ञाना वारा 
              लढा स्वयं ध्येयाप्रती 
               अन्न वस्त्र आणि निवारा....!!

                 ज्या सावित्री मुळे आजच्या लेकी शिकून-सवरून शहाण्या झाल्यात. अनेक क्षेत्रात उंच भरारी स्त्रियांनी घेतली. पण त्या माईलाच विसरत चालल्या आहेत. शिकलेल्या स्त्रियांनासुद्धा अडाण्यासारखे बुवा, महाराज, वृत्त, वैकल्य, साधू, बापू च्या मागे लागलेल्या दिसतात. अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका. स्वतःच्या ध्येयप्राप्तीसाठी लढा आणि अन्न वस्त्र निवारा मिळवा. स्वतःच्या पायावर स्वावलंबी जीवन जगायला शिका. सावित्री विद्येची खरी देवता आहे तिनेच खरी मानवता शिकवली त्याच मार्गाने चला.... असे कवी राऊत आवर्जून सांगतात.
            डबघाई, आभार, काहूर,रूप पालटले, पत्रावळी समरस्ता, कर्मभूमी, जमीन, माझे अस्तित्व, विद्याधन, प्रिय मृत्यू , धुळवड, पाटलाचं गाव, घाबरलोय, मानलेलं नातं, कोरड्या मातीत, अरे शेतकरी दादा... अशा अनेक रचना विविधांगांनी नटलेल्या वास्तवता दर्शविणाऱ्या, स्वतःचे कर्तव्य सांगणाऱ्या शेती, माती, शेतकरी व त्यांचे कष्ट सांगणाऱ्या सहज साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे थेट काळजाला भिडणाऱ्या कविता आहेत. कवी मनाच्या अंतर्मनातील काव्याचे बिंब शब्दाच्या रूपाने काव्यबद्ध होऊन बिंब-प्रतिबिंब च्या रूपाने वाचकांसमोर आले आहेत सर्वांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब होय या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता मनाला साद घालणा-या आहेत.

           कवी प्राध्यापक कल्याण राऊत सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....

समीक्षिका,लेखिका, कवयित्री, शिक्षिका 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम 
मोबाईल 9767663257

Saturday, 13 February 2021

*वीरांगना झलकारीबाई*

*थोर विरांगना झलकारीबाई*

       देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारी इतिहासकालीन थोर विरांगणा म्हणजे झलकारीबाई. जिचे नाव आजही बऱ्याच स्त्रियांना माहिती नाही. झलकारी बाईचा जन्म उत्तर प्रदेशातील झांसी जवळच्या भोजला या छोट्याशा गावात कोळी समाजामध्ये झाला. वडील सदोवा सिंह आणि आई यमुना देवी यांच्या पोटी २२ नोव्हेंबर १८३० रोजी त्यांचा जन्म झाला. झलकारीबाई खूप छोटी असतानाच बालपणी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी त्यांना मुला प्रमाणे सांभाळले. स्वसंरक्षणाचे सर्व धडे झलकारीबाईना देऊ लागले. तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, भाला फेकणे, अशा सर्व युद्ध कौशल्यात झलकारीबाई पारंगत झाल्या.
           झलकारीबाई शूरवीर, धाडसी, पराक्रमी योद्धा होत्या. एकदा झलकारीबाई जंगलात गेल्या असताना अचानक त्यांच्यासमोर वाघ आला. वाघ भुकेने व्याकुळ झालेला डरकाळी फोडत धावत झलकारी बाईच्या अंगावर चवताळून येणार इतक्यात झलकारीबाईनी कमरेला अडकवलेली कु-हाड वाघावर भिरकावली. तेवढ्यात वाघ रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. स्वतःचे रक्षण करणारी धाडसी स्त्रीचा इतिहास वाचला तरी आजच्या काळातील स्त्रियांच्या अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर एक वेळ चोरांनी एका व्यापार्‍याला  लुटलं होतं. तेव्हा झलकारीबाई वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून त्या चोराच्या दिशेने जाऊन त्यांच्या सोबत लढाई करून सर्व चोरांना सळो-की-पळो करून सोडले. आणि लुटलेला माल तिथेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन चोर पसार झाले.झलकारीबाईच्या शौर्याचे किस्से पंचक्रोशीत सर्वदूर पसरले होते.
               झलकारी बाईचा विवाह तोफखान्याचे काम करणाऱ्या शूर सैनिक पुरणसिंग यांच्याशी झाला. झलकारी बाईच्या धाडसाचे, शौर्याचे किस्से राणी लक्ष्मीबाई ऐकून होत्या. एकवेळ पूजेच्या समयी दोघींची भेट झाली. आणि काय आश्चर्य राणी लक्ष्मीबाई अचंबित झाल्या. झलकारीबाई दिसायला हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. नंतर राणी लक्ष्मीबाईने स्त्री लष्करात झलकारीबाई यांना सामील करून घेतले. पुढे झलकारीबाई त्यांची मुख्य सल्लागार बनल्या.
              १८५७ च्या युद्धात जनरल ह्यू रोज या इंग्रज अधिकाऱ्याने अफाट सैन्यानिशी झांसीवर आक्रमण केले.२३ मार्च १८५८ मध्ये सैन्यानिशी झांसीवर आक्रमण करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई पेशव्यांकडून मदतीची अपेक्षा धरत बसल्या होत्या. पण कोणाचीही मदत मिळाली नाही. एवढ्या बलाढ्य सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही. असे राणी लक्ष्मीबाईंना वाटू लागले. कारण तात्या टोपे हे जनरल ह्यु रोज कडून पराभूत झाले होते. बघता बघता इंग्रजांचे सैन्य झाशीमध्ये पोहचले. इतक्यात झलकारीबाई ने राणी लक्ष्मीबाईचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः राणीच्या वेशात समोर आली. व जोरदार लढाई सुरू केली. तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई निसटून पळून जाण्यासाठी वेळ मिळाला.  इकडे युद्धात झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई सारखा वेश परिधान केल्याने व दिसायला हुबेहूब लक्ष्मीबाई सारखी दिसत असल्याने लढाई सुरू केली.आपण राणी लक्ष्मीबाईशींच लढत आहोत याचं भ्रमात इंग्रज राहिले. तेवढ्यात झलकारीबाई जनरल ह्यु रोज यांना भेटण्यासाठी गेल्या. इंग्रजांना मोठा आनंद वाटला की झांसी तर आपल्या ताब्यात आली आहे. पण त्यांची राणी सुद्धा आपल्या ताब्यात आली. तेवढ्यात तिथला एक सैनिक झलकारीबाई यांना ओळखत होता त्यांनी सांगितले की ही राणी लक्ष्मीबाई नसून त्यांची सैनिक झलकारीबाई आहे. तेवढ्यात राणी लक्ष्मीबाई सुखरूप स्थळी जाऊन पोचल्या होत्या.
        जनरल ह्युजने झलकारीबाईना  एक प्रश्न विचारले तो असा ....तुमच्या सोबत काय करायला पाहिजे? त्यावर मनाने खंबीर असणाऱ्या झलकारीबाईने उत्तर दिले की.... मुझे फासी दे दो | झलकारीबाईचे इतके साहस पाहून ह्यु रोज प्रभावित झाला आणि म्हणाला .... "यदि भारत की एक प्रतिशत महिलांये भी उसकी जैसी हो जाये, तो ब्रिटिश सरकार को जल्द ही भारत छोडना पडेगा |
        अशी धाडसी विरांगणा अखेरपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढत राहिली. त्यातच त्यांना वीरमरण आले. जेव्हा इंग्रजांना माहिती झाले की ज्या महिलेने त्यांना युद्धात सळो कि पळो करुन सोडले होते ती महिला राणी लक्ष्मीबाई नसून झलकारी राणी होती. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...भारत सदा ही अशा नारींचा सन्मान सदैव करेल...
            कवी मैथिलीशरण गुप्त यांनी तिच्या शौर्याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे. 

                "जाकर रण में ललकारी थी |
                वह तो झांसी की झलकारी ती |
                गोरों से लढना  सिखा गयी |
                 है इतिहास मे झलक रही 
                 वह भारत की ही नारी थी |"

                   अशा या महान विरांगणेचा भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी झलकारी राणीच्या स्मरणार्थ पोस्टात एक तिकीट काढले आहे. त्यांचे स्मारक अजमेर,राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारने एक प्रतिमा आग्रा येथे स्थापन केली आहे. लखनऊमध्ये झलकारीबाई वर एक हॉस्पिटल उघडण्यात आले आहे. अशा या महान विरांगणीचा इतिहास आजच्या काळातील सर्व स्त्रियांना माहीत असला पाहिजे. ८ मार्च जागतिक दिनाच्या निमित्ताने अशा धाडसी विरांगणेला माझा मानाचा मुजरा....!!
       सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

                   झलकारीचे शौर्य घे 
                   घे जिजाऊचे संस्कार 
                   आकाशाला कवेत घे 
                   कर सावित्रीचे स्वप्न साकार....!!

                    घे अहिल्येचा कणखर बाणा 
                    मुक्ता साळवेचे धाडस घे 
                    रमाईचा त्याग शिक जरा
                     ताराराणीची कार्यकुशलता घे....!!

                     अन्यायावर मात करण्या
                      कधी तानुबाई बिर्जे हो तू
                     अंध:काराला दूर सारण्या
                      हो कधी दिव्याची वात तू.....!!

                       फातिमॉं बी सारखी तळमळ ठेव  
                       रख्माबाई राऊत सारखी सेवा कर
                       सावित्रीची खरी लेक हो तू
                       अन्यायावर उठून प्रहार कर....!!

लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
फोन ९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com

Thursday, 11 February 2021

 *अंतर्मनाला स्पर्श करणारा काव्यसंग्रह म्हणजे -अंतर्मन*




            उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी या खेडेगावातील हिराचंद गुंडाप्पा देशमाने यांचा अंतर्मन हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ माणसाला अंतर्मुख करून विचार करायला लावणारे आहे तर मल पृष्ठावर कवी हिराचंद देशमाने यांचे खेड्यातील आयुष्य,परंपरा,संस्कार, सदाचरण, साधेपणा व नातेसंबंध जोडत प्रेम, वात्सल्य, गरीबाविषयीची कणव, निर्मोही जीवन आणि उदात्त अशी ओढ सांगणारी आहे.या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती फेब्रुवारी २००६ साली प्रकाशित झाली आहे.प्रकाशिका सौ.अनिता देशमाने असून मुद्रक जयंती ऑफसेट ,सोलापूर येथून झाले आहे. या काव्यसंग्रहाला दत्ता हलसगीकर यांची प्रस्तावना लाभली असून श्री सी.एन भातलोंढे सरांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे पण यातील कविता लाखमोलाच्या आणि काळजाला स्पर्श करणा-या आहेत.

        

         "आईचं हृदय आकाशाहुन विशाल 

         आम्ही आनंदाने बागडतो खुशाल 

          आई देवता थोर 

          आम्हासाठी कष्ट ते अपार...!!"


           वरील ओळी मध्ये कवी आपल्या आईच्या विशाल ह्रदयाची महती सांगतो आहे. आईचं काळीज आकाशाएवढे विशाल असतं आईचे ह्रदय जगात एकमेव आहे.जिथे अनेक गुन्हे माफ होतात. आईच्या ह्रदयाच्या पंखाखाली तिचे लेकरं आनंदाने बागडत असतात.आई म्हणजे साक्षात देवताच आहे. तीच आपल्यासाठी रात्रीचा दिवस करून अपार कष्ट करते असे कवीला वाटते.


               "घरोघरी टी.व्ही दादा

               संस्कारावर पडला पडदा 

               आई बाबा शब्द विसरला 

               मम्मी-पप्पा लागला म्हणायला...!!"


             आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक घरात टीव्ही दादा बसलेला आहे.सान- थोरापासून सर्वजणच तासन-तास त्या टीव्हीच्या समोर बसलेले असतात. त्यामुळे टीव्हीवर दाखवणारे सिरीयल पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव लहान मुलांच्या मेंदूवर पडत असून आज प्रत्येक मुल स्वतःच्या आईला माय किंवा आई न म्हणता मम्मी आणि  बाबांना पप्पा म्हणत आहेत. खरंतर थडग्याला  मम्मी म्हणलं जातं. इतका वाईट परिणाम या टी.व्ही.चा होताना दिसतो आहे. त्यामुळे सुसंस्कारित असलेल्या कवीच्या हळव्या मनाला ही सल बोचताना दिसते आहे.


                 "कष्टकरी देशाचा कणा 

                 जाणा कष्टकऱ्यांना 

                  माना कष्टकऱ्यांना 

                  पूजा कष्टकऱ्यांना 

                 मोल द्या त्यांना.....!!"


         भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि  कष्टकरी हा या देशाचा कणा आहे,त्याचबरोबर श्रमिकांचा देश आहे. या देशात अनेक लोक फार कष्ट करतात. कष्टक-यांमुळेच तर मोठमोठाले बंगले बांधले जातात. ज्या हातांनी मजूर विटा रचत असतात आणि बंगले तयार होतात पण मजुरांच्या वाट्याला मात्र झोपडीच असते. कष्टकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतो म्हणून सर्वांना अन्नधान्य मिळते. म्हणून कवी म्हणतो मोलमजुरी करणाऱ्या लोकांची मन जाणायला शिका त्यांना मान द्या. कष्टकऱ्यांची पूजा करावी असे कवीला वाटते.


                       "दुसऱ्याच्या दुःखासी

                       जाणून समजून घ्यावे 

                       मैत्री असावी दुःख निवारण्याची

                        दुसऱ्याच्या दुःखावर 

                       मायेची फुंकर घालण्याची....!!"


          संवेदनशील मनाच्या कवीला दुसऱ्याच्या दुःखांची खूप चिंता आहे. इतरांचे दुःख पाहून कवी व्याकूळ होतो.इतरांचे दुःख ते माझे दुःख असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. मैत्री अशी असावी की आपला मित्र जर दु:खी असेल किंवा संकटात असेल तर ते दुःख निवारण करणारा, दुःख दूर करणारा मित्र असावा. इतरांच्या दुःखावर मायेची फुंकर मारणारा, मदत करणारा, जिवाला जीव देणारा मित्र असला पाहिजे असे कवीला वाटते.


                "ध्येय स्वप्नातील 

               आशा आकांक्षाची 

                फुलबाग फुलविण्यासाठी

                जीवन जगायचं असतं 

                दीनदलित ,गोरगरीब

                अनाथांचे नाथ होऊन त्यांच्या 

                आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 

                जीवन जगायचं असतं....!!"


              मनुष्याच्या जीवनात ध्येय,आशा-आकांक्षा याला फार महत्त्वाचे स्थान असते. आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी उच्च ध्येय गाठण्यासाठी आपल्या आयुष्याची फुलबाग फुलविण्यासाठी जीवन जगायचं असतं. आपल्या आजूबाजूला दीन-दलित,गोरगरीब, मनात कोणी दिसले तर त्यांना मदत करण्यासाठी माणसाने पुढे धावले पाहिजे. तरच आपल्या आयुष्यात आनंद फुलेल यासाठी जीवन जगायचं असतं. असं कवीच्या अंतर्मनाला सदैव वाटतं.

            हळव्या मनाच्या संवेदनशील कवीला आजूबाजूच्या लोकांचे दुःख पहावले जात नाही. आपले लाख मुलाचे आयुष्य भरभरून जगा व जगता जगता इतरांनाही मदतीचा हात द्यावे.प्रेम, वात्सल्य,मायेने भरभरून गेलेल्या कवीला एकतर्फी प्रेम नकोसं वाटतं. प्रेम हे हिमपर्वतासारखे उत्तुंग असावं, तर अथांग सागराप्रमाणे महान असावं, जीवाला जीव देणार असावं,तर धुतलेल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ,गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असावं असा कवीच्या अंतर्मनाला वाटतं.

              अंतर्मन या काव्यसंग्रहात एकूण ५१ कविता असून त्या सर्व काळजाला स्पर्श करणार्‍या आहेत. स्वार्थाने बरबटलेल्या माणसाला अंतर्मुख करायला लावणा-या आहेत. आईप्रति माया, श्रमिकाप्रति  प्रेम, नात्यांचा गोडवा, दु:खीतांची चिंता, माहेरची ओढ, जीवन जगण्याची रीत, इतरांचं हित, आपुलकीचा भाव,गरिबीची जाणीव, संस्काराची उणिव सांगणा-या आहेत .

             कवी हिराचंद देशमाने यांचा हा पहिला काव्यसंग्रह असून पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा....!!


समीक्षिका, लेखिका,शिक्षिका,संपादिका, कवयित्री 

 कु. मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 

ता.जिल्हा .वाशिम

मो.9767663257

Wednesday, 10 February 2021

गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह म्हणजे-'गावठी गिच्चा'

 *गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह म्हणजे- गावठी गिच्चा*

              सांगली जिल्ह्याचे कर्नाळ गावचे सुपुत्र लेखक सचिन वसंत पाटील यांचा 'गावठी गिच्चा' गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे, ग्रामीण भागातील घरे, शेतावर जाणारा शेतकरी,त्याची बैलजोडी, बैलगाडी, शेतावर जाणाऱ्या बायका, आणि चिखलात पाय रोवून उभी असलेली व एका पायात काटा रुतलेली लक्ष्मी असे सुंदर मुखपृष्ठ वाचनासाठी उत्सुकता निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहाचे प्रकाशन तेजश्री प्रकाशन पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती १६ नोव्हेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. डॉक्टर तारा भवाळकर यांनी पाठराखण केली असून मूल्य केवळ दोनशे रुपये आहे.पण यातल्या सर्वच कथा वाचकाला वेड लावणाऱ्या आहेत.
              लेखक सचिन पाटील यांचा पहिला कथासंग्रह सांगावा, दुसरा कथासंग्रह अवकाळी विळखा. ज्याला अनेक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गावठी गिच्चा हा त्यांचा तिसरा कथासंग्रह आहे. ज्याला पंचतत्व सेवा प्रतिष्ठान सांगलीचा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. प्रत्येकाला सर्वात प्रिय आपला गाव असतो. मग तो शहरात राहायला गेलेली व्यक्ती असो किंवा गावात राहणारी व्यक्ती असो.गाव म्हणलं की त्याचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण गावाच्या मातीत त्याचं बालपण गेलेलं असतं. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याला बालपणीच्या आठवणी, गावातले खेळ, गावातले रस्ते, गावातलं बालपण, बालपणीची मौज-मजा, गावातले चौक, देऊळ,रस्ते,कट्टे, गावची नदी,बोराची झाड, गाई म्हशीचे गोठे, दुकाने सर्व आठवल्याशिवाय राहत नाही.
             लेखक सचिन पाटील यांच्या गावात फेरफटका मारण्यापुर्वीचा भाग वाचताना त्यांचे कर्नाळ गाव जणूकांही नजरेसमोर उभे राहते. वाचकाला वाचताना जणू आपण त्या गावात प्रत्यक्ष गेल्याची अनुभूती येते.लेखक सचिन पाटील यांची अस्सल ग्रामीण भाषा, मध्ये मध्येच बोलीभाषेतून मारलेला गावराणी विनोद, वाचकाला हसवून जातो. त्यांची गावाकडची साधी, सरळ, सोपी भाषा वाचकाला भुरळ पाडणारी आहे. गावाकडची साधीभोळी पण मनाने श्रीमंत असणारी माणसं, एकमेकांच्या मदतीला जाणारी, नात्यातला आपलेपणा ओळखणारी, जिवाभावाची माणसं,गावाकडची शुद्ध, मोकळी हवा, गावातली कमी शिकलेली पण आपुलकीचा झरा वाहणारी मोकळ्या मनाची माणसं हे सारं अनुभवायला मिळतं. आजही जेंव्हा कोरोना आला तेंव्हा शहराकडची बहुतांश लोकांनी आपला गाव गाठला. कधी नव्हे ते गावाकडे न जाणारी मंडळी गावचा रस्ता धरली. शेवटी आपला गावच बरा... असं वाचकाला वाटून जातं. गावठी गिच्चा या काव्यसंग्रहातील सर्वच कथा गावच्या माणसांच्या आहेत त्यामुळे त्या जिव्हाळ्याच्या आपुलकीच्या वाटतात.
                'उमाळा' या कथेतील पुष्पा अक्का जरी स्वभावाने फटकळ असली तरी तिच्या प्रेमाचा उमाळा रामभाऊनांच नव्हे तर समस्त वाचकांना बहीण-भावाच्या नात्याविषयी प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, आदर,व्यक्त करणारा वाटतो. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक वाटते. बहिण कितीही रागात असली तरी तिच्या मनातले प्रेम ती  दाखवत नाही आणि लपवत ही नाही. भावाने बहिणीची केलेली विचारपूस आणि बहिणीने भावा बद्दलचे प्रेम. तिच्या प्रेमाचा उमाळा,बहिणीचे पाणी लागेल म्हणून दिलेला आशीर्वाद वाचकाला वेड लावून जाते.
             दंगल या कथेमध्ये रेशम ची डिलिव्हरी जवळ आलेली, दंगलीत सर्वत्र कडकडीत बंद असताना त्यांना मदत करणारा ख्रिश्चन धर्माचा जेकब अॅटोवाला आपल्या जिवाचा आटापिटा करून स्वतःच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघतो.  वाटेत त्याला मदत करणारा पुढारी कार्यकर्ता राजू हा हिंदू असून देवासारखा मदतीला धावून येतो.आणि अॅम्बुलन्सची व्यवस्था करतो.जातीय दंगली पेटलेली असतानाही हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन असे धर्म वेगळे असले तरी त्यांच्यातली ही माणुसकी जिवंत असल्याचे ऐक्य साधणारी कथा खूप काही शिकवून जाते.
           सुली या कथेमध्ये सोळा-सतरा वर्षाची सुली स्वतःचं तरुणपण जपण्यासाठी, शील जपण्यासाठी रात्रभर कोपीत जागी राहते. आई गावाला गेलेली आणि बाप उसाच्या गाडीवर गेलेला सुलीच्या जवानी वर वखवखलेल्या नजरेने बघणारा मुकादम, कारखान्यावरची टवळी पोरं अचानक अंधाऱ्या रात्री सुलीच्या घरा भोवती घिरट्या घालणाऱ्या वासनांध नजरा, पळणाऱ्या पावलांचा आवाज ऐकून घाबरून गेलेली सुली कुडाला अडकवलेला कोयता स्वयंसंरक्षणासाठी हातात घेऊन झोपी जाते. आजच्या काळातील स्त्रियांना स्वयं संरक्षणाचे धाडस दाखवून जाणारी ही कथा अंगावर शहारे आणणारी आहे.डोरलं या कथेत कष्ट करणारी सवी नवरा मेल्यावर परिस्थितीने हतबल होते. पतसंस्थेच्या कर्जापायी आत्महत्येचा विचार करते पण पोटच्या गोळ्यासाठी तो विचार बाजूला सारून परिस्थितीशी दोन हात करायला शिकते. वासनांध असलेला नामदेव सावकाराचे पैसे घेणे सवीच्या सद्सदविवेक बुद्धीला पटत नाही. त्यासाठी तिच्या नवऱ्याचं डोरलं विकायला तयार होते आणि आत्मसन्मानाने जगायला शिकते. माणूस परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. हे ही कथा शिकवून जाते.
           गावचे स्टॅन्ड ही कथा वाचकाला खूप हसायला लावते. शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. ग्रामीण भागात आजही लालपरी म्हणजेच एसटीची वाट पाहणारे लोकं आणि त्यांची एसटीत चढण्याची घाई डोळ्यांसमोर दिसते. अभ्यास न करता पास व्हावे म्हणून मारुतीला नवस बोलणारा साहेब.  शेवटी नापास होतो मग त्याच्या लक्षात येतं की देव काय पास करत नाही. पास होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. सायब्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तो अभ्यासाला लागतो.साहेब ही कथा अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे. लेखक सचिन पाटील म्हणजे या कथेतील साहेब पाटलाचा दोस्त जो खूप अभ्यास करणारा असतो. आजच्या काळात चकवा म्हणजे अंधश्रद्धा कशी असते? हे सांगण्यासाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी चकवा ही कथा अंधश्रद्धेची मुठमाती करणारी आहे. 
             आदर्श गावात तंटामुक्ती योजना कशी सफल होते? हे तंटामुक्ती या कथेतून कळते. बारीकसारीक तंटे व गावकऱ्यांनी त्यातून काढलेला मार्ग वाखाणण्याजोगा आहे. टोमॅटो केचप विनोदी कथा वाचताना वाचकाचे भान हरपल्याशिवाय राहत नाही. नवरा-बायकोच्या प्रेमाची व त्यांच्यात उडणाऱ्या खटक्यांची सरमिसळ म्हणजे गावठी गिच्चा ही कथा शेवटी वाचकाला विचार करायला भाग पाडते. नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकाला कसं समजून घ्यायचं?  हे कळत नकळत शिकवून जाते.
              ग्रामीण साहित्यातले लेखक सचिन पाटील यांचा गावठी गिच्चा  या कथासंग्रहात एकूण १२ कथा वाचकाला वाचनाची ओढ लावणार्‍या आहेत. त्यांची साधी सरळ भाषा हृदयाला भिडणारी आहे. सर्वच कथेमध्ये वाचक स्वतः असल्याची अनुभूती तर येतेच शिवाय ग्रामीण भागातल्या गावचे चित्र नजरेसमोर उभे राहते. ही ताकद अस्सल गावरानी, गावाची ओढ असलेल्या, अपंगावर मात करणाऱ्या, मनाला आशेचे पंख लावणाऱ्या व सर्वांच्या पसंतीस गावठी गिच्चा उतरविण्यास भाग पडणाऱ्या दमदार उत्कृष्ट लेखनशैलीची उपजत कला असलेल्या ध्येयवेड्या लेखक कथाकार सचिन पाटील यांना कौतुकाची थाप देणा-या आहेत.
          पुढील वाटचालीसाठी लेखक सचिन पाटील यांना भरभरून शुभेच्छा....

समिक्षिका,लेखिका, शिक्षिका,कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

 पुस्तकाचे नाव-गावठी गिच्चा
 लेखक-सचिन वसंत पाटील
 प्रकाशक-तेजश्री प्रकाशन पुणे
 एकूण कथा- १२
मूल्य-२०० रूपये
लेखकाचा मोबाईल नंबर-८२७५३७७०४९

Tuesday, 9 February 2021

प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे- प्रेमकमळ

 *प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रेमकमळ होय*

         बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, लेखक, प्राध्यापक देवबा पाटील यांचा प्रेमाने ओतप्रोत भरलेला, प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रेमकमळ. प्रेमकमळ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, तळ्यांमध्ये अनेक प्रेम कमळांनी भरलेले आहे. त्याच तळ्यात प्रेम करणारे दोन बदक व भोवताली निसर्गाचा अनमोल खजिना म्हणजे नानाविध सुगंधी फुलांनी भरलेला मळा मनाला भुरळ घालणारा आहे. काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सूर्यकांत तायडे यांनी लिहिली आहे. तर प्रकाशन कृष्णायन प्रकाशन पुणे यांनी केले असून याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे.पण यातील सर्वच कविता प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत
           प्रेम हेच जीवन.प्रेमानेच घराला घरपण येते. प्रेमाने जीवन सुगंधित होते. प्रेमाने जीवनाला खरा अर्थ येतो. प्रेमाची अनेक रूपे आहेत. हे रूपच जीवनाचे सौंदर्य. खरे अलंकार आहेत. आई-वडिलांचे मुलामुलींवरील प्रेम, आजी-आजोबांचे नातवंडावरील प्रेम, पती-पत्नींचे एकमेकांवरील प्रेम, बहिण भावाचे अतूट प्रेम,भावा-भावा वरील प्रेम,मित्रमैत्रिणीचे अपार प्रेम, देशावरील प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम,  ईश्वरावरील निस्सीम प्रेम अशा प्रेमळ भाव वरच हे जग चालले आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने बोललेलंच आवडतं. राग कोणालाही नकोसाच आहे. याचा अर्थ प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे.
            कवी प्रा.देवबा पाटील यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. ते त्यांच्या कवितेत युवकांना, तरुणांना आवाहन करीत आहे. ते म्हणतात... 

          हे युवका ! तोडुनी बंधने सारी 
          गरुडासारखी मार भरारी 
          विशाल गगनावरी 
          ये घेऊनी तारका भुवरी...!!

           आजच्या तरुण पिढीला कवी आवाहन करतो की हे युवका तू सारी बंधने तोडून टाक आणि गरुडासारखी भरारी घे. विशाल गगनावरी जाऊन एकदा आकाश कवेत घे. तारका भुवरी आण म्हणजेच तारखा प्रमाणे देदीप्यमान यश संपादन कर. अनिष्ट प्रथा बाजूला सारून देशावर प्रेम कर. देशासाठी जग आणि वेळ आली तर देशासाठी बलिदान दे. सिंहासारखी झेप घे. आणि समाजाचे धुर्त कोल्हे आहेत त्यांच्या मानगुटीवर जाऊन बस. अशा लबाड लांडग्यांना वठणीवर आण. त्यासाठी तू स्वतः एक आदर्श व्यक्ती हो. असे आजच्या पिढीला जी पिढी गोवा, गुटखा खाण्यात सिगारेट  ओढण्यात आणि रिकामी बोटं मोबाईलवर खेळत असलेल्या तरुण पिढीला कवी कळकळीने सांगतो आहे.

              आजची कन्या 
              उद्याची माता 
              कन्या ही संस्कृती 
              तीही भाग्यविधाता...!

              आजची नंदिनी 
               भावी संस्कारखाण
               आपल्या घराची 
               तीही आहे शान....!!

               कन्या धनाची पेटी
               कन्या ही परीस 
               कन्या आपला अंश 
               तिला ही करा वारस....!!

            आज आपण मुलगा मुलगी एकसमान जन म्हणती खरे, पण मुलीच्या नावावर प्रॉपर्टी हव्या तितक्या प्रमाणात केली जात नाही. एकदा मुलीचे हात पिवळे केले की झालं. मुलगी म्हणजे परक्याचं धन असं मानणारे लोकं आजही समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरत असतात. आजची जी कन्या आहे तीच उद्याची माता आहे. तीच खरी संस्कृती आहे. तीच संस्काराची खान आहे.कन्याच आपल्या घराचा मान शान आणि अभिमान आहे. कन्या रुपी परिस जिथे जाईल तिथे प्रेम, वात्सल्य,जिव्हाळा निर्माण होतो. तीच धनाची पेटी आहे.  तीच आपला अंश आहे. तिलाही नियमाने आपल्या घराचा वारस करायला हवे.असे कवी सांगितल्या शिवाय राहत नाही.

               प्रेम असावे स्वच्छ
               प्रेम नसावे जाळणारे
               प्रेम असावे हसवणारे 
              आयुष्याचं सोनं करणारे....!!

                सत्य प्रेम वाढवी आत्मशक्ती
                शुद्ध प्रेमाची असावी आसक्ती 
                शरीराकर्षण नसते शुद्ध प्रेम 
                परस्पर जिव्हाळ्याचे खरे प्रेम...!!

                माणसाचं प्रेम शुद्ध असावे,पवित्र असावे तरच ते चिरकाल टिकतं. अन्यथा खोटा आव आणून प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करणारे तोंडावर पडतात. त्यांचा खरा चेहरा एक दिवस समाजासमोर येतो. त्यामुळे प्रेमात दिखावा नको. प्रेम डोहातल्या स्वच्छ पाण्यासारखं असावं. प्रेम एकमेकांना उभारी देणार, विश्वासानं जोडणारं,एकमेकांना जीव लावणारं असावं, मग ते प्रेम आधार देणारं असावं ते प्रेम शेजाऱ्या-शेजाऱ्याचे असोत की नातेवाईकांचं असो. प्रेम जाळणारे नसावे, प्रेम एकमेकांना हसविणारे, फुलविणारे आणि आयुष्याचं सोनं करणारे असावे.
               प्रेमाला उपमा नाही म्हणतात अगदी तसेच प्रेम व्यक्त करायला आणि प्रेमावर लिहायला बोलायलाही शब्द तोकडेच पडतात. दोन जीव एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जरी ते बोलू शकत नसले तरी डोळ्याने प्रेमभाव व्यक्त करणारी असतात. तर काही जण फक्त मनाने बोलणारी असतात. हृदयाने हृदयाला जोडणारे प्रेम असावे. प्रेमामुळेच मानवाला खरी ऊर्जा व आत्मशक्ती मिळते. प्रेम जसे जगायला शिकवते तसेच विरहात मरायला देखील तयार होते. पण शुद्ध प्रेम असले तरच ते चिरकाल टिकतील. प्रेमात फक्त शरीर आकर्षण नकोत तर परस्पर जिव्हाळ्याचे खरे प्रेम असावे असे कवीला वाटते.
               कवीने पावसाचे धरणीशी असलेले प्रेम, नदीचे सागराशी असणारे प्रेम, सहचारिणीशी असणारे प्रेम, कोवळ्या कळ्यांवरचे अविरत प्रेम, सखी बरोबरचे प्रेम, कल्पनाविस्तारातील प्रियसीचे प्रेम, फुलपाखरांचे फुलावरील प्रेम, पक्ष्यांचे झाडावरील प्रेम,भारतीय प्रेमदिवस, सूर्याचे उषेवरील प्रेम, व्यथा, फुल, सहचारिणी, मोर, लांडोर, स्त्री-पुरुष,भारतीय पत्नी, प्रेमांकुर, प्रेमाची नानाविध रूपे, स्वप्नात धुंद करणारे प्रेम, एक होती मोहिनी इ.कविता प्रेमभाव व्यक्त करणाऱ्या व प्रेमरसानं चिंब भिजवणाऱ्या मानवी मनाला मोहिनी घालणाऱ्या आहेत.
         प्रेमकमळ या काव्यसंग्रहात एकूण ७२ प्रेमावरच्या कविता, प्रेमाची साद घालणाऱ्या आणि प्रेमाने सुगंधित करणाऱ्या अशाच आहेत.कवी लेखक प्रा.देवबा पाटील यांना पुढील काव्य लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

समिक्षिका, लेखिका, शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.9767663257