Monday, 21 February 2022

बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे-गंमत जत्रा

 *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे-गंमत जत्रा*

         लहान मुलांना प्राण्या-पक्ष्यांच्या,बाहुलीच्या, परींच्या, गोष्टी खूप आवडतात. तसेच बालकविताही खूप आवडतात. खेळणी आणि खेळ या गोष्टी तर बालकांचे भावविश्व समृद्ध करणा-या असतात.खेळण्यातल्या बाहुलीला सजवून तिला नवरी बनू पाहणारी उद्याची त्यांची स्वप्ने किंवा खेळण्यातले विमान घेऊन आकाशी उंच भरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न, कल्पनाशक्ती उद्याची स्वप्न सत्यात उतरण्याची प्रेरणा देत असते हेही तितकेच खरे.
       सोलापूर जिल्ह्यातल्या बालकवयित्री तथा उपक्रमशील शिक्षिका स्मिता आण्‍णासो मुराळी यांचा गंमत जत्रा हा दुसरा बालकवितासंग्रह नुकताच वाचनात आला. लहान मुलांना आवडेल असे नावाला साजेसे दर्जेदार मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी विद्यार्थ्यांनी कितीही हाताळले तरी टिकतील असे लवचिक पृष्ठे आहेत. प्रकाशक शिवांजली स्वामी, निर्मला पब्लिकेशन सोलापूर यांनी प्रकाशित केली असून याची प्रथम आवृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली. या बालकाव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ७५ रुपये असून यातल्या सर्वच कविता बालगोपालांना आवडणाऱ्या, गुणगुणायला लावणाऱ्या आणि प्रत्येक पहिली दुसरीच्या वर्गात आवर्जून शिकवाव्यात अशाच आहेत.
             संवेदनशील मनाची कवयित्री स्मिता मुराळी यांचे विद्यार्थ्यांशी दृढ नाते आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा चांगलाच लळा आहे. लहान मुलाप्रति गोडी, आदर, प्रेम, जिव्हाळा करूणा,वात्सल्य आहे. जेंव्हा एखादा कवी किंवा कवयित्री छान छान बालकविता लिहिते तेंव्हा समजून जायचं की ही कवयित्री कविता करताना लहान मुला इतकीच लहान होत असते. तेंव्हा त्या कविता, ते भाव तिच्या कागदावर उमटतात.स्मिता मुराळी यांचा बालविश्व हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला. गंमत जत्रा हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही. कवयित्री स्मिता मुराळी यांनी हा काव्यसंग्रह त्यांच्या आई श्रीमती विमल मुराळी यांच्या चरणी अर्पिला आहे. लहान मुले झोपेत अनेक छान छान स्वप्न पाहतात. ओरडतात,बोलतात हे काही नवीन नाही जहाज सवारी या बाल कवितेमध्ये समुद्राची छानशी सफर मुले स्वप्नात करतात आणि घरी परत येतात.
         लावून एक झाड ही कविता विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व पटवून सांगते.आणि विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करते.

         मुलांनो एक तरी 
         लावली का झाड? 
         उगीच का म्हणता
         ढगा पाऊस पाड?

          झाडांमुळे मिळते 
          शुद्ध स्वच्छ हवा
          मुलांनो एक तरी 
          झाड तुम्ही लावा!

         वरील ओळी बालमनाला  जाऊन भिडणा-या आहेत. बालकांना विचार करायला लावणा-या आहेत. जाब विचारणा-या आहेत. नुसतंच ये रे ये रे पावसा म्हणता त्यापेक्षा तुम्ही कधीतरी एखादं झाड लावले का?  मग उगीच ढगाला पाऊस पाड म्हणता? असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. झाडांमुळे मानवाला शुद्ध, स्वच्छ, हवा मिळते.शरीर निरोगी राहते. त्यासाठी मुलांनो तुम्ही एक तरी झाड लावा अशा सूचना वरील ओळीतून लक्षात येतात. बालपणी लहान मुलांना आई घास भरवताना चिऊच्या, कावळ्यांच्या, प्राण्यांच्या, फळांच्या, फुलांच्या, कविता, गाणी, गोष्टी, गप्पा सांगत असते. आणि अशाच गप्पा गाणी गोष्टी मुलांना आवडतात. मोबाईलचा अतिवापर चिऊताईचे जीवनमान, आयुष्य कमी करत चालले आहे. मोबाईल चे दुष्परिणाम ही बालकांना चिऊताई या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न कवयित्रींने केला आहे. आज आपण पाहतो मोबाईलच्या आभासी दुनियेत विद्यार्थ्यांचा हसणं, खेळणं, बालपण हिरावून घेतले आहे.बालकांना वेगवेगळे छंद जोपासावे म्हणून कवयित्री स्मिता मुराळी यांनी कवितेतून छान प्रकारे व्यक्त झाल्या आहेत.

            स्वतःसाठी काढू
            थोडा तरी वेळ
            सवडीने खेळू 
            आवडता खेळ

            हल्ली लहान मुले मैदानावर खेळताना दिसत नाहीत. कारण त्यांच्या हातातुन मोबाईल सुटत नाही. स्वतःला मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळ नाही.पण खेळ खेळायचा म्हणल्यास आवडीच्या खेळासाठी जरूर वेळ काढायला हवा.वरील ओळी शिकवून जातात. छंद जोपासल्यामुळे तुमचा कंटाळा निघून जाईल. तुम्हाला विरंगुळा पण मिळेल. जपूया छंद या कवितेतून कवयित्री बालकांना नाणी,नोटांचा संग्रह करण्यासाठी प्रेरित करतात. तसेच मैदानी खेळ, गडकिल्ले महाराष्ट्राचे दैवत आहेत. ते पहात जा आणि घाट माथ्यावर जाऊन मोकळा श्वास घ्या मोकळ्या गळ्याने मनसोक्त गा असे कवयित्री आवर्जून सांगते.

               पुस्तक वाटतात
               जिवलग मित्र 
               गाणी, गप्पा, गोष्टी
               रंगतदार चित्र 

                मित्र हा आपला 
                वाटतो ज्ञान 
                संगत याची 
                मिटवते अज्ञान.

            पुस्तकासारखा दुसरा खरा मित्र नाही. पुस्तकांनी कित्येकांचे आयुष्य घडवले आहे. पुस्तकच जिवलग मित्र आहेत. पहिले पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकात अनेक रंगतदार चित्र सुद्धा आहेत. पुस्तक हा मित्र सर्वांना ज्ञान वाटतो. जो कोणी पुस्तकाशी संगत धरतो त्यांचे अज्ञान आपोआप मिटते. अशी भावना नाजूक, कोमल मनाच्या कवयित्री स्मिता मुराळींना वाटते. जुळ्या बहिणींची गंमत, अगडबंब चिंगी, प्राण्यांचे शिबीर, वेडा आंबा अशा विनोदी कविता बालकांना आवडल्या शिवाय राहणार नाहीत. त्याच बरोबर लहान विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न पेरणा-या कविता बालमनावर कोरली जाते. विज्ञानाचे कुतूहल या कवितेमधून हळूच घडल्याशिवाय राहत नाही. यासारख्या कविता विद्यार्थ्यांना खूप आवडतील अशाच आहेत. अगदी लहान मुलांनाही समजेल अशी साधी सरळ, सोपी भाषा असल्यामुळे आणि प्रत्येक कवितेला अनुसरून चित्र असल्यामुळे बालकवितासंग्रह अधिक उत्कृष्ट बनला आहे. बालवयामध्ये विद्यार्थ्यांना जादूचं खूप आकर्षण असतं. जादुई पेन या कवितेतून पेनातील शाई कधीच संपू नये असं विद्यार्थ्यांना वाटतं. हिरवा डोंगर, बळी पिकवितो मोती, बियाणं, आली थंडी, बोलणारे झाड, सूर्य, नदी इत्यादी निसर्गाविषयीच्या कविता निसर्गप्रेमी बनवायला मदत करतात. निसर्गाविषयीची गोडी निर्माण करणाऱ्या आहेत.
         बळी पिकवितो मोती या कवितेतून कवयित्री शेतकर्‍याबद्दलचे प्रेम, त्यांचे कष्ट, मेहनत, बैलजोडीची साथ इत्यादीचे महत्त्व विशद करते. त्याच बरोबर बालमनावर शेतकऱ्याबद्दल आदर, शेतीमालाला भाव,पीक काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, कष्टाची जाणीव कवितेच्या माध्यमातून स्मिता मुराळी  व्यक्त करतात. मायेची सावली या कवितेतून कुटुंबाचा आधारस्तंभ बाप असतो. तर मायेची सावली देणारी आई असते. आई-वडील दोघेही रात्रंदिवस मुलंबाळासाठी कष्ट उपसतात. ही जाणीव कवितेच्या माध्यमातून बालमनावर बाल कवयित्री स्मिता मुरळी बाल संस्कार करण्याचा प्रयत्न करतात.
      आज पर्यंत एकवीसाव्या शतकात  बालसाहित्य जेवढ्या प्रमाणात प्रकाशित व्हायला हवे होते, तेवढ्या प्रमाणात ते झाले नाही. बालसाहित्य तयार करणे साधे काम नाही. त्याची परिणामकारकता बालमन घडवत असते. अशा छान छान गोष्टी, कथा, कविता, बालमनावर संस्कार करीत असतात.
         कवयित्री स्मिता मुराळी यांच्या गंमत जत्रा या बालसाहित्याची पाठराखण ज्येष्ठ लेखक बबन शिंदे यांनी केली असून यात एकूण ४० बालकविता बाल दोस्तांना गुणगुणायला लावणा-या आहेत.
     कवयित्री स्मिता मुराळी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  समिक्षिका /लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
 जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

1 comment:

  1. नेहमीप्रमाणेच अप्रतिम समिक्षण ताई.

    ReplyDelete