Friday, 11 February 2022

मिनाक्षी नागराळे राज्यस्तरीय माता रमाई पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय माता रमाई पुरस्काराने सन्मानित*

     वाशिमच्या मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील उपक्रमशील शिक्षिका यांना सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना दिनांक ७ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील स्थानिक अकोला नाका, भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, नागार्जुन बौद्ध अल्पसंख्यांक बहु सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने राज्यस्तरीय त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार- २०२२ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय माता रमाई पुरस्कार, संविधानाची उद्देशिका व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास कार्यालयाचे तालुका संरक्षण अधिकारी मा.धनगर साहेब, विशेष अतिथी पंचायत समिती सभापती सौ रेश्माताई योगीराज गायकवाड तर मुख्य अतिथी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त निलेश सोमानी, आकाशवाणी पत्रकार सुनील कांबळे, मुकनायक अध्यक्ष राजीव दारोकार, अशासकीय सदस्य सामाजिक वनीकरण विभाग वैशालीताई खोब्रागडे, पत्रकार संदीप डोंगरे,कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सोनाजी इंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल माता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात माता रमाई यांचा फार मोठा वाटा आहे.माता रमाई यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष व त्यागांनी भरले होते. त्याच प्रमाणे अनेक स्त्रिया आयुष्य जगत असताना संघर्ष व त्यागामुळे जीवन जगत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत कुटुंब घडविले आहे. अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संघर्षशील महिला वैशालीताई खोब्रागडे, शकुंतला गायकवाड, उषा संतोष भालेराव, शीलाताई गडेकर, मीनाक्षीताई नागराळे, इंदू पट्टेबहादूर, कुसुमताई सोनवणे अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न संस्थेचे अध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, प्रास्ताविक पी.एस. खंदारे तर आभार भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेजचे संचालक यशपाणी कंकाळ यांनी मानले.
        मिनाक्षी नागराळे यांनी परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन आपल्या जिद्दीच्या जोरावर जगत आहेत.त्यामागे त्यांचा प्रामाणिकपणा त्याग व समर्पण आणि विद्यार्थ्याप्रति असणारी निष्ठा यामुळे त्यांना आज पर्यंत पस्तिशीच्या वर राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल मिनाक्षी नागराळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment