Tuesday, 22 December 2020

*स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

 *स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ.प्रीती प्रकाश भिसे यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर एका स्त्रीचे चित्र आहे. प्रत्येक स्त्री त्या चित्रांमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. असे देखणे मुखपृष्ठ असून त्याचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन पुणे यांनी केले असून प्रस्तावना नागपूरच्या मीरा मितेश्री यांची लाभली आहे. तर मलपृष्ठावर शितल कुलकर्णी व प्रवीणा कुलकर्णी यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २ ऑक्टोबर २०२० ला झाले असून त्यात ५७ कविता आहेत. प्रत्येक स्त्रीची अनुभूती माझी स्वतःची सहानुभूती आहे.असे वाटणा-या कविता  स्त्रीमनाला स्पर्शून जाणा-या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण त्याचे मूल्य पैशात न मोजता येणारे आहे.
            बालपणी असणारी गोड मुलगी जशी मोठी होत जाते. तिच्या आयुष्याचे पाने अलगदपणे उघडत प्रत्येक गोष्टीत सहभागी होत. बालपणीचा आनंद लुटत अनेक सण समारंभ साजरे करत हळूहळू एक एक पाऊल पुढे सरकते. सासरी गेल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. विविधांगी जीवन जगत घरातल्या प्रत्येकाची काळजी घेत, थोरामोठ्यांचा आदर, कुटुंबाची जिम्मेदारी, मुलं-बाळं, नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक पैलूंनी तिचं आयुष्य सुगंधित होऊन जातं. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वेगळा अनुभव अनुभवत पुढे जाते. अशीच एक कविमनाची गोड स्त्री म्हणजे प्रीती भिसे.
          
                   हिरवाईने नटली वसुंधरा 
                   उधळत मुक्त स्वरूप 
                    पेटवून प्रदूषणाची ठिणगी 
                     मानव करतो तिला कुरूप...!!

             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री वसुंधरेचे तोंड भरून कौतुक करताना दिसते.हिरवळ कोणाला आवडणार नाही असा एकही माणूस जगाच्या पाठीवर दिसणार नाही. डोंगर-दऱ्या,नद्या-नाले, ओढे,आसमंनती पसरणारा धुंद गारवा, इंद्रधनु ही सर्व निसर्गाची मुक्त उधळण आहे. निसर्ग मानवाला भरभरून देतो पण या उलट माणूस प्रदूषण करून निसर्गाची घडी बिघडवतो. झाडे, जंगल तोडून निसर्गाची हानी करतो. इतक्या सुंदर निसर्गाला हावरट वृत्तीचा माणूसच कुरूप करतो असे कवयित्रीला वाटते.

                 समाजात या सुंदरतेला बहुमान 
                आंतरिक सौंदर्याची झुलती कमान 
                लग्नाच्या बाजारात गोर्‍या रंगाचे मोल
                 नाही बघत गुण कितीही असले अनमोल...!!

           सुंदरता कोणाला आवडत नाही.प्रत्येकालाच आवडते. सुंदरता ही प्रत्येक गोष्टीत लपलेली आहे फक्त ती सौंदर्य शोधणारी नजर पाहिजे. सौंदर्य हे निसर्गात तर, कोणाच्या काव्यात,तर कोणाच्या अभंगात तर कोणाच्या पूजनात,कोणाच्या कलेत तर कोणाच्या पाककलेत, तर कोणाच्या खेळात, तर कोणाचे देशाची सेवा करण्यात लपलेले आहे. आज समाजात जरी सुंदरतेला मान असेल पण आंतरिक सौंदर्य पण माणसाचे सुंदर असले पाहिजे. नाहीतर लग्नाच्या बाजारात गो-या रंगाला महत्त्व देणारी माणसं तया व्यक्तीचे आतले गुण कसे आहेत? हे मात्र पाहत नाही. मनुष्य दिसायला जरी काळा असला तरी चालतो पण त्याच्या आंतरिक सौंदर्य, त्याच्यातले गुण चांगले असले पाहिजेत. असे हळव्या मनाच्या कवयित्री वाटते.कवयित्री बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला जास्त महत्त्व देते.

           शिक्षकी पेशा 
           सन्मान देशा 
           घडवी गुरू 
           भविष्य रेषा 
            गुरू आदर
            मनी सादर
           गुरुची दीक्षा 
           ज्ञान जागर....!!

            देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक म्हणजे गुरू होय. गुरूच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक मुलाचे भवितव्य गुरु घडवतो. म्हणून शिक्षकी पेशाला देशात सर्वोच्च मान आहे.गुरु विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो म्हणून सर्वांनी गुरूचा आदर करावा. गुरुला वंदावे.गुरुबद्दल मनात सदैव आदर असावा कारण तोच ज्ञानाचा जागर आहे. गुरूंना मान सन्मान दिला पाहिजे. गुरू मुळेच प्रत्येकाचे आयुष्य घडत असते.याची जाणीव कवयित्री आपल्या पंचाक्षरी कवितेच्या ओळीतून देते.

             उमलते अंकुर प्रवेश 
             घडला ओळख कवी 
             संदीप खरे नामक 
             उजळला हा रवी......!!

             आजच्या काळातील प्रसिद्ध कवी संदीप खरे हे कवयित्रीचे आदर्श आहेत. संदीप खरे यांच्या अनेक कविता कवयित्रीच्या मनात घर करून राहतात. अनेक काव्य पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. पुण्यगौरव,झीगौरव, काव्यदीप पुरस्कार, आद्यकवी, मुकुंदराज, बालगंधर्व  इत्यादी पुरस्कारांमध्ये संदीप खरे यांनी बाजी मारली.त्यांचा चित्रपट दमलेल्या बाबांची कहाणी व त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व कवयित्रीला खूप आवडते त्यांच्या साहित्याची कवयित्री दीवानी आहे. आयुष्यावर बोलू काही संदीप खरे यांचे अत्यंत गाजलेली कविता कवयित्रीला खूप आवडते. म्हणून कवयित्री आपल्या शब्द सुमनांमध्ये संदीप खरे यांना  गुंतवले शिवाय राहत नाही.

             मराठी भाषेचे अग्रगण्य 
             कवी, लेखक,नाटककार 
             जाणिवेत ते आत्मनिष्ठ
             उत्तम समीक्षक नी कथाकार...!!
      
                  मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या कविता कवयित्रीला खूप भावणाऱ्या आहेत. त्यांच्यामुळे मराठी भाषेला मान मिळाला आहे. वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,नाटककार,लेखक,कथाकार,व समिक्षा असणारे वि.वा.शिरवाडकर म्हणजेच टोपणनाव  "कुसुमाग्रज" यांना गुरुस्थानी मानणारी कवयित्री प्रीती की तिच्या कवितेतून मानाचा मुजरा करते.
           आजच्या युगात ऑनलाइन व्यवहार करणारे, घरपोच होम डिलिव्हरी ने मोठ्या शॉपिंग मॉल्स मधून  वेगवेगळ्या वस्तू आज सहज घरपोच मागवत आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराची मजा कवयित्री दिलखुलासपणे आपल्या काव्यातून मांडते.त्याचबरोबर व्यायामाचे महत्त्व ही सांगते. स्पर्धेच्या युगात थांबला तो संपला पण क्षणभर विश्रांती किती महत्त्वाची आहे हे नमूद करायला कवयित्री अजिबात विसरत नाही. 
                    जीवनाच्या पायवाटेवर आलेली विविध अनुभूती आपल्या अनेक छंदमय येणाऱ्या प्रकारात सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न कवयित्री करते.जीवनाच्या पायवाटेवर या कवितासंग्रहातील कविता जगायला शिकवणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणार्‍या, प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या, दातृत्वाची शिकवण देणाऱ्या, अध्यात्माची आवड जपणाऱ्या,  सण आणि संतांचा महिमा सांगणा-या,निसर्गावर भरभरुन प्रेम करणा-या, भक्तीरसात तल्लीन होणाऱ्या, सर्व वाचकांच्या पसंतीस उतरणा-या अशाच आहेत.
         कवयित्री प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment