Saturday, 12 December 2020

जगण्याचे सामर्थ्य देणाऱा काव्यसंग्रह म्हणजे-आयुष्याच्या पानावर.

 जगण्याचे सामर्थ्य देणारा काव्यसंग्रह म्हणजे- आयुष्याच्या पानावर*

      पुण्याचे ज्येष्ठ कवी अरुण पुराणिक यांचा नुकताच प्रकाशित झालेला "आयुष्याच्या पानावर" हा काव्यसंग्रह वाचनात आला. कवी अरुण पुराणिक हे हाडाचे शिक्षक भावी पिढी घडवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे, सेवानिवृत्ती नंतर २८ वर्षांनी म्हणजे वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यावर कवितेच्या प्रेमात पडले. हे फार महत्वाचे आहे. आयुष्यात जे कांही अनुभव आले त्यातूनच अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन आयुष्याची पानं उलगडत आपले अनुभव शब्दांच्या माध्यमातून कवितेच्या रूपात मांडणारे कवी अरुण पुराणिक यांच्या कविता माणसाला संकटा समोर हतबल न होता जगण्याचे सामर्थ्य देऊन जातात.
        संग्रहाचे मुखपृष्ठ खूप विचार करायला लावणारे पण वास्तवाचे सत्य दर्शन करणारे आहे.त्यावर एक रिकामी खुर्ची आहे आणि खिडकीत दोन पक्षी आहेत. पक्षी कसला तरी वीचार करत खिडकीतून बाहेर डोकावत आहेत. मानवाचे आयुष्य ही असेच असते. प्रत्येकाला एक दिवस आपली खुर्ची सोडावी लागते.प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावाच लागतो हे अंतिम सत्य आहे.
            कवी अरुण पुराणिक यांनी अनेक संकटांचा सामना करत साहित्य क्षेत्रामध्ये वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर कवितासंग्रह काढणारे पहिलेच कवी असावेत. आयुष्य संपत आल्यानंतर आयुष्याच्या पानांवर कडू-गोड,सुख-दुखत आठवणी, त्याग,विरह, प्रेम आलेले सर्व अनुभव प्रत्येक पानावर उमटवत गेले. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २०सप्टेंबर २०२० ला आर्या प्रकाशन पुणे यांनी केले असून या काव्यसंग्रह मध्ये एकूण ६० कविता आहेत. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्राध्यापक विजय काकडे पुणे यांची असून या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे.पण यातली प्रत्येक कविता खुप आशयघन व मानवाला जगण्याचे सामर्थ्य देणारी आहे.या काव्यसंग्रहाची सुरुवात गणरायाला शब्द सुमने अर्पण करून ते थेट विसावा घेई पर्यंत आहेत.

            विचारात देव | देव आचारात |
            देवा आधारात | कल्याणात ||

     या वरील अभंगाच्या ओळीतून देव कोठे आहे? असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर देव माणसाच्या विचारात आहे. देव माणसाच्या आचारात आहे. देव माणसांत आहे. देवळाबाहेर जर एखादा मुलगा भुकेने व्याकूळ होऊन बसला असेल आणि  त्याच मंदिरात लोकं देवावर दुधाचा अभिषेक करत असतील तर त्याला काही अर्थ नाही. खरा देव हा माणसात लपला आहे. ते ओळखा आणि अडचणीत असलेल्या माणसांला आधार द्या. तरच देव तुम्हांला पावेल. त्यातच तुमचे कल्याण आहे... असे कवीला वाटते.

           चारा चोचीत पिलांच्या चिमणी देई.
           गोठ्यात वासरांना चाटतात गाई 
           उपमा कशाची देऊ वात्स्ल्यमूर्ती आई...!!

        जशी चिमणी आपल्या पिलांसाठी रानावनात भटकून चोचीत चारा आणते. तशाच गोठ्यातल्या गाई व ममत्वपूर्ण आपल्या वासरांना चाटतात.अगदी त्याप्रमाणेच आपणाला जन्म देणारी आई वात्स्ल्याची खरी मूर्ती आहे. या वात्स्ल्यमुर्ती आईला कशाची उपमा देऊ ? आईचे उपकार कधीही न फिटणारे आहेत. या वरील ओळींमधून कवींनी मर्मदर्,शी प्रेमरूपी वात्सल्याचे दर्शन घडवले आहे. संवेदनशील मनाचा कवी अप्रतिम शब्दरचना करूणरसात काव्य करतो.

               स्थायिभाव हा अविरत सेवा
               भक्कम पाया आदर्श विचारांचा 
               शस्त्र म्हणून घेतले सदविचारा
               शिक्षक असा मी समाज घडविता...!!

              प्रत्येक माणसांचा एक स्थायीभाव असतो. त्यात प्रेम,राग, हेवा,मत्सर,आपुलकी, जिव्हाळा,त्याग, सेवा इत्यादी गुण माणसांच्या ठायी असतात. पण कवि अरुण पुराणिक यांचा स्थायीभाव म्हणजे अविरत सेवा हे त्यांचे व्रत आहे. हा गुण त्यांच्या ठायी ठासून ठासून भरलेला आहे. त्यांच्या आयुष्याचा भक्कम पाया म्हणजे त्यांचे आदर्श विचार. त्यांच्या जोरावर ते आयुष्याची पाने अलगदपणे पलटवीत आहेत. सदविचारांना कवीने शस्त्र म्हणून हाती घेतले आहे. ज्या माणसांच्या ठायी सद् विचार आहेत तो मनुष्य कधीही पराभूत होऊ शकत नाही. ते एक शस्त्र आहे. सद्गुणांचे शस्त्र ज्याच्या हाती असेल तो कधीच भरकटणार नाही.गुन्हे करणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही. सद् विचारांच्यांच वाटेने जाणार आणि हा बदल फक्त एक शिक्षक करू शकतो. असाच मी एक शिक्षक आहे. समाज घडविणारा असे कवी मोठ्या अभिमानाने सांगतो.

               बहारदार हरित वृक्ष
               देतात प्राणवायू 
                त्यांच्याच कृपेने 
               लाभते मानवास आयु....!!

                 हरित वृक्ष माणसाला प्राणवायू देतात. त्याच बरोबर पाने, फुले-फळे,अनेक औषधे देतात. हरित वृक्ष नसते तर मानवाला ऑक्सिजन मिळाले नसते. त्यासाठी सर्वांनी वृक्ष लावायला पाहिजे. त्यांचे जतन, संगोपन, आणि संवर्धन केले पाहिजे.त्याच्याच कृपेने मानवाला हे आयुष्य मिळाले आहे असे कवीला वाटते.निसर्गावर भरभरून प्रेम करणारा कवी आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो.
          कवी अरुण पुराणिक यांच्या कविता निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या,वेळेचे महत्व सांगणाऱ्या,देशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या,क्रांतिकारकांबद्दल ऋण व्यक्त करणाऱ्या, माणसांत  देव शोधायला सांगणाऱ्या, देवावर श्रद्धा असणार्‍या,बहिणींशी नाते जोडणाऱ्या,मित्रत्वाचे प्रेम सांगणाऱ्या,कर्तव्यनिष्ठा, साहित्य व संस्कृती जपणाऱ्या, त्यागी जीवन जगणाऱ्या, संकटावर मात करून नव्या उमेदीने जगण्याचे सामर्थ्य देणाऱ्या कविता थेट काळजाला भिडणा-या आहेत. आयुष्य कसं जगावं यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे आयुष्याच्या पानावर.

    कवी अरुण पुराणिक यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा...!!

समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६८६६३२५७

No comments:

Post a Comment