Monday, 21 February 2022

बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे-गंमत जत्रा

 *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे-गंमत जत्रा*

         लहान मुलांना प्राण्या-पक्ष्यांच्या,बाहुलीच्या, परींच्या, गोष्टी खूप आवडतात. तसेच बालकविताही खूप आवडतात. खेळणी आणि खेळ या गोष्टी तर बालकांचे भावविश्व समृद्ध करणा-या असतात.खेळण्यातल्या बाहुलीला सजवून तिला नवरी बनू पाहणारी उद्याची त्यांची स्वप्ने किंवा खेळण्यातले विमान घेऊन आकाशी उंच भरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न, कल्पनाशक्ती उद्याची स्वप्न सत्यात उतरण्याची प्रेरणा देत असते हेही तितकेच खरे.
       सोलापूर जिल्ह्यातल्या बालकवयित्री तथा उपक्रमशील शिक्षिका स्मिता आण्‍णासो मुराळी यांचा गंमत जत्रा हा दुसरा बालकवितासंग्रह नुकताच वाचनात आला. लहान मुलांना आवडेल असे नावाला साजेसे दर्जेदार मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी विद्यार्थ्यांनी कितीही हाताळले तरी टिकतील असे लवचिक पृष्ठे आहेत. प्रकाशक शिवांजली स्वामी, निर्मला पब्लिकेशन सोलापूर यांनी प्रकाशित केली असून याची प्रथम आवृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली. या बालकाव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ७५ रुपये असून यातल्या सर्वच कविता बालगोपालांना आवडणाऱ्या, गुणगुणायला लावणाऱ्या आणि प्रत्येक पहिली दुसरीच्या वर्गात आवर्जून शिकवाव्यात अशाच आहेत.
             संवेदनशील मनाची कवयित्री स्मिता मुराळी यांचे विद्यार्थ्यांशी दृढ नाते आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा चांगलाच लळा आहे. लहान मुलाप्रति गोडी, आदर, प्रेम, जिव्हाळा करूणा,वात्सल्य आहे. जेंव्हा एखादा कवी किंवा कवयित्री छान छान बालकविता लिहिते तेंव्हा समजून जायचं की ही कवयित्री कविता करताना लहान मुला इतकीच लहान होत असते. तेंव्हा त्या कविता, ते भाव तिच्या कागदावर उमटतात.स्मिता मुराळी यांचा बालविश्व हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला. गंमत जत्रा हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही. कवयित्री स्मिता मुराळी यांनी हा काव्यसंग्रह त्यांच्या आई श्रीमती विमल मुराळी यांच्या चरणी अर्पिला आहे. लहान मुले झोपेत अनेक छान छान स्वप्न पाहतात. ओरडतात,बोलतात हे काही नवीन नाही जहाज सवारी या बाल कवितेमध्ये समुद्राची छानशी सफर मुले स्वप्नात करतात आणि घरी परत येतात.
         लावून एक झाड ही कविता विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व पटवून सांगते.आणि विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करते.

         मुलांनो एक तरी 
         लावली का झाड? 
         उगीच का म्हणता
         ढगा पाऊस पाड?

          झाडांमुळे मिळते 
          शुद्ध स्वच्छ हवा
          मुलांनो एक तरी 
          झाड तुम्ही लावा!

         वरील ओळी बालमनाला  जाऊन भिडणा-या आहेत. बालकांना विचार करायला लावणा-या आहेत. जाब विचारणा-या आहेत. नुसतंच ये रे ये रे पावसा म्हणता त्यापेक्षा तुम्ही कधीतरी एखादं झाड लावले का?  मग उगीच ढगाला पाऊस पाड म्हणता? असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. झाडांमुळे मानवाला शुद्ध, स्वच्छ, हवा मिळते.शरीर निरोगी राहते. त्यासाठी मुलांनो तुम्ही एक तरी झाड लावा अशा सूचना वरील ओळीतून लक्षात येतात. बालपणी लहान मुलांना आई घास भरवताना चिऊच्या, कावळ्यांच्या, प्राण्यांच्या, फळांच्या, फुलांच्या, कविता, गाणी, गोष्टी, गप्पा सांगत असते. आणि अशाच गप्पा गाणी गोष्टी मुलांना आवडतात. मोबाईलचा अतिवापर चिऊताईचे जीवनमान, आयुष्य कमी करत चालले आहे. मोबाईल चे दुष्परिणाम ही बालकांना चिऊताई या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न कवयित्रींने केला आहे. आज आपण पाहतो मोबाईलच्या आभासी दुनियेत विद्यार्थ्यांचा हसणं, खेळणं, बालपण हिरावून घेतले आहे.बालकांना वेगवेगळे छंद जोपासावे म्हणून कवयित्री स्मिता मुराळी यांनी कवितेतून छान प्रकारे व्यक्त झाल्या आहेत.

            स्वतःसाठी काढू
            थोडा तरी वेळ
            सवडीने खेळू 
            आवडता खेळ

            हल्ली लहान मुले मैदानावर खेळताना दिसत नाहीत. कारण त्यांच्या हातातुन मोबाईल सुटत नाही. स्वतःला मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळ नाही.पण खेळ खेळायचा म्हणल्यास आवडीच्या खेळासाठी जरूर वेळ काढायला हवा.वरील ओळी शिकवून जातात. छंद जोपासल्यामुळे तुमचा कंटाळा निघून जाईल. तुम्हाला विरंगुळा पण मिळेल. जपूया छंद या कवितेतून कवयित्री बालकांना नाणी,नोटांचा संग्रह करण्यासाठी प्रेरित करतात. तसेच मैदानी खेळ, गडकिल्ले महाराष्ट्राचे दैवत आहेत. ते पहात जा आणि घाट माथ्यावर जाऊन मोकळा श्वास घ्या मोकळ्या गळ्याने मनसोक्त गा असे कवयित्री आवर्जून सांगते.

               पुस्तक वाटतात
               जिवलग मित्र 
               गाणी, गप्पा, गोष्टी
               रंगतदार चित्र 

                मित्र हा आपला 
                वाटतो ज्ञान 
                संगत याची 
                मिटवते अज्ञान.

            पुस्तकासारखा दुसरा खरा मित्र नाही. पुस्तकांनी कित्येकांचे आयुष्य घडवले आहे. पुस्तकच जिवलग मित्र आहेत. पहिले पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकात अनेक रंगतदार चित्र सुद्धा आहेत. पुस्तक हा मित्र सर्वांना ज्ञान वाटतो. जो कोणी पुस्तकाशी संगत धरतो त्यांचे अज्ञान आपोआप मिटते. अशी भावना नाजूक, कोमल मनाच्या कवयित्री स्मिता मुराळींना वाटते. जुळ्या बहिणींची गंमत, अगडबंब चिंगी, प्राण्यांचे शिबीर, वेडा आंबा अशा विनोदी कविता बालकांना आवडल्या शिवाय राहणार नाहीत. त्याच बरोबर लहान विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न पेरणा-या कविता बालमनावर कोरली जाते. विज्ञानाचे कुतूहल या कवितेमधून हळूच घडल्याशिवाय राहत नाही. यासारख्या कविता विद्यार्थ्यांना खूप आवडतील अशाच आहेत. अगदी लहान मुलांनाही समजेल अशी साधी सरळ, सोपी भाषा असल्यामुळे आणि प्रत्येक कवितेला अनुसरून चित्र असल्यामुळे बालकवितासंग्रह अधिक उत्कृष्ट बनला आहे. बालवयामध्ये विद्यार्थ्यांना जादूचं खूप आकर्षण असतं. जादुई पेन या कवितेतून पेनातील शाई कधीच संपू नये असं विद्यार्थ्यांना वाटतं. हिरवा डोंगर, बळी पिकवितो मोती, बियाणं, आली थंडी, बोलणारे झाड, सूर्य, नदी इत्यादी निसर्गाविषयीच्या कविता निसर्गप्रेमी बनवायला मदत करतात. निसर्गाविषयीची गोडी निर्माण करणाऱ्या आहेत.
         बळी पिकवितो मोती या कवितेतून कवयित्री शेतकर्‍याबद्दलचे प्रेम, त्यांचे कष्ट, मेहनत, बैलजोडीची साथ इत्यादीचे महत्त्व विशद करते. त्याच बरोबर बालमनावर शेतकऱ्याबद्दल आदर, शेतीमालाला भाव,पीक काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, कष्टाची जाणीव कवितेच्या माध्यमातून स्मिता मुराळी  व्यक्त करतात. मायेची सावली या कवितेतून कुटुंबाचा आधारस्तंभ बाप असतो. तर मायेची सावली देणारी आई असते. आई-वडील दोघेही रात्रंदिवस मुलंबाळासाठी कष्ट उपसतात. ही जाणीव कवितेच्या माध्यमातून बालमनावर बाल कवयित्री स्मिता मुरळी बाल संस्कार करण्याचा प्रयत्न करतात.
      आज पर्यंत एकवीसाव्या शतकात  बालसाहित्य जेवढ्या प्रमाणात प्रकाशित व्हायला हवे होते, तेवढ्या प्रमाणात ते झाले नाही. बालसाहित्य तयार करणे साधे काम नाही. त्याची परिणामकारकता बालमन घडवत असते. अशा छान छान गोष्टी, कथा, कविता, बालमनावर संस्कार करीत असतात.
         कवयित्री स्मिता मुराळी यांच्या गंमत जत्रा या बालसाहित्याची पाठराखण ज्येष्ठ लेखक बबन शिंदे यांनी केली असून यात एकूण ४० बालकविता बाल दोस्तांना गुणगुणायला लावणा-या आहेत.
     कवयित्री स्मिता मुराळी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  समिक्षिका /लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
 जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 16 February 2022

मानवी मनाचा तळ शोधणारा काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं

 *मानवी मनाचा तळ शोधणारा काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं*

      आज प्रत्येकजण मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. मी त्याच्यापेक्षा चांगला. माझाच मोठा बंगला. माझाच मुलगा चांगला. असा खोटा आभास निर्माण करण्याच्या मागे लागला आहे. माणसाच्या अस्तित्वापेक्षा जेव्हा आभास मोठा वाटायला लागतो. तेंव्हा माणूस स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो. अशी अस्तित्व विसरलेली माणसं मग स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहायला तयार नसतात अशाच विचारसरणीला साहित्यातून आरसा दाखवण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री विद्या प्रकारच्या जाधव यांनी केले आहे.
      अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री विद्या प्रकाश जाधव (वीप्रजा) यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती १फेब्रुवारी २०२१रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी नावाला साजेसे अतिशय सुंदर चित्र रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना व पाठराखण ज्येष्ठ कवी गीतकार हनुमंत चांदगुडे सरांची लाभली आहे. तसेच या काव्यसंग्रहात एकूण 77 कविता असून मूल्य केवळ दीडशे रुपये आहे यातल्या सर्वच कविता वाचकाच्या मनाचा तळ शोधणा-या आहेत आणि माणसाला भेटली रूप. आरशातील प्रतिबिंब या प्रमाणे स्वच्छ दाखवणा-या आहेत.

         भेगाळल्या भूमीच्या या 
         कशा भेगाळल्या भेगा 
         फाटलेल्या नशिबाच्या 
         सांगा कशा शिवू रेघा.....!!

     शेतकरी, कष्टकरी रात्रंदिवस शेतात कष्ट उपसतो. काळ्याआईची सेवा करतो म्हणून शेतकर्‍याला अख्या जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहे म्हणून जग आहे. त्याच्यामुळे सर्वांना धनधान्य व पोटभर खायला मिळते पण शेतकऱ्याचे जीवन म्हणजे अनेक वादळं, संकट झेलणार , अत्यंत हलाखीचे जीवन शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो. मरमर करतो.आपल्या हाडाची काडं करून धान्य पिकवतो आणि ऐन वेळी पाऊस दगा देतो. वादळ अति अतिवर्षण, रोगराई इत्यादी गोष्टींनी शेतकरी हवालदिल होतो भेगाळल्या जमीनीत अपार मेहनत करतो फाटलेल्या नशिबाच्या सांगा कशा शिवू रेघा  म्हणून कवयित्रीने शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट वरील गोळीतून विशद केले आहे.

          पाकळीत जपलेला सुगंध 
          फुलातून उडून गेला
          जन्मदात्या काळजाचा तुकडा 
          आश्रमात सोडून गेला....!

          मुलं लहान असताना आई-वडिलांवर त्यांचा खूप जीव असतो. बालपणी जगातली सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे आई वडीलच असतात. आणि एकदा का मुलं मोठी झाली की त्यांच्या पंखात बळ येतं आणि अचानक उडून जातात. मुलाचे स्वतःचे लग्न झालं की हळूहळू मुलांना आई-वडील नकोसे वाटायला लागतात.आणि एक दिवस मुलगाच आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा असून त्यांना आश्रमात सोडून येतो. असे भयाण वास्तव वरील ओळीतून चित्रित करणाऱ्या या ओळी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.

        प्रेमावर निस्वार्थ होते मी 
       तुझ्यासाठी घार होते मी
       बेड्या टाकुनी पायात माझ्या 
       केलस ठार मला तू 
       कारण तू तर वासनेचा बळी...!!

       
      आजच्या काळात निस्वार्थी प्रेम मिळणे  फारच कठीण होत चालले आहे. पण कवयित्री विद्या जाधव यांनी निस्वार्थी प्रेम व प्रेमासाठी वाट्टेल ते सहन करण्याची तयारी दाखवली,  स्त्रीजातीला अनेक बंधने लादली जातात. जगताना मन मारून अनेक वेळा स्त्री जगत असते कारण नरदेह तर वासनेचा बळी असतो.अशी खंत वरील होळीतून कवयित्रींनी व्यक्त केली आहे

        शाब्दिक खेळ खेळला माझ्याशी 
        नको नको म्हणता लढलास माझ्याशी

        विषारी तुझ्या जीव्हेने केला घात 
        वेदनेचे घरे पडले हृदयाच्या आत...!!

           संशयासारखे दुसरे विश नाही. संशय हा कॅन्सरपेक्षाही भयंकर असतो. ज्याच्या सुखी संसारात संशय आला की सुखी संसार पार विस्कळित होऊन जातो. साधे संशयाची जरी पाल चुकचुकली तर पती-पत्नीमध्ये अति भांडण कधी लयाला जातात आणि क्षणात घटस्फोटावर प्रकरण येतं हे कळत सुद्धा नाही. सापाच्या विषापेक्षाही जिभेने  दिलेली जिव्हारे घात पार माणसांच्या पार हृदयावर अनेक वार करून तुकडे-तुकडे करून टाकतात म्हणून बोलताना विचार करून बोलावे असे वरील ओळीतून कवयित्री सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
           कवयित्री विद्या जाधव यांना सामाजिक भान, कर्तव्याची जाण, समाजाचे वास्तव, निसर्गाशी लढा, प्रेमभाव, संवेदनशीलता, स्त्रीमनाची घालमेल,स्त्री-स्वातंत्र्य, मैत्रीभाव, प्रेम, शेतकऱ्याविषयी कळकळ, गरिबांची जाणीव इतरांचे दुःख या सार्‍या गोष्टी  प्रकाश टाकणा-या कविता मनाला खूपच भावते 'नुसतेच कविता लिहिणं'ही कविता वाचकाच्या मनात घर केल्याशिवाय राहत नाही. कवयित्री( विप्रजा) यांचा माणूसपण, कर्माची मशाल, बापाची आठवण, न समजलेली आई,रंग जीवनाचे, विचार मंथन, कर्तव्य बजावणार, संशय, माणसं अशीच असतात, तू तर वासनेचा बळी , स्त्री जन्मा तुझी कहाणी , गर्भ कळी आणि आरसा गमावलेली माणसं अशा अनेक कविता अत्यंत वाचनीय व अर्थ गर्भित आहेत.
      आरसा गमावलेली माणसं या काव्यसंग्रहात एकूण 77 कविता असून बांधणी अतिशय उत्कृष्ट आहे. माणसाला माणसाचे खरे रूप दाखवणारा हा काव्यसंग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे. या काव्यसंग्रहातील सर्वच रचना जरी साध्या-सोप्या असल्या तरी त्यामध्ये असलेल्या भावार्थ अगदी खराखुरा, प्रेमळ आहे हे दिसून येते कवयित्री विद्या प्रकाश जाधव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परि.प्राथमिक.शाळा. कोकलगाव 
ता. जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 11 February 2022

मिनाक्षी नागराळे राज्यस्तरीय माता रमाई पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय माता रमाई पुरस्काराने सन्मानित*

     वाशिमच्या मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील उपक्रमशील शिक्षिका यांना सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना दिनांक ७ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील स्थानिक अकोला नाका, भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, नागार्जुन बौद्ध अल्पसंख्यांक बहु सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने राज्यस्तरीय त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार- २०२२ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय माता रमाई पुरस्कार, संविधानाची उद्देशिका व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास कार्यालयाचे तालुका संरक्षण अधिकारी मा.धनगर साहेब, विशेष अतिथी पंचायत समिती सभापती सौ रेश्माताई योगीराज गायकवाड तर मुख्य अतिथी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त निलेश सोमानी, आकाशवाणी पत्रकार सुनील कांबळे, मुकनायक अध्यक्ष राजीव दारोकार, अशासकीय सदस्य सामाजिक वनीकरण विभाग वैशालीताई खोब्रागडे, पत्रकार संदीप डोंगरे,कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सोनाजी इंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल माता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात माता रमाई यांचा फार मोठा वाटा आहे.माता रमाई यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष व त्यागांनी भरले होते. त्याच प्रमाणे अनेक स्त्रिया आयुष्य जगत असताना संघर्ष व त्यागामुळे जीवन जगत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत कुटुंब घडविले आहे. अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संघर्षशील महिला वैशालीताई खोब्रागडे, शकुंतला गायकवाड, उषा संतोष भालेराव, शीलाताई गडेकर, मीनाक्षीताई नागराळे, इंदू पट्टेबहादूर, कुसुमताई सोनवणे अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न संस्थेचे अध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, प्रास्ताविक पी.एस. खंदारे तर आभार भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेजचे संचालक यशपाणी कंकाळ यांनी मानले.
        मिनाक्षी नागराळे यांनी परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन आपल्या जिद्दीच्या जोरावर जगत आहेत.त्यामागे त्यांचा प्रामाणिकपणा त्याग व समर्पण आणि विद्यार्थ्याप्रति असणारी निष्ठा यामुळे त्यांना आज पर्यंत पस्तिशीच्या वर राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल मिनाक्षी नागराळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Sunday, 6 February 2022

जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे-काव्यमनीषा

 *जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे- काव्यमनीषा*

       हे जीवन सुंदर आहे.या ओवी प्रमाणे खरंच जीवन खूप सुंदर आहे. मानवी जीवनात अनेक चढ-उतार येतच असतात. फक्त संकटे, संघर्ष पेलता आले पाहिजे. संघर्षा शिवाय सुख नाही. संघर्ष विना जीवन नाही. ज्यांनी जीवनात अनेक खस्ता खाल्ल्या. त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला. आपले जीवन स्वर्गाहुनी सुंदर बनवू शकतो. फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. दृष्टिकोन सकारात्मक असला की मानवी मनाला नवीन ऊर्जा मिळते. आणि तिची ऊर्जा सकारात्मकतेकडे घेऊन जाते. अशाच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणाऱ्या कवयित्री म्हणजे सांगली जिल्ह्याच्या मनीषा रायजादे( पाटील )यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह म्हणजे काव्यमनीषा वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २० मार्च २०२१ रोजी प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. प्रकाशक वैभव धनावडे यांनी प्रकाशित केले असून प्रकाशन साहित्यसंपदा प्रकाशन, मुंबई यांनी केले आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १३०/ रुपये असून  यातल्या कविता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणा-या आहेत यात शंकाच नाही.
        काव्यमनीषा या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्रातःसमयी नैसर्गिक दर्शन घडवणारे सुमेध कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर साकारले आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रख्यात ज्येष्ठ गझलकार व कवी ए.के. शेख यांची लाभली असून पाठराखण व शुभेच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी. वीरा राठोड यांच्या लाभल्या आहेत.
     प्रत्येक माणसाला एक सुंदर, संवेदनशील मन असतं. निसर्गाने ती देणगी सर्वांनाच दान दिलेली आहे. भेट दिलेली आहे. त्या मनाला योग्य वळण लावून त्यावर चांगले संस्कार केले तर जिवनाचं सोन झाल्याशिवाय राहत नाही. कवयित्री मनीषा रायजादे या पेशाने शिक्षिका जरी असल्या तरी त्या संवेदनशील मनाच्या कवयित्री सुद्धा आहेत. ज्यातून प्रेम, कारुण्य, सद्भावनेचा स्त्राव त्यांच्या कवितेतून दिसून येतो. कवितेवर त्यांची निस्सीम भक्ती, प्रेम आहे. सांगली जिल्ह्यातल्या( देशींग) हरोली या छोट्याशा गावच्या ग्रामीण भागातल्या कवयित्री. त्यामुळे शेती-माती, सगेसोयरे, माणसातले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणूसपण, नात्यांचे बंध, जिवाभावाच्या मैत्रिणी, निसर्ग, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी, माय-मातीचा घट्ट ओलावा या सार्‍यांनी कवयित्री मनीषा रायजादे यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. त्यामुळेच त्यांचा काव्यमनीषा बहरत आला.

         अलगत स्वप्नांना असे 
         सजवणारा कवी मी 
         भावना कोमल शब्दांत
          फुलवणारा कवी मी....!!

           समाजाच्या अनेक व्यथा 
           परखडपणे मांडतो मी 
           समतेसाठी, न्यायासाठी 
           झगडणारा अविरत कवी मी..!!

      संवेदनशील मनाच्या कवयित्री मनीषा रायजादे आपल्या स्वप्नांना अलगत आपल्या कवितेमध्ये सजवणारी कवयित्री आहे. कवयित्री स्वतःच्या भावना कोमल शब्दांत कवितेच्या माध्यमातून व्यक्त करते. इतकेच नाही तर समाजाच्या अनेक व्यथा परखडपणे मांडते. समतेसाठी, न्यायासाठी सतत झगडणारी कवयित्री म्हणजे मनीषा रायजादे होय. हे वरील ओळीतून दिसून येते.

          दिव्यातील तेजोमय तेवणारी वात 
          सार्‍याच दुःखावर करतसे मात
          हळुवार नाती सारी तीच फुलवते 
          दोन कुळांचा उद्धार मुलगीच करते...!!

       मुलगी दिव्यातील तेजोमय वात असते. मुलगी सगळ्या दुःखावर मात करणारी असते.मुलगी आई-वडिलांना खूप जीव लावते. मुलगी सासरी जरी गेली तरी तिथून सगळे नाते फुलवते. एक मुलगीच मुलगी, आई, पत्नी, सासू,नणंद, जाऊ, वहिनी, आत्या, बहीण, अशी अनेक रुपे फुलवीत असते. इतकेच नाही तर मुलगी माहेर आणि सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते. सासरच्या मंडळींनाही सर्वांची मर्जी सांभाळून तिथेच सगळेच नाते फुलवते.असे वरील ओळीतून कवयित्री मनीषा रायजादे व्यक्त होतात.

                जीवन असे संघर्ष 
                सुख दुःखाचा हा खेळ 
                हसत हसत घालायचा 
                जीवनाचा सुंदर मेळ...!!

       कवयित्री मनीषा रायजादे पाटील यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.सहज सुंदर आहे. जीवनात संघर्ष हे करावेच लागतात.त्याशिवाय जीवन सुखी होत नाही. संघर्षाशिवाय जीवन नाही. संघर्ष व हर्ष हे दोन्ही सुख-दुःखाचे खेळ आहेत.अशा सुंदर जीवनाचा मेळ बनवायचा असेल तर हसत हसत जीवन जगता आले पाहिजे. दु:खाला कवटाळून न बसता दु:खाला सुखाची झालर लावून जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी दुःखाला न घाबरता धैर्याने जगता आले पाहिजे. असे कवयित्री मनीषा रायजादे यांना वाटते.
        कवयित्री मनीषा रायजादे यांना शेतकर्‍याबद्दल केवढी आपुलकी आहे. हे बळी पिकवितो मोती या रचनेतून दिसून येते. शेती आणि शेतकरी यांच्या विषयी सखोल ओलावा दिसून येतो. ग्रामीण जीवन जगायला कवयित्रीला आवडते. ग्रामीण जीवन किती सुंदर असतं? ते ग्रामीण जीवन या रचनेतून चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.कवयित्री साहित्याची गोडी जोपासत, निसर्गाशी मैत्री करत, जीवनाच्या वाटा शोधत, महाराष्ट्राचे गीत गात, गझलेचा हात धरून, पावसात त्याला शोधत, स्त्रीच्या जन्माचे महत्व सांगत, शब्दांची थोरवी गात, शब्दांच्या प्रेमात पडणारी कवयित्री मनीषा वास्तवाचे भान राखीत वास्तव चित्र आपल्या कवितेच्या प्रगल्भतेतून दिसून येते.

                 वाट अहंकारानेच
                 विनाशाची तो चालतो 
                 जन्मदात्या आई बापा 
                 वृद्धाश्रमी तो धाडतो...!!

       आजच्या ग्लोबल दुनियेत माणुसकी वरचेवर पार विरून जात आहे. स्वतःच्या आईवडिलांना आजकालची मुलं सांभाळत नाहीत. अहंकाराने जगणारी मुलं जन्मदात्या आई बापाला वृद्धाश्रमी पाठवत आहेत. हे आजच्या समाजातील भयान वास्तव कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून वरील ओळीतून चित्रीत करताना दिसून येत आहेत.कवयित्री मनीषा रायजादे यांच्या हरवली माणुसकी, जनसेवा, मी एक, माय मराठी,सासर झाले माहेर, बाप माझा, पंढरीची वारी, स्वाभिमान, जीवनाचे गणित, घे जरासे, सावित्रीच्या लेकी,वृद्धांना मिळावे हक्काचे घर या सर्व कविता अत्यंत वाचनीय आहेत कवयित्रींनी अत्यंत साधी सरळ भाषेचा वापर करून कविता अष्टाक्षरी, गजल, अभंग, षडाक्षरी, ओवी, लावणी इत्यादी प्रकारात गेय स्वरूपात लिहिल्याने वाचकांच्या पसंतीस उतरणा-या आहेत.
      कवयित्री मनीषा रायजादे यांच्या कविता जीवन जगायला शिकवणाऱ्या, स्वाभिमान जागवणा-या, ग्रामीण भागातले दर्शन घडवणाऱ्या, निसर्गाशी नाते जोडणा-या, आई-वडिलांची सेवा शिकवणाऱ्या, देवावरची श्रद्धा जोपासणाऱ्या, वास्तव सांगणाऱ्या,प्रेम रसाने बहरलेल्या, संस्कार पेरणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, अशा सर्वच कविता काळजाचा ठाव घेणाऱ्या एकूण ६८ कविता आहेत.
        सर्वांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे काव्यमनीषा होय. कवयित्री मनीषा रायजादे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 1 February 2022

जगण्यासाठी ऑक्सिजन देणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रश्न टांगले आभाळाला

 *जगण्यासाठी ऑक्जीजन देणारा गझलसंग्रह म्हणजे "प्रश्न टांगले आभाळाला"*
   
         कविता करणं साधं काम नाही. ज्याच्या अंगात नसानसात शब्द खेळतात, शब्दच प्रेरणा देतात, शब्द जगवतात, जागवतात, शब्दच आधार देतात, शब्द जीवनाला आकार देतात, वळण घेतात, वळण देतात, शब्द जगायला शिकवतात, शब्द जमिनीची मशागत करतात, शब्दच प्रश्न विचारतात आणि उत्तरही देतात,शब्दच नवी उमेद, संजीवनी देतात तसाच गझल संग्रह म्हणजे 'प्रश्न टांगले आभाळाला'
        अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी, गझलकार नितीन देशमुख सर यांचा उत्कृष्ट गझल संग्रह म्हणजे 'प्रश्न चांगले आभाळाला' हा गझलसंग्रह नुकताच वाचनात आला आणि थेट काळजाला जाऊन भिडला. मला गझल येत नाही पण दुसऱ्यांची गझल वाचायला खुप आवडते. गजलेचे काही तंत्र असतात ते आत्मसात करून शुद्ध पद्धतीने गझल लिहिणे हे एका सोनाराने दागिने हाताने घडवून बनवल्या सारखीच मेहनत असते. गझलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविताच असते पण गझल थेट काळजाला भिडते. प्रश्न टांगले आभाळाला या गझलसंग्रहाचे प्रकाशन प्रतिमा पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशक दीपक चांदणे यांनी प्रकाशित केली. या गजल संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे उत्कृष्ट डबल कव्हर बांधणी आहे. मुखपृष्ठावरील चित्र मानवाच्या मनात असंख्य प्रश्न,असंख्य भाव, विचार, कविता हजारो स्वप्न होऊन झाड होऊ पाहणारी आहे. या गझलसंग्रहाचे मूल्य केवळ २५० रुपये आहे पण यातली प्रत्येक गझल थेट काळजाला भिडणारी आहे. शब्द न शब्द जगण्याची उमेद वाढवणारा आहे आणि मानवाला ऑक्सिजन पुरवणारा आहे.

    जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणार्‍याला नाही
    जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही

    कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला 
    चिंता याची बघणाऱ्याला,लढणाऱ्या ला नाही

      गझलकार नितीन देशमुख यांचा शब्द न शब्द फक्त वाचणाऱ्याला कळतो,पाहणाऱ्याला नाही. जो माणूस जीवन जगतो जो जीवन जगण्यासाठी अग्निपरीक्षा देतो, जो कष्ट उपसतो, वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी अंगभर कष्ट करतो, त्यालाच विस्तव करतो त्यालाच उन्हाचे चटके बसतात. बघणार्‍याला त्याचं काहीच वाटत नाही. जीवन हे फक्त जगणा-यालाच कळते. आपण कसं जीवन जगत आहोत?  पळणाऱ्याला जीवनाचा अर्थ कळत नाही. आणि लढणारा माणूस हरण्याची चिंता करीत बसत नाही. तो फक्त लढतच राहतो. कोण जिंकेल कोण हारेल याची खरी चिंता बघणा-यालाच असते. लढणाऱ्या ला फक्त लढायचं माहिती असतं. असा खोल अर्थ लिहिलेला शेर संवेदनशील मनाचा कवी गझलकार नितीन देशमुख यांच्या ओळीतून दिसून येतो.

     रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही
    दारू कळले विकणाऱ्याला, पडणा-याला नाही.

        वरील शेर म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाच्या डोक्यातल्या मुंग्या उतरवणारा आहे. दारू पिणाऱ्या माणसाने जर मन लावून हा शेर वाचला तर आयुष्यात कधी पुन्हा दारू पिणार नाही. असा अर्थगर्भित शेर प्रत्येक दारूच्या दुकानासमोर बोर्ड शासनाने लावला पाहिजे. म्हणजे दारूचे व्यसन मुक्ती केंद्राची गरज भासणार नाही. आज समाजात कित्येक लोकं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारू पिणारे लोक फक्त स्वतःच्याच जीवनाची राखरांगोळी करीत नाही तर अख्ख्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात.काही रथी-महारथी तर घरातले धान्य विकून दारू पितात. दारू मुळे कॅन्सरसारख्या आजाराला निमंत्रण देतात आणि कुटुंबाची जिम्मेदारी बायको वर टाकून अवेळी मरण पावतात. जो दारू पितो तो कशासाठी पितो कुणास ठाऊक? पिणारा रोज पितो पण त्याला दारू कळत नाही. दारू विकणार्‍याला कळते दारू पिऊन पडणाऱ्या ला नाही असा खोल अर्थ वरील गझलेतून कळतो.
             कवी नितीन देशमुख यांचा गझल लिहिण्याचा फार मोठा वेगळाच हातखंडा आहे. मी आजपर्यंत अनेकांच्या गझल वाचल्या पण नितीन देशमुख सरांची काही औरच बात आहे. त्यांच्या गझल पुन्हा  वाचाव्यात असे वाचकाला वाटते. प्रत्येक वेगवेगळ्या लगावली मध्ये लिहिलेल्या गझल वाचकांच्या कधी अंगवळणी पडतात कळतच नाही.गझलेतील प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असतो शंभर कविता आणि एक गझल बरोबर असते तेवढी ताकत गझलेत असते.हल्ली कुणीही उठसूठ गझल करायला लागले आहे. थोडसं तंत्र माहीत झाले की झाले गझलकार. पण मोठ्या मनाचा गझलकार, अगोदर उत्तम कवी असला पाहिजे. गझलकार नितीन देशमुख आपल्या नावाच्या समोर गझलकार किंवा कवी हा शब्द लावत नाहीत यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. एक से बढकर एक गझल नितीन देशमुख सरांच्या आहेत. गझलसंग्रह वाचावा तर नितीन देशमुख सरांचा गझल संग्रह आवर्जून वाचावा असाच आहे. कुठलाही बडेजावपणा नाही. प्रत्येक गझल वेगवेगळ्या वृत्तात व लगावलीत अगदी सराईतपणे बसवण्याचा देशमुख यांचा वेगळा हातखंडा आहे.त्यांच्या गझलेवर प्रेम करणारी विदर्भातले लाखो वाचक मंडळी आहेत.

      ईश्वराने निर्मिली जर या जगातील माणसांना
      माणसाच्या स्पर्शल्याने, देव अपुला बाटतो का?

     जातीधर्माच्या बेड्या तोडून टाकणारा हा शेर थेट काळजाला भिडला शिवाय राहत नाही. आपण म्हणताना सगळेच म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण सोयी करताना किंवा लग्न जमवताना जात पाहिली जाते आपण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. असं प्रत्येक जण भाषणात तत्वज्ञान मानतो पण तोच मुलाचा प्रेम विवाह करण्यास नकार देतो. या जगातील सर्वच माणसांना जर ईश्वराने निर्माण केले आहे मग माणसाच्या स्पर्शाने देव  बाटतो का ? असा खडा सवाल नितीश देशमुखांनी माणसातल्या माणसाला केला आहे.

      पावसाने हर बळीला प्रश्न हा मुद्दाम केला 
     मी तुला पाऊस देतो, शेतसारा मागतो का?

      आज आपण पाहतो सर्वत्र स्वार्थाने बरबटलेल्या समाजात घासपूस घेतल्याशिवाय कोणत्याच टेबलाला कोणतेच काम होत नाही. राजकारणी समाजाचा पैसा घशात घातल्या शिवाय श्वास घेत नाहीत. संस्थाचालक पैसे उकळले शिवाय नोकरी देत नाही. शेतकरी फासावर गेल्याशिवाय कर्ज माफ होत नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत स्वार्थ असल्याशिवाय कोणीही कोणालाही कवडीचीही मदत करीत नाही. पाऊस पडतो म्हणून जगाचा पोशिंदा बळीराजा जगतो आणि देशही जगवितो. तो पावसाने जर प्रत्येक बळीला असा प्रश्न केला मी तुला पाऊस देतो शेतसारा मागतो का?  खूप विचार करायला लावणारा प्रश्न वरील गझलेच्या शेरातून नितीन देशमुख यांनी केला आहे. आत्मचिंतन करायला लावणारा हा शेर आहे.
       'प्रश्न टांगले आभाळाला'  हा नितीन देशमुख सरांचा गझलसंग्रहात एकूण 80 दर्जेदार गझल फुलल्या आहेत. प्रत्येक गझल व्यवस्थेला बळी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करते. जगायला शिकवते लढायला शिकवते. आत्मचिंतन करायला शिकवते. माझ्या वाचनात आजपर्यंत सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह म्हणजे प्रश्न टांगले आभाळाला हे माझ्या हाती आले आहे हे  मी माझे भाग्यच समजते. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी या गझलसंग्रहाची पाठराखण केलेली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा गझलसंग्रह आहे.
            
        कवी गझलकार नितीन देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा

 समीक्षिका/शिक्षिका/लेखिका /कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम
मो.9767663257