Sunday, 7 February 2021

ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं

*ग्रामिण मातीशी नाळ जोडणारा कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं*

            उस्मानाबाद जिल्ह्यातील आई तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर जवळच्या मंगरूळ या खेड्यात जन्मलेले लेखक रत्नाकर कमलाकर उपासे यांचा 'बदबदीची सोनपावलं' हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. मंगरूळ या गावाला कुशीत घेत हरणाई नदी पश्चिमेकडून दक्षिणेला वाहत जाते. या नदीलाच बदबदी असे म्हणतात.कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर हरणाई नदी जी पाण्याने भरलेली आहे.त्यालाच बोलीभाषेतून बदबदी म्हणत असावेत. अशा नदीचे चित्र, पाण्यावर तरंगणारे सोनपावलं म्हणजेच बदबदी नदीशी नाळ जोडणाऱ्या, जिव्हाळ्याच्या व्यक्तींचे ठसे आहेत.असे बोलके मुखपृष्ठ मनाला ओढ लावणारे आहे. याचे प्रकाशन  १० जानेवारी २०२० रोजी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे प्रकाशित झाले आहे.याचे मूल्य फक्त १५० रूपये आहे. पण यातील कथा व्यक्तिचित्रणात्मक कथातून माणसाच्या स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण व बोलीभाषा असल्यामुळे या सर्वच कथा वाचनीय आहेत.
                मंगरूळ या खेड्यात बालपण व्यतीत केलेल्या लेखक रत्नाकर उपासे यांची ग्रामीण  मातीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उपासे सरांनी बालवयापासूनच ग्रामीण जीवनाचे अनुभव घेतलेले आहेत. माणसांच्या वृत्ती- प्रवृत्तीची जाणीव अत्यंत प्रगल्भ झालेली आहे. आणि त्यातूनच साकारलेला हा कथासंग्रह विविधता आणि वेधक ता जोपासणारा आहे. या कथेमध्ये येणाऱ्या व्यक्ती मनाने धनवान आहेत. प्रत्येक कथेत वाचक स्वतः असल्याची अनुभूती घेतो. वाचकाला प्रत्यक्षदर्शी त्याच्या समोरच सारे घडत आहे अशा सर्व कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
               हसमुख नागाचा म्हातारीची साधलेला संवाद वाचकाची गोडी वाढवतो. नागाची कष्ट करण्याची जिद्द आळशी माणसाला रामबाण उपाय दर्शविणारी आहे. मंगरूळ चे गंधर्व म्हणजे देसाई काका यांच्यातला उत्तम दर्जाचा कलाकार व कलाकारातील उपस्थित गुणांचे दर्शन घडवणारी कथा वयोमर्यादेला पार करून कला जिवंत करणारी आहे. त्यात सिंधूचे पात्र वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.बिनधास्त एकनाथचे जीवन त्याला जीव लावणारी त्याची बायको ठकू आणि मोहोळ मारण्यात तरबेज असलेला एकनाथ यांच्या कथा खूप काही शिकवून जातात. अस्सल मराठवाड्याची मराठी भाषा, लकब, नुसत्या, कवा -कवा, म्हटलं, जाऊ, हाय, म्हणंजी अशा अनेक शब्दांतून गावरानी गोडवा दर्शविल्याशिवाय राहत नाही.
                 माणुसकीचे दर्शन घडवणारा कयलू आबा त्यांचा स्वभाव व मुक्या प्राण्यांविषयी अपार आदर असलेला कयलू आबा लेखकाने खूप मार्मिकपणे कथेत रंगवलेला आहे. लेखकाची साधी सरळ भाषा मनाला भुरळ घालणारी आहे. बड्या हिंमतीचा कयलू आबा यांची कथा वाचकाला प्रत्यक्षदर्शीचा अनुभव देणारी आहे. हे सर्व जणूकाही वाचकाच्या समोरच घडते आहे असे वाचकाला वाटते. मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी मायाळू गिरीजा ही कथा खुप वाचनीय अशी आहे. मालकाच्या हाताखाली शेतावर काम करणारी गिरीजा तिचा प्रामाणिकपणा आणि तिची कष्ट करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
                 काकीची लोकांना आपलेसे करण्याची कला काकी या कथेतून दिसून येते. जीवनात कितीही संकटं आली तरी हार न मानता त्याला सामोरं जाण्याचं बळ काकी कडून शिकावं. वय साठीच्या पुढे गेलं तरी कष्ट करण्याची तयारी या कथेतून दिसून येते. हरहुन्नरी नवनाथ या कथेतून शेतकऱ्याला असलेली बैलाची जाण, अहोरात्र कष्ट करणारा शेतकरी त्यांची साधी राहणी अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहे. बैलजोडी असो की बाजार असो शेतकऱ्याला व्यवहारिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे हे या कथेतून प्रकर्षाने जाणवते.
                लेखक रत्नाकर उपासे यांची ग्रामीण मातीशी नाळ जुळल्याने बदबदी काठावर येणाऱ्या मनाने श्रीमंत असणाऱ्या अस्सल ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातल्या माणसांचा मायाळूपणा आपुलकी भाव माणसाप्रति जिव्हाळा,साधी राहणी पण उच्च विचार त्यांची बोलीभाषा त्यांचे ग्रामीण भागातील जीवन जगण्याची कला, शेतकऱ्याची अपार मेहनत, अस्सल गावरान मेवा प्रमाणे फार सुरेखपणे मांडली आहे. बदबदीकाठची सोनपावलं हे पुस्तक हातात घेतल्यावर प्रत्येक कथा हृदयाला भिडून पुढच्या कथेची ओढ लावीत जातात.
                 एकनाथचे धाडस, त्याचे कौटुंबिक जीवन, कयलू आबाचे प्राण्यांविषयीचे प्रेम, त्यांचा अस्सलपणा, मायाळू गिरीज्याची कष्ट करण्याची तयारी, मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी व सत्याची कास धरून राहणारी गिरीजाचे खरंच कौतुक वाटते. काकीचे धाडस, काम करण्याची तयारी,डगमगून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी वाखाणण्यासारखी आहे. दिसायला साधा जरी असला तरी प्रत्येक गोष्टीत असलेला हरहुन्नरी नवनाथ आणि कोणत्याही गोष्टीवर मात करणारा सिल्या यांच्या सर्व कथा ग्रामीण भागातले दर्शन घडवणाऱ्या व वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या आहेत.
          बदबदीकाठची सोनपावलं या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचनीय आहेत. या कथासंग्रहात एकूण आठ कथा ग्रामीण मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत. लेखक रत्नाकर उपासे यांची लेखणी ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीशी समरूप होणारी आहे.प्रत्येक कथा वाचक वाचताना देहभान विसरून जातो.वाचतानाचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. सर्व वाचकांनी आवर्जून वाचावा असाच कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं हा कथासंग्रह होय.

           लेखक रत्नाकर उपासे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

लेखिका शिक्षिका समीक्षिका कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि. प्राथमिक शाळा. कोकलगाव
ता. जि. वाशिम
मो.9767663257

Saturday, 23 January 2021

शापित भूमीतून साकारले हिँदवी स्वराज्य...

Wednesday, 6 January 2021

*निसर्गावर प्रेम करायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे- सृष्टीकाव्य*

*निसर्गावर प्रेम करायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे -सृष्टीकाव्य*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री, निसर्गप्रेमी असलेल्या माधुरी काकडे यांचा सृष्टीकाव्य हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे, सृष्टीचे रक्षण मानवांनी केले पाहिजे, दोन हातामध्ये पृथ्वी धरल्याचे चित्र विचार करायला लावणारे आहे. बाजूने पाणी आणि हरित वने ही सृष्टी वरची खरी संपत्ती दर्शविणारे चित्र आहे.जंगले टिकले तरच जंगलातले प्राणी राहतील. असा त्रिवेणी संदेश देणारे मुखपृष्ट आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी १८ फेब्रुवारी २०२० रोजी केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर विनिता आपटे यांची असून याचे मूल्य फक्त शंभर रुपये आहे पण यातील कविता निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणाऱ्या आहेत.
             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री माधुरी काकडे या राष्ट्रीय हरित सेना शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्याने आणखीन प्रेरित झाल्या. त्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम असतात. त्याच दृष्टीने सृष्टी कवयित्रीशी बोलती झाली. वसुंधरेचे वैभव पाहून वसुंधरेवरच लिहिण्याचा ठाव संवेदनशील मनाच्या कवयित्री माधुरी काकडे यांनी घेतला. त्यांच्या निसर्ग प्रेमातले भाव शब्द लेखणीतून मोराच्या नृत्याप्रमाणे, इंद्रधनुच्या अनेक रंगात न्हावून, श्रावण सरीत चिंब भिजवत, वसंताच्या बहराने डुलत, कोकिळेची सुंदर तान घेत, तर कधी वाऱ्याची मंद झुळूक बनून, फुलांचा सुगंध दरवळत नेत सर्वांसमोर सृष्टी काव्याच्या रूपाने सादर झाल्या.
              आज आपण पाहतो प्रत्येक वर्षी शासनामार्फत 'झाडे लावा झाडे जगवा' अभियान राबवले जाते. अनेक झाडे लावली जातात.वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन केले जाते. तरीही बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड होते. रस्ते रुंदीकरण असोत किंवा स्वार्थाने बरबटलेल्या मानवाकडून अनेक वर्ष लाखो वृक्षतोड केली जाते.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि ऋतूचक्रा प्रमाणे वेळेवर पाऊस पडत नाही. तेव्हा मानवाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. हाच जीवघेणा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतो आणि शेतकरी आत्महत्या वाढतात. मानवाचा पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडत चालले आहे. त्याला अनेक घटक जबाबदार आहेत. काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच पहिली कविता एका झाडाची आत्मकथा कवितेच्या रूपात मांडत मानवाला मानवाची चूक लक्षात आणून देण्याचे काम कवयित्री करण्याचा प्रयत्न करते.

                  कोणाचे तरी भरावे पोट 
                  म्हणून अन्न तयार करत होते 
                  प्राणवायू करून तयार 
                  देहात प्राण भरत होते.....!!

       एका झाडाची आत्मकथा कवितेच्या माध्यमातून वाचताना नकळत मानवाने ही रडावे असे ते झाड रडत होतं. या वाक्यावरून रडायला येतं. आतल्याआत झुरत होतं पाणी पाणी करत होतं. झाडाला होणाऱ्या वेदना अतिशय मार्मिक शब्दात कवयित्री मांडते. झाड स्वतःसाठी कधीच जगत नाही. सदैव दुसऱ्यासाठी जगत असतं. झाडाला लागणारी फळ,फुलं, आणि औषधी वनस्पती,त्याचा देह म्हणजे लाकूड तो सुद्धा काही ना काही इंधन म्हणून देऊन जाते. झाडाचे प्रत्येक अवयव मानवाच्या उपयोगी पडते. मानवाचे पोट भरावे म्हणून झाड जगत असतं सर्वांना सर्वस्व देण्यासाठी झाड जगतं.इतकंच नाही तर झाड प्राणवायू तयार करतो.त्यावर माणूस जगतो झाडामुळेच तर आज माणूस जिवंत राहू शकतो. असं कवयित्री कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करते.

           हो मी पृथ्वी बोलते 
          जरा घेणार का ऐकून
          राहवत नाही आता मला 
          हे सांगितल्या वाचून 

          अब्जावधी वर्षाचं वय माझं 
          सुखात होते मी पूर्वीपासून
           एवढ्यातच तर आला माणूस 
           त्यांना पुरत घेतलं त्रासून....!!

                  पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम मी पृथ्वी बोलतेय या ओळीतून माणसाला विचार करायला लावणारे आहेत. माणूस माणसाच्या स्वार्थापोटी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर वारंवार करत चालला आहे. त्यामुळे माझं जरा ऐकून घेणार का ? माझं दुःख सांगितल्याशिवाय राहवत नाही. माझं वय अब्जावधी वर्षांचे आहे.मी पूर्वी सुखात होते. जेव्हापासून मानवानी मोठमोठ्या कारखान्याची घाण पाणी, नद्या नाल्यांमध्ये टाकून प्रदूषण तयार केलं. वृक्षतोड सुरू झाली जंगले नष्ट झाली.ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यांनी माझा पृथ्वी जीव पुरता गुदमरून गेला आहे. या मानवानं मला त्रासून टाकला आहे. अशी पृथ्वीची कळकळीची हाक कवयित्री मारते आहे.

                  वसुंधरेची करितो घुसमट 
                 खोदून खोदून केले भुस्कट 
                 बुद्धिमान तू सर्वात पण 
                 मनी टोचतो हा सल....!! 

                  वापराचे भान ठेवू
                  संकल्प करू हा चल
                  मानवा रे आजपासून
                  जपून वापरू जल.....!!

               पूर्वीच्या काळी सर्वत्र विहिरी दिसत होत्या पण आज प्रत्येक घरांमध्ये बोरवेल आहे. माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी जमिनीला बोरवेल घेण्यासाठी छिद्र करून टाकली आहेत.जणू जमिनीची चाळणी करून टाकली आहे. सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणुन मनुष्याची ओळख आहे. पण मनुष्य स्वतःच्या स्वार्थापोटी निसर्गाची हानी करतोय याचे दुःख हळव्या मनाच्या कवयित्री माधुरी काकडे यांना वाटते. त्यासाठी त्या समस्त जनतेला आवाहन करतात की पाणी वापराचे भान ठेवा मनी संकल्प करा आजपासून प्रत्येकाने पाणी जपून वापरा." जल है तो कल है " या उक्तीप्रमाणे भविष्यात पाण्याची कमतरता भासू द्यायची नसेल तर आजच पाण्याचा जपून वापर करावा असे ठणकावून कवयित्री सांगतात.
                  निसर्गप्रेमी कवयित्री माधुरी ताईच्या सर्वच कविता सृष्टीच्या संहाराचा इशारा देत, निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या आहेत. पाण्याचा जपून वापर वसुंधरेचे भरभरून प्रेम, पर्यावरणाची होणारी हानी, ग्लोबल वॉर्मिंगचे संकट,वाढणारे प्रदूषण,नवनवीन कारखान्यामुळे होणारे प्रदूषण, वृक्षतोड, जंगलतोड त्यामुळे वन्य जीवनाची होणारी ससेहोलपट, प्राणीजीवन, विस्कळीत, टोलेजंग इमारती मुळे होणारी जंगलतोड, शेतकरी,शेततळ्याचा सूकर मार्ग, निसर्गावर मात करण्यासाठी सुचवलेले उपाय, पर्यावरणावर हानीवर होतं असलेली खंत, शब्दांच्या माध्यमातून कवयत्री काकडे करतात. सुखवैभव, दृष्टी, नाळ, दुर्दशा,झाडे,गरज,का, सायकल, स्वप्न, दुष्काळ, मानवा, कोंडी, जरा बदलूया,निष्ठुर या सर्व कविता विचार करायला लावणा-या आहेत. प्रत्येक व्यक्तीने आवर्जून वाचावा असाच सृष्टीकाव्य हा काव्यसंग्रह नक्कीच निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणारा आहे.

           कवयित्री माधुरी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Saturday, 2 January 2021

विद्येची खरी देवता -सावित्रीआई फुले...

 *खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*

ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म वाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलां नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 
            सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
             १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.

           शिका शिका रे विद्या शिका
           मनूचे काही ऐकू नका !
           कोणी मागे राहू नका 
            विद्या शिकूया ज्ञान घेऊया 
             एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!

                या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.

           फुले असूनी काटे वेचिले
           घेतला शिक्षणाचा ध्यास 
            तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
          आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!चे

               सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
                 जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
            ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या. 

          धोंडे मुले देती| नवसा पावती|
         लग्न का करती | नारी नर ||
    
                दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
         
             तुझ्या कार्याचा वेलू 
             मी गगनाला नेईन
             तुझ्या विचारांचे गुट्टी
            मी विद्यार्थ्यांना देईन

              तुझ्या कार्याची भाऊ
              किती गाऊ गौरवगाथा 
              धन्य धन्य ती साऊ 
             तुझचरणी विनम्र माझा माथा...!!

       जय ज्योती....
          जय क्रांती....
            जय सावित्रीमाई....!!

*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७

Thursday, 31 December 2020

*स्त्री मनाचे गूढ उकलत जाणारे ललित लेखसंग्रह म्हणजे "मौनातील अर्थ"...!*

 *स्त्रीमनाचे गूढ उकलत जाणारे ललितलेखसंग्रह म्हणजे- मौनातील अर्थ*

           धुळ्याच्या प्रसिद्ध लेखिका /कवयित्री/ प्राध्यापिका त्रिशिला साळवे यांचा ललितलेखसंग्रह नुकताच वाचनात आला. या ललित लेखसंग्रहाचे मुखपृष्ठ पती-पत्नींच्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा,त्यांनी भावना अभिव्यक्त करणाऱ्या जोडप्यांचे चित्र अतिशय देखणे आहे. या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती ५ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे. या ललित लेखसंग्रहाचे मूल्य फक्त १६० रुपये आहे पण यातील अनुभव प्रत्येक स्त्री मनाला स्वतःच्या ढाच्यात बसवून जणू माझेच आयुष्य आहे.आणि माझ्याच घरातला संवाद आहे. असं प्रत्यक्ष वाचनाची अनुभूती वाचताना लक्षात येते. मलपृष्ठावर प्रकाश मारुती तोटेवाड यांनी पाठराखण अतिशय सुंदर शब्दात केली आहे. पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार आहे.
                 लेखिका त्रीशिला साळवे  यांच्या सहजीवनातील अनुभव, स्त्रीने समजून घेण्याची भूमिका, संसार चालवत असताना जोडीदाराच्या आवडीनिवडी, जोडीदाराला समजून घेण्याची भूमिका, स्त्री जीवनात पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, स्त्री मनाची चालू असलेली घालमेल, तिच्या भावना,नाजूक कळी सारखे तिचं मन, सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर होणारी जाणीव, संसार वेलीवर लागलेली फुले, जणू सारं काही मौनातील अर्थ मधून व्यक्त होते. वाढत्या वयाबरोबर समजदारीतून, निरागसतेतून, निस्वार्थीपणातून,शब्दाशिवाय फक्त मौनातून लेखिका न्याहाळत असते. साध्या साध्या गोष्टींची हौस जोडीदाराकडून पूर्ण करून घेण्यात तिला जीवनाचा खरा आनंद मिळतोय. स्वतःच्या आवडीनिवडी पेक्षा जोडीदारांनी केलेली निवड लेखिकेला अधिक प्रिय वाटते.जोडीदाराच्या सहवासातून मिळालेलं प्रेम त्यातून निर्माण झालेली जाणीव, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका लेखिका अगदी बिनधास्तपणे मांडताना दिसते.
                बालपणी माहेर अतिशय अप्रूप वाटणारी वधू एक दिवस माहेर सोडून चिमणीसारखी उडून जाते. नवऱ्या कडील नात्यांमध्ये गुंतून जाते. त्याच घराला माझं घर म्हणून राहते. नवऱ्याचं सुख ते तीच सुख होऊन बसतं. छोट्या-छोट्या सुखांच्या क्षणांनी हरखून जाते. स्वकर्तृत्वाची जाणीव सदैव ठेवूनच स्वतःचे सर्वस्व सहजपणे अर्पण करत असते. प्रत्येक स्त्रीला तीचं सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र तिच्या प्राणापेक्षा सुद्धा अधिक प्रिय असते. ते जेव्हा हरवतं तेव्हा लेखिकेची होणारी दमछाक त्यावर पतीने मारलेली प्रेमाची फुंकर खूपच सुंदर मांडली आहे. नवऱ्याने दिलेल्या सोन्याचं मंगळसूत्र लेखिकेला अधिक प्रिय वाटू लागतं कारण ते खऱ्या समर्पणातून, जाणिवेतून, कोणत्याही सामाजिक बंधनाशिवाय, आंतरिक ओढीने दिलेलं असतं नव्हे तर तो त्याच्या हातांनी गळ्यात घालतो. हीच आठवण लेखिकेला जगण्याची उर्मी देऊन जाते.
               नवरा-बायकोच्या नात्यातला गोडवा अतिशय सरळ साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करणारी हळव्या मनाची त्रिशिला स्वतःच्या संसारसुखाबरोबरच प्रत्येक स्त्री जातीचे मन नकळतपणे गुंतवित जाते. पती-पत्नींच्या नात्यांमध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे. हे लेखिका तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करते. स्त्री किती पटकन रागाला येते. तेवढीच समंजससुद्धा असते. तेवढीच प्रेमळ असते. तिच्या मनात मात्र काहीच नसतं. पण माणूस सुद्धा अगदी शांतपणे सहन करतो हे सारं लेखिका नमूद केल्या शिवाय राहत नाही. सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्याची अतिशय चिंता वाटणारी लेखिका त्या विचारानेच तिचं मन सैरभैर होतं आणि मनातील अर्थ शोधायला निघतात तिचे शब्द.
                    सहजीवनसाथी तिची पदोपदी काळजी घेणाऱ्या वडिलांसारखा भासतो लेखिकेला. तर कधी मित्रांसारखा. पतीच्या साथीमुळे स्वतः किती बिनधास्त आहे हे लेखिका खुशाल सांगून टाकते. ना तिला भूतकाळाची आठवण. ना वर्तमानाची वेदना.ना भविष्याची काळजी. नाजूक नात्यांचा हळवेपणा लेखिका हळुवारपणे मांडण्याचा प्रयत्न करते. पतीचा विरह तर सोडाच पण त्याची कल्पनाही लेखिकेला करवत नाही.आज समाजामध्ये आपण पाहतो पती नसलेल्या स्त्रीला समाज जगूच देत नाही. व्यभिचाराचे ओरघडे ओढल्याशिवाय. स्वतः पण दूर जाण्याची भीती वाटते म्हणून फक्त ओंजळभर प्रेम हटाने आपल्या नवऱ्याकडे मागणारी लेखिका शेवटी संवेदनशील मनाची एक स्त्रीच आहे. सोबत निवांत वेळ घालवण्यासाठी चाललेली तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे.पिक्चरला जाता आले नाही तरीही न रागावता, सुखी संसाराची स्वप्न बघणारी स्त्री खरंच ग्रेट आहे.परमेश्वराने विश्वातील सर्वात सुंदर कलाकृती अधिक वेळ देऊन निर्मिलेली सुंदर भेट म्हणजे स्त्री. हळव्या नाजूक मनाच्या स्त्रीचं मन सांभाळणे फार जोखमीचे काम असतं. हे पुस्तक वाचल्यानंतर समजतं. निवांतपणाची व्याख्या धावणा-या आयुष्यात खूप मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न लेखिका करते. विश्वास शब्दांचा अर्थ खूप छान पद्धतीने लेखिका सांगण्याचा प्रयत्न करते. शब्दांचा अर्थ हा शब्द उच्चारण्याच्या लकबीवर आणि तो शब्द कोणत्या माणसाने कोणत्या परिस्थितीत उच्चारला आहे यावर अवलंबून असतो.पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास किती महत्त्वाचा असतो. हे जीव तोडून सांगण्याचा अट्टहास करायला लेखिका विसरत नाही.
               सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण पैशाच्या मागे लागून मानसिक समाधान तर हरवत नाही ना याची भीती बाळगणारी लेखिका आपलं मत खंबीरपणे मांडते. पैसा म्हणजे सर्वस्व नसतच मुळी. माणसाचं जीवन कसं असावं ? कसं जगावं? हे लेखिका खूपच मार्मिकपणे मांडत जाते. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो. त्याचप्रमाणे पत्नीला यशस्वी व्हायचे असेल तर पतीची खंबीर साथ किती महत्त्वाची असते? हे तूच माझी प्रेरणा या भागांमधून लेखिका सांगते. तू फक्त माझाच आहेस हे हक्काने बजावून सांगणारी बायको त्याची खरी मैत्रीण होऊ पाहते. आणि तू बदलू नकोस म्हणून सांगायलाही लेखिका विसरत नाही. मनमोकळेपणाने संवाद साधणाऱ्या, मोकळ्या मनाच्या लेखिकेला सहजीवन साथीचे मौन नकोसे वाटते. त्याला बोलते करण्याच्या नादात लेखिका मौनातील अर्थ शोधत असते.
            सहजीवनाची दहा वर्षे उलटून गेल्यावरही परत अनोळखी बनवूया असा आग्रह धरणारी लेखिका स्वतःचं अस्तित्व विसरून जोडीदाराच्या सागरात विलीन होण्याचा प्रयत्न करत जीवनाचा निखळ आनंदाचा शोध घेते. वरवरच्या सुखाना बळी न पडता खरे प्रेम शोधण्याचा निरागस प्रयत्न वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. पुढचे सर्व भाग वाचण्याची उत्कंठा निर्माण करतात.प्रत्येक तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावे असेच पुस्तक म्हणजे "मौनातील अर्थ" हा वाचनात आला तरच जीवनाला खरा अर्थ येईल यात शंकाच नाही. या ललितलेखसंग्रहाचे एकूण ५४ भागांमध्ये विश्लेषण केलेले आहे. मौनातील अर्थ हा सर्वच तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावा असाच ललित लेखसंग्रह आहे. 
    लेखिकेला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७