Wednesday, 6 January 2021

*निसर्गावर प्रेम करायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे- सृष्टीकाव्य*

*निसर्गावर प्रेम करायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे -सृष्टीकाव्य*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री, निसर्गप्रेमी असलेल्या माधुरी काकडे यांचा सृष्टीकाव्य हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे, सृष्टीचे रक्षण मानवांनी केले पाहिजे, दोन हातामध्ये पृथ्वी धरल्याचे चित्र विचार करायला लावणारे आहे. बाजूने पाणी आणि हरित वने ही सृष्टी वरची खरी संपत्ती दर्शविणारे चित्र आहे.जंगले टिकले तरच जंगलातले प्राणी राहतील. असा त्रिवेणी संदेश देणारे मुखपृष्ट आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी १८ फेब्रुवारी २०२० रोजी केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर विनिता आपटे यांची असून याचे मूल्य फक्त शंभर रुपये आहे पण यातील कविता निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणाऱ्या आहेत.
             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री माधुरी काकडे या राष्ट्रीय हरित सेना शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्याने आणखीन प्रेरित झाल्या. त्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम असतात. त्याच दृष्टीने सृष्टी कवयित्रीशी बोलती झाली. वसुंधरेचे वैभव पाहून वसुंधरेवरच लिहिण्याचा ठाव संवेदनशील मनाच्या कवयित्री माधुरी काकडे यांनी घेतला. त्यांच्या निसर्ग प्रेमातले भाव शब्द लेखणीतून मोराच्या नृत्याप्रमाणे, इंद्रधनुच्या अनेक रंगात न्हावून, श्रावण सरीत चिंब भिजवत, वसंताच्या बहराने डुलत, कोकिळेची सुंदर तान घेत, तर कधी वाऱ्याची मंद झुळूक बनून, फुलांचा सुगंध दरवळत नेत सर्वांसमोर सृष्टी काव्याच्या रूपाने सादर झाल्या.
              आज आपण पाहतो प्रत्येक वर्षी शासनामार्फत 'झाडे लावा झाडे जगवा' अभियान राबवले जाते. अनेक झाडे लावली जातात.वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन केले जाते. तरीही बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड होते. रस्ते रुंदीकरण असोत किंवा स्वार्थाने बरबटलेल्या मानवाकडून अनेक वर्ष लाखो वृक्षतोड केली जाते.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि ऋतूचक्रा प्रमाणे वेळेवर पाऊस पडत नाही. तेव्हा मानवाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. हाच जीवघेणा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतो आणि शेतकरी आत्महत्या वाढतात. मानवाचा पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडत चालले आहे. त्याला अनेक घटक जबाबदार आहेत. काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच पहिली कविता एका झाडाची आत्मकथा कवितेच्या रूपात मांडत मानवाला मानवाची चूक लक्षात आणून देण्याचे काम कवयित्री करण्याचा प्रयत्न करते.

                  कोणाचे तरी भरावे पोट 
                  म्हणून अन्न तयार करत होते 
                  प्राणवायू करून तयार 
                  देहात प्राण भरत होते.....!!

       एका झाडाची आत्मकथा कवितेच्या माध्यमातून वाचताना नकळत मानवाने ही रडावे असे ते झाड रडत होतं. या वाक्यावरून रडायला येतं. आतल्याआत झुरत होतं पाणी पाणी करत होतं. झाडाला होणाऱ्या वेदना अतिशय मार्मिक शब्दात कवयित्री मांडते. झाड स्वतःसाठी कधीच जगत नाही. सदैव दुसऱ्यासाठी जगत असतं. झाडाला लागणारी फळ,फुलं, आणि औषधी वनस्पती,त्याचा देह म्हणजे लाकूड तो सुद्धा काही ना काही इंधन म्हणून देऊन जाते. झाडाचे प्रत्येक अवयव मानवाच्या उपयोगी पडते. मानवाचे पोट भरावे म्हणून झाड जगत असतं सर्वांना सर्वस्व देण्यासाठी झाड जगतं.इतकंच नाही तर झाड प्राणवायू तयार करतो.त्यावर माणूस जगतो झाडामुळेच तर आज माणूस जिवंत राहू शकतो. असं कवयित्री कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करते.

           हो मी पृथ्वी बोलते 
          जरा घेणार का ऐकून
          राहवत नाही आता मला 
          हे सांगितल्या वाचून 

          अब्जावधी वर्षाचं वय माझं 
          सुखात होते मी पूर्वीपासून
           एवढ्यातच तर आला माणूस 
           त्यांना पुरत घेतलं त्रासून....!!

                  पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम मी पृथ्वी बोलतेय या ओळीतून माणसाला विचार करायला लावणारे आहेत. माणूस माणसाच्या स्वार्थापोटी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर वारंवार करत चालला आहे. त्यामुळे माझं जरा ऐकून घेणार का ? माझं दुःख सांगितल्याशिवाय राहवत नाही. माझं वय अब्जावधी वर्षांचे आहे.मी पूर्वी सुखात होते. जेव्हापासून मानवानी मोठमोठ्या कारखान्याची घाण पाणी, नद्या नाल्यांमध्ये टाकून प्रदूषण तयार केलं. वृक्षतोड सुरू झाली जंगले नष्ट झाली.ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यांनी माझा पृथ्वी जीव पुरता गुदमरून गेला आहे. या मानवानं मला त्रासून टाकला आहे. अशी पृथ्वीची कळकळीची हाक कवयित्री मारते आहे.

                  वसुंधरेची करितो घुसमट 
                 खोदून खोदून केले भुस्कट 
                 बुद्धिमान तू सर्वात पण 
                 मनी टोचतो हा सल....!! 

                  वापराचे भान ठेवू
                  संकल्प करू हा चल
                  मानवा रे आजपासून
                  जपून वापरू जल.....!!

               पूर्वीच्या काळी सर्वत्र विहिरी दिसत होत्या पण आज प्रत्येक घरांमध्ये बोरवेल आहे. माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी जमिनीला बोरवेल घेण्यासाठी छिद्र करून टाकली आहेत.जणू जमिनीची चाळणी करून टाकली आहे. सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणुन मनुष्याची ओळख आहे. पण मनुष्य स्वतःच्या स्वार्थापोटी निसर्गाची हानी करतोय याचे दुःख हळव्या मनाच्या कवयित्री माधुरी काकडे यांना वाटते. त्यासाठी त्या समस्त जनतेला आवाहन करतात की पाणी वापराचे भान ठेवा मनी संकल्प करा आजपासून प्रत्येकाने पाणी जपून वापरा." जल है तो कल है " या उक्तीप्रमाणे भविष्यात पाण्याची कमतरता भासू द्यायची नसेल तर आजच पाण्याचा जपून वापर करावा असे ठणकावून कवयित्री सांगतात.
                  निसर्गप्रेमी कवयित्री माधुरी ताईच्या सर्वच कविता सृष्टीच्या संहाराचा इशारा देत, निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या आहेत. पाण्याचा जपून वापर वसुंधरेचे भरभरून प्रेम, पर्यावरणाची होणारी हानी, ग्लोबल वॉर्मिंगचे संकट,वाढणारे प्रदूषण,नवनवीन कारखान्यामुळे होणारे प्रदूषण, वृक्षतोड, जंगलतोड त्यामुळे वन्य जीवनाची होणारी ससेहोलपट, प्राणीजीवन, विस्कळीत, टोलेजंग इमारती मुळे होणारी जंगलतोड, शेतकरी,शेततळ्याचा सूकर मार्ग, निसर्गावर मात करण्यासाठी सुचवलेले उपाय, पर्यावरणावर हानीवर होतं असलेली खंत, शब्दांच्या माध्यमातून कवयत्री काकडे करतात. सुखवैभव, दृष्टी, नाळ, दुर्दशा,झाडे,गरज,का, सायकल, स्वप्न, दुष्काळ, मानवा, कोंडी, जरा बदलूया,निष्ठुर या सर्व कविता विचार करायला लावणा-या आहेत. प्रत्येक व्यक्तीने आवर्जून वाचावा असाच सृष्टीकाव्य हा काव्यसंग्रह नक्कीच निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणारा आहे.

           कवयित्री माधुरी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment