Sunday, 28 March 2021

शेतीमातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'आम्ही माणसं मातीचे'

 *शेती मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे आम्ही माणसं मातीचे*

     भारत हा कृषीप्रधान देश आहे.बळीराजा शेतामध्ये राबराब राबतो. उन्हातानात रात्रंदिवस कष्ट उपसतो. म्हणून अख्या जगाला अन्न मिळते. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहेत म्हणून सारी दुनिया आहे.शेतकऱ्याला त्याची काळी माती त्याला मायीसारखी वाटते. शेती शेतकऱ्याचा जीव की प्राण असतो. विदर्भाच्या मातीत जन्मलेले अमरावती जिल्ह्यातील व-हाडी कवी गजानन मते यांचा 'आम्ही माणसं मातीचे' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ शेती- मातीचे आहे. शेतातली झोपडी, झाड,बैलगाडीचे चाक असे सुंदर मुखपृष्ठ आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस, अमरावती यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ५ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता शेती-मातीशी नाळ जोडणा-या आहेत.
         शेतकऱ्यांचे स्वप्न फुलवणाऱ्या, शेतकऱ्याच्या घामाने भिजलेल्या, पावसाचे महत्व सांगणाऱ्या, कुणब्याचं जीणं सांगणाऱ्या,धान्याला कोंब फुटतं, मृगाचा पाऊस,जेंव्हा पालवी फुटते, मृगाचा पाऊस, फुले, बापू तुझ्या देशात, माय, आभाय, आंबा, माती माय रुसलेली,आम्ही माणसं मातीचे अशी मातीचा कळवळा असणारा कुणब्याला माती म्हणजे त्याची माय समजून लिहिलेल्या सर्वच कविता शेती मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत कष्टकऱ्यांचे जीणं-मरणं सांगणा-या आहेत.
        
           "रोज घरचाच कसा 
           आला पाऊस पावना 
           पापणीत साठवून 
           सखी बसली साजना...!!

            आठवात पावसाच्या 
             होती धरती अबोल 
             तुवा भिजोल्या वाटेन
             कशी सावरू मी तोल...!!

              कवळ्या फांदीले आली 
              आता कवळीच पान 
              थेंब झेलताना गाती 
               हिरव्या संसाराच गाणं....!!"

          शेतकरी ज्याची देवासारखी वाट पाहतो, ज्याच्यावर शेती अवलंबून असते अशा पावसाची आतुरतेने वाट बघणारा शेतकरी पावसाला  पाहुना म्हणतो. पावसाच्या आठवणीत धरणीमाय अबोल होऊन बसते. पावसाची आतुरता, ओढ,धरणीमायला लागली आहे. पावसाने भिजलेल्या वाटेनं तिचा तोल कशी सावरू या विचारांनी धरणी वाट पाहत बसली आहे.तुझ्या पावसानं मी तृप्त होणार आहे.तुझ्यामुळेच झाडाच्या फांदीला कोवळी पानं फुटतील आणि पावसाचा प्रत्येक थेंब झेलताना हिरव्या संसाराचं गानं गातील असे शेतकरी प्रिय असणारा कवी गजानन मते यांना वाटते. शेतीवरचे निसर्गावरच प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दांशब्दातून भरभरून ओसंडत आहे.
             कवी गजानन मते सरांच्या सर्वच कविता अस्सल वऱ्हाडी भाषेमध्ये असल्याने 'आम्ही माणसं मातीचे' हा कवितासंग्रह व-हाडी मेवा आहे. साधी, सरळ, सोपी,व-हाडी भाषा, प्रत्येक कवीता गेय स्वरूपात मांडण्याचा गजानन मते सरांचा हातखंडा दिसून येतो. कांही कविता सहा अक्षरी, तर काही कविता अभंग प्रकारात असल्याने एक वेगळाच साज घातल्या सारख्या भासतात तर काही कविता अष्टाक्षरी या काव्या प्रकारांमध्ये येतं असल्याने आणखीनच खुलून दिसत आहेत.कवी गजानन मते सरांना मनाच्या शेतीवर शब्दांची पेरणी करायला सुरेख जमतं.

            पाणी ना पाऊस
            चिंता कास्तकारा
            हमसून रडे 
            वावराचा धुरा....!

             बिना भरोशाचं 
             कुणब्याचं जीन
             मांडतो बेरीज
             होते उणं-उणं....!!

          व-हाडी मातीचा गंध कवी गजानन मते सरांच्या प्रत्येक शब्दांतून येताना दिसतो. ना कुणाची प्रस्तावना ना कुणाच्या शुभेच्छा. प्रत्येक कविता कवीने बळीराजाच्या ओटीत धान्य भरावं तसं भरले आहेत. कुणाब्याला समर्पित केले आहे.स्वार्थी माणसानेच आज  वृक्षतोड करून निसर्गाची भयानक हानी करून ठेवली आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर कधी पडतच नाही. पावसाची वाट बघणारा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसतो. वेळेवर पाऊस पडला नाही तर चिंता करीत बसतो. शेतकऱ्याला झोप लागत नाही की अन्न गोड लागत नाही. त्याला फक्त पावसाची ओढ लागते. पाऊस पडल्यावर वावराचा( शेताचा) धुरा (बांध ) रडत बसतो. शेतकऱ्याचे जीवनच पावसावर अवलंबून असते.ते जीवन बीन भरोशाचे असतं म्हणजे पाऊस पडेल की नाही याची खात्री नसते. बेरीज मांडत बसला तर राहतं उणं उणं. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा पावसाच्या भरोशावर कर्ज काढून व्याजानं पैसा काढून खत बियाणं साहित्य घेतो. शेत पिकल्यावर परत करू या आशेन का होईना हिंमत धरतो. पण पावसाने जर दगा दिला तर शेतकरी कर्जापायी स्वतःला फास लावायलाही मागं पुढं बघत नाही. शेतकऱ्याच्या जीवाची आर्त हाक कवीने मांडली आहे.

                 सूर्य तळपत आला 
                 हिवं खात पाणी पित
                 वारा सुसाट सुटला 
                 धूळ-माती उडवित....!!

                  आला फुलून पळस
                  शेत-शिवारास लाली
                  सुकलेल्या डोंगराला 
                  हसू फुटलेलं गाली......!!

                   किती सोकू दे जमीन 
                   हारू नको धर तग
                   ऊन वारा तुफानात 
                   सांगे पळस तू जग.....!!

          वरील गोळीतून कवी गजानन मते यांचे शेतकऱ्यावरील नितांत प्रेम व आदर दिसून येते. कडक उन्हाळ्यात सूर्य आग ओकत आहे. अशी उन्हाची तीव्रता असताना इतकी गर्मी विदर्भात असते. वारा बेभान सुटतो. धूळ माती तुडवत याच वसंत ऋतूमध्ये पळस फुलून आला आहे . त्याच पळसाच्या फुलावरची शिवाराला सुद्धा लाली चढली आहे. उन्हाळ्यात कितीही तापलं, डोंगर सुकली तरी पळस मात्र हसत शेतात उभा आहे. पाऊस नाही पडला तर दुष्काळ येतो. जमीन सुकून जाते. पण तू बळीराजा तू हरू नकोस धीर सोडू नकोस. त्यातूनसुध्दा तुफानामध्ये पळस  जगायला सांगते .असल्या तप्त उन्हात पळस डोलाने रंग उधळीत उभा असतो.तसे माणसाने ताठ उभं राहून कष्ट करून जगले पाहिजे. पळस सुद्धा माणसाला तू असं जग म्हणून सांगतो.

        तुझी माय माती | माझी माय माती |
        कुठे जातीपाती | पांघरता ||

       साऱ्या मानवाची माय म्हणजे माती. माणसाचा जन्म जरी आईच्या पोटी घेतला पण शेवटी मनुष्य मातीतच जाणार आहे. या काळ्या माईकडे कधीच भेदभाव नसतो. तिला सारी लेकरे एक समान असतात. तिच्याकडे कोणती जातपात नसते. ना कोणता धर्म नसतो. सर्वांचा रंग एकसारखाच असतो. सर्व सर्वांचे रक्त लालच असते मग मानवाने का भेदभाव करावा असे कवी गजानन मते वरील वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात.
                  कवी गजानन मते यांच्या कविता शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, कष्ट करायला लावणाऱ्या,निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या, समतेचे महत्त्व विशद करणा-या,कुणब्याचं  जिने-मरणं, दुःख, दुष्काळ , अवर्षण विषद करणाऱ्या, गावाची ओढ लावणाऱ्या, वास्तवता मांडणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, देश धर्मासाठी प्राण पणाला लावणाऱ्या, सर्वच कविता वाचकांच्या थेट काळजाला जाऊन भिडणा-या आहेत.
        
            कवी गजानन मते सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!
आम्ही माणसं मातीचे पुस्तक खरेदीसाठी संपर्क.
९४२००७६८६७

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment