Saturday, 25 March 2023

जगण्याचा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे -जगण्यामधले हेतू काही

 *जगण्याचा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे - जगण्यामधले हेतू काही*

        कोणतीही कलाकृती त्या माणसाचा अविभाव व्यक्त करत असते. मग ती साहित्यकला असेल तर कवीच्या अंतर्मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अशीच एक कवयित्री जिला लहानपणापासून कविता रचण्याचा छंद होता. शाळेतील शिक्षकांना, बाबांना कविता वाचून दाखवायची आणि शाबासकीची थाप पाठीवर घेऊन आपलं भावा विश्व समृद्ध करणारी यवतमाळ जिल्ह्यातील कवयित्री कविता शिरभाते यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे -जगण्यामध्ये हेतू काही.

       जीवन कधी रखरखत ऊन 
       तर कधी झुळझुळणारा गार वारा 
       कधी गुंतागुंतीचे चक्रव्यू 
       तर कधी लहरीस गवसावा किनारा...!

       हे जीवन सुंदर आहे. या ओळीप्रमाणे सुंदर जीवन जगताना तेवढाच त्याग,कष्ट,मोह,माया,स्वार्थ इत्यादी गोष्टी त्याच जीवनाचे विविध अंग आहेत. जीवनात जसे सुख येथे त्यामागून आपोआप दुःख येते. सुख-दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून दुःखा नंतर सुख आणि सुखानंतर दुःख असे चक्र मानवी जीवनात निरंतर सुरूच राहते. जीवन कधी रखरखतं ऊन तर कधी झुळझुळणारा गार वारा, तर  कधी जीवनामध्ये गुंतागुंतीचे अनेक प्रश्न असतात. तर कधी जीवनाला किनारा गवसतो. कवयित्री कविता शिरभाते यांनी साहित्य विश्वास जगण्यात जगण्यामधले हेतू मनात ठेवून पाहिलं आणि मग पाऊल टाकलं वरील ओळी मनाला सुन्न करत जगण्याचा अर्थ शोधतात.कवयित्रीचे नावच कविता असल्याने कवयित्री आपल्या भावना हळुवार अलगदपणे वरील कवितेतून मांडताना दिसते.
       कवयित्री कविता शिरभाते यांच्या लेखणीचा प्रवासाचा सखी सिद्ध लेखिका या समूहात उगम झाला हे कवयित्रीने पहिल्याच कवितेत प्रामुख्याने नमूद केल्याचे दिसून येते.

               दारिद्र्य माणसांमाणसातील अनुभवांची श्रीमंती देतो 
               जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं 
                माणसाला अधिक समंजस बनवतं 
                आणि गरज कोणती व जैन कोणती
                यातला फरक शिकवून जातं
                कष्टाच्या स्वप्नात जगणंही असंच 
               पण श्रीमंतीत लोळणाऱ्या राजनेत्यांना ते कसं समजणार?

       दारिद्र्य माणसांमाणसातील फरक दर्शवतो. दारिद्र्य माणसाला जगण्याच्या लढाईत बळ पुरवतो. माणसाला समंजस बनवून शहाणं बनवतं. श्रीमंत लोकांना ओळखायला लावतं खऱ्या श्रीमंतीचे दर्शन घडवत खोट्या श्रीमंतीचा आव आणणा-यांचा पर्दापाष करतो. आयुष्याच्या शाळेत दारिद्र्य प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातं. मूलभूत गरज कोणती आणि चैन कोणती यातला फरक शिकवून जातो. अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्यांचं जगणं कष्टमय आणि दुःखप्रस्त असतं हे शिकवून जातं. पण श्रीमंताला राजनेत्याला दारिद्र्य म्हणजे काय ? हे समजत नाही कारण त्यांचे चटके त्यांना कधीच बसलेले नसतात. ही कवयित्री वरील ओळींमधून विशद करायला विसरत नाही.
           प्रक्षुब्ध जाणीवा असणारी, संवेदनशील मनाची कवयित्री कविता शिरभाते यांनी मतदानाचा हक्क हा आपला अधिकार आहे. आणि तो संविधानाने आम्हांस दिला आहे. माणसाने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले अनमोल मत देशाप्रति निष्ठावान असणाऱ्याला द्यावे.असे आवर्जून सांगतात. जाग माणसा या कवितेतून माणसाने माणसातच माणुसकी शोधायची असते. मन, बुद्धी, विवेकाला सदगुणांची जोड द्यायला सांगितली आहे. दुर्गुणांची होळी करून माणसाने जगलं पाहिजे.माणसा समान वागलं पाहिजे म्हणून अशी आर्त हाक कवयित्री कविता शिरभाते देतात.
     कवयित्री कविता शिरभाते यांच्या काही कविता गजल सदृश्य पाहायला मिळतात. त्यामध्ये अगदी सोप्या भाषेत लय साधलेला दिसून येतो.या कविता अंतर्मनाला भेटल्याशिवाय राहत नाहीत. शब्दांचा फापड पसारा न करता अगदी मोजक्या शब्दात कवयित्री अगदी सोप्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते.
  
        या अवकाळी पावसानं 
       नकोसं केलंय माझं जगणं 
       शेतावर फुलल्या केळीच्या बागा 
       वेलीवर द्राक्षांनी घेतली जागा 
       संत्री मोसंबीचा जुळलाय धागा 
       अशातच तुझं अवकाळी येणं 
        नकोसं केलंय माझं जगणं....!!

        बळीराजाच्या मुखातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कसं नुकसान होतं? केळीच्या, द्राक्षांच्या बागा, संत्री,मोसंबी इ. बागेमध्ये अवकाळी पावसाने जोडपले की शेतकऱ्याच्या हाती काहीच राहत नाही. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. अगोदरच शेतकरी अंगावर कर्ज काढून शेती पिकवतो. त्यात पण निसर्ग त्याची परीक्षा पाहतो. म्हणून शेतकऱ्याला त्याचं जगणं नकोसं वाटतं अशी आर्त हाक वरील रचनेतून कवयित्री कविता शिरभाते मांडतात.

        काढी मातीतून मोती 
        अन्नदाता कीर्ती थोर 
         पोट भरतो जगाचे 
         निजे उपाशीच पोर....!!

        शेतकऱ्याचं जगणं काय असतं?  पदराला शंभर गाठी मारून, चटणी भाकरी खाऊन तर कधी उपाशी राहून पोटाला चिमट्या देत काळ्या आईची सेवा करणारा शेतकरीच खरा अन्नदाता आहे. तोच जगाचा पोशिंदा आहे. असा जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या कवयित्री कवयित्री शिरभाते यांच्या आहेत. कवयित्री कविता शिरभाते यांच्या कविता माय मराठीचा गोडवा वाढवणाऱ्या, तर जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या,तर काही कविता काळ्या आईची सेवा करणाऱ्या, शेतकरी राजाच जगणं सांगणाऱ्या, मतदानाचा हक्क बजावणाऱ्या, माणुसकी जागवणाऱ्या, तर कधी बालपणात हरवणाऱ्या आहेत. गझल सुदृश्य कविता तर अत्यंत वाचनीय होऊन जाणाऱ्या व कवी शब्दांमध्ये जास्त मतितार्थ दर्शवणाऱ्या, मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे असे सांगणाऱ्या, तर कधी माणसाचा शोध घेणाऱ्या, तर कधी मखमली प्रीत कशी फुलते? भेट कशी थेट होते ? अशा प्रेम रसात न्हावून निघणाऱ्या कविता वाचकाला वेड लावल्याशिवाय राहत नाहीत.
          कवयित्री कविता शिरभाते यांच्या विरह, गारवा, पावसाळा, कोप निसर्गाचा, अवकाळी पाऊस, बळीराजा, बैलपोळा, दीप पेटवा मनात, पिंडदान, आई, आला पाऊस भरून, श्वास आईचा, स्त्री जाणीव, जन्मदात्री, गणगोत, जिजाऊ-सावित्री, आई मला वाचव गं, कन्यादान, जगाया निघाली, चिमणी ताई,जगण्यामध्ये हेतू काही अशा कित्येक कविता वाचकांच्या काळजात घर करून राहतात.
         कवयित्री कविता शिरभाते यांच्या जगण्यामध्ये हेतू काही या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ८५ कविता आहेत.  याची पहिली आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली.मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय देखण्या स्वरूपात केले असून प्रस्तावना नीलकृष्ण देशपांडे, यवतमाळ यांनी केली असून पाठराखण भीमराव पांचाळे सर यांनी अगदी सोप्या भाषेत करून दिले आहे. कवयित्री कविता शिरभाते यांच्या सर्वच कविता वाचकांच्या पसंतीस पडतील यात तिळमात्र शंका नाही. कविताताई शिरभाते यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

जगण्यामधले हेतू काही- कवयित्री कविता शिरभाते
 प्रकाशक- परिस पब्लिकेशन पुणे 
मुखपृष्ठ- श्री अरविंद शेलार 
पहिली आवृत्ती- १४ नोव्हेंबर २०२१ 
मूल्य केवळ -150 रुपये 
मोबाईल नंबर ९८३४१३८००१

समीक्षिका /लेखिका
 कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कोकलगाव 
तालुका, जिल्हा -वाशिम

Wednesday, 22 March 2023

http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्ह...

http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्ह...:  *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे- बालगीतांचा खजिना*     चंद्रपूर जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती जगझाप यां...

Tuesday, 21 March 2023

मिनाक्षी नागराळे सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

 *मिनाक्षी नागराळे यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर.*

सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराची सुरूवात केली आहे.शिक्षकांमधील शैक्षणिक उत्तरदायित्व, शैक्षणिक काम, सामाजिक काम, साहित्यिक रुची, समाजासाठी स्वतः चे अर्थिक योगदान, स्वतःची वाढवलेली शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टींचा विचार करून ट्रस्टच्या वतीने निवड केली जाते.यावर्षी साधारण ७०प्रस्ताव महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांकडून प्राप्त झाले होते त्यातील सर्वोच्च २०शिक्षक निवड समितीने निवडले आहेत.त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव जि.प.शाळेच्या आदर्श उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.दरवर्षी प्रस्ताव न मागवता एक विशेष पुरस्कार दिला जातो तो यावर्षी अक्षरनंदन शाळेचे आदर्श शिक्षक अनिल आंधळे यांना जाहीर झाला आहे.
    ही माहिती प्रकल्प प्रमुख सोपान बंदावणे,कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर,सुरेश धनकवडे,प्रभा गोगावले, रजनीताई धनकवडे,ज्योती मते,संगिता गोवळकर यांनी दिली . पुरस्कार वितरण रविवार दि १२मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध साहित्यिक व ९५व्या साहित्य संमेलन अध्यक्ष मा भारत सासणे यांच्या उपस्थितीत उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ,पुणे येथे सायं ४वा संपन्न होणार आहे.
     नुकताच या वर्षी मिनाक्षी नागराळे यांनी नवोपक्रम स्पर्धेत वाशिम जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक पटकावला आहे.त्यांचे अनेक नवोपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.मिनाक्षी नागराळे यांचे चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.चिमणी पाखरं,उमलती फुले, स्वराज्याचे मावळे (महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह -जृयांची निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयात निवड झाली आहे आणि महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.) समकालीन समिक्षा -(पि.एच.डी.करणा-यांसाठी संशोधन ग्रंथ) अशी चार पुस्तके प्रकाशित असून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.मिनाक्षी पी.नागराळे नावाचे शैक्षणिक युट्यूब चॅनल प्रसिध्द असून लाखो लोकांची पसंती दर्शविली आहे.संगीतमय पाढे या त्यांच्या व्हिडिओ ला ६० लाख लोकांनी पाहिला आहे.त्याचबरोबर त्यांचे http://meenakshi1412.blogspot.com या ब्लॉगवर अनेक शैक्षणिक पोस्ट आहेत.
          मोलाचा समजला जाणारा सुमतीबाई गोरे ट्रस्टचा  राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Tuesday, 24 January 2023

मनाचे मळभ(अभंग क्र.४०)

 मनाचे मळभ (अभंग क्र.४०)

मनाचे मळभ | करूयात दूर|
जायचे हो भूर्र | एकदिनी ||

आहे तोपर्यंत | आनंदाने जगा |
उगाचच त्रागा | कशापायी ||

निर्मळ मनाने | राहील जो आज |
दिर्घायुष्यी साज | मिळे तया ||

नको जळमटे | पवित्र हे मन |
देवाचेच धन | आहे बघ ||

मनमंदिरात | भगवंत वास |
लाभे सहवास | ठेव ध्यानी ||

आपण सारेच | ईशरूपी पक्षी |
आत्मा आहे साक्षी | प्रत्येकाचा ||

मनातली घाण | काढुनिया टाक |
स्वतःचाच धाक | असू द्यावा ||

निर्मळ मनाने | आनंदे भरीन |
जगण्याचा शीण | जाईल गा ||

मनाची श्रीमंती | जया वसतसे |
निर्मळ होतसे | मन त्याचे ||

दूर फेकुनिया | मनातली घाण |
स्वच्छ आणि छान | ठेव मन ||

मिनू म्हणे आता | खरेखुरे धन |
माणसाचे मन | ठेव ध्यानी ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम


Saturday, 21 January 2023

बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे -बालगीतांचा खजिना

 *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे- बालगीतांचा खजिना*

    चंद्रपूर जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती जगझाप यांचा नंदादीप या काव्यसंग्रहानंतर दुसरा काव्यसंग्रह म्हणजे बालगीतांचा खजिना नुकताच वाचनात आला. लहान बालकांना बडबड गीते, बालकविता आणि गोष्टी खूप आवडतात. सो प्रीती जगझाप या मुळातच एक प्राथमिक शिक्षक असल्याने त्या बालकांचे भाव विश्व जाणतात. कायम बालकांच्या सानिध्यात राहत असल्याने बालकांच्या आवडीनिवडी, त्यांचा कल ओढा जाणून असल्याने त्यांचा २१ कवितांचा खजिना बालकांचे भावविश्व समृद्ध करेल यात शंकाच नाही. 'बालगीतांचा खजिना' या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि बोलके असल्याने व बांधणी उत्कृष्ट असल्याने थोरामोठ्यांना, बालकांना पसंतीस पडणारे आहे. या बालकाव्यसंग्रहाला प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक कवी चंद्रकांत वानखेडे पुणे यांची लाभली असून शुभेच्छा ग्रामगीताचार्य बंडोपंत बडेकर( अध्यक्ष झाडीबोली साहित्य संमेलन भंडारा )यांची लाभली आहे तर पाठराखण सुप्रसिद्ध बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांची लाभली आहे.
           लहान बालकांना पावसात भिजायला आणि खेळायला खूप आवडतं. त्यांचे विश्वच वेगळं असतं. लहान बालकांना जसा पाऊस आवडतो तसेच प्राणी सुद्धा खूप आवडतात. प्राणी, पक्षी यांच्या बद्दल कुतूहल व आकर्षण असते. सौ. प्रीतीताईंनी नेमके तेच हेरले आहे. बालकात रममान होणाऱ्या त्या शिक्षिका असल्याने बालकांची आवड, बालकांचे भावविश्व त्या जाणतात त्यामुळेच तर बालगीतांचा खजिना त्यांच्या हाती सापडला आहे. बालकविता करणे इतकं साधं सोपं काम मुळीच नाही. बालकांच्या इतकच लहान व्हावं लागतं. तेंव्हा कुठे अशा बाल साहित्याचा जन्म होत असतो हेही तितकच खरं.
        बालपणी बालकांना जादूची छडी आवडते. बाहुली संगे खेळायला आवडते. परींच्या गोष्टी आवडतात. परींच्या कविता आवडतात. कवयित्री प्रीती ताईंनी वर्षाराणी या कवितेतून पावसाचे महत्व विशद केले आहे. पावसात भिजण्याचा बालमनाचा आनंद वर्षाला ती या कवितेतून पहायला मिळतो. 
           
             डोळ्यावर बांधून कापडी पट्टी 
             चला खेळूया धावणी शिपटी
             तू धाव आधी मी धावतो मागे 
             पडले कोणीतरी येऊ नका रागे...!

           आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात नवनवे तंत्रज्ञान जसजसे विकसित झाले तसतसे लहान बालकांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण मोबाईलच्या इंटरनेटच्या जमान्यात वावरू लागले. त्यामुळे पूर्वीच्या काळी खेळले जाणारी मैदानी खेळ आज दुरापास्त होत चालले आहेत. आजच्या काळातील बालकांना पारंपारिक खेळाची नावे पण माहिती नाहीत. पूर्वीचे खेळ आता खेळता येत नाहीत किंवा सरसर झाडावरही चढता येत नाही.पूर्वी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर किंवा शिवना पाणी असे खेळ खेळले जात होते. एक जण पुढे धावायचा दुसरा त्याचे मागे धावायचा धावता धावता कोणी पडले तर रागही यायचा नाही. अशा पद्धतीने वरील ओळीतून कवयित्री प्रीतीताईनी पूर्वीच्या काळच्या मैदानी खेळांची ओळख,खेळाचे महत्व आजच्या इंटरनेटच्या काळातील विद्यार्थ्यांना करून दिली आहे.
        कवयित्री प्रीती ताईंनी चाचा नेहरू या कवितेतून चाचा नेहरूंचे कार्य त्यांचे आवडनिवड सांगितली आहे.चाचा नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान असून त्यांनी स्वदेशी साठीची लढाई त्यांनी त्यांच्या कवितेतून विशद करण्याचा प्रयत्न केला आहे.

             चला मुलांनो गाऊया
             भाज्यांची नावे पाहूया 
              हिरवी हिरवी ताजी ताजी 
              आवडते मला मेथीची भाजी 
               पालक चवळी शेपू माठ 
               सांबराचा सर्वत्र थाट 
                हिरवीच दिसते शिमला मिरची
                काटवल आणतात  जिभेवर सिर्शि
               भेंडीची आहे मी खूप दर्दी 
                पांढऱ्या भोंबुड्यावर तुफान गर्दी 
                चला मुलांनो गाऊया 
                भाज्यांची नावे पाहूया....!!

              वरील कवितेतून भाज्यांची नावे कवयित्रीने नमूद केली आहेत. प्रत्येक भाजी आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे? लहान मुलांना सर्वच भाज्या आवडत नाहीत म्हणून प्रत्येक भाजीचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून प्रीती ताईने सांगितले आहे.लौकिचा रस हृदयासाठी चांगला असतो तर कारले मधुमेह आजारावर गुणकारी औषध म्हणून काम करते. सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल तर सर्व बालकांनी सर्वच भाज्या खाल्ल्या पाहिजेत या उद्देशाने कवयित्री गाण्याच्या रूपाने भाज्यांचे महत्त्व विशद करतात.

             खेळ , उपक्रम, विज्ञान वही 
            आठवतात मला माझ्या बाई 
            ऑनलाईन मला आता करमत नाही 
            डोळ्यांची होते लाही लाही
            जा रे जा रे कोरोना 
            मैं तुझसे डरू ना....!!

                  विद्यार्थ्यांना जेवढी शाळा आवडते तेवढ्याच शाळेतल्या मॅडम आवडतात.एकटेपण विद्यार्थ्यांना मुळीच आवडत नाही.लॉकडाऊन काळात शाळांना टाळे बंदी झाली आणि विद्यार्थ्यांना जवळपास दोन वर्ष घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करावा लागला पण विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासाला नंतर खूप कंटाळून गेले होते. विद्यार्थ्यांना केंव्हा एकदा शाळा सुरू होईल आणि शाळेत जाईन असं झालं होतं विद्यार्थ्यांना शाळेतले खेळ, उपक्रम,विज्ञान वही आणि शाळेतल्या बाई आठवत होत्या.मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास करून डोळ्यांची खूप आग होत होती. जा रे कोरोना. आता आम्ही तुला घाबरणार नाही असं प्रत्येकाला वाटू लागलं होतं. कवयित्री प्रीती ताईंनी बालमनाच्या वास्तवतेचं दर्शन वरील ओळीमधून करून दिली आहे.

               हिमालयाच्या उंच शिखरावर 
               फडकत आहे निशाण
               हिंद आणि अरबी सागर 
               ज्याचे करीती गुणगान 
               प्रिय आमचा भारत देश महान...

           वरील ओळीतून कवयित्री प्रीती ताईंनी हिमालयाचे व आपल्या भारत देशाचे गुणगान गायले आहे.हिमालयाच्या उंच शिखरावर आपल्या भारत देशाचे निशान डौलाने फडकते आहे. हिंद आणि अरबी सागर सुद्धा भारत देशाचे गुणगान गातात. प्रिय आमुचा भारत देश महान...भारत देशाचे महती जाणाऱ्या गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, कावेरी इ. नद्यांच्या देखील उल्लेख वरील कवितेत करताना कवयित्री दिसून येतात. कवयित्री प्रीती जगझाप यांनी बालमनाला भावणाऱ्या अनेक कविता या बालगीतांचा खजिना या बालकाव्यसंग्रहात घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांना आवडणारा पाऊस, परी, खेळ,चाचा नेहरू, आईची माया, भाज्यांची नावे,कोरोना,इकर बिल्ला टिकर बिल्ला,आवडीचे खेळ, शाळा बंद पण शिक्षण सुरू, स्वच्छता, भारत देश महान, विद्यार्थ्यांना आवडणारा फळा, मांजराला आवडणाऱ्या लोण्याचा गोळा, सृष्टी सौंदर्य, फुलपाखरू आणि माझी शाळा अशा अनेक विद्यार्थ्यांच्या बालमनाला स्पर्श करणारा हा बालगीताचा खजिना प्रीती ताईंनी वाचकांच्या हाती दिला आहे. या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक व दर्जेदार असल्याने प्रत्येक कवितेनुरूप त्यात चित्र असल्याने आणखीन सुंदर आकर्षक दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनाला भावणारे आहे हे सर्व वाचकांना आवडेल यात शंकाच नाही.
          प्रीती ताईच्या हातून अनेक बालकाव्यसंग्रहाची निर्मिती होवो. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!

              बालकाव्यसंग्रह-बालगीतांचा खजिना -प्रीती जगझाप 
             प्रकाशन -समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर 
             प्रकाशक- प्रवीण भाकरे 
             मुखपृष्ठ -संतोष घोंगडे 
             प्रथम आवृत्ती 15 जून 2022 
             मूल्य -केवळ साठ रुपये 

       समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
      मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
       मु. पो.कोकलगाव 
       तालुका /जिल्हा- वाशिम
       मो.नंबर 9767663257