मानवाचे अंत:करण म्हणजे भाव-भावनांनी भरलेले समुद्रच.मानवाला जसे सुख हवे असते तसेच सुखामागून दुःखही येतच असते. मनुष्य आपल्या भावभावना, राग, द्वेष, प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य अशा अनेक गुणांनी युक्त ओतप्रोत भरलेला असतो. निसर्गाने सर्वांना दिलेली देणगीच. प्रत्येकाच्या अंतकरणात वेगवेगळ्या भावना असू शकतात. अशीच एक भावना चंद्रपूर जिल्ह्यातल्या कवयित्री सौ. प्रीती जगझाप यांनी आपल्या जन्मदात्रीच्या नावाने 'नंदादीप' च्या रुपाने भावभावनांचा कल्लोळ व्यक्त केला आहे.
संवेदनशील मनाच्या कवयित्री सौ. प्रीती जगझाप यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह जरी असला तरी त्यांना वर्ग आठवी पासून कविता लेखनाची आवड आहे.मध्यंतरी काही कालावधीसाठी खंड पडला पण लग्न झाल्यावर कवयित्री आपल्या भावभावना कवितेच्या माध्यमातून पत्र लेखन करू लागल्या. पूर्वी मोबाईल,टेलिफोन अशी सुविधा नसल्याने कवितेच्या मनातील भावना कागदावर उमटू लागल्या. नंतर सौ प्रितीताईनी पतीदेवांची खंबीर साथ व इतर कवींचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे नंदादीप प्रकाशात आला.
प्रिती जगझाप यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे वडील स्वर्गीय तुळशीराम रामटेके व विठ्ठल रामटेके (काका) यांच्या चरणी हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समिक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी केले असून, मुखपृष्ठ श्रीकृष्ण ढोरे यांनी अतिशय सुंदर नावाला साजेसे बनवले आहे. या काव्यसंग्रहाची प्रथम आवृत्ती 5 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झाली. नंदादीप या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 120 रुपये असले तरी यातल्या सर्वच कविता जीवनाचा अर्थ सांगणा-या आहेत. यात शंकाच नाही.
कवयित्री प्रीती जगझाप यांची पहिली कविता आई विषयीचे ऋण व्यक्त करणारी आहे. नंदादीप म्हणजे देवापुढे रोज लावला जाणारा दिवा. शांत जळणारी ज्योती. ती स्वतः जळते पण सर्वांना प्रकाश देते. त्या प्रकाशातुन नवी ऊर्जा, नवी चेतना निर्माण होते.तसेच कवयित्री प्रीती ताईंच्या मनमंदिरी त्यांच्या आई वसल्या आहेत. त्यांच्या आईचे नाव नंदा यांच्या नावाने हा पहिला कविता संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. माझ्या वाचनात आलेल्या कवितासंग्रहापैकी आईच्या नावाने निघणारा हा पहिलाच काव्यसंग्रह वाचून माझे अंत:करण अगदी भरून आले. आजच्या काळात अनेक कवी स्वतःच्याच नावाने काव्य संग्रह संग्रह काढताना मी पाहिले. पण कवयित्री प्रीतीताईंनी आईविषयी कृतज्ञता सदोदित स्त्रवत राहावी या उद्देशाने केलेला हा शब्दप्रपंच. कवयित्री प्रीती जगझाप यांनी आईबरोबरच दुसरे स्थान विद्येची देवता सावित्रीमाई यांना दिले आहे.
सावित्री तू नसतीस तर
आजही मी तिथेच
खितपत पडले असते
सुशिक्षित निरक्षरांचा गर्दीत...!!
पूर्वीच्या काळी स्त्रीवर होणारा अन्याय, त्रास, हाल-अपेष्टा, गुलामी, रांधा वाढा, उष्टी काढा, चूल आणि मूल इतक्याच बंदिवान असलेली स्त्री आज मुक्त विचाराने स्वातंत्र्य आणि अवकाश झेप घेऊ शकते हे फक्त सावित्री मुळेच. सावित्री नसती तर अख्ख्या भारत देशातील स्त्रिया आजही अज्ञानाच्या अंधकारात विझून पडल्या असत्या. अंधारात खितपत पडल्या असत्या. सुशिक्षित निरक्षरांचा गर्दीत. सावित्रीनेच ज्ञानाची कवाडे खुली केली. तिच्यामुळेच आजच्या स्त्रियांच्या पंखात बळ मिळाले आहे. शिक्षणाचे, स्वातंत्र्याचे,अभिमानाचे,अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे.नाही तर या मनुनी काय केलं असतं? कुणास ठावुक? अशी खंत प्रीती ताईंनी वरील ओळीतून व्यक्त केली आहे.
कवयित्री प्रिती जगझाप यांनी जन्मदात्रीचे ऋण व्यक्त करण्यासाठी पहिली कविता आई. ज्ञानाईचे ऋण मानण्याकरिता दुसरी रचना.सावित्रीच्या चरणी समर्पित केली. तर तिसरी रचना ही आज्जी ही कविता. प्रत्येकालाच एक आज्जी असावी ही आशा प्रज्वलित करते. चौथी कविता अख्ख्या विश्वातील समस्त नारीला नमन करणारी आहे. स्त्रीची शक्ती, तिचा करुणाभाव,तिचे वात्सल्य, तिची रूपे, तिचा जिव्हाळा, तीच जगाची स्वामिनी. तुझ्या शक्तीनेच हे विश्व चालते. तू नररत्नांची खाण असे अनेक पैलू समस्त स्त्रीजातीविषयीचा आदर दर्शविणारी आहे.
सडेतोड विचारांची कवयित्री सौ प्रीती जगझाप यांनी वास्तवाचे भान राखत, सत्याची कास धरत, प्रत्येकाला न्याय देत, वास्तव आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते कौतुकास्पदच आहे. महाराष्ट्राचे गीत गात, मोठेपणा सांगत, आजच्या काळात माणसाची माणुसकी कशी हरवत चालली आहे? ही हरवलेली माणुसकी या कवितेतून कळते तर दुष्काळाचा सामना करणाऱा शेतकरी पाऊस पडल्यावर कसा अहवालदिल होतो ते दुष्काळ या कवितेतून दिसून येते.
घरी झाली मोठी पण
मन झालीत हो छोटी
हातो- हाती मोबाइल
शब्द नाहीत हो ओठी...!!
वरील ओळीतून आजच्या काळातील भयान वास्तव कवयित्री प्रीती जगझाप यांनी व्यक्त केले आहे.आज अनेक शहरात, ग्रामीण भागातही मोठमोठाली घरी झालीत पण माणसांची मने मात्र छोटी होत चालली आहेत. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसतो पण या मोबाईलच्या आभासी जगात माणूस माणसापासून कसा दूर चालला आहे? नात्यातला संवादात मुका झाला आहे.कुणाच्याही ओठी शब्द नाहीत भावना व्यक्त करायला.माणूस बोलतो तो फक्त मोबाईलशीच. तोही मुक्यानेच अशी खंत प्रीती ताईंनी व्यक्त केली आहे.
हळव्या मनाच्या कवयित्री प्रीती जगझाप यांचे स्त्री मनाशी असलेले गाढ नाते, स्त्रीपूजेच्या त्या उपासक आहेत. त्यांच्या बहुविध कविता या स्त्रीवर आहेत. स्त्री विषयी नितांत आदर त्यांना आहे. व प्रत्येकानेही स्त्रीचा आदर करावा असे कवयित्रीला मनोमन वाटते. त्याच बरोबर त्यांना वृध्दांविषयी आपुलकी आहे.
मन सुन्न, भावना सुन्न
विचार सुन्न सारे
कशास हवे वृद्धाश्रम
बंद करा सारे....!!
संवेदनशील मनाची कवयित्री प्रीतीताईंनी वृद्धाश्रम या कवितेतून त्यांचे मन सुन्न होते. विचार सुन्न होतात.कशाला वृद्धाश्रम काढतात सारे? वृद्धाश्रम बंद करा. वृद्धांना आपुलकीचा मायेचा हात द्या.वृध्दच आपल्या घराचा आधार आहेत.वृद्धांना म्हातारपणी पैसाअडका काही हवं नसतं. त्यांना फक्त मायेची ऊब द्या. साथ द्या. हात द्या. त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवा. त्यांच्यासोबत चांगली वागणूक असावी. त्यांना काहीच कमी पडू देऊ नका. तुम्हाला ही काहीच कमी पडणार नाही. अशी आर्त हाक कवयित्री प्रीती जगझाप यांनी वरील ओळीतून व्यक्त केली आहे.
कवयित्रीचे मन जेवढे हळवे,संवेदनशील आहे तेवढेच पिंपळा सारखे कणखर देखील आहे. त्यांना जेवढा स्त्रियांबद्दल जिव्हाळा आहे, आदर आहे. तेवढीच त्या निसर्गाच्या पूजक आहेत. निसर्गाशी वेगळे जवळचे नाते आहे. कवयित्रीच्या आतल्या सुप्त भावना,अभिव्यक्ती,शब्द माधुर्य, जिव्हाळा, वृद्धांना बद्दलचा नितांत आदर, मैत्रीभाव, आई बद्दलची माया, आजीचे प्रेम, प्रेमभाव, समाजातील भयान वास्तव, शेतकर्याबद्दलची काळजी, प्रेमावरची निष्ठा, गावाची ओढ, जीवनसाथीचे प्रेम, तसेच मासिक पाळी सारख्या विषयाला हात घालत नैसर्गिक देणगी ती. त्यातून केलेले मतपरिवर्तन. जिद्द, चिकाटी,जीवनाचा खरा अर्थ, माय मराठी बद्दलचे प्रेम हे सर्व कवयित्री प्रीतीताईच्या कवितेतून स्पष्टपणे दिसून येते.
'नंदादीप' या काव्यसंग्रहात एकूण ६६ कवितांचा खजिना आणि त्यात लपलेल्या कवयित्रीच्या भाव-भावना यांचा सुरेख संगम दिसून येतो. एकूण ८० पृष्ठ असलेल्या या काव्यसंग्रहाची पाठराखण डॉक्टर पद्मरेखा धनकर, चंद्रपूर यांनी अतिशय सुरेखपणे केलेली आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असाच हा काव्यसंग्रह म्हणजे 'नंदादीप' होय.
कवयित्री प्रिती जगझाप यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका,जिल्हा वाशिम