Saturday, 2 January 2021

विद्येची खरी देवता -सावित्रीआई फुले...

 *खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*

ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म वाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलां नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 
            सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
             १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.

           शिका शिका रे विद्या शिका
           मनूचे काही ऐकू नका !
           कोणी मागे राहू नका 
            विद्या शिकूया ज्ञान घेऊया 
             एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!

                या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.

           फुले असूनी काटे वेचिले
           घेतला शिक्षणाचा ध्यास 
            तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
          आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!चे

               सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
                 जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
            ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या. 

          धोंडे मुले देती| नवसा पावती|
         लग्न का करती | नारी नर ||
    
                दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
         
             तुझ्या कार्याचा वेलू 
             मी गगनाला नेईन
             तुझ्या विचारांचे गुट्टी
            मी विद्यार्थ्यांना देईन

              तुझ्या कार्याची भाऊ
              किती गाऊ गौरवगाथा 
              धन्य धन्य ती साऊ 
             तुझचरणी विनम्र माझा माथा...!!

       जय ज्योती....
          जय क्रांती....
            जय सावित्रीमाई....!!

*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७

Thursday, 31 December 2020

*स्त्री मनाचे गूढ उकलत जाणारे ललित लेखसंग्रह म्हणजे "मौनातील अर्थ"...!*

 *स्त्रीमनाचे गूढ उकलत जाणारे ललितलेखसंग्रह म्हणजे- मौनातील अर्थ*

           धुळ्याच्या प्रसिद्ध लेखिका /कवयित्री/ प्राध्यापिका त्रिशिला साळवे यांचा ललितलेखसंग्रह नुकताच वाचनात आला. या ललित लेखसंग्रहाचे मुखपृष्ठ पती-पत्नींच्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा,त्यांनी भावना अभिव्यक्त करणाऱ्या जोडप्यांचे चित्र अतिशय देखणे आहे. या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती ५ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे. या ललित लेखसंग्रहाचे मूल्य फक्त १६० रुपये आहे पण यातील अनुभव प्रत्येक स्त्री मनाला स्वतःच्या ढाच्यात बसवून जणू माझेच आयुष्य आहे.आणि माझ्याच घरातला संवाद आहे. असं प्रत्यक्ष वाचनाची अनुभूती वाचताना लक्षात येते. मलपृष्ठावर प्रकाश मारुती तोटेवाड यांनी पाठराखण अतिशय सुंदर शब्दात केली आहे. पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार आहे.
                 लेखिका त्रीशिला साळवे  यांच्या सहजीवनातील अनुभव, स्त्रीने समजून घेण्याची भूमिका, संसार चालवत असताना जोडीदाराच्या आवडीनिवडी, जोडीदाराला समजून घेण्याची भूमिका, स्त्री जीवनात पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, स्त्री मनाची चालू असलेली घालमेल, तिच्या भावना,नाजूक कळी सारखे तिचं मन, सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर होणारी जाणीव, संसार वेलीवर लागलेली फुले, जणू सारं काही मौनातील अर्थ मधून व्यक्त होते. वाढत्या वयाबरोबर समजदारीतून, निरागसतेतून, निस्वार्थीपणातून,शब्दाशिवाय फक्त मौनातून लेखिका न्याहाळत असते. साध्या साध्या गोष्टींची हौस जोडीदाराकडून पूर्ण करून घेण्यात तिला जीवनाचा खरा आनंद मिळतोय. स्वतःच्या आवडीनिवडी पेक्षा जोडीदारांनी केलेली निवड लेखिकेला अधिक प्रिय वाटते.जोडीदाराच्या सहवासातून मिळालेलं प्रेम त्यातून निर्माण झालेली जाणीव, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका लेखिका अगदी बिनधास्तपणे मांडताना दिसते.
                बालपणी माहेर अतिशय अप्रूप वाटणारी वधू एक दिवस माहेर सोडून चिमणीसारखी उडून जाते. नवऱ्या कडील नात्यांमध्ये गुंतून जाते. त्याच घराला माझं घर म्हणून राहते. नवऱ्याचं सुख ते तीच सुख होऊन बसतं. छोट्या-छोट्या सुखांच्या क्षणांनी हरखून जाते. स्वकर्तृत्वाची जाणीव सदैव ठेवूनच स्वतःचे सर्वस्व सहजपणे अर्पण करत असते. प्रत्येक स्त्रीला तीचं सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र तिच्या प्राणापेक्षा सुद्धा अधिक प्रिय असते. ते जेव्हा हरवतं तेव्हा लेखिकेची होणारी दमछाक त्यावर पतीने मारलेली प्रेमाची फुंकर खूपच सुंदर मांडली आहे. नवऱ्याने दिलेल्या सोन्याचं मंगळसूत्र लेखिकेला अधिक प्रिय वाटू लागतं कारण ते खऱ्या समर्पणातून, जाणिवेतून, कोणत्याही सामाजिक बंधनाशिवाय, आंतरिक ओढीने दिलेलं असतं नव्हे तर तो त्याच्या हातांनी गळ्यात घालतो. हीच आठवण लेखिकेला जगण्याची उर्मी देऊन जाते.
               नवरा-बायकोच्या नात्यातला गोडवा अतिशय सरळ साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करणारी हळव्या मनाची त्रिशिला स्वतःच्या संसारसुखाबरोबरच प्रत्येक स्त्री जातीचे मन नकळतपणे गुंतवित जाते. पती-पत्नींच्या नात्यांमध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे. हे लेखिका तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करते. स्त्री किती पटकन रागाला येते. तेवढीच समंजससुद्धा असते. तेवढीच प्रेमळ असते. तिच्या मनात मात्र काहीच नसतं. पण माणूस सुद्धा अगदी शांतपणे सहन करतो हे सारं लेखिका नमूद केल्या शिवाय राहत नाही. सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्याची अतिशय चिंता वाटणारी लेखिका त्या विचारानेच तिचं मन सैरभैर होतं आणि मनातील अर्थ शोधायला निघतात तिचे शब्द.
                    सहजीवनसाथी तिची पदोपदी काळजी घेणाऱ्या वडिलांसारखा भासतो लेखिकेला. तर कधी मित्रांसारखा. पतीच्या साथीमुळे स्वतः किती बिनधास्त आहे हे लेखिका खुशाल सांगून टाकते. ना तिला भूतकाळाची आठवण. ना वर्तमानाची वेदना.ना भविष्याची काळजी. नाजूक नात्यांचा हळवेपणा लेखिका हळुवारपणे मांडण्याचा प्रयत्न करते. पतीचा विरह तर सोडाच पण त्याची कल्पनाही लेखिकेला करवत नाही.आज समाजामध्ये आपण पाहतो पती नसलेल्या स्त्रीला समाज जगूच देत नाही. व्यभिचाराचे ओरघडे ओढल्याशिवाय. स्वतः पण दूर जाण्याची भीती वाटते म्हणून फक्त ओंजळभर प्रेम हटाने आपल्या नवऱ्याकडे मागणारी लेखिका शेवटी संवेदनशील मनाची एक स्त्रीच आहे. सोबत निवांत वेळ घालवण्यासाठी चाललेली तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे.पिक्चरला जाता आले नाही तरीही न रागावता, सुखी संसाराची स्वप्न बघणारी स्त्री खरंच ग्रेट आहे.परमेश्वराने विश्वातील सर्वात सुंदर कलाकृती अधिक वेळ देऊन निर्मिलेली सुंदर भेट म्हणजे स्त्री. हळव्या नाजूक मनाच्या स्त्रीचं मन सांभाळणे फार जोखमीचे काम असतं. हे पुस्तक वाचल्यानंतर समजतं. निवांतपणाची व्याख्या धावणा-या आयुष्यात खूप मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न लेखिका करते. विश्वास शब्दांचा अर्थ खूप छान पद्धतीने लेखिका सांगण्याचा प्रयत्न करते. शब्दांचा अर्थ हा शब्द उच्चारण्याच्या लकबीवर आणि तो शब्द कोणत्या माणसाने कोणत्या परिस्थितीत उच्चारला आहे यावर अवलंबून असतो.पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास किती महत्त्वाचा असतो. हे जीव तोडून सांगण्याचा अट्टहास करायला लेखिका विसरत नाही.
               सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण पैशाच्या मागे लागून मानसिक समाधान तर हरवत नाही ना याची भीती बाळगणारी लेखिका आपलं मत खंबीरपणे मांडते. पैसा म्हणजे सर्वस्व नसतच मुळी. माणसाचं जीवन कसं असावं ? कसं जगावं? हे लेखिका खूपच मार्मिकपणे मांडत जाते. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो. त्याचप्रमाणे पत्नीला यशस्वी व्हायचे असेल तर पतीची खंबीर साथ किती महत्त्वाची असते? हे तूच माझी प्रेरणा या भागांमधून लेखिका सांगते. तू फक्त माझाच आहेस हे हक्काने बजावून सांगणारी बायको त्याची खरी मैत्रीण होऊ पाहते. आणि तू बदलू नकोस म्हणून सांगायलाही लेखिका विसरत नाही. मनमोकळेपणाने संवाद साधणाऱ्या, मोकळ्या मनाच्या लेखिकेला सहजीवन साथीचे मौन नकोसे वाटते. त्याला बोलते करण्याच्या नादात लेखिका मौनातील अर्थ शोधत असते.
            सहजीवनाची दहा वर्षे उलटून गेल्यावरही परत अनोळखी बनवूया असा आग्रह धरणारी लेखिका स्वतःचं अस्तित्व विसरून जोडीदाराच्या सागरात विलीन होण्याचा प्रयत्न करत जीवनाचा निखळ आनंदाचा शोध घेते. वरवरच्या सुखाना बळी न पडता खरे प्रेम शोधण्याचा निरागस प्रयत्न वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. पुढचे सर्व भाग वाचण्याची उत्कंठा निर्माण करतात.प्रत्येक तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावे असेच पुस्तक म्हणजे "मौनातील अर्थ" हा वाचनात आला तरच जीवनाला खरा अर्थ येईल यात शंकाच नाही. या ललितलेखसंग्रहाचे एकूण ५४ भागांमध्ये विश्लेषण केलेले आहे. मौनातील अर्थ हा सर्वच तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावा असाच ललित लेखसंग्रह आहे. 
    लेखिकेला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७

Saturday, 26 December 2020

*विद्यार्थ्यांच्या शारिरिक, बौद्धिक, मानसिक कौशल्यांचा विकास करणारे पुस्तक म्हणजे - चला खेळूया,शिकूया*

 *विद्यार्थ्यांच्या शारिरिक, बौद्धिक, मानसिक कौशल्यांचा विकास करणारे पुस्तक म्हणजे - चला खेळूया,शिकूया*

           पुण्याचे लेखक सोपान बंदावणे यांचे चला खेळूया शिकूया हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास साधला तरच सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल.soundmindin a sound body  या उक्तीप्रमाणे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आणि निरोगी शरीर ठेवायचे असेल तर खेळ फार आवश्यक आहे. खेळामुळे शरीर चपळ बनते. बुद्धी तल्लख होते आणि शरीरातील रक्ताचे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. शरीरातील स्थूलपणा नाहीसा होतो. ताजेतवाने वाटते. यासाठी मैदानी खेळ, बैठे खेळ आणि मनोरंजनात्मक खेळ खेळणे फार आवश्यक आहे.
             आज प्रत्येक मूल मोबाईलच्या आहारी गेलेले दिसते. बऱ्याच मुलांना खेळ खेळायला नको पण टिव्ही कार्टून आणि मोबाईलच्या खेळांमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे बालकांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा भयंकर वाढलेला दिसतो. लहान मुलांना mindly fresh ठेवायचे असेल तर प्रत्येक पालकांनी, शिक्षकांनी असे पुस्तक स्वतः वाचावेत व मुलांना भेट म्हणून द्यावेत. वेळात वेळ काढून किमान दररोज एक तरी खेळ मुलांसोबत खेळला पाहिजे.
                   लेखक सोपान बनवणे यांच्या चला खेळूया शिकूया या पुस्तकाचे प्रकाशन राज्य साधन केंद्र पुणे यांनी प्रकाशित केली आहे. याची प्रथमावृत्ती आक्टोबर २०१७ ला झाली आहे.मुखपृष्ठावर सांघिक खेळ खेळणारी मुले रेखाटली आहेत. आतील चित्र खेळा व मैदानी आकृत्यांसह आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.या पुस्तकाचे मुल्य फक्त शंभर रुपये जरी असले पण त्यातील खेळ विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाला चालना देणारे आहेत.
              राज्य साधन केंद्र पुणे या संस्थेअंतर्गत साक्षर भारत या कार्यक्रमातील विविध पातळीवरील घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात चला खेळूया शिकूया यातील खेळाचा समावेश करण्यात आला आहे.या पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट असून पुस्तकाची मांडणी मनोरंजनात्मक खेळ,शर्यती (स्पर्धात्मक खेळ ),अभ्यास खेळ व सावलीतले खेळ या चार टप्प्यात केली आहे.मनुष्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याच प्रयत्नांची पायाभरणी अशा खेळातून होत असते. मुले मैदानात जिंकण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतात. स्वतःला विसरून अधिक पुढे जायचे अधिक प्रगती करण्यासाठी धडपडतात. हीच प्रेरणा पुढे मुलांना यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते. यासाठी उदाहरण म्हणजे गल्लीगोळा मध्ये क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर साऱ्या जगाला माहिती आहे.त्यानेच भारताची मान जगात उंच केली. मग एखाद्या मुलांने म्हटले मला सचिन व्हायचे तर फारसे वावगे ठरणार नाही.बालपणीचे प्रयत्नच यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. खेळामुळे हार-जीत चा सामना करण्याचे धाडस निर्माण होते.तेच धाडस जीवनाचा संघर्ष यश-अपयश पचवायला शिकवते. जे मुले अभ्यासात हुशार नसतात. त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तो न्यूनगंड दूर करायचा असेल तर खेळ फार आवश्यक आहे.
                     शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी खेळ म्हणले की एकदम आवाज जोरात काढून टाळी वाजवून आनंद व्यक्त करतात.हुर्रर रे.. करत चेहरे उल्हासित होतात.प्रत्येक बालकाला खेळ फार आवडतात.सोपान बंदावणे सरांनी मनोरंजनात्मक खेळ लिहिलेले आहेत.त्यामध्ये राम राम पाहुणे, राम-रावण,कोंबडी व कोंबडीची पिल्ले,हम भी बाजार जायेंगे, वर्तुळाचा राजा, आज्ञापालन, वाघ-शेळी, चपळ कोण, पोलीस कोठडी, विमानतळ,चल माझ्या घरी, भारत किसका हैं| माझा भाऊ सापडला, कोळी आणि मासा इत्यादी अनेक खेळ विद्यार्थ्यांचे फक्त मनोरंजनच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास घडवणारे आहेत. आज्ञापालन या खेळांमध्ये श्रवण कौशल्य विकसित होऊन आज्ञापालनाची सवय लागेल.
                 काठी शर्यत,अडथळा शर्यत अशा अनेक शर्यती किंवा स्पर्धात्मक खेळ घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागेल. सहकाऱ्याला मदत करण्याची वृत्ती वाढीस लागेल. अडथळा शर्यती मुळे काम लक्षपूर्वक करण्याची सवय लागेल. बोगदा शर्यती मुलांची सांघिक भावना वाढीस लागेल. बटाटा शर्यतीमुळे कोणतेही काम घाईने न करता संयमाने जिंकता येते याचा अनुभव येईल. वर्तुळ युद्ध मध्ये स्वतःच्या ताकदीचा अंदाज येईल.बंडू पुढे की चेंडू पुढे या खेळामुळे झेलणे,पळणे हे कौशल्य प्राप्त होते.अभ्यास खेळामुळे वाचन विकास होईल. अभ्यासाची सवय लागेल.शब्दसंग्रह वाढवूया या खेळामुळे अध्ययन अध्यापनातला कंटाळा किंवा थकवा दूर होईल. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल. स्मरणशक्तीला चालना मिळेल. उलटे अंक म्हणूया या खेळामुळे स्मरणशक्ती वाढीस लागून दृढीकरण होईल.
           सावलीतले खेळ यामध्ये चित्र पूर्ण करा या खेळामुळे चित्रकला सुधारण्यास मदत होईल.निरीक्षणशक्ती वाढीस लागेल. दुसऱ्यांची स्वतःची तुलना करता येईल. खाऊचा डबा या मनोरंजन मनोरंजनात्मक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. लेखक सोपान बंदावणे सर यांनी लिहिलेले चला खेळूया शिकूया या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल. विद्यार्थ्यांची सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे खेळ- मुलांना भरपूर खेळ खेळू दिल्याने त्यांचा शारीरिक,बौद्धिक, मानसिक विकास होईल. त्यामुळे असे पुस्तक प्रत्येक शाळेत असणे. प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांकडे असणे फार महत्त्वाचे आहे. 
             लेखक सोपान बंदावणे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 22 December 2020

*स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

 *स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ.प्रीती प्रकाश भिसे यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर एका स्त्रीचे चित्र आहे. प्रत्येक स्त्री त्या चित्रांमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. असे देखणे मुखपृष्ठ असून त्याचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन पुणे यांनी केले असून प्रस्तावना नागपूरच्या मीरा मितेश्री यांची लाभली आहे. तर मलपृष्ठावर शितल कुलकर्णी व प्रवीणा कुलकर्णी यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २ ऑक्टोबर २०२० ला झाले असून त्यात ५७ कविता आहेत. प्रत्येक स्त्रीची अनुभूती माझी स्वतःची सहानुभूती आहे.असे वाटणा-या कविता  स्त्रीमनाला स्पर्शून जाणा-या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण त्याचे मूल्य पैशात न मोजता येणारे आहे.
            बालपणी असणारी गोड मुलगी जशी मोठी होत जाते. तिच्या आयुष्याचे पाने अलगदपणे उघडत प्रत्येक गोष्टीत सहभागी होत. बालपणीचा आनंद लुटत अनेक सण समारंभ साजरे करत हळूहळू एक एक पाऊल पुढे सरकते. सासरी गेल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. विविधांगी जीवन जगत घरातल्या प्रत्येकाची काळजी घेत, थोरामोठ्यांचा आदर, कुटुंबाची जिम्मेदारी, मुलं-बाळं, नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक पैलूंनी तिचं आयुष्य सुगंधित होऊन जातं. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वेगळा अनुभव अनुभवत पुढे जाते. अशीच एक कविमनाची गोड स्त्री म्हणजे प्रीती भिसे.
          
                   हिरवाईने नटली वसुंधरा 
                   उधळत मुक्त स्वरूप 
                    पेटवून प्रदूषणाची ठिणगी 
                     मानव करतो तिला कुरूप...!!

             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री वसुंधरेचे तोंड भरून कौतुक करताना दिसते.हिरवळ कोणाला आवडणार नाही असा एकही माणूस जगाच्या पाठीवर दिसणार नाही. डोंगर-दऱ्या,नद्या-नाले, ओढे,आसमंनती पसरणारा धुंद गारवा, इंद्रधनु ही सर्व निसर्गाची मुक्त उधळण आहे. निसर्ग मानवाला भरभरून देतो पण या उलट माणूस प्रदूषण करून निसर्गाची घडी बिघडवतो. झाडे, जंगल तोडून निसर्गाची हानी करतो. इतक्या सुंदर निसर्गाला हावरट वृत्तीचा माणूसच कुरूप करतो असे कवयित्रीला वाटते.

                 समाजात या सुंदरतेला बहुमान 
                आंतरिक सौंदर्याची झुलती कमान 
                लग्नाच्या बाजारात गोर्‍या रंगाचे मोल
                 नाही बघत गुण कितीही असले अनमोल...!!

           सुंदरता कोणाला आवडत नाही.प्रत्येकालाच आवडते. सुंदरता ही प्रत्येक गोष्टीत लपलेली आहे फक्त ती सौंदर्य शोधणारी नजर पाहिजे. सौंदर्य हे निसर्गात तर, कोणाच्या काव्यात,तर कोणाच्या अभंगात तर कोणाच्या पूजनात,कोणाच्या कलेत तर कोणाच्या पाककलेत, तर कोणाच्या खेळात, तर कोणाचे देशाची सेवा करण्यात लपलेले आहे. आज समाजात जरी सुंदरतेला मान असेल पण आंतरिक सौंदर्य पण माणसाचे सुंदर असले पाहिजे. नाहीतर लग्नाच्या बाजारात गो-या रंगाला महत्त्व देणारी माणसं तया व्यक्तीचे आतले गुण कसे आहेत? हे मात्र पाहत नाही. मनुष्य दिसायला जरी काळा असला तरी चालतो पण त्याच्या आंतरिक सौंदर्य, त्याच्यातले गुण चांगले असले पाहिजेत. असे हळव्या मनाच्या कवयित्री वाटते.कवयित्री बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला जास्त महत्त्व देते.

           शिक्षकी पेशा 
           सन्मान देशा 
           घडवी गुरू 
           भविष्य रेषा 
            गुरू आदर
            मनी सादर
           गुरुची दीक्षा 
           ज्ञान जागर....!!

            देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक म्हणजे गुरू होय. गुरूच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक मुलाचे भवितव्य गुरु घडवतो. म्हणून शिक्षकी पेशाला देशात सर्वोच्च मान आहे.गुरु विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो म्हणून सर्वांनी गुरूचा आदर करावा. गुरुला वंदावे.गुरुबद्दल मनात सदैव आदर असावा कारण तोच ज्ञानाचा जागर आहे. गुरूंना मान सन्मान दिला पाहिजे. गुरू मुळेच प्रत्येकाचे आयुष्य घडत असते.याची जाणीव कवयित्री आपल्या पंचाक्षरी कवितेच्या ओळीतून देते.

             उमलते अंकुर प्रवेश 
             घडला ओळख कवी 
             संदीप खरे नामक 
             उजळला हा रवी......!!

             आजच्या काळातील प्रसिद्ध कवी संदीप खरे हे कवयित्रीचे आदर्श आहेत. संदीप खरे यांच्या अनेक कविता कवयित्रीच्या मनात घर करून राहतात. अनेक काव्य पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. पुण्यगौरव,झीगौरव, काव्यदीप पुरस्कार, आद्यकवी, मुकुंदराज, बालगंधर्व  इत्यादी पुरस्कारांमध्ये संदीप खरे यांनी बाजी मारली.त्यांचा चित्रपट दमलेल्या बाबांची कहाणी व त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व कवयित्रीला खूप आवडते त्यांच्या साहित्याची कवयित्री दीवानी आहे. आयुष्यावर बोलू काही संदीप खरे यांचे अत्यंत गाजलेली कविता कवयित्रीला खूप आवडते. म्हणून कवयित्री आपल्या शब्द सुमनांमध्ये संदीप खरे यांना  गुंतवले शिवाय राहत नाही.

             मराठी भाषेचे अग्रगण्य 
             कवी, लेखक,नाटककार 
             जाणिवेत ते आत्मनिष्ठ
             उत्तम समीक्षक नी कथाकार...!!
      
                  मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या कविता कवयित्रीला खूप भावणाऱ्या आहेत. त्यांच्यामुळे मराठी भाषेला मान मिळाला आहे. वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,नाटककार,लेखक,कथाकार,व समिक्षा असणारे वि.वा.शिरवाडकर म्हणजेच टोपणनाव  "कुसुमाग्रज" यांना गुरुस्थानी मानणारी कवयित्री प्रीती की तिच्या कवितेतून मानाचा मुजरा करते.
           आजच्या युगात ऑनलाइन व्यवहार करणारे, घरपोच होम डिलिव्हरी ने मोठ्या शॉपिंग मॉल्स मधून  वेगवेगळ्या वस्तू आज सहज घरपोच मागवत आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराची मजा कवयित्री दिलखुलासपणे आपल्या काव्यातून मांडते.त्याचबरोबर व्यायामाचे महत्त्व ही सांगते. स्पर्धेच्या युगात थांबला तो संपला पण क्षणभर विश्रांती किती महत्त्वाची आहे हे नमूद करायला कवयित्री अजिबात विसरत नाही. 
                    जीवनाच्या पायवाटेवर आलेली विविध अनुभूती आपल्या अनेक छंदमय येणाऱ्या प्रकारात सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न कवयित्री करते.जीवनाच्या पायवाटेवर या कवितासंग्रहातील कविता जगायला शिकवणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणार्‍या, प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या, दातृत्वाची शिकवण देणाऱ्या, अध्यात्माची आवड जपणाऱ्या,  सण आणि संतांचा महिमा सांगणा-या,निसर्गावर भरभरुन प्रेम करणा-या, भक्तीरसात तल्लीन होणाऱ्या, सर्व वाचकांच्या पसंतीस उतरणा-या अशाच आहेत.
         कवयित्री प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Saturday, 19 December 2020

बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

 *बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

         पुण्याचे कवी रमेश जाधव सर यांचा काव्यसंग्रह "नाते मनाशी मनाचे" नुकताच वाचनात आला.आज धावपळीच्या युगात सर्वजणच खूप व्यस्त झाले आहेत. सारे जग झपाट्याने धावताना दिसते.धावत्या युगाबरोबर नातेवाईकांना सुद्धा पूर्वीसारखा वेळ नाही. सर्वजण आपापल्या कामात अत्यंत व्यस्त दिसत आहेत. तेव्हा मन हलके करण्यासाठी कित्येक वेळा कवी मनाशीच बोलतो आहे.आपल्या मनातले भाव मनालाच जणूकाही सांगतो आहे. तेच भाव शब्दबद्ध केलेत कवी रमेश जाधव यांनी. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पांढऱ्या शुभ्र फुलांचे चित्र आहे. जणू काही ते कवीचे मनच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन घनश्याम पाटील असून त्यांचीच काव्यसंग्रहाला साजेशी,सुरेख प्रस्तावना आहे. तर मलपृष्ठावर अमरावतीच्या लेखिका पल्लवी चौधरी यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता बंद हृदयाची स्पंदने खोलणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती २४ जुलै २०१६ ची असून मूल्य फक्त ८० रुपये आहे. पण यातील कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत.

            अडगळीत पडलेल्या आयुष्याला 
            दिली एक नवी दृष्टी 
            दिसली नव्या आयुष्यात 
            सकारात्मक सुष्टी 
             काढून टाकली नकारात्मक घाण
             फुलणार मनाची रान....!!

          वरील ओळी खूप काही सांगून जाणा-या आहेत. माणसाचं आयुष्य जर उसवले असले तरी त्याला नवा दृष्टिकोन आला तर नव्या उमेदीने जगता येतं तरच मानवाच्या आयुष्याच सोनं होतं.तर त्यासाठी माणसांने सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच नवीन ऊर्जा तयार होईल व मनातले मळभ दूर होतील. माणसाने आयुष्यात कितीही संकटे आली तर ती पेलून धरता आली पाहिजे.त्यातून बाहेर पडता आले पाहिजे. मनातले सर्व नकारात्मक विचार काढून टाकता आले पाहिजे. आपले अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. मनातली घाण काढून टाकल्या नंतरच आपल्या मनाचं रान फुलणार आहे. आणि आयुष्य डुलणार आहे. असं कवी रमेश जाधव यांना वाटतं. 

                अंधाराच्या साम्राज्यात 
                हाती काही लागत नाही 
                आपलेच हात रिकामी असल्यावर 
               कोण आपले स्वागत करीत नाही....!!

             आज सर्वत्र श्रीमंतीचा, गर्वाचा अंधार पसरलेला दिसतो. स्वार्थाने बरबटलेली माणसं पाहायला मिळतात. जर एखाद्याचे काही काम असेल तरच ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला गोड बोलण्याचा प्रयत्न करते. काम संपलं की "गरज सरो आणि वैद्य मरो" अशीच अवस्था लोकांची होते. अशा वातावरणात जर गेलं तर आपल्या हाती काहीच लागत नाही आपल्या जवळ धन, पैसा, संपत्ती नसेल तर आपल्याला कुणीच बोलत नाही.आपल्याकडे पैसा नसला आपण अडचणीत असलो तर कोणीच आपले स्वागत करीत नाहीत असे कवी म्हणतो आहे.

                     अंतरीच्या वेदनांचे
                     किती आणि कसे आवरू हुंदके
                    सुपीक नात्यांवर 
                     गैरसमजाचे पडलेत खंदके....!!

           अंतर्मनाला जर वेदना झाल्या तर त्याच्या जखमा लोकांना दिसत नाहीत.मनावर अनेक आघात होऊन  दुःखाचे हुंदके दाटून येतात आणि नातलग  यांच्यामध्ये गैरसमज होऊन मनाच्या रानाला भेगा पडतात. मन व्याकुळ होतं आणि वेदनेची जाणीव मनात जाळं बनून राहते. असे संवेदनशील मनाच्या कवीला वाटते.

               मी गेल्यावर कोणी रडू नका 
               कडू-गोड आठवणी काढू नका 
                नको ती रक्षा सावडणे
                तेंव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे 
                नको ते दहावा, तेराव्याचे विधी 
                 त्यापेक्षा अनाथाश्रमात द्या निधी....!!

             मरणाला प्रत्येक जण भितो. आज आपण पाहतो पण हळव्या मनाचा कवी मोठ्या धाडसाने स्वतःची अंतयात्रा काव्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी मेल्यानंतर रडू नका. माझी आठवण काढू नका. माझी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम ठेवत बसू नका. तेंव्हा खरी गरज आहे. माझ्या कुटुंबाला आधार देण्याची,त्यांना सावरण्याची ते करा. माझे दहावे, तेराव्याच्या विधीवर पैसा खर्च करू नका. त्यापेक्षा तोच पैसा अनाथ आश्रमात द्या. जुन्या रूढी-परंपरांना आणि अंधश्रद्धा ठेवणाऱ्या अनेक पद्धतींना आळा घालण्यासाठी आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न कवी रमेश जाधव सरांनी केलेला आहे. आज अंत्यविधी वर किती तरी लोक पैसा खर्च करतात. तो न करता त्याचा उपयोग समाजासाठी करावा अनाथ आश्रमाला तोच निधी देण्यात यावा असे कवीला वाटते.

                 हल्ली शिक्षणाचा मांडलाय बाजार 
                डोनेशनचे आकडे ऐकून पालक झाले बेजार...!!

              सत्य परखडपणे मांडणारे कवी रमेश जाधव सर म्हणतात आज गल्लीबोळामध्ये शाळा काढून शिक्षणाचा बाजार मांडलाय.खाजगी दुकाने शाळाचं नवरूप घेऊन ठाण मांडून बसल्या आहेत. स्वार्थापोटी गोरगरीब जनतेला लुबाडत आहहेत. एल.के.जी पासून पालक प्रवेश घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहून भली मोठी फी भरून आपल्या मुलाला शाळेत पाठवत आहेत. इतकेच नाही तर पुन्हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी संस्थाचालकाच्या घशात भरमसाठ पैसा ओतून डिग्र्या घेत आहेत. पुढे तेच पालक लग्नाच्या बाजारात शिक्षणाचा सर्व पैसा वसूल करतात.त्याच्या स्वरूपात अशी अशी टीका केली आहे. आणि ती रास्तच आहे. आज खासगी संस्थांची फीस गगनाला भिडली आहे. तिच्याकडे पाहून भल्याभल्या लोकांचे होश उडून जातात. दोन दोन लाख एका एका वर्षाची फीस आहे. अशा शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मानसिकतेला जर आळा घालायचा असेल तर सर्वांनी त्याचा विचार करावा. असे कवी आवर्जून सांगतो आहे.

           कवी रमेश जाधव यांच्या कविता सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या, समाजहित जपणाऱ्या,मनांची गुंफण करणाऱ्या, हळव्या मनास आधार देणाऱ्या,अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणाऱ्या, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या, वास्तवाचे भान ठेवणाऱ्या, गैरसमजाचे जाळे दूर करणाऱ्या, वृद्धा विषयी सहानुभूती असणाऱ्या, पोलिसांविषयी आदर असणाऱ्या, मनाशीच मनाचे नाते सांगणाऱ्या....सर्व कविता अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत. बंद हृदयाची स्पंदने खोलत जाणा-या आहेत.
        प्रत्येक मानवी मनाने मनातूनच वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे..कवी रमेश जाधव सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा....!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७