Monday, 9 November 2020

*विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य फुलविणारा बालकवितासंग्रह म्हणजे ऐसा घडवू बालक*

 *विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य फुलविणारा बालकवितासंग्रह म्हणजे ऐसा घडवू बालक*

        बीड जिल्ह्यातील हाडाची शिक्षिका,सावित्रीच्या विचारांचा वारसा चालवणारी, तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे यांचा नुकताच प्रकाशित झालेला  "ऐसा घडवू बालक"  हा बालकवितासंग्रह माझ्या वाचनात आला.याचे प्रकाशन अजिंक्य प्रकाशन वाशिम यांनी प्रकाशित केलेला असून काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर नावाला साजेसे बालकांचे मॅडम समवेत असलेले छायाचित्र असून याची पहिली आवृत्ती ५ सप्टेंबर 2020 रोजी प्रकाशित झालेली असून याचे मूल्य फक्त 120 रुपये आहे. या पुस्तकाला शुभेच्छा डॉ. गोविंद नांदेडे साहेब(पूर्व शिक्षण संचालक पुणे) तसेच संदीप राक्षे (गुडमॉर्निंग मराठी चित्रपटाचे निर्माते)सरांच्या शुभेच्छा आणि कचरू चांभारे सर(मुख्याध्यापक)बीड यांची प्रस्तावना लाभली आहे.आपल्या देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कसे असावे ? विद्यार्थ्यांमध्ये कोणती मूल्य रुजवावे ? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आपली मुले सुसंस्कारीत घडावीत म्हणून प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतो. कवी मनाची उषाताई संवेदनशील व मूल्यसंस्कार रुजवून चांगल्या विचारांचे खतपाणी घालून आदर्श विद्यार्थी कसे घडवावे त्यासाठी सतत धडपड करणारी आहे.त्यांच्या स्वप्नातले विद्यार्थी कसे असावेत? हे हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर समजते.
         विद्यार्थ्या प्रती प्रेम, आदरभाव, संवेदनशील मन, बालमनाची पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवताना झालेली बालमनाची घालमेल, शाळेतल्या बाई म्हणजे जणूकाही मुलांची आईच, स्वच्छतेचे महत्व काव्यातून पटवून देणाऱ्या कविता खरोखरच काळजाला स्पर्शून जातात.मुळात कवयित्री खूप संवेदनशील मनाची आहे तिला सतत मुलात राहायला आणि गायला आवडतं.

          मनासारखे शिक्षण मिळते 
          धावतच शाळेत जायचं 
         पुस्तक,गणवेश मोफत येथे
          दुकानात कशाला जायचं ? 
          वेळोवेळी साहित्य मिळते 
          लिहाया आणि वाचाया
         आई आवर गं  शाळेला निघाया 
         बाई आल्या असतील 
         मुलांना शिकवाया......!!

      बालवयातच इयत्ता पहिलीला शिकवायला जर बाई (शिक्षिका )असतील तर नव्याने दाखल होणारी मुले रडत नाहीत. कारण त्यांना बाई या आई सारख्याच वाटतात. कवयित्रीचे मन अगदी बालवयातच घेऊन जातं. आज ग्रामिण भागातील सर्वच पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे ओढला जातो आहे कारण तिथे मनासारखे शिक्षण मिळते. बालकांच्या मनावर ना बर्डन असते ना ताण असतो. तिथे हसत-खेळत मोफत,ज्ञानरचनावादी,शिक्षण मिळते. पुस्तक, गणवेश, शिष्यवृत्ती आणि खिचडी सुद्धा मिळते मग दुकानात कशाला जायचं? या शब्दांमध्ये कवयित्री आपलं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. दुकानातली विविध पदार्थ खाऊन विद्यार्थी आजारी पडतात त्या काळजी पोटी कवयित्री दुकानात कशाला जायचं म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना बजावते आहे. जिल्हा परिषद शाळेत वेळोवेळी वेगवेगळे साहित्य मिळतील आणि तिथे हसत-खेळत मनोरंजनात्मक शिक्षण मिळते. त्याच बरोबर लिहायला-वाचायला शिकवले जाते .असे उशीर झालेला मुलगा शाळेच्या ओढीने आपल्या आईला काव्यातून म्हणतो आहे. हे बालपणाचे विचार अगदी बालवयातच घेऊन जाणारे आहेत.

         शाळेत आपण जाऊ चला 
         मूल्य सारे शिकू चला
         स्वच्छतेचा मंत्र आपण 
          मना मनात रुजवू चला...!!

      मुल्यसंस्काराबरोबरच कवयित्री विद्यार्थ्यांना स्वच्छतेची कास धरायला ही आवर्जून सांगते. भारतभूमीचे गुणगान ही बाल मनावर ठसवण्याचा प्रयत्न करते. आज धावत्या युगामध्ये वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र कोलमडले असताना कवयित्रीने निसर्गाच्या ऋणात राहून वृक्ष संगोपन करूया रे असं म्हणत बालकांच्या मनावर वृक्ष लागवडीचे महत्व पटवले आहे. वृक्षतोडी बरोबरच पर्जन्य संपले त्यामुळे पाणी संपले हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न कवयित्री करत आहेत.
          प्रत्येक मूल हे शाळेत जास्त वेळ राहते.शाळा हा मानवी विकासाचा पाया आहे.त्यामुळे शाळेतून त्याच्यावर अनेक मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी मूल्यवर्धनचे महत्त्व, शाळेची गोडी,शाळेतली उपक्रम, शाळा शिकले यामुळेच आयुष्याची पायाभरणी कशी होते? शाळेत हसत खेळत शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थ्याचे चैतन्य हे कायम टिकेल असेही आपल्या काव्यातून कवयित्री सांगते.

          विज्ञानाची कास धरू 
          कष्टाचा मंत्र जपू 
          अभ्यासातून ज्ञान घेऊ
          देशाच्या कामी येवू
         भाग्यशाली आपण सारे 
          गौरवगाण गाऊ...!!

        वरील ओळींमधून कवयित्रीने विज्ञानाची कास धरत कष्ट करण्याचा मूलमंत्र दिला आहे. तसेच अभ्यासातून प्रगती साधता येते, ज्ञान मिळवता येते, तसेच बालकांना देशाच्या कामी म्हणजेच देश रक्षणार्थाचे आव्हान देते. आपण किती भाग्यशाली आहोत.असे ताठ अभिमानाने सांगते आहे. सैनिका प्रति प्रेम,आई बापाची तळमळ, पोरगं शिकावं म्हणून विकासाचे गाणे, तो बालवयातल्या आनंद, शाळेत मुलाला नेण्यासाठी बाईंनी मारलेली हाक, पावसाचा आनंद, वृक्षारोपणाची शपथ तर महाराष्ट्र गीता ची शान आणि उषा ताईच्या स्वप्नातला बालक अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत उषेच्या प्रभात समयी प्रमाणे डोंगररांगातून उगवणार्‍या तेजोमयी स्वयंप्रकाशित सूर्यकिरणां सारखांच आहे. सर्व बालक,पालक,शिक्षक यांनी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य फुलंवण्याकरता आवर्जून वाचावा असाच हा "ऐसा घडवू बालक"  बालकवितासंग्रह आहे.माझी सखी कवयित्री उषाताई यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....

     समीक्षिका, लेखिका, संपादिका,शिक्षिका, कवयित्री
     कु. मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
      ता. जि. वाशिम 
      मो ९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment