Tuesday, 9 June 2020

जननायक शहीद बिरसा मुंडा....

 Date: 6 Jun 2020

*जननायक शहीद बिरसा मुंडा*

     आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी जननायक शहीद बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा खेड्यात १५ नोव्हेंबर१८७५ मध्ये झाला.वडील सुग्ना व आई करमी यांच्या पोटी झाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे बिरसाचा नंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांची आत्या दासकिर यांच्या आयुभातू या गावी गेले. बालपणापासूनच अत्यंत हुशार व शिक्षणाची आवड असलेले बिरसा मुंडा होते. बासरी व टुईला वाजविणे नृत्य व नकला करणे, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंद त्यांच्या अंगी होते. जी.सी.एल मिडल स्कूल मधून त्यांनी उच्च माध्यमिक पास केली. मिशनरी आदिवासींना आदिवासी,चोर,डाकू म्हणू लागले. त्यावेळी त्यांना मिशनर्‍यांना खडसावून प्रत्युत्तर दिले व शाळा सोडून दिली त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले.
         बिरसा मुंडा यांचा विवाह हिराबाई यांच्याशी झाला पण पुढे लवकरच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संगीताबरोबरच नृत्याची आवड बिरसांना होती.  ते उत्तम बासरी वाजवायचे त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला. रानात गुरे चारायला नेत त्यामुळे जंगली वनौषधी बद्दल चांगले ज्ञान बिरसांना होते. आजारग्रस्त लोकांना जडीबुटी औषध तयार करून देऊन त्यांचा आजार त्यांचा बरा करत असत. म्हणून लोक त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणू लागले.
         सन १८६९ मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली. सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्या. त्याबद्दल आदिवासींनी एकही शब्द न करण्याचे आदेश इंग्रजांनी दिले होते.त्यामुळे आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्ध बिरसा यांनी १८९० मध्ये व्यापक "क्रांती उलगुलान" ची घोषणा केली १८९५ मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले जंगल, जमीन,संपत्ती आमचा अधिकार आहे. यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येऊन लढायचे आव्हान केले. न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतले बिरसा यांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिले. त्यामुळे त्यांना ९ ऑगस्ट १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांना अटक झाली.
           ३० नोव्हेंबर १८९७ ला बिरसा तुरुंगातून बाहेर आले.त्यावेळी आदिवासी समाजाची केविलवाणी परिस्थिती पाहून पुन्हा अन्यायाविरुद्ध पेटून उठले. बिरसा हे उत्तम योद्धा व कुशल प्रशासक होते. १८९८ मध्ये बिरसांनी "डुंबारी बुरुज"  या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली. फादरच्या घरावर हल्ले करायचे ठरवले जानेवारी १९००मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकार्‍याला बिरसा यांच्या हल्ल्याची माहिती मिळाली इंग्रजांनी "डुंबारी बुरुजावर" गोळीबार सुरु केला. आदिवासींनी दगडफेक व धनुष्यबाण करत प्रतिकार केला. या नरसंहारात दोनशेपेक्षा अधिक आदिवासी लोक मारले गेले.इंग्रजांनी बिरसा यांना अटक केले. व तुरुंगात अतोनात छळ केला ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. न्याय व हक्कासाठी लढणारा क्रांती सूर्याचा अंत झाला. अशा या महान शूरवीर क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम आज ९ जून रोजी  स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

लेखिका/ कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम...

---
ShuusShuus

No comments:

Post a Comment