Sunday, 24 May 2020

कर्तव्यनिष्ठ पराक्रमी योद्धा सरसेनापती बाजी पासलकर....यांचा स्मृतिदिन२४ मे

Date: 23 May 2020

*कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योध्दा सरसेनापती बाजी पासलकर*

          छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक मावळा म्हणजे शूर वीर बाजी पासलकर हे होय.१२मावळा पैकी एक मोसे खोऱ्यातील ८४ खेड्याचे राजे होते. स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. बाजी पासलकर हे हे मावळ खोऱ्याचे वतनदार निगुडे -मुसे गावापासून ते सांगरून- डावजेपासून धामण -ओव्होळ पर्यंतचा भाग ८४ खेडे यांच्या अखत्यारीत होती. अत्यंत शूर वीर असलेले बाजी पासलकर न्यायदान उत्तम करीत असत. तंटे सोडविण्यात अत्यंत हुशार होते. 
         विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सन १६४८ साली फत्तेखानास धाडले होते.फत्तेखानाने बेलसर येथे तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभानमंगळ वर हल्ला करून तो किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपती शिवरायांनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसर छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यानी खानाच्या सैन्याची कत्तल केली. व पुरंदर चा पायथा गाठला.फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला केला. पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्यांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले.फत्तेखानाचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने फत्तेखानाच्या छाताडाचा वेध घेतला. आणि खान खाली कोसळला. लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या    पाठीमागून त्यांच्या समशेर धारी उजव्या हातावर झाला. अपार वेदना होत असतानाही बाजी वार करणा-यांचा प्रतिकार करीत होते. तेवढ्यात गनिमांची तलवार बाजी च्या छातीवर पडली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले.
           कावजी मल्हारला हे समजताच वाऱ्याच्या वेगाने सासवडला धावले.आपल्या धन्याची जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती. पुरंदर किल्ला येईपर्यंत बाजींनी आपल्या शिवरायांना पाहण्यासाठी व अखेरचे शब्द बोलण्यासाठी श्वास रोखून ठेवला होता. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला -गोमातेला  बघताच धावत सुटते. तसे राजे पालखी कडे धावले. शिवाजी महाराजांनी बाजीच्या डोक्याखाली आपली मांडी लावली. आणि मगच स्वामीनिष्ठ निष्ठावंत पराक्रमी बाजींनी आपला प्राण सोडला.तो दिवस म्हणजे २४ मे १६४९ होय.मराठ्यांनी स्वराज्याचा रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर यांसारखा वीर रणी पडला.
         बाजी पासलकर यांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. बाजी पासलकर यांची समाधी पुण्यातील सासवड येथे आहे.अशा या थोर पराक्रमी योद्ध्याला मानाचा मुजरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन....
       जय जिजाऊ जय शिवराय....


लेखिका/कवयित्री
कू.मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

No comments:

Post a Comment