Sunday, 3 August 2025

सोडू नये निती (अभंग क्र.५६)

 *सोडू नये निती(अभंग क्र.५६)*

कधी माणसाने | सोडू नये निती |
लोकांस प्रचिती | असतेच || १||

वंशावळ खोटी| खोटेची करिती |
जगा दाखविती | मोठेपण || २ ||

जग हे शहाणे | ओळखती सारे |
हव्यासाचे वारे | सुटलेले || ३||

शहाण्याला असे | शब्दांचा मार |
मुर्खाचा बाजार | मांडलासी || ४ ||

काय तुझी निती | केलास कचरा |
माणूस ना बरा | दिसलासी || ५ ||

आपुल्या हाताने | दगड घातला |
मनात सलला | आंतरीक || ६ ||

खोटेपण दिसे | लोकं ही हुशार|
मानवा लाचार | का झालास || ७ ||

अतिहव्यासाचे | रे दुष्परिणाम |
करी घामाघाम | निर्लज्जास || ८ ||

सत्याचे हे सार | सत्य जिंकतसे
नाही लपतसे | खोटेपण || ९ ||

केवढी फजिती | गध्याची होतसे |
लालसा दिसते | गाढवाला || ९ ||

गाढवास काय | गुळाची ती चव |
नाही काय भेव | आंतरिचे || २० ||

तुझे मन ग्वाही | तूच आहे चोर |
परि शिरजोर | ठरलासी || ११ ||

एकदिन ऐसा | उगवेल खास|
सत्याचीच आस | दिसेलगा || १३||

नियतीचा खेळ | आज ना उद्याला |
साथ दे न्यायाला | राहशील || १४ ||

जैसी रे करणी | वैसी रे भरणी |
डोळा येई पाणी | कळेलच || १५ ||

शब्दांचा हा मार | मुर्खास कळेना |
वळता वळेना | बुध्दीलाही || १६ ||

मिनू म्हणे आता | हो बाई सावध |
सत्याचा गे वध | होत असे || १७||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...

Friday, 27 June 2025

कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव व नवांगतांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने मिरवणूक कढत वाजतगाजत,नाचत धम्माल मिरवणूक काढण्यात आली.

 कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातीशी नाळ जोडत पारंपारिक पद्धतीने केला प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा प्रवेशोत्सव व नवांगतांचे स्वागत महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने बैलगाडी मध्ये चिमुकल्या मुलांनख बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.सर्वप्रथम लहानग्या दाखलपात्र मुलांना शाळेच्या गेटवरच कुंकुमतिलक लावून त्यांचे औक्षण करून डोक्यावर बर्थडे टोपी घालून प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढून,सर्वत्र फुगे लावून सर्जाराजा ची बैलजोड बैलगाडीला जुंफण्यात आली.संपुर्ण बैलगाडी फुग्यांनी सजवून बैलगाडी मध्येच दाखलपात्र विद्यार्थी बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.विशेष म्हणजे विद्यार्थीप्रिय असणाऱ्या शिक्षिका नागराळे मॅडम या सुध्दा बैलगाडी बसल्या होत्या त्यांनासुद्धा बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.मिरवणुकीत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बैलजोडी ज्या शेतकरी बांधवांनी दिली होती त्यांना शाल व श्रीफळ देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकिसन वाकुडकर सर यांनी सत्कार केला.त्यांनंतर शाळा समितीचे अध्यक्ष डॉ दिनेश काळबांडे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,मोफत पुस्तके,मोफत मसालेभात आणि जिलेबीचा खाऊ वाटप करण्यात आले.दाखलपात्र चिमुकल्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सर्व गावकऱ्यांना मोहित करणारे व शाळेविषयी गावाविषयी आपुलकी वाटणारे वातावरण निर्मिती झाली.आगळ्यावेगळ्या पध्दतीने आनंदोत्सव व प्रवेशोत्सव साजरा केल्याबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.

Friday, 13 June 2025

ऐक आतला आवाज

 ऐक आतला आवाज( १३/६/२०२५)

ऐक आतला आवाज
तुला पटलं तेच कर
सांगणारे सांगत असतात
तू सुखाची ओंजळ भर....!!

एका कानाने घे ऐकून
दुसऱ्या कानाने दे सोडून
तुझ्या अंतर्मनाला पटलं तर
तू कर तुझे दोन्ही हात जोडून....!!

चांगलेभले तुला कळतेच
पण जशास तसे वागू नको
तु तुझे चांगले कर्म करत रहा
वेड्यांच्या नादी तु लागू नको....!!

प्रामाणिक रहा तू स्वतःशी
डागेलपणा तू करू नको
इथल्या इथेच आहे सारे
तू तुझा गर्व दाखवू नको....!!

क्षणभंगुर हे जीवन वेड्या
आनंदाने शिक जगायला
इथे रोज नवीन लढाई आहे
तू ही शिक आता लढायला....!!

काळानुसार नाती बदलतात
जग हे स्वार्थी आहे माणसा
तुझ्या आतला आवाज ऐक
तू चांगल्या मार्गाने चाल माणसा...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Thursday, 10 April 2025

महाराष्ट्र राज्य शासनाच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये (२०२३) मिनाक्षी नागराळे यांना १७ पुरस्कार,१७ आणि ८१ हजाराचा धनादेश बक्षिस स्वरूपात देण्यात आले...

Tuesday, 4 March 2025

इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का?

 इतक्या क्रूरपणे  कुणाला मारायचं असतं का?(कविता मनातली)


इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का? || धृ||
एक चापट मारली म्हणून
हत्याच करायची असते का?
घाणेरड्या राजकारणासाठी
इतक्या क्रूरपणे मारायचं असतं का?

आका,बोका,खंडण्या काय चाललंय?
माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात
अहो लाज वाटली पाहिजे थोडी तरी
स्वतःच्या स्वार्थासाठी मग
वडिलांचं छत्रच उडवायचं असतं का?

राजकारणी सगळेच एका माळेचे मणी
गरीबाला कोणी आहे का धनी?
अन्यायाला प्रतिकार केला म्हणून
जिवानिशी उडवायचं असतं का?

एका आईच्या पोटचा गोळा होता
एका मुलीच्या आधारस्तंभ होता
असं किड्या मुंग्यावानी कुणी दिवसाढवळ्या
उचलून नेऊन हत्या करतं का?
इतक्या निर्दयीपणे कुणी कुणाला मारतं का?

काय चूक होती त्या निष्पाप जिवाची?
इमानदारी तुमच्या आडवं येते का?
राजकारण्यांच्या वरहस्ताशिवायं
सांगा हे सगळं घडतं का?

संतोष देशमुखांना मारून
दोन महिने होतायेत
अजूनही सरकारला मोबाईल
सापडत नाहीयेत
सापडला मोबाईलातला डेटाच उडतो का?

देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून अचानक
माणसाच्या काळजाचा चुकतोय ठोका
कायद्याने फासावरती लटकवा दोषींना
जे कुणी असतील मास्टर माईंड आका बोका..

कायदा,संविधान,सर्व हाती घेत चाललेत
जनतेचे सेवकच आता दादा बनायलेत
आपल्याच भाकरीवर आपलीच पोळी  शेकायलेत 
आता जनतेनेच न्याय मागायचं का?
एक चापट मारली म्हणून हत्याच करायची असते का?

कवी,लेखक, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ 
पत्रकार, कधी उठवणार आहेत तुमचा आवाज?
इतकं सारं महाराष्ट्रात घडूनही
 उघड्या डोळ्यांनी बघायचं का?
उघड्या डोळ्यांनी बघायचं का?

कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.