Tuesday, 4 March 2025

इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का?

 इतक्या क्रूरपणे  कुणाला मारायचं असतं का?(कविता मनातली)


इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का? || धृ||
एक चापट मारली म्हणून
हत्याच करायची असते का?
घाणेरड्या राजकारणासाठी
इतक्या क्रूरपणे मारायचं असतं का?

आका,बोका,खंडण्या काय चाललंय?
माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात
अहो लाज वाटली पाहिजे थोडी तरी
स्वतःच्या स्वार्थासाठी मग
वडिलांचं छत्रच उडवायचं असतं का?

राजकारणी सगळेच एका माळेचे मणी
गरीबाला कोणी आहे का धनी?
अन्यायाला प्रतिकार केला म्हणून
जिवानिशी उडवायचं असतं का?

एका आईच्या पोटचा गोळा होता
एका मुलीच्या आधारस्तंभ होता
असं किड्या मुंग्यावानी कुणी दिवसाढवळ्या
उचलून नेऊन हत्या करतं का?
इतक्या निर्दयीपणे कुणी कुणाला मारतं का?

काय चूक होती त्या निष्पाप जिवाची?
इमानदारी तुमच्या आडवं येते का?
राजकारण्यांच्या वरहस्ताशिवायं
सांगा हे सगळं घडतं का?

संतोष देशमुखांना मारून
दोन महिने होतायेत
अजूनही सरकारला मोबाईल
सापडत नाहीयेत
सापडला मोबाईलातला डेटाच उडतो का?

देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून अचानक
माणसाच्या काळजाचा चुकतोय ठोका
कायद्याने फासावरती लटकवा दोषींना
जे कुणी असतील मास्टर माईंड आका बोका..

कायदा,संविधान,सर्व हाती घेत चाललेत
जनतेचे सेवकच आता दादा बनायलेत
आपल्याच भाकरीवर आपलीच पोळी  शेकायलेत 
आता जनतेनेच न्याय मागायचं का?
एक चापट मारली म्हणून हत्याच करायची असते का?

कवी,लेखक, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ 
पत्रकार, कधी उठवणार आहेत तुमचा आवाज?
इतकं सारं महाराष्ट्रात घडूनही
 उघड्या डोळ्यांनी बघायचं का?
उघड्या डोळ्यांनी बघायचं का?

कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Tuesday, 4 February 2025

नवनीत कडून मिनाक्षी नागराळे आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित...

नवनीत कडून मिनाक्षी नागराळे सन्मानित.... वाशीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील आदर्श शिक्षिका महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत

Tuesday, 1 October 2024

महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी नागराळे यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय क्रमांक पटकावला

 *महाराष्ट्र राज्य शासनाच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी पांडुरंग नागराळे मॅडम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव, केंद्र -तोंडगाव,ता.जि.वाशिम यांना जिल्हास्तरीय ६ वेळा आणि तालुकास्तरीय ११ वेळा पुरस्कृत*

उपक्रमशील व तंत्रस्नेही असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील मिनाक्षी नागराळे मॅडम यांना जिल्हास्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये

१ ली ते २ री- गणित - प्रथम
६ ते ८ वी      गणित - द्वितीय
६ ते ८ वी      इंग्रजी - तृतीय
६ ते ८ वी      विज्ञान- द्वितीय
६ ते ८ वी.     सा.शास्त्र.तृतीय
११ वी १२.    भाषा.    द्वितीय


तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी नागराळे मॅडम

१ ते २ री     भाषा.       प्रथम
१ ते २ री.    गणित.      द्वितीय
१ ते २ री     इंग्रजी.      तृतीय
३ ते ५ वी.    भाषा.       प्रथम
३ ते ५ वी.    गणित.      प्रथम
३ ते ५ वी     इंग्रजी.      प्रथम
६ ते ८ वी.    भाषा.       प्रथम
६ ते ८ वी.     गणित.     प्रथम
६ ते ८ वी.      इंग्रजी     द्वितीय
६ ते ८ वी.     विज्ञान.     प्रथम
६ ते ८ वी.     सा.शास्र    प्रथम

*असे तब्बल ११ वेळा तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत यशस्वी झाले याचा आम्हांला मनस्वी आनंद होत आहे... 

*मिनाक्षी नागराळे मॅडमचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐मॅडम आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे...*

*शुभेच्छूक-*

श्री.रामकिसन वाकुडकर सर
श्री.धम्मसेवक विसावे सर
श्री.राजेंद्र गोटे सर
श्री.ज्ञानेश्वर काळबांडे सर
श्री.डॉ.दिनेश काळबांडे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व सदस्य)
*समस्त कोकलगावनगरी*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव...*


Monday, 1 July 2024

अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत कोकलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलेला माझा विद्यार्थी विमानसेवेत रूजू झाला... खूप खूप अभिनंदन शिवशंकर अंभोरे...💐💐💐

 माझा पहिल्या वर्गातला विद्यार्थी... शिवशंकर अंभोरे
अगदी लहान वयापासून चुणचुणीत,गरीब,शांत स्वभाव अभ्यासात एकदम हुशार,दिलेला अभ्यास मन लावून करणारा...म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे मला त्याचा अभ्यास पाहून,शिकण्याची जिद्द पाहून तेंव्हा ही वाटायचं की हा पुढे जाऊन काहीतली चांगला बनणार... शिवशंकरची परिस्थिती खूपच बिकट,त्यात अचानक त्याच्या बाबा वर विज कोसळून वडीलांचंही छत्र हरवलं.आईने दोन मुलींची लग्न केली स्वबळावर,आजची कष्ट उपसतच असते रात्रंदिवस...आईसारखाच होतकरू मुलगा शिवशंकर सुध्दा..मागे माझ्या शाळेत कै.गोटे सरांचं आकस्मिक निधन झाले आणि चार शिक्षकांचा पट पण माझ्या शाळेत दोनच शिक्षक राहिलो...मी दोन वर्ग घ्यायची, वाकुडकर सरांना दोन वर्ग आणि मुख्याध्यापकाचा रोल त्यामुळे फार कठीण चाललं होतं...मग मला शिवशंकर आठवला. मी गावातील पालकांना रिक्वेस्ट केली की शिवशंकरला एका वर्गाला जसं जमेल तसं शिकवा म्हणून बिचा-याने क्षणाचाही विलंब न करता वेगवेगळ्या परिक्षांचा अभ्यास करत माझ्या शाळेतल्या चिमुकल्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं त्याचंच फलित (पुण्य) आणि त्याची जिद्द, चिकाटी,ध्यास, प्रयत्न यांच्या जोरावर आज एयर इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे नोकरी लागली...वडीलाचं छत्र हरवलेल्या लेकरांना खरंच खूप जाणिव असते परिस्थितीची...माझा विद्यार्थी म्हणून मला तर गर्वच आहे.आणि अभिमान सुध्दा वाटतो...आज शिवशंकरनी आकाशाला गवसणी घातली....कोण म्हणतं मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यावर चांगल्या पदाला जातात? मी म्हणते शाळा कोणतीही असो विद्यार्थी चांगले असले आणि पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेतून शिकले की मुलं चांगल्या पदावर पोहचतात....

My dear students congratulations...u get big achivements in air india job...As the saying goes, the baby's feet are seen in the cradle, you were in the first class, little by little, until you finally achieved success, with the strength of determination and perseverance, you climbed the sky without the support of your father. I am proud of you.💐💐💐💐👌👌✌️

*शब्दांकन-मिनाक्षी नागराळे मॅडम*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव*

#drxshivshankarambhore
#airindiaairlines

Monday, 22 April 2024

उष्माघाताच्या लाटेपासून बचावासाठी काय करावे? काय करू नये?

 उष्माघाताच्या लाटेपासून बचावासाठी नक्की काय करावे? काय करु नये

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -उन्हाळी हंगामात व वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट निर्माण होत असून नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे मे महीन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात तापमाणात वाढ होत असते. उष्णतेची लाट अथवा उष्माघाटाचा विचार करता सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे उष्मतेची लाट आहे असे समजून होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. वातावरणातील तापमानासोबत हवेतील आद्रता जास्त असल्यास त्याठिकाणी उष्णतेच्या लाटेचे अधिक दुष्परिणाम जाणवतात या शिवाय काही भागात रात्रीच्या वेळी तापमान कमी न होता अधिक उष्ण राहत असल्याने हा भाग अतिसंवेदनशील व उष्माघात प्रवण बनतो. अशा परिस्थितीत मानवी शरीरावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. विशेषतः झोपडपट्टी मध्ये राहणारे, रस्त्या शेजारील अथवा फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रचे ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समितीत काम करणारे, नियमित बाजार अथवा आठवडा बाजारातील विक्रेते येथे भेट देणारे वयोवृद्ध, लहान मुले, महिला यांच्यावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. यासाठी उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करावे ?
· पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्धा तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
· घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावे.
· सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा,
· उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
· हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.
· उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपडयाने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
· प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
· शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हें, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
· अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
· गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
· घर थंड ठेवण्यासाठी पड़दे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
· पंखे, ओले कपड़े याचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
· कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
· सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
· पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
· गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करु नये ?
· उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
· मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
· दुपारी 13 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
· उच्य प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
· लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
· गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
· बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
· उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.