Friday, 27 May 2022

सुख-दु:खाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.

 सुख-दुःखाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे*

                  पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक /कवी अरुण पुराणिक यांचा अंतरातील मोरपिसे हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. यापूर्वी त्यांच्या आयुष्याच्या पानावर आणि पाऊलवाट हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अंतरातील मोरपिसे या ललित संग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अंड डिस्ट्रीब्युटर्स पुणे, यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ३० जून २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट एक मनमोहक, सुंदर मोरपीस आहे.याचे मूल्य केवळ शंभर रुपये असून प्रस्तावना श्री संजय कुळये (कवी व गझलकार) रत्नागिरी यांची लाभली आहे. अंतरातील मोरपिसे म्हणजे आठवणींचे प्रतीक, आठवणींचा कल्लोळ,आठवणींना उजाळा देणारा लेखसंग्रह, भावभावनांचा कल्लोळ म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.
             लेखक/ कवी असणारे अरुण पुराणिक यांनी वयाच्या पंच्याहत्तरी ओलांडले तरीही प्रचंड उर्जेने भरलेले आहेत. अरुण पुराणिक म्हणजे एक वेगळं रसायन आहे. अरुण पुराणिक यांना कविता लेखनाचा छंद पूर्वीपासूनच  होता. त्यात व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक लेख,काव्य वाचनात आले आणि त्यांनी रोज एका नवीन विषयाला हात घालत आपल्या लेखनाचा उपयोग ललित लेख करायला सुरुवात केली. पहिल्या ललित लेखांमध्ये श्री गणेश वंदनाचे महत्व, गणेशाची प्रतिष्ठापना कशी केली जाते? सोंडेच्या अग्रभागावरून गणपतीचे पडणारे प्रकार, गणपतीच्या पूजनाचे महत्त्व,गणपती म्हणजे पती किंवा नेता. गणपतीलाच शक्ती विधायक म्हणतात. गौराईचे महत्व, गौरीपूजन, यथासांग पूजाविधी, अरुण पुराणिक यांनी सांगितले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव याला खूप महत्व दिले गेले आहे. महाराष्ट्रात तर एकामागून एक सणांची मांदियाळी सुरूच असते. ऋतूचक्रा नुसार सण सुध्दा फिरून फिरून येतात. महाराष्ट्रात मराठी नववर्ष हे गुढी पाडव्यापासून सुरू होते. ते वर्षाअखेरीस सण म्हणजे होळी पौर्णिमा व धुलीवंदन हा असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा म्हणतात. हा वर्षातला पहिला व साडेतीन मुहुर्तातला एक सण आहे.
              तुळस तुझ्या अंगणीचे या ललित लेखांमध्ये वारकरी संप्रदाय तुळशीचे महत्त्व सांगितले आहे.आईचे महत्व मातृदेवो भव या लेखांमध्ये आईची महती देवासमान आहे असे अरूण पुराणिक यांनी सांगितले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे आई नसलेला देव सुद्धा भिकारी असल्याप्रमाणेच आहे. असे लेखक अरुण पुराणिक म्हणतात.
              जसे दुःखामागून सुख येते आणि सुखामागून दुःख हे येतेच.सुख, शांती ही सुखाची परिभाषा या लेखात सुखदुःखाची सरमिसळ चांगल्या पद्धतीने अरुण पुराणिक यांनी सांगितलेली आहे. मनाची अवस्था या लेखात मनाला दार असतं तर..मन कसं सुसाट पळत... पळत एकेकालाही मागे टाकतो आणि दुसर्‍या क्षणी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन परत आलेलं असतं. मन हे सदैव स्थिर नसतं. अशी मनाची व्याख्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
            कवी अरुण पुराणिक यांनी मनाची अशी व्याख्या सांगितली आहे. अशीच व्याख्या ज्ञानार्जन ललित लेखात ज्ञानार्जनाची व्याख्या सांगितली आहे.ज्ञानार्जन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने जोपासले पाहिजे. ज्ञानाचा वटवृक्ष होऊन त्याच्या फांद्या सर्वत्र पसरण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.त्यामुळे विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. कोणतेही काम करायचे असेल तर तयारी लागते. मी आणि सायकल या लेखामध्ये अरुण पुराणिक यांनी त्यांच्या जीवनातील सायकलचा प्रवास किती सुखकर होता हे सांगितले आहे. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य कोणाला कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासलेला आहे. आजीचा बटवा या लेखामध्ये छोट्या छोट्या आजारांवर घरगुती उपाय किती महत्त्वपूर्ण असतात? याचे महत्त्व या लेखात सांगितले आहे.
        मानवाच्या जन्मात मानवी अवस्थांचे महत्त्व जास्त असते. शेवटची अवस्थामध्ये वृध्दावस्था  आणि आजच्या काळात होऊ घातलेली वृद्धाश्रम व याची उकल मानवी अवस्था या लेखात अरुण पुराणिक केल्याशिवाय राहत नाहीत. पण मला वाटतं वृद्धावस्था ही समस्या नाही आपण जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले वृध्दाश्रम निघणार नाहीत. संस्कार आणि नम्रता, आजी आणि आजोबा हे लेख खूप वाचनिय आहेत. पंच्याहत्तरीच्या जवळपास असलेले कवी लेखक अरुण पुराणिक यांना  वाचनाचा व लिखाणाचा छंद आहे. हे कौतुकास्पदच आहे. अरुण पुराणिक यांच्या आठवणी म्हणजे अंतरातील मोरपीस होऊन कडू-गोड आठवणीचे अंतरातील मोरपिस होय.
      कवी अरूण पुराणिक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

 समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम 
मोबाईल ९७६७६६३२५७

Wednesday, 25 May 2022

ग्रामिण मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे-आगंतुकाची स्वगते

 *ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे- आगंतुकाची स्वगते*

        अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी डॉ. कैलास दौंड यांचा पाचवा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. गावच्या मातीची ओढ असणारा कवी डॉ. कैलास दौंड यांच्या यापूर्वी 'उसाच्या कविता' हा पहिला काव्यसंग्रह त्यानंतर वसाण,भोग ,सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा आणि त्यानंतर पाचवा काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चपराक प्रकाशन, पुणे, प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती १२ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ११० रुपये असून सर्वच कविता गावाची ओढ लावणार्‍या आहेत.
             डॉ. कैलास दौंड हे गाव-खेड्यात राहणारा सामान्य माणूस पण कविता लेखनाचा छंद त्यांना २००१ सालापासून झाला. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातल्या नामवंत मासिक, साप्ताहिक,दिवाळी अंक तसेच अनेक दैनिक वृत्तपत्रातून सतत प्रकाशित होत असतात. या काव्यसंग्रहातील  पहिली कविता वाचकाला खूप भावते. शेतकऱ्याचे जगणं कसं असतं ? याचे चित्रण चित्रफिती सारखे डोळ्यासमोरून तरळून जाते.
       
                जमुनिया ढग आभाळात आले 
                कुणब्याचे मन वावधानी झाले 
                पावसाचे वारे फिरले बाजारी 
                कुणब्याची माय पडली आजारी..

        जगाचा पोशिंदा असलेल्या कुणब्याला ढग आभाळात आले की कुणब्याच्या मनाची अवस्था सैरवैर होते. बी-बियाणे कशाने आणायचे?  खत नांगरणी पेरणी कशाने करायची? या विचाराने शेतकरी हवालदिल होतो. जसे पावसाचे वारे येईल तसे कुणब्याचे मन बाजारी फिरून येते. कारण कुणब्याची माय म्हणजे त्याची शेती. त्यासाठी त्याच्या कडे पैसे नसले की कुणाला बी-बियाणे घेण्यासाठी सावकाराच्या व्याजाचा फास दिसायला लागतो आणि मग दुसरा पर्यायही नसतो. 'कुणब्याचे मन' हे जगण्याचा अर्थ शोधणारी कविता थेट वाचकाच्या काळजाला भिडते.

                गोंदलेले मातीवर
               बांधांचे चौकोन
               तसतसे खुजे झाले 
               माणसाचे मन 

               पाणी मातीस शोधते 
               रुजताना खोल
               अख्ख्या नदीला मिळेना 
               माणसाची ओल....!!

     वरील ओळीतून डॉ. कैलास दौंड यांनी खूप अर्थगर्भित मतितार्थ मांडला आहे. नांगरलेल्या मातीवर शेतात जसे बांध घालून त्याचे चौकोन आखले जातात. अगदी त्याप्रमाणेच आज माणसाची मनी देखील खुजी झाली आहेत. माणसाच्या मनाचा खुजेपणा स्पष्ट दिसून येतोय. आज नात्यात देखील प्रेम राहिलेले नाही. पाणी मातीत शिरताना जसे खोल खोल जाते. तसे अख्ख्या नदीत जरी पाहिलं तरी माणसाला माणुसकीची ओल मिळत नाही. माणसामाणसांमध्ये देखील मायेचा ओलावा राहिलेला नाही. अशी खंत वरील ओळीतून कवी कैलास दौंड यांनी केली आहे.

           आहे आजव मरणाची आस बाळगणार्‍या
           म्हातारीला चकवून गेला म्हातारा देवाघरी
          लेकराच्या हातावर फुटका रुपया ठेवायला 
           न धजावणारा म्हातारा 
          म्हातारीच्या हातावर देऊन गेलाय तुरी...

       समाजातलं भयाण वास्तव कवी डॉक्टर कैलास दौंड यांच्या कवितेतून दिसून येते.वृद्धपणी नको असलेलं, खंगत चाललेलं शरीर. त्यात म्हातारा म्हातारीच्या जीवाला चुटका लावून देवाघरी निघून जातो. लेकरांच्या हातावर फुटका रुपया ठेवायला न धजावणारा म्हातारा म्हातारीच्या हातावर तुरी देऊन जातो. न सांगताच म्हातारीची नजर चुकवून जातो. आज कित्येकांना वृद्धा मायबाप नकोशी वाटतात. त्या मायबापांनी स्वतः खस्ता खाऊन मुलांना लहानाचं मोठं केलेलं असतं शेवटी तेच मायबाप म्हातारपणी मुलांना ओझे वाटायला लागतात. अशी खंत वरील कवितेतून दिसून येते.
         कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अगदी ग्रामीण भागाशी, गावच्या मातीची, गावाची ओढ लावणा-या आहेत. इतकंच नाही तर समाजातील भयाण वास्तव,ढोंगीपण, माणसाचा आशावाद, शेतकऱ्याचे जीणं, नात्यांचा ढोंगीपणा, आटत चाललेला प्रेमाचा झरा, हरवत चाललेली माणुसकी, आटत चाललेली माया, गावाची ओढ सोडून शहराकडे चाललेली माणसं, कोपत चाललेला निसर्ग, वावर पडीत ठेवलं तर काय होईल ? असा विचार करायला लावणाऱ्या ओळी, मराठीची गोडी, स्वतःचा शोधणारा तळ, जीवनातले गूढ, हा गाव तुझा नाही, गावाबद्दल असणारी ओढ, गावचे वातावरण, माणसापेक्षा पक्षी थोर, इथे मानवता शहारली. इत्यादी कविता वाचकाच्या काळजाला हात घालणा-या आहेत. कित्येक पिढ्या गमावल्यानंतर ही कविता माणसाला विचार करायला लावणारी आहे. शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणाऱ्या या सर्वच कविता वाचकाला भावल्या शिवाय राहत नाहीत.
       कवी डॉ. कैलास दौंडड यांच्या कविता दुष्काळाचा सामना कसा करावा? आज उजाड होत चाललेली गाव, राजकारणांनी नासत चाललेली गाव, विस्थापितांचे शहराकडे निघालेले लोंढे, यावर प्रकाश टाकणा-या कविता आहेत. लेकी-बाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे चित्र आणि जाती-जातीत गुरफटत चाललेली माणसं अशा सा-या समस्या भीषण, भयाण वास्तव  दर्शवणारे काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते होय.
       कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अत्यंत वाचनीय व सत्यता मांडणा-या आहेत.या काव्यसंग्रहाची पाठराखण नागनाथ कोतापल्ले( माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद) यांची लाभली आहे. 
          कवी डॉ.कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समीक्षिका /लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
 मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 24 May 2022

बुद्ध: गौरवशाली मार्गदाता:-जीवनाकडे सृजनात्मक दृष्टीने पहायला लावणारे पुस्तक.

*जीवनाकडे सृजनात्मक दृष्टीने पाहायला लावणारे पुस्तक म्हणजे बुद्ध:गौरवशाली मार्गदाता*

       जळगाव जिल्ह्याच्या लेखिका चित्रा पगारे यांचा बुद्ध गौरवशाली मार्गदाता हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो. असे म्हणणारे, जगाला शांततेचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्ध यांचा अष्टांग मार्ग, धम्माची आवश्यकता का? बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग, त्यांनी सांगितलेले कर्मसिद्धांत, बुद्ध तत्त्वज्ञानाचे बहुआयामीत्व, सामाजिक समस्या व त्यावर तत्वज्ञानाचे उपयोजन, बुद्धवाणी, त्यांनी दाखविलेला मार्ग आज जगाला प्रेरक बनू शकते. मार्गदर्शक ठरू शकतो. असे या ग्रंथाचे सार आहे.
           या ग्रंथाच्या लेखिका कुमारी चित्रा पगारे या असून प्रकाशक ग्रॅव्हिटी पब्लिकेशन, अकोला यांनी प्रकाशित केले आहे.याची प्रथमावृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाचवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, अकोला येथे प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ अतिशय सुंदर, ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धाचे आहे. मूल्य केवळ ७० रुपये असून प्रस्तावना श्री विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस निवृत्त प्रधानसचिव तामिळनाडू राज्य) अकोला यांची लाभली आहे.
        कोरोना काळामध्ये जैविक युद्ध रुपी महाभयंकर महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते.डिप्रेशन, ताणतणाव, नैराश्य,समायोजन, मानसिक अपयश इत्यादी अनेक सामाजिक समस्या उद्भवल्या होत्या.या सर्वांचा आशय लक्षात घेऊन कवयित्री /लेखिका चित्रा पगारे यांनी जगाला विश्व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आणि शिकवणीचा अभ्यास करण्याकडे कल धरला. त्यातूनच महत्त्वपूर्ण सिद्धांत या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. बुद्धतत्वज्ञान काळाची गरज आहे. म्हणून लेखिका चित्रा पगारे यांनी सखोल चिंतन, मनन, करून हा ग्रंथ लिहिलेला आहे.
            जगाला युध्दाची नाही तर गौतम बुद्धाची गरज आहे. या उक्तीप्रमाणे आज संपूर्ण जग कसल्यातरी भय व ताणतणावाखाली जगत आहेत.त्यात विज्ञानाने सर्व प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती केली आहे.मानवाने विध्वंसाची जी साधने स्वतः निर्माण केली आहेत आणि त्यातून त्याला बाहेर पडणे गरजेचे वाटू लागले आहेत.त्यामुळे बुद्ध नीति संपूर्ण जगाला द्या. करूणा,प्रेमभाव, शांती व अहिंसेचा संदेश दिला आहे. विश्वात संपूर्ण सजिवांशी, परस्परांशी करूणाभाव ठेवणे गरजेचे आहे. म्हणून आज जगाला युध्दाची नाही तर बुद्ध धम्माची आवश्यकता आहे.
          तथागत बुद्धांनी सांगितलेल्या धम्माला विज्ञानाचा आधार आहे. धम्म हा प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांतावर आधारित आहे. म्हणूनच जगातील वैज्ञानिक तथागत बुद्धाला जगाचा पहिला वैज्ञानिक म्हणून स्वीकारतात. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे एका वस्तूच्या प्राप्तीवर दुसऱ्या वस्तूची उत्पत्ती होणे.तथागत गौतम बुद्धांनी प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत आणि अनित्यतेचा सिद्धांत असे महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत.लेखिका चित्रा पगारे यांनी तथागत गौतम बुद्धाने शोधलेले मानवी जीवनातील दुःखाचे कारण खूप अभ्यासपूर्ण व तत्वज्ञान पूर्ण पद्धतीने सांगितले आहे. यामध्ये चार आर्यसत्य सांगितले आहेत. पहिले१) आर्यसत्य जगात दुःख आहे.२) दुःख निर्माण होण्याची कारणे.३) दुःखापासून मुक्त होता येते.४)  दुःखावर मात करण्याचा उपाय.
       जीवनात दुःख आहे पण दुःखावर काहीच इलाज नाही असे नाही. दुखाच्या वास्तवाला मिटवून टाकता येते. दुःखाच्या प्रत्येक व्यक्तीचा पराभव करता येतो. दु:खाना पराभूत करण्याचा बुद्धाने सांगितलेला मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. बुद्धाने सांगितलेला अष्टांगिक मार्ग एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये एकूण आठ भाग येतात. त्याला अष्टांग मार्ग (मध्य मार्ग) असे म्हणतात. यामध्ये १) सम्यक दृष्टी २)सम्यक वाचा ३) सम्यक संकल्प ४)सम्यक कर्म ५) सम्यक आजीविका ६) सम्यक स्मृती ७ सम्यक व्यायाम ८)सम्यक समाधी शब्दाचा अर्थ यथार्थ योग्य असा होतो बुद्धाने सांगितलेला मध्य मार्ग हा एक प्रकारचा जीवन मार्ग किंवा जीवन शैली आहे.
          विपश्यना ही बुद्धाने सांगितलेले बौद्ध धर्माची पद्धती आहे.हे जगाला जे महत्त्वपूर्ण तत्वज्ञान सांगितले त्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे ध्यान विपश्यना. या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकावणे असा होतो बुद्धांनी स्वतःच्या ध्यान पद्धतींचा अभ्यास करून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे. ही विपश्यना ध्यान पद्धति आत्मसात केल्यानंतर व्यक्ति स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकतो.
       'अत्त दीप भव'  हा उपदेश बुद्धाने जगाला सांगितलेला आहे. आणि तो मानवी जीवनाचा परम आदर्श आहेत. मनुष्य स्वतः स्वतःचा मार्ग दीप होणं गरजेचे आहे. बुद्धाने सांगितलेल्या कर्म सिद्धांतानुसार कर्म आणि त्याचे मिळणारे फळ ही त्याची प्रतिक्रिया. हे मन, राग मुक्त लोभ मुक्त दोषमुक्त असेल तर चांगले कर्म घडून येतात. तेच मोह, लोभ, द्वेष यांच्या आहारी गेले तर वाईट कर्म घडून येतात. मनुष्याला कर्मानुसार त्याची फळे मिळत असतात. त्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असं बुद्ध म्हणतात
          तथागत गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्ग, तत्व सिद्धांत, त्यांचे तत्वज्ञान , बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसेचा सिद्धांत लोकशाही आणि बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्ध धम्म आणि समाजशास्त्र बुद्ध तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा संबंध विपश्यना प्रणाली व सामाजिक मानसिक शांतता सामाजिक समस्या, प्रति बुद्ध तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन बुद्धवाणी, तथागत बुद्धाने मांडलेले सुविचार,प्रेमाबद्दल मांडलेले सुविचार, कर्माबाबत मांडलेले सुविचार, शांतते बाबत मांडलेली सुविचार, बुद्धांचे प्रेरणादायी विचार आनंदा विषयीचे सुविचार, मैत्री बद्दलची शिकवण,यशाबद्दल ची शिकवण या सार्‍या मार्गदर्शक विचारांचा सखोल अभ्यास कुमारी चित्रा पगारे यांनी अभ्यासपूर्ण हा ग्रंथ निर्माण केला आहे.
        कुमारी चित्रा पगारे यांना बुद्धाचा प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच तर त्या अत्यंत मौलिक व मार्गदर्शक असणाऱ्या ग्रंथाची निर्मिती चित्राताईकडून झाली हे गौरवास्पद आहे.बुद्ध तत्वज्ञान काळाची गरज आहे.म्हणून चित्रा पगारे यांनी सखोल चिंतन मनन करून हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यात प्रतित्यसमुत्पाद आणि त्याचा सिद्धांत कर्मसिद्धांत बुद्धांचे अष्टांगिक मार्गाचे तत्वज्ञान, मादक पदार्थांच्या सेवनावर ईल उपाय आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचे आयामीत्व इत्यादी बुद्ध विनया वर लेखिकेने केलेल्या ग्रंथाची मांडणी आकर्षक झाली आहे या सर्व बाबींमुळे हा ग्रंथ निश्चितच वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे.
              लेखिका चित्रा पगारे यांना पुढील साहित्य निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा 

समीक्षिका/ शिक्षिका/ लेखिका /कवियित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि. वाशिम 
मोबाईल -९७६७६६३२५७

Saturday, 21 May 2022

नवकाव्याची निर्मिती करणारा काव्यसंग्रह म्हणजे मधुसिंधू

*नवकाव्याची निर्मिती करणारा काव्यसंग्रह म्हणजे -मधूसिंधू*

       पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सौ माधुरी काकडे यांनी संपादित केलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह म्हणजे मधुसिंधू.मधुसिंधू हा नवनिर्मिती केलेला नवीन काव्याचा प्रकार पुण्याच्या सो माधुरी काकडे यांनी संपादित केलेला आहे.महाराष्ट्रातील एकूण ३५ कवयित्रींच्या प्रत्येकी १० मधुसिंधू कविता घेऊन बनलेला सर्वच  स्त्रीया असलेला हा पहिला काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनुराधा प्रकाशन पुणे यांनी केली असून मुखपृष्ठ चित्रकार रंजीत वर्मा, नांदेड यांनी अतिशय देखणे रेखाटले आहे.या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती 12 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झाली असून प्रस्तावना जगन्नाथ शिंदे यांची लाभली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ दोनशे रुपये असले तरी नवीन काव्य, नवीन नव कवींना आवडण्यासारखे आहेत.
        सतत नवनिर्मिती करणा-या माधुरी काकडे यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह सुष्टीकाव्य प्रकाशित केला. त्यात सर्व कविता निसर्गावर आधारित आहेत. हा त्यांचा दुसरा प्रातिनिधिक काव्यसंग्रह असून याची निर्मिती त्यांनी केली. यात नवीन काव्यप्रकाराचा शोध माधुरीताईने लावला आहे. अलीकडच्या काळात नवनवीन कवी /कवयित्री  एकत्र येत आहेत. त्यांनी अनेक नवनवे शोध लावत, नवीन प्रकार शोधले आहेत.म्हणतात ना.गरज ही शोधाची जननी आहे. असे माधुरीताईने पूर्वीच्या पारंपारिक काव्यप्रकाराचा सखोल अभ्यास करून नवीन काव्य निर्मिती केली आणि त्याला मधुसिंधू हे काव्य नाव दिले. या काव्यप्रकारात एकूण 22 अक्षरे आहेत.त्याचे नियम असे आहेत पहिल्या ओळीत व चौथ्या ओळीत पाच अक्षरी दुसर्‍या व तिसर्‍या ओळीत सहा अक्षरे अशी एकूण २२ अक्षरे आहेत.

      शपथ घेऊ 
     वाढदिवसाला 
      वृक्षारोपणाला 
      प्राधान्य देऊ....!!

       या प्रकारे पहिल्या व चौथ्या ओळीत यमक असावे आणि दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत समान यमकअक्षर असावे.तिसऱ्या व चौथ्या ओळीत विचारांची कलाटणी देण्याचा प्रयत्न केला तर रचनेचा गभितार्थ आणखीन छान दिसून येतो.
   प्रत्येक स्त्रीला तिच्या भावना असतात. त्या शब्दरूपाने व्यक्त करायला अनेक जणींना आवडते. आज समाजात आपण पाहतो चुलीपासून ते अवकाशा पर्यंत सर्व जबाबदाऱ्या पेलत स्त्रीने मजल मारली आहे. शिक्षण, शिवार, शेत, राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय एवढेच काय बसचा कंडक्टर ड्रायव्हर पासून ते सीमेवर शत्रूपासून संरक्षण करण्यापर्यंत महिला कार्यरत आहेत. जोपर्यंत साहित्यलेखन राहणाऱ्या अनुभवणाऱ्या हातून लिहिले जात नाही तोपर्यंत साहित्य जिवंत होत नाही मधुसिंधू तर राबणाऱ्या अनुभवसंपन्न महिलांची निर्मिती आहे.
      
           चांगले कर्म 
           आपल्या हातात 
           मोद पेरतात 
            जाणा हे मर्म....!

       वरील ओळीतून कवयित्री अनिला मुंगसे असे म्हणतात. चांगले कर्म करणे हे माणसाच्या हातात आहे. ज्याला त्याची जाणीव आहे त्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही.
    
           शब्दास धार 
           जाण्या तडीपार 
            करती निर्धार 
            कष्ट अपार....!!

       वरील ओळीतून अनुष्का गोवेकर यांनी मधुसिंधू या काव्यातून खूप छान व्यक्त झाल्या आहेत. आपल्याला जर तडीपार जायचे असेल तर आपल्या शब्दांला धार पाहिजे. आपला निर्धार पक्का पाहिजे. त्यासाठी आपण अपार कष्ट केले पाहिजेत असे कवयित्रीला वाटते.
   
          करा संगीत
          प्रकट भावना 
          शमवी यातना 
          सुरेल गीत....!!

       वरील ओळीतून कवयित्री आशा नष्टे म्हणतात की संगीताने मानवी मनातील भावना प्रकट करता येतात. आपल्या मानवी जीवनातील दुःख संगीताने नाहीसे होते. तानतनाव मनावर असला आणि सुरसंगीत ऐकले तर तणाव हलका होऊन जातो आणि मनाला मनःशांती मिळते. त्यामुळे मानवी मनाचे त्रास, दुःख, नैराश्य कमी होते.

         माणूस सुखी 
         चांगले विचार
         चांगला अचार 
         न होई दु:खी....!!

        कवयित्री कीर्ती म्हात्रे म्हणतात की माणसाला जर सुखी राहायचे असेल.समाधानी राहायचे असेल तर मनुष्याच्या ठायी चांगले विचार असले पाहिजेत. त्याचे आचरण शुद्ध व सात्त्विक असले पाहिजे. मनाने तो निर्मळ असला पाहिजे तरच त्याला दुःखाचा लवलेशही लागणार नाही. चांगले विचार असले की माणसाचे चांगलेच होते.
   
          त्याग भावना 
          ठेवा देशासाठी 
         कार्य सर्वांसाठी 
          निश्चयी बना....!!

     वरील ओळीतून कवयित्री माया देशमुख म्हणतात की माणसाच्या अंगी त्याग भावना असली पाहिजे. समर्पणाची वृत्ती असली पाहिजे. मानवाने एकजुटीने राहिले पाहिजे. प्रत्येकाचे देशाप्रती काही कर्तव्य आहेत. कांही कार्य आहेत. ते सर्वांनी मनोभावे पूर्ण केली पाहिजेत त्यासाठी निश्चित करण्याचा उद्देश कवयित्री देताना दिसून येतात.
           संसार, कष्ट, प्रगती, प्रतिष्ठान आत्या, मावशी, मामा, पोस्टमन , अभियंता, गवळण, पुरुष,पुत्र ,शेतकरी शास्त्रज्ञ आई बहिणाबाई लेख अशा व्यक्ती सापेक्ष मधून मधुसिंधूधरचना त्यांच्या फार सुंदर आणि वाचनीय आहेत. त्याच बरोबर निसर्ग, झाडे,  फळे, फुले, प्राणी, पक्षी प्रदूषण अशा निसर्गावर आधारित कविता सुरेख पद्धतीने नटून-थटून आलेले आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राला पूर्वीपासून संतांची परंपरा लाभली आहे.त्यांची शिकवण माणसाला माणूस बनवते. अशा थोर संतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या अनेक कवयित्रीनी संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मीराबाई, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत गाडगेबाबा अशा अनेक संतावर आधारित मधुसिंधू रचना फार सुरेख रचल्या आहेत. प्राणी,जंगल, वनस्पती,  सामाजिक जाणिवेतून समाज,देश, संस्कार, समर्पण, संविधान, संकट, समाजकारण, शिक्षण, प्रतिष्ठा इत्यादी महत्त्वाच्या विषयाला अनेकांनी हात घातला असून मधुसिंधूला 4 चंद्र लावल्या सारखेच भासतात.
      मधुसिंधू या नवीन काव्य प्रकारांमध्ये एकूण 35 कवयित्रींनी सहभागी झाल्या आहेत .350 कविता अत्यंत वाचनीय सोप्या, सुलभ, भाषेत लिहिले असल्याने या काव्यसंग्रहाचे मोल वाचकांच्या नजरेत नक्कीच वाढेल यात तिळमात्र शंका नाही सतत नाविन्याचा शोध लावणाऱ्या व इतरांसाठी सतत काहीतरी करू पाहणाऱ्या माधुरी काकडे यांनी नवीन काव्याची निर्मिती करून पुढील पिढीला एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
         कवयित्री माधुरी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!

समीक्षिका/ शिक्षिका /लेखिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि. प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम 
मोबाईल 9767663257

Friday, 13 May 2022

निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे - वारसा शिल्पकलेचा

 *निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे वारसा शिल्पकलेचा*

     निसर्गाची अत्यंत आवड असणारा निसर्गप्रेमी, प्रवासाची आवड,साहित्याची जाण, गायन, लेखन, प्रवास, भटकंती,गरजूंना मदत करणं, संवेदनशील हाडाचा शिक्षक, अभ्यासू व्यक्तिमत्व, चित्रपट निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पुणे जिल्ह्यातील आमचे मानस बंधू संदीप दादा राक्षे यांचा प्रवास वर्णन असणारे पुस्तक म्हणजे 'वारसा शिल्पकलेचा'हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. तसे राक्षे दादांना गड-किल्ले, जंगल सफारी, शिल्पमंदिरे, पुरातन वास्तू इत्यादी पाहण्याचा छंद आहे. ते पाहून इतर लोकांच्या मनात ते ठिकाण पाहण्याची उत्सुकता जागृत होते. या पुस्तकातील प्रत्येक प्रवास वर्णन मी जेंव्हा फेसबूक वर पाहते. तेंव्हा खरंच दादासोबत आपणही प्रवास करतोय असं वाटते आणि कॅमेरातले चित्र पाहिले की स्वतः पाहिल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. हे मात्र तितकेच खरे.
      वारसा शिल्पकलेचा या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले असून मुखपृष्ठ अतिशय देखणे नजरेत साठवून ठेवणारे सुप्रसिद्ध चित्रकार 'अरविंद शेलार' सर यांनी कोरीव अशा सुंदर शिल्प मंदिराचे रेखाटले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १० मार्च २०२२ रोजी माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशित झाली असून याचे मूल्य केवळ १८० रुपये असले तरी प्रवास वर्णन करणाऱ्या, भटकंती करणार्‍या, निसर्गप्रेमी लोकांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरणारी आहे.
        सांस्कृतिक दृष्ट्या व इतिहासकालीन प्राचीन मंदिरे म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा जपत जगाला नव्याने ओळख देणारा भारत संतांची भूमी, शूर वीरांची भूमी, समजली जाते इतर देशातील लोकं आपल्या देशात आल्यावर आपल्या भारताची माती आपल्या स्वतःच्या कपाळाला लावतात. निसर्गप्रेमी, कलाप्रेमी, शिल्पवास्तू प्रेमी असणारे संदीप दादा राक्षे यांना निरनिराळ्या शिल्पकलेची, निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, भटकंती करायला, तेथील दृश्य डोळ्यात साठवायला आणि त्यावर सुंदर प्रवासवर्णन लिहायला आवडते. जणू त्यांचा युगानयुगांचा छंदच आहे. असाच छंद वाचकाला पण प्रेक्षणीय स्थळांची उत्सुकता वाढवणारा आहे. संदीप राक्षे यांनी या पुस्तकात ऐतिहासिक वास्तू, शिल्प मंदिरे, गडकिल्ले पाहत असताना प्रामुख्याने तेथील स्थळ, समाज, रूढी,परंपरा,लोक, संस्कृती यांची माहिती करून घेत पुरातन शिल्प मंदिर व स्थापत्य मंदिर यांचा सखोल अभ्यास करीत मंदिराच्या बाह्य अंगावर शिल्पित केलेल्या सुरसुंदरी, मकतोरण, जालवातायन, रंगशीला, विज्ञान, कीर्तीमुख, गजथर,देवकोष्ठ इ. कोरण्याचे प्रयोजन समजून घेऊन त्यावर लिहिण्याचा प्रयत्न संदीप राक्षे करतात. त्यामुळे वाचकाला वाचताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा भास होतो.वारसा शिल्पकलेचा या पुस्तकात एकूण तेरा ठिकाणचे सुंदर प्रवासवर्णन मनाला भुरळ पाडणारे आहेत.
        पहिले रम्य ठिकाण म्हणजे पुण्यामधले अद्भुत त्रिशुंड गणेश मंदिर.पुण्यातील सोमवार पेठे पासून जवळच असणारे हे ठिकाण. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला ही पवित्र भूमी. पावन भूमी. अशा ठिकाणचे हे त्रिशुंड म्हणजे तीन सोंड असलेले गणेश मंदिर. जिथे सुवर्ण पाषाण त्रिशुंड गणेशाची शिल्प वास्तू.शिल्प या मंदिराचे एक खास आकर्षण अनेक वेगवेगळ्या शिल्पाकृती चा सुंदर नमुने या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप राक्षे यांनी फोटोसहीत छापल्याने वाचकाला प्रत्यक्ष शिल्पाकृती पहावयास मिळतात. दुसरे ठिकाण म्हणजे पेडगावचा धर्मवीर गड. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरुळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट किल्ला देखभालीसाठी होता. मोगलांच्या ताब्यातून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोडवून घेतला. या किल्ल्याच्या आत उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आणि त्या मंदिरावर देखणे शिल्प कोरीव काम केलेले दिसते. याच मंदिरात लक्ष्मीनारायणाची अद्भुत कलाकृती दिसते. जिथे किरणोत्सव जूनमध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच वास्तू छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य स्मृती असलेले स्थळ म्हणजे धर्मवीर गड.
      तिसरे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गुप्तेश्वर. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासुर गावचे गुप्तेश्वर मंदिर. मंदिराची भव्यता व शिल्पाकृती पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल यात शंकाच नाही. हे मंदिर चालुक्य काळातील अकराव्या शतकातील. या गुप्तेश्वर मंदिराचे शिखर अजूनही शाबूत दिसते. चौथे ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कुकडेश्वर शिवालय ९१०व्या  दशकात झंझ राजाने बांधलेले कुकडेश्वर शिवालय हे मंदिर हरिश्चंद्रगडावरील शिवालय प्रति बद्रिनाथ-केदारनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे शिवालय आतून बाहेरून अनेक शिल्पांनी नटलेली आहे. रायगड जिल्ह्यातील कोथळी गडाचा प्रवास वर्णन ऐकून मन भारावून जातं. पण गडाच्या पाय-या चढायला खूप अवघड जातं. गड चढायला लेखकाला संदीप राक्षे सरांना आईचे दूध आठवत होते. त्यात सोसाट्याचा वारा गड चढू देत नव्हता अशा परिस्थितीत द्राक्षे सरांच्या सोबत असलेली बालचमू मंडळी कशीबशी गड चढून वर जाते आणि राक्षे सर खाली धबधब्याजवळ उभे राहतात.कारण निसर्गाच्या समोर माणसाचे काही चालत नाही. धबधब्याजवळ रान हळदीची पिवळीधम्मक फुले मनाला भुरळ घालणारी आहेत. या गडावर अद्भुत आश्चर्य म्हणजे वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरते ठरलेली दगडी भुयार होय.
     पुढचे दैवत कोहिंडे बु.गावचा कोहिडेश्वर. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांमध्ये असणारे कुंडेश्वर महादेवाचे मंदिर. वनराईने नटलेले कुंडेश्वराचे डोंगर सात किलोमीटर घाटाचा रस्ता चढून मग कुंडेश्वराच्या दर्शनाला जावे लागते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे निमगिरी किल्ला. या किल्ल्यावर पूर्वीचे असे काहीच राहिले नाही. वरती फक्त छप्पर वजा मंदिर तयार केलेले आहे. त्यात गजलक्ष्मी व महादेवाची पिंड आहे पण दर्शन घेतल्यावर जी ऊर्जा मिळते ती स्वर्गसुखाचा पेक्षाही श्रेष्ठ आहे. असे संदीप राक्षे दादा सांगतात. या ठिकाणी घनदाट झाडीत ५० वीरगळी एका रांगेत आहेत.वीरगळ म्हणजे एखाद्या व्यक्तीला लढताना रणांगणावर वीरमरण तेथे त्यांच्या स्मृतीत वीरांचे दगडांच्या शिळेवर विशिष्ट प्रसंगाचे शिल्पांकन करून तो पाषाण स्तंभ स्मृती स्वरूपात जतन करणे.
   पुढचे ठिकाण आहे ओतूरच्या कपार्दिकेश्‍वराचे मंदिर. मांडवी नदीच्या तीरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नव्या दशकात झंझ राजाने हे मंदिर बांधले होते .अप्रतिम शिल्पाकृती व सुंदर नक्षीकाम केल्यामुळे सभागृह अत्यंत देखणे दिसत होते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे पळशीचे विठ्ठल मंदिर. पारनेर तालुक्यातील पळशी गावचे विठ्ठल मंदिर. नागर शैलीतील बांधकाम व शिल्पकाम ज्या अठरा षटकोनी शिल्पजडित  स्तंभावर उभे आहे. शाळिग्राम दगडापासून कृष्ण अवतारात बनवलेली मूर्ती अतिशय देखणी, सुंदर रूप,कमरेवर हात, गळ्यामध्ये तुळशीचे हार, कस्तुरी-टिळाच्या आकाराची कुंडले असे मनोहारी रूप माणसाच्या काळजात साठवल्याशिवाय राहत नाही. जांबचे विष्णू मंदिर तसेच काठापुरचा वाघ वाडा डोळ्यात साठवण्याचे ठिकाण. या वाड्यात छोटी छोटी आणि सुंदर नक्षीकाम केलेली ऐतिहासिक  वास्तू आणि तिची आजच्या काळात झालेली दुरावस्था. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानिपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ यांना वीरमरण आले. त्यानंतर मल्हारराव होळकरांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष देणारा हा वाडा आज अखेरचा श्वास घेत असल्याची खंत लेखक संदीप राक्षे व्यक्त करतात.
      पुढचे ठिकाण म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आपेगाव. सूर्यदेवाचे किरण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखकमलावर विराजमान झाले. ना भूतो न भविष्यति असा चमत्कार लेखक संदीप राक्षे यांनी अनुभवला. पर्यावरणाची शिल्पकलेची, ऐतिहासिक, पुरातन वास्तूंची, गड किल्ल्यांची आवड असलेला हा अवलिया महाराष्ट्रातला पहिलाच आहे असं मला वाटतं. आज पर्यंत त्यांची अनेक प्रवास वर्णन व फोटो मी त्यांच्या फेसबुक पेजला पाहत होते पण आज त्यांचे पुस्तक वारसा शिल्पकलेचा हे वाचून व आतील चित्र पाहून स्वतः प्रवास केल्याचा अनुभव मला आला. खरंच शासनाने महाराष्ट्राचा अमोल ठेवा म्हणजे ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, पुरातन मंदिरे यांचा जिर्णोध्दार  करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेही तितकंच खरं आहे.
          सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे प्रवासवर्णन असणारे 'वारसा शिल्पकलेचा' हे पुस्तक प्रत्येक घरातील मुलांना वाचण्यास द्यावे.जेणेकरून मुलांना पुरातन वास्तूची जाण होईल. यात खूप सुंदर व सखोल माहिती आमचे माणस बंधू संदीप दादा राक्षे यांनी करून दिली आहे.
           संदीप राक्षे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७