आज मानवी जीवन धावपळीचं बनत चालले आहे. माणसाला माणसाप्रमाणे माणूस जगू देत नाही.आज मानवाची मलिनता भयानक वाढत चालली आहे. माणसाचा स्वार्थ वाढला आहे. त्यामुळे ना नातीगोती दिसत आहेत, ना मानवता, ना कुणाचा त्याग, ना समर्पणाची भावना, ना संवेदनशीलता कुणांमध्ये दिसत आहे. दिसतो तो फक्त स्वार्थ, अहंभाव, आपल्याच विश्वात गुंग असणारी, मनानी खुजी असणारी माणसं. त्यात कितीही उच्च शिक्षित झाली असली तरी अंधश्रद्धेच्या आहारी जाणारी, बुवा, साधूंच्या हातून भविष्य पाहण्यात मग्न असणारी माणसं, जातीयवादी मानसिकता निर्माण करून निसर्गातील रंगांची वाटणी करून नानाविध धर्माचे झेंडे मिरवणारी विषमता आज समाजात दिसून येते. त्यासाठी माणसाला त्याग, समर्पण, माणुसकी शिकवणारा काव्यसंग्रह म्हणजे पिंपळ व्हायचंय मला.
वर्धा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक असणारे, बुद्धिप्रामाण्यवादी विचार जोपासणारे, आंबेडकरी विचारांची कवी अरुण विघ्ने सरांचा पाचवा काव्यसंग्रह पिंपळ व्हायचंय मला नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी केले असून नावाला साजेसे दर्जेदार मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी साकारले आहे. या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती १४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली असून याचे मूल्य केवळ १५० रुपये असून यातली प्रत्येक कविता माणसाला माणूसपण शिकवणारी आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना व पाठराखण डॉ. युवराज सोनटक्के यांची लाभली असून या काव्यसंग्रहात शोषित व उपेक्षित लोकजीवनाचे यथार्थ चित्रण दिसून येते.
झाड व्हायचंय मला उजेडाचं
येथील रगतपित्या व्यवस्थेच्या छाताडावर
स्वयंदीप होऊन वर्तमानात प्रकाशनासाठी
झाड व्हायचंय मला मानवतेचं
अमानुषतेच्या बुडखावर माणुसकीची
पालवी जपत बंधुता, मैत्रीने डवरलेलं....!!
झाड माणसांला सर्व काही देत असतो. पानं, फुलं, फळं, सावली, डिंक, औषधी, पक्षांना आधार, वेलींना आधार, आणि शेवटी लाकूड. झाडाला फक्त द्यायचंच माहिती असते. झाड सावली देताना विचार करीत नाही की तो कोणत्या जातीचा आहे? कोण आहे ? गरीब आहे की श्रीमंत ? स्त्री आहे की पुरुष ? सर्वांना सारखेच देत राहतो. कवी अरुण विघ्ने सरांना उजेडाचे झाड व्हायचे आहे. इथल्या रक्त पिणाऱ्या व्यवस्थेच्या छातीवर स्वयंदीप होऊन प्रकाशनासाठी. कवीला झाड व्हायचे मानवतेचं, माणुसकीचं. अमानुषतेच्या बुंध्यावर माणुसकीची पालवी जपण्यासाठी. बंधुता, मैत्रीणं मोहरण्यासाठी. संवेदनशील मनाचे कवी अरुण विघ्ने यांना जातिभेद समूळ नष्ट करण्यासाठी एकात्मतेची गाणी गाण्यासाठी झाड व्हायचे आहे असे वरील ओळीतून दिसून येते.
हे क्रांतीसूर्या!
तू उगवला नसतास तर
हे उजेडाचे जग आम्हांस
कदापिही दिसले नसते
रातकिड्यांनीही आम्हांला
केंव्हाच बंदिस्त केले असते...
बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुर्याची उपाधी देत तू उगवला नसतास तर आज हे उजेडाचे जग कधीच दिसले नसते. रात किड्यांनी केंव्हाच बंदिस्त केलं असतं. आज सगळ्यांना साक्षर होता आलं नसतं. तूच आमचा उद्धारक आहेस. तूच आमचा मुक्तिदाता आहेस. हे ज्ञानसूर्या तुझ्यामुळेच आमच्या जीवनाचं सोनं झालं असे वरील ओळीतून कवीला वाटते.
आयुष्यावर बोलू काही ही कविता माणसाचे आयुष्यच बदलून टाकते. माणूस ज्या भाकरीसाठी आयुष्यभर मरमर करतो. वाकळी ऐवजी गादीवर झोपतो. माझा बंगला, माझी गाडी, माझं घर म्हणतो. माणूस अमाप दुःख आणि विरह सहन करतो. या साऱ्या गोष्टी आयुष्याने दिल्या. आप,तेज, वायू,धरणी, आकाश सर्व दिलस ज्यात माणूस एक दिवस विलीन होणार आहे. माणसाला सरतेशेवटी काही सोबत नेता येणार नाही. फक्त माणसाच्या नावाबरोबरच त्याचं चांगलं सत्कार्यच मागे चिरंतर उरणार आहे. वास्तव माणसाला माणूसपण आणि शहाणपण शिकवणा-या कवी अरुण विघ्ने सरांच्या ओळी थेट काळजाला जाऊन भिडणा-या आहेत.
कोविड 19 च्या काळात एका विषाणूने सर्वांना खूप काही शिकवलं. कवी अरुण विघ्ने सरांच्या यापासून आम्ही काय शिकलो? ही कविता माणसाला विचार करायला लावणारी आहे. एका विषाणुने जवळपास दोन वर्ष साऱ्या जगावर थैमान घातलं होतं. सर्वजण घरात बंदिस्त झाले होते. स्मशानात प्रेत ठेवायला जागा नव्हती. ना कोणत्या प्रेताला अंघोळ नव्हती. कोणी कोणाच्या मातीला जायला तयार नव्हता. माणसाला माणसाचा जीवच फक्त प्रिय होता. हे वास्तव कवीने आपल्या कवितेतून मांडले आहे.
लढत लढत जगायचं
की जगत जगत लढायचं हे तुम्हीच ठरवा
मन म्हणेल तसं जगायचं
जगताना काय शिकायचं हे तुम्हीच ठरवा...
कवी अरुण विघ्ने सरांच्या वरील ओळी माणसाला जगायला शिकवणाऱ्या आहेत. जीवन जगताना प्रत्येकाला लढाई ही करावीच लागते. मग ते लढत लढत जगता आले पाहिजे. की जगत लढायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं कवीला वाटते शेवटी कवी म्हणतो की मन मानेल तसं जगा आणि जगताना काय शिकायचं ? हे तुम्हीच ठरवा. संकट काळात कोण खरं कोण खोटं हे कसं ओळखायचं हे तुम्हीच ठरवा असे कवी म्हणतो.
प्रज्ञा, शील, करुणा जपणारा संवेदनशील मनाचा कवी अरुण विघ्ने कधी मृदू शब्दातून बोलतो तर कधी व्यवस्थेच्या मुळाशी कठोर शब्दांनी प्रहार करतो. समाजातले भयाण वास्तव, लोकशाही, विषमतेची दरी, जगा आणि जगू द्या, जीवनाचे अंतिम सत्य, माणसातलं माणूसपण, आपलेपण, आंबेडकरी आशावाद, शिवरायांचे विचार आणि झाडासारखी परोपकारी भावना, विषाणूचा भयानक काळ, त्यातून मिळालेली शिकवण, संविधानाने दिलेले समान हक्क, अधिकार आणि कर्तव्य, माय ने खाल्लेल्या खस्ता, गरिबीची जाणीव, झाडाची समर्पणवृत्ती, मानवी मनाच्या ओलाव्यात असलेली सदभावना, समाजाच्या व्यथा, वेदना, प्रश्न, व्यवस्थेशी भांडून न्याय मागणारा कवी म्हणजे अरुण विघ्ने होय.
राख झाली घराची, माणसाच्या नशा ने
थंड झालेल्या चुलीला, पेटवावे कशाने ?
वरील गझलेतून कवी अरुण विघ्ने सरांनी माणूस नशेच्या आहारी गेल्यावर घरादाराची, संसाराची कशी राखरांगोळी होते, संसार कसा उद्ध्वस्त होतो? व्यसन किती भयानक असते? तसेच माणसाला चांगलं की वाईट याचं भान राहत नाही. नशेच्या आहारी गेलेला माणूस शेतीबाडी, घरदार सर्व विकायला सुरुवात करतो आणि वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त होतो. नाहीतर मग आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवून टाकतो. मग मागच्यांनी कसं जगावं ? थंड झालेल्या चुलीला कशाने पेटवावं? असा मार्मिक सवाल कवीने आपल्या शेरातून केला आहे.
कवी अरुण विघ्ने सरांनी झाडासारखी उदात्त भावना जपायला सांगितली आहे. झाड कसं दान देतो? तसं माणसाने सुद्धा आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावं. असं कवीला वाटतं. कवीला कांही माणसांमध्ये झाडे दिसतात. भारतात जे संत होऊन गेले. महापुरुष होऊन गेले.त्यांच्या समाजकार्यात, आचारात, विचारात कवीला झाडाची प्रतिमा दिसते. अशा महान संतांच्या, त्यांच्या विचारांच्या, पावलावर पाऊल ठेवून नाही तर किमान त्यांच्या पावला मागे पाऊल टाकण्यासाठी कवीला परोपकारी पिंपळ व्हायचं आहे.
कवी अरुण विघ्ने यांच्या पिंपळ व्हायचंय मला या काव्यसंग्रहात एकूण 83 कविता अत्यंत वाचनीय आहेत. मुक्तछंदातली कविता वेगळ्याच हातोटीने रचण्याची वेगळीच कला कवी अरुण विघ्ने सरांनी साधली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे पिंपळ व्हायचंय मला.
कवी अरुण विघ्ने यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....!
समिक्षिका/लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि. प. प्राथमिक शाळा कोकलगाव
ता. जि.वाशिम