Wednesday, 19 January 2022

संघर्षाचे दुसरं नाव म्हणजे-झालं कोरडं आभाळ

 *संघर्षाचे दुसरं नाव म्हणजे- झालं कोरडं आभाळ*

   अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सावत्र आईच्या हाताखाली राहून मोलमजुरी करून शाळा शिकून सीमेवर देशाची सेवा करणारा हिम्मतबाज,जिगरबाज सैनिक कै.लक्ष्मणराव मानकर व त्यांच्या पत्नी कै.मनोरमाबाई मानकर या उभयंताचा मृत्यू झाला. कोरोना कालावधीत अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांचे जावई संवेदनशील मनाचा सच्चा दिलाचा माणूस गणेश भाकरे यांनी सासू-सासऱ्यांचा जीवन प्रवास त्यांचा त्याग, धैर्य, शौर्य, माया, जिव्हाळा, आपुलकी भाव, त्यांचा आदर्श समाजासमोर प्रेरणादायी ठरावा यासाठी केलेला हा शब्दप्रपंच. माणसाला संघर्ष करायला शिकवतो.साहसी बनायला शिकवतो.संघर्षाचं दुसर नाव म्हणजे - झालं कोरडं आभाळ आभाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २७ ऑक्टोबर २०२१ मध्ये झाले असून प्रकाशन  शब्ददीप प्रकाशन मुर्तीजापुर यांनी प्रकाशित केले आहे. सुंदर मुखपृष्ठ मिलिंद इंगळे यांनी सुरेख व्यक्तिमत्व असलेले बोलके चित्र साकारले आहे .या काव्यसंग्रहात एकूण ८० कविता असलेल्या देखण्या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 170 रुपये असून यातल्या कविता अर्थगर्भित व काळजाला भिडणा-या आहेत.
      संघर्षाशिवाय जीवन नाही. जीवना शिवाय संघर्ष नाही. या उक्तीप्रमाणे बऱ्याच जणांना दोन वेळचे पोटभर जेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. परिस्थिती घडवते आणि बिघडवते सुद्धा. असा प्रेरणादायी प्रवास कवी  गणेश भाकरे यांनी आपल्या आदर्श असणाऱ्या सासु-सासरे (आई-वडीलासमान) असणारे यांना शब्दांच्या मखमली झालरीमध्ये ठेवण्याचा संकल्प केला. प्रत्येक वेळी नातं रक्तातच असावं लागतं असं नाही. आज आपण पाहतो कित्येक पोटची मुलं देखील स्वतःच्या जन्मदात्यांना वृद्धपणी सांभाळत नाहीत. त्यांना वृद्धाश्रम ठेवतात. इथे मात्र संवेदनशील मनाचा जावई कवी गणेश भाकरे यांनी प्रत्येक आठवण शब्दबद्ध करत खरी साहित्याची सेवा केली आहे. खरी शब्द सुमनांजली अर्पिली आहे.
    
            काय केलं आई अण्णा 
            गेले एकामागे एक 
            विसरले कसे सांगा 
            दूर गावातली लेक....!!

             सांगा सासर सोडून 
             येऊ कुणाचे भेटीला 
             असं कसं फेकलं हो
             दूर दिव्याच्या वातीला....!!

           एका मुलीचे आई वडील देवाघरी गेल्यावर जेवढे दुःख होतं तितकच दुःख जावयाला होते हे वरील ओवीतून विषद होते.प्रत्येक जावई आपल्या सासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या रूपात पाहत असेल तर कोणत्याच स्त्रीला हुंड्यासाठी सासरवास होणार नाही. माय बाप गेल्यावर मुलीवर कोसळणारा दुःखाचा डोंगर, दुःखाचा आभाळ कोसळलं की मुलीला आयुष्यभर आभाळ कोरडं झाल्यासारखं वाटतं. त्याची उणीव भासत राहणार. सहचारिणीचे दुःख कवीने आपल्या काव्यातून व्यक्त केले. तसेच यापुढे सासरवाडीला कोणासाठी येऊ असं कसं दिव्याच्या वातीला म्हणजे लेकीला तुम्ही दूर फेकलं अशी खंत कवीमनाला वाटते.

          प्रत्येकाच्या
         मनी भीती 
         नाही दिली 
         मूठमाती
 
         जवळचे 
         खूप दूर 
         जीव गेला
         रिते घर....!!

    कोरूना नावाच्या भयंकर महामारीमुळे अख्खं जग पार हादरून गेलं. लाखो लोक मरण पावले.स्मशानाने भयाण रूप धारण केलं होतं. कोणत्याही व्हाट्सअप समुह उघडला की कुणीतरी जवळचे मित्र व नातेवाईक,ओळखीचे आपल्यातून निघून गेलेली असायची आणि भावपूर्ण श्रद्धांजली ने समूह भरून जायचा. काळजात धस्स व्हायचं. कित्येक लोकांच्या नशिबी माती करण्याचे भाग्य  सुद्धा लाभले नाही. प्रत्येकाच्या मनात भीतीचे वातावरण होतं. जवळचे दूर झाले. जवळचे मेले.जीव गेला तरी  काहीजण मातीला गाठू शकले नाहीत. अशी अवस्था अनेकांची झाली होती. तीच खंत कवी गणेश भाकरे यांनी उपरोक्त ओवी मधून करण्याचा प्रयत्न केला आहे.

            आई गेल्यावर ! सारे दूरदूर 
            खिडक्या आणि दार | बंद केले ||
 
           अंतर ठेवून | राहिले असते 
           कशी ही दिसते | जाता जाता ||

     कोरोना काळ जगाला खूप काही शिकवून गेला. कोरोना महामारीत कोरोनांने आणि खूप लोकं भितीपोटी मेली. स्मशानात भयान वाटणाऱ्या चितेच्या अग्नीतांडव घातलेला स्मशान लोकं जाळायला  पण जागा नव्हती. अशा बिकट परिस्थिती मध्ये काही लोकं भीतीनेच मेले. तर काही लोक इतर आजारांनी मेले.कुणी अटॅकने गेले,कोणी नातेवाईक निसर्गतः जरी मेला तरी कुणी कुणाच्या मातीला जाईना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती कवी गणेश भाकरे यांच्या सासुबाई वारल्यावर झाली होती. आई गेल्यावर सगळे नातेवाईक दूर गेले. सर्वांनी खिडक्या आणि दार बंद केले. कोणीही मैयतीला आले नाही.रिपोर्ट निगेटिव्ह असून सुद्धा. तिला लोक आले नाहीत.अंतर ठेवून आले असते आणि शेवटचे दुरूनच पाहिले असते.अशी खंत कवी गणेश भाकरे यांनी वरील अभंगातून  केली आहे.

             आई अण्णा वैकुंठात 
             आता माहेरात काय 
             पुण्या विटेवरी शोधू
             माथा टेकविण्या पाय...||

             आई-वडील नसल्याचे दुःख जेवढे एका मुलीला होते तेवढे दुःख जगात कोणालाच होत नाही. मुलगी सासरी जरी गेली तरी तिचे डोळे, तिचे अंतकरण, सतत आई-वडिलांकडे माहेरी पिंगा घालत असतं. माय बापा विना कोणत्याच मुलीला माहेरी करमत नाही. पाया पडण्यासाठी कोणती विठ शोधू? असा खडा  सवाल लेकीच्या भावना कवींनी व्यक्त केले आहेत.' जे देखे कवी ते ते न देखे रवी ' या उक्तीप्रमाणे कवी कोणाच्याही भावना व्यक्त करू शकतो. कवी कोठेही पोहचू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संवेदनशील मनाचा कवी गणेश भाकरे होय.
 
              त्यांच्यामुळे वाटे मला
              माझं माहेर पंढरी 
              त्यांच्या भेटीसाठी माझी 
               असते एकादशी वारी....!!

     प्रत्येक मुलीला तिचे माहेर म्हणजे तिच्यासाठी पंढरीच असते. जणू स्वर्गच असतो. आणि त्या स्वर्गातले मायबाप म्हणजे देवच. आई वडिलांच्या भेटीसाठी मुलगी धावत माहेर गाठते. मुलीला तिच्या माहेरची भेट म्हणजे एकादशीची वारीच वाटत असते. हे त्रिकालाबाधित सत्य चार ओळीतून  कोणीच नाकारू शकत नाही.

               मित्रानो
               स्मशानातल्या लिंबाच्या झाडाखाली
               तोंडावर मास्क लावून
               एक एक जरी उभा राहीला असता.   
               निरोप द्यायला तर 
                माजी ऑक्सिजन लेवल 
                किती तरी पटीने वाढली असती.
                माझ्या मायला शेवटचा
                निरोप देताना....!!

     संवेदनशील मनाचे कवी गणेश भाकरे यांना त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या कठीण समयी, त्यांच्या दुःखात सहभागी झाले नाहीत. याची सल कायम त्यांना बोचत राहते. मित्र फक्त सुखात सोबत असून उपयोग नाही तर वेळप्रसंगी संकटात, दुःखात साथ देणारेच खरे मित्र.कवी गणेश भाकरे यांच्या आई सासुबाई वारल्यानंतर मित्रमंडळी दूर दूर जरी उभी राहिली असती स्मशानात. तरी माझी ऑक्सिजन लेवल किती तरी पटीने वाढली असती.असा शेवटचा निरोप देते समयी अशी खंत कवी गणेश भाकरे यांनी केली आहे.
        कोरोनाच्या काळात अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये कवी गणेश भाकरे यांना सासू-सासरे यांच्या निधनानंतर झालेले दुःख. शब्दातून वाट मोकळी करत कांही रचना अष्टाक्षरी तर काही अभंग प्रकारात काही मुक्तछंदातल्या तर काही चाराक्षरीत आहेत. अष्टाक्षरी काव्यप्रकारात गेम साधणा-या रचनांचा कवी गणेश भाकरे यांचा वेगळाच हातखंडा दिसून येतो. सासू-सासरे यांच्या जाण्याने कवीचा मायेचा पसारा हरवल्यासारखं वाटतं. झालं कोरडं आभाळ या पुस्तकाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. प्रत्येक कविता वाचताना आभाळ भरून आल्यासारखं अंतःकरण भरून येतं. अशा या काव्यसंग्रहात ८० कविता वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे- झालं कोरडं आभाळ या शीर्षकावरूनच कवी गणेश भाकरे यांच्या दुःखाची वलयाची कल्पना दिसून येते. आणि नकळत वाचकांची ही डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

     कवी गणेश भाकरे यांच्या पाचव्या काव्यसंग्रहाला व पुढील कारकीर्दीला अनंत शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

शब्दसौंदर्याने नटलेला काव्यसंग्रह म्हणजे -'प्राजक्त'

 *शब्दसौंदर्याने नटलेला काव्यसंग्रह म्हणजे- प्राजक्त*

       प्राजक्ताचा सडा अंगणात सर्वत्र पसरतो आणि चोहिकडे सुगंध ज्याप्रमाणे दरवळत राहतो. अगदी तसाच निसर्गसौंदर्याने भरभरून नटलेला काव्यसंग्रह म्हणजे पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती भिसे यांचा दुसरा काव्यसंग्रह 'प्राजक्त' होय. कवयित्री प्रीती भिसे यांचा काव्यसंग्रह खर्‍याखुर्‍या प्राजक्ता प्रमाणेच मनमोहक असून वाचकांच्या जीवनात देखील आनंद पेरणारा, वाचकांचे मंदिर सुगंधित करणारा हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अॅंन्ड डिस्ट्रीब्युटर्स सासवड, पुणे यांनी १ मार्च २०१९ रोजी प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ शंभर रुपये असले तरी प्रत्येक कविता या शब्द सौंदर्याने नटलेल्या वाचकाच्या मनाला गारवा देणा-या आहेत. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्राजक्ताची फुले असणारा प्राजक्त निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवतो. वाचकाला वाचनाची गोडी वाढवून जातो.
          कवयित्री प्रीती भिसे या अत्यंत श्रद्धाळू, मायाळू असल्याने त्यांनी शब्द फुलांची परडी सुरुवातीलाच गणेश वंदना ने केली आहे. प्राजक्ताचे फुल जरी नाजूक असले तरी संध्याकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा पाहून मन हर्षित झाल्याशिवाय राहत नाही. प्रा:त काळी उठल्याबरोबर अंगणात प्राजक्ताचा सडा पाहून जसं मन सुगंधित होते त्याच प्रमाणे प्रीतीताईंच्या कविता वाचून मन सुगंधित होते.

        अल्पायुषी प्राजक्त असा आहे सुंदर देखणा
        श्रीहरीसही मोहवितो हा नाजूकही तेवढा
        दुसऱ्यासाठी सुगंधित अविरत घालतो तो सडे 
        बागेतून प्राजक्त कसा गं सुवासिक दरवळे...!!

         प्राजक्ताचं फूल जेवढं नाजूक आहे. तेवढेच अल्पायुष्यी आहे. पण प्राजक्ताच्या सुगंधाने संपूर्ण परिसर सुगंधित होतो. देवाला सुद्धा खूप आवडतो. तेवढाच नाजूकही असतो. नुसत्या वाऱ्याच्या झुळकेनेसवे प्राजक्ताचा सडा अंगणी पडतो. त्याचा सुवास सर्वांना मोहून टाकतो. वरील ओळीतून कवयित्री प्रीती भिसे व्यक्त होताना दिसतात.

          वाटे माझिया मनाला, स्वच्छंदी पाखरू व्हावे
          माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे 
          दाराच्या जवळ जुई, सुगंधी प्रसन्न वाटे
          अंगणात सुबकशी, रांगोळी नक्षी थाटे
          आईची प्रेमळ हाक,आनंद नभी न मावे
          माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे...!!

              संवेदनशील मनाच्या कवयित्री प्रीती भिसे यांचे मन सदैव माहेरच्या अंगणात घिरट्या घालताना दिसून येतं. कवयित्रीला स्वच्छंदी पाखरू होऊन सतत माहेरी जावं वाटतं. माहेरच्या अंगणात दाराच्या जवळ असलेल्या जुईचा सुगंध घेतल्यावर कवयित्रीला प्रसन्न वाटतं. अंगणातली सुबक अशी रांगोळीची नक्षी कवितेच्या मनात घर करून राहते.  त्यात आईची प्रेमळ हाक ऐकल्यावर कवित्री प्रीती भिसे यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणून कवयित्रीचे मन सारखं माहेरच्या अंगणी गिरट्या घालताना दिसतं.
          कवयित्री प्रितीताई जेवढी निर्मळ तेवढी स्वच्छंदी पाखरू असल्यासारखी आहे. त्यांनी अनेक कविता माती, आकाश, प्रेम, सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या, वेली, झाडे, पशू, पक्षी, डोंगर, वसुंधरा इ.वर केलेल्या आहेत.त्यामुळे कवयित्री प्रीती भिसे यांचे सृष्टीशी खूप छान जवळचे नाते आहे. कवयित्री जेवढ्या हळव्या मनाची आहे. तेवढीच श्रद्धाळू ,मायाळू आहे. हे पहिल्या कवितेतूनच दिसून येते. कवयित्रीला भारत माते विषयी खूप प्रेम आहे.खूप आदर आहे,खूप अभिमान आहे.
      कवयित्री प्रितीताई भिसे यांचा 'जीवनाच्या पायवाटेवर' हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला आहे. जीवनाच्या पाय वाटेवरून चालताना त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्राजक्त वाचकांच्या पसंतीस उतरणारा आहे. कारण त्यांच्या अनेक कविता छंदबद्ध वृत्तामध्ये असल्याने  चार चॉंद या काव्यसंग्रहाला लागले आहेत. जेवढ्या कविता वृत्तबद्ध किंवा लगावली मध्ये लिहिली जाते. तेवढी कविता सर्वोत्तम व दर्जेदार बनतील यात संशय नाही. या काव्यसंग्रहात कवयित्रीने अनेक छंद वृत्तामध्ये गझल लिहिल्या आहेत.कवयित्री प्रीती ताईंना निसर्ग सौंदर्या प्रमाणेच शब्द सौंदर्याची देणगी परमेश्वराकडून मिळालेली आहे.
    
          आभाळाचे पंख लावू
          प्रयत्नांना देव मोका 
          यश शिखरा भिडून 
          उंच जाई माझा झोका...!!
  
        वरील अष्टाक्षरीमधून गरूडा प्रमाणे उंच भरारी घेणाऱ्याला जमिनीचं ओझं नसतं त्याप्रमाणे प्रितीताईना आभाळाचे पंख लावून प्रयत्नांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी उंच झोका घ्यायचा आहे. अशी जिद्द प्रितीताई यांच्या अष्टाक्षरी ओवीतून दिसून येते. जिद्द चिकाटीला गुरु मानणारी कवयित्री प्रेरणेला साथीदार करून साहित्याचा कल्पतरू बनू पाहात आहे. अहंकारा विषयी अत्यंत चीड असणारी कवित्री संवेदनशील ही तितकीच आहे. त्यांची सांजवेळ,आयुष्यात साथीचे स्थान, फुलाला सुगंध मातीचा, तुळस, शब्द मनोरा, रविकिरण, निवांत क्षण, स्वप्नातली सृष्टी, सृष्टीसौंदर्य निसर्गाचे,नववधू, आठवणी, तुझ्या मुळे बहरलं नातं, अवनी,आकाश यासारख्या कविता अत्यंत वाचनीय होऊन वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येताना दिसतात. काही अष्टाक्षरी काव्य कधी शेलकाव्य, कधी शिरोमणी काव्य, तर कधी गजल होऊन तर कधी भुजंगप्रयात, आनंदकंद तर कधी आनंद ज्वाला वृत्त, उद्धव मात्रा वृत्त, पादाकुलक वृत्त असे वेगवेगळ्या मात्रा वृत्तात मांडण्याचा वेगळाच हातखंडा कवयित्री प्रीती ताईंचा दिसून येतो.
         कवयित्री प्रितीताई चे अनेक रचनातून त्या धार्मिक असल्याचं दिसून येतं. प्रीती ताईच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना जरी प्रदीर्घ असली तरी मुद्देसूद व काव्यसंग्रहाला न्याय देणारी आहे. प्रस्तावना सौ.मीरा भागवत मीतेश्री यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक विजय काकडे, बारामती यांनी मोजक्या शब्दांत पण सुरेखपणे मांडली आहे. या काव्यसंग्रहात एकूण 61 कविता असून त्या प्राजक्त च्या रूपाने सृष्टी सौंदर्यात व साहित्यात वाचकाला शब्द सौंदर्याने नकळत प्राजक्ता सारखा फुलवीत सुगंधित करणा-या आहेत. 
          कवयित्री सौ.प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
©️®️मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Monday, 10 January 2022

स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे ती अशीच आहे

 *स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे ती अशीच आहे*

     ती च्या मनातील घालमेल फक्त तीच जास्त ओळखू शकते. एका स्त्रीच्या मनातले भाव, शब्दमाधुर्य,प्रेमरसाने बहरत जाऊन, ती च्या काव्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहतो. असाच एक काव्यसंग्रह म्हणजे 'ती अशीच आहे'  कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी यांचा एक काव्यसंग्रह.मी आजपर्यंत प्रातिनिधिक काव्यसंग्रह अनेक वाचले पण दोन कवयित्रीचे संयुक्तिक काव्यसंग्रह प्रथमच माझ्या वाचनात आले. दोन भिन्न व्यक्तींचे विचार एकत्र जुळणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद व खऱ्या मैत्रीचे प्रतीक आहे. आजकाल आपण पाहतो बऱ्याच मैत्रिणी या शॉपिंग पुरत्या,पार्टीपुरत्या  किंवा इतर कार्यक्रमापुरत्या असतात. पण दोन भिन्न जिल्ह्यातल्या कवयित्री एकत्र येऊन काव्यसंग्रह काढतात. ती च्या शोधात म्हणजे स्त्रीच्या जीवनावर आधारित विचार यांचा सुरेख संगम जिथे जुळून येतो तिथे खरोखर माझे कर आपोआप जुळतात.
       'ती अशीच आहे' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परिस पब्लिकेशन पुणे यांचे असून मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी स्त्री (ती) चे कर्तव्यदक्ष असणारे हात व त्या झाडावर बसलेली ती चिमणी काढलेले बोलके चित्र बघताक्षणीच काव्यसंग्रह वाचनाची गोडी वाढवते. या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रकाशित झाली असून मुल्य केवळ दीडशे र१५०/ असले तरी ती चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे? ते शेवटी मनाला पटते. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना धनंजय मुळे भंडारा व विष्णू संकपाळ यांची लाभली आहे.

        ती अशीच आहे
        फुलापेक्षाही नाजुक 
         नारळासारखे कठीण
         पण आतून कोमल 
         रागामागेही जिचे अतुट प्रेम आहे
         भांडूनही जी हक्काने हवे ते मागून घेते.

            निसर्गाने स्त्रियांना अद्भुत शक्ती प्रदान केली आहे. स्त्रियांच्या स्त्रियांना जेवढी सहनशक्ती दिली आहे तेवढेच संवेदनशील मन ही तिच असतं.ती जेवढी फुलासारखी नाजुक आहे. तेवढीच बाहेरून नारळासारखी कठीण आहे. पण आतून खूप कोमल आहे. मायेचा सागर आहे. पुराणात पुरातन काळापासून स्त्रीला खूप महत्त्व आहे. तिच्या रागा मागेही अतूट प्रेम दडलेलं असतं. एखादी स्त्री आपल्या मुलाला एक चापट जरी मारली तरी दिवसभर तिला रुखरुख लागून राहते की मी उगाच चापट मारली. तिची माया अगाध आहे. तिचं मन अगदी लहान मुलाप्रमाणे निरागस आहे. ती नसली तर ती च्या अस्तित्वाच्या खुणा घरभर पसरलेल्या असतात. ती जितकी धांदरट आहे तितकीच समजदार आहे. ती च्या मनाचा ठाव कोणालाही घेता येणार नाही. अशी परमेश्वराची ती खास निर्मिती आहे.
        स्त्रियांच्या जबाबदाऱ्या, ती च्यावर लादलेली बंधने, तिचा कणखर करारी बाणा, ती चं उदार असणारं अंतःकरण, तिचे निरागस भाव, घरासाठी समर्पित होणारी ती, ती च्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, ती च्या शिवाय तो नाही, तिच्यावर होणारा अन्याय, ती ची होणारी उपेक्षा, ती चा संघर्ष, ती च्या आयुष्याची जडणघडण, ती ने खाल्लेल्या खस्ता,तीचे कष्ट, मेहनत, ती ची जिद्द, ती चं सौंदर्य, ती च फुलपाखरासारखं भिरभिरणारं मन,ती चा तो स्पर्श, ती चा तो आपुलकी भाव, अनेक नात्यात गुंफिली जाणारी ती, आयुष्याचा खडतर प्रवासाची ती सोबतीन, अशा सर्वांगाने व्यापून गेलेली ती, ती च्याविषयीचे उत्कट भाव कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मिता नानवटकर यांनी "ती अशीच आहे" यातून व्यक्त केल्या आहेत.

        खुल्या आभाळाखाली निर्भय अन् 
        उघड्यावरचा संसार मी थाटला आहे 
        कष्टाने पेटलेल्या चुलीवरती कधी 
        मी माझाच हात भाजला आहे.

             वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबांना किती कष्ट सोसावे लागतात. किती खस्ता खाव्या लागतात. हे फक्त गरिबांना माहिती असतं. गरिबांना घरादाराचा आधार नसला की खुलं खुल्या आभाळाखाली कसली भीती नाही आणि उघड्यावरचा संसार त्यांनी थाटलेला असतो. कष्टाने पेटलेल्या चुलीवर गरिबांचा हात भाजतो. अशी व्यथा मी कामगार बोलतोय कवितेतून संवेदनशील मनाच्या कवयित्री चित्रा पगारे यांनी मांडली आहे.

          भेटी साजनाचा ह्रदयात ध्यास आहे
         डोळ्यात आसवांचा पाऊस खास आहे
         ओढ अनामिक आता ध्येयात गुंतलेली 
          दरवळतो भोवताली तुझा सुवास आहे.

          कवयित्री नीता नानवटकर यांनी वरील शेर आनंदकंद या वृत्तपत्रातील लिहीला असून त्यांनी स्त्रीला साधणार्‍या साजनाच्या भेटीची ओढ, त्याच्या आठवणी व साजनाच्या प्रेमाचा दरवळणारा सुवास गझलेतून व्यक्त केला आहे.कवयित्री मीता नानवटकर यांच्या गझलेचा वेगळाच थाट या काव्यसंग्रहाला मखमली लेस लावून जातो. स्त्रियांचं जगणं.. जगता-जगता होणारी परवड, तिचे स्वातंत्र्य, तिची ती बंदिस्त अवस्था, ती चर्या साठी धडपडणारी ती सावित्री, सावित्रीचे ते कार्य, सावित्री मुळे झालेली स्त्री जातीची प्रगती, तिने घेतलेली गरुड झेप, ती च्यातली ती समर्पण करणारी वृत्ती, ती ची विरह भावना, ती चे प्रेम करणारी ती कळी, तिच्यावर लादलेली अनेक बंधनं  झुगारून देऊन ती ने केलेला तो प्रवास हे सारे काही कवयित्री मिता नानवटकर यांनी अगदी सुरेखपणे मांडले आहे.

        पेलून संकटांना मी वाकणार नाही
        वाटेत आयुष्याच्या मी थांबणार नाही

        चाखून वेदनांना पाहील धाडसाने 
        डोहात आसवांच्या मी वाहणार नाही....!

            कवयित्री मीता नानवटकर यांनी एक स्त्री संकटावर कशी मात करते? अनेक संकटं झेलण्याचे धाडस स्त्रीमध्ये असते. आयुष्याच्या वाटेवर ती कधीच थांबत नाही. संकटसमयी सुद्धा स्त्री वेदनेने व्याकुळ न होता धाडसाने समोर जाते.इतकेच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला तरी आसवांचा डोहात मी वाहणार नाही. अशी खंबीर स्त्री म्हणजे 'ती ती अशीच आहे'  ईश्वराने स्त्रीचे मन जरी हळवे बनवले असले तरी ती ला धाडसी सुद्धा बनवले आहे. परमेश्वराची खास कलाकृती म्हणजे स्त्री 'ती अशीच आहे'.
           कवयित्री चित्रा पगारे व मीता नानवटकर या दोघींच्या कवितेचा संयुक्तिक काव्यसंग्रह स्त्री म्हणजे ती. ती च्या अस्तित्वाचा शोध घेणारा असल्याने रसिकांच्या, वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. कवयित्री नीता नानवटकर यांच्या अनेक गझल खूप काही सांगून जातात. वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या, तिचं जगणं,खूलनं,फुलनं, ती च अस्तित्व व्यक्त करणाऱ्या कविता सरळ काळजाला जाऊन भिडणा-या अशाच कविता या काव्यसंग्रहात आहेत. काही कविता सामाजिक भान जपणाऱ्या तर काही कविता प्रकाश टाकणा-या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण 80 कविता असून अत्यंत उत्कृट दर्जाच्या आहेत.
        कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 31 December 2021

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन




 

Tuesday, 28 December 2021

वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन

 *वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन*

      महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे सादरीकरण दिनांक 21 डिसेंबर रोजी रिसोड रोड, लाखाळा वाशिम. येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉ.ज्ञानेश्वर नागरे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम) मार्गदर्शक डॉ.सुलक्षणा पवार मॅडम (अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक नवोपक्रम), परिक्षक श्री शिवशंकर मोरे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री जगदीश करडे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री रोकडे सर (प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय वाशीम) यांनी जिल्ह्यातील नवोपक्रम स्पर्धेतील पात्र शिक्षकांच्या सादरीकरणाच्या परीक्षणाचे काम पाहिले. 
          सन 2021- 22 या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील  नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याकडून राज्यातून उपक्रमशील शिक्षकांकडून नवोपक्रम शासन स्तरावर मागवले जातात. नवनवीन उपक्रम व शिक्षकांची कल्पकता या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिसून येते. अशा उपक्रमांची यादी राज्यस्तरावरून (SCERT)पुणे यांच्याकडून डाएट कडे येते. यात प्रथम फेरीत निकषानुसार स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्राथमिक गटांमध्ये एकूण 13 व माध्यमिक स्तर एक असे 14 नवोपक्रम सादर झाले होते. पहिल्या फेरीची निवड होऊन प्राथमिक गटातून सात शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड झाली. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एकूण आठ शिक्षकांच्या नवोक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण झाले. त्यामध्ये पाच मुद्यांना धरून सात मिनिटांमध्ये सादरीकरण करावयाचे होते. परीक्षकांनी गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
               प्राथमिक गटातून श्री.रंजीत जाधव, मानोरा यांनी प्रथम मानांकन प्राप्त केले तर वाशिम पंचायत समिती मधील आरती गंगावणे यांनी दुसरा आणि मीनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कारंजा येथील कु. नीता तोडकर व मुरलीधर जाधव कारंजा यांना उत्तेजनार्थ मानांकन मिळाले. माध्यमिक गटातून संजय धांडे, रिसोड यांनी प्रथम मानांकन मिळवले.  प्रज्ञा देवळीकर कारंजा व संध्या पिंजरकर, मंगरूळपीर यांनी सहभाग घेतला. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि जिंकलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
          जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव केंद्र तोंडगाव पंचायत समिती वाशिम येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी नागराळे या त्यांच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत असतात.याही वर्षी त्यांनी गणित विषयावर आधारित नवोपक्रम SCERT pune यांच्याकडे सादर केला होता.या उपक्रमाचे सादरीकरण २१डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते.त्यात मिनाक्षी नागराळे वाशिम यांच्या उपक्रमास तृतीय मानांकन मिळाले.स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.गट शिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिंदे साहेब व केंद्रप्रमुख विलास गोटे सर,शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन वाकुडकर सर व केंद्रातील तसेच वाशिम पंचायत समिती मधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश सुर्वे (जिल्हा समुपदेशक डायट वाशिम) यांनी केले तर तंत्रज्ञान टेक्निकल श्री विश्वंभर आळणे (विषय सहाय्यक डायट ) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास कडाळे (अधिव्याख्याता )स्वाती ढोबळे (डायट, वाशिम)श्रीमती संजीवनी दारोकार (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) श्रीमती स्मिता इंगळे (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) आदींनी अथक परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.विश्वंभर आळणे सरांनी मानले. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.