Saturday, 19 December 2020

बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

 *बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

         पुण्याचे कवी रमेश जाधव सर यांचा काव्यसंग्रह "नाते मनाशी मनाचे" नुकताच वाचनात आला.आज धावपळीच्या युगात सर्वजणच खूप व्यस्त झाले आहेत. सारे जग झपाट्याने धावताना दिसते.धावत्या युगाबरोबर नातेवाईकांना सुद्धा पूर्वीसारखा वेळ नाही. सर्वजण आपापल्या कामात अत्यंत व्यस्त दिसत आहेत. तेव्हा मन हलके करण्यासाठी कित्येक वेळा कवी मनाशीच बोलतो आहे.आपल्या मनातले भाव मनालाच जणूकाही सांगतो आहे. तेच भाव शब्दबद्ध केलेत कवी रमेश जाधव यांनी. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पांढऱ्या शुभ्र फुलांचे चित्र आहे. जणू काही ते कवीचे मनच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन घनश्याम पाटील असून त्यांचीच काव्यसंग्रहाला साजेशी,सुरेख प्रस्तावना आहे. तर मलपृष्ठावर अमरावतीच्या लेखिका पल्लवी चौधरी यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता बंद हृदयाची स्पंदने खोलणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती २४ जुलै २०१६ ची असून मूल्य फक्त ८० रुपये आहे. पण यातील कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत.

            अडगळीत पडलेल्या आयुष्याला 
            दिली एक नवी दृष्टी 
            दिसली नव्या आयुष्यात 
            सकारात्मक सुष्टी 
             काढून टाकली नकारात्मक घाण
             फुलणार मनाची रान....!!

          वरील ओळी खूप काही सांगून जाणा-या आहेत. माणसाचं आयुष्य जर उसवले असले तरी त्याला नवा दृष्टिकोन आला तर नव्या उमेदीने जगता येतं तरच मानवाच्या आयुष्याच सोनं होतं.तर त्यासाठी माणसांने सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच नवीन ऊर्जा तयार होईल व मनातले मळभ दूर होतील. माणसाने आयुष्यात कितीही संकटे आली तर ती पेलून धरता आली पाहिजे.त्यातून बाहेर पडता आले पाहिजे. मनातले सर्व नकारात्मक विचार काढून टाकता आले पाहिजे. आपले अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. मनातली घाण काढून टाकल्या नंतरच आपल्या मनाचं रान फुलणार आहे. आणि आयुष्य डुलणार आहे. असं कवी रमेश जाधव यांना वाटतं. 

                अंधाराच्या साम्राज्यात 
                हाती काही लागत नाही 
                आपलेच हात रिकामी असल्यावर 
               कोण आपले स्वागत करीत नाही....!!

             आज सर्वत्र श्रीमंतीचा, गर्वाचा अंधार पसरलेला दिसतो. स्वार्थाने बरबटलेली माणसं पाहायला मिळतात. जर एखाद्याचे काही काम असेल तरच ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला गोड बोलण्याचा प्रयत्न करते. काम संपलं की "गरज सरो आणि वैद्य मरो" अशीच अवस्था लोकांची होते. अशा वातावरणात जर गेलं तर आपल्या हाती काहीच लागत नाही आपल्या जवळ धन, पैसा, संपत्ती नसेल तर आपल्याला कुणीच बोलत नाही.आपल्याकडे पैसा नसला आपण अडचणीत असलो तर कोणीच आपले स्वागत करीत नाहीत असे कवी म्हणतो आहे.

                     अंतरीच्या वेदनांचे
                     किती आणि कसे आवरू हुंदके
                    सुपीक नात्यांवर 
                     गैरसमजाचे पडलेत खंदके....!!

           अंतर्मनाला जर वेदना झाल्या तर त्याच्या जखमा लोकांना दिसत नाहीत.मनावर अनेक आघात होऊन  दुःखाचे हुंदके दाटून येतात आणि नातलग  यांच्यामध्ये गैरसमज होऊन मनाच्या रानाला भेगा पडतात. मन व्याकुळ होतं आणि वेदनेची जाणीव मनात जाळं बनून राहते. असे संवेदनशील मनाच्या कवीला वाटते.

               मी गेल्यावर कोणी रडू नका 
               कडू-गोड आठवणी काढू नका 
                नको ती रक्षा सावडणे
                तेंव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे 
                नको ते दहावा, तेराव्याचे विधी 
                 त्यापेक्षा अनाथाश्रमात द्या निधी....!!

             मरणाला प्रत्येक जण भितो. आज आपण पाहतो पण हळव्या मनाचा कवी मोठ्या धाडसाने स्वतःची अंतयात्रा काव्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी मेल्यानंतर रडू नका. माझी आठवण काढू नका. माझी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम ठेवत बसू नका. तेंव्हा खरी गरज आहे. माझ्या कुटुंबाला आधार देण्याची,त्यांना सावरण्याची ते करा. माझे दहावे, तेराव्याच्या विधीवर पैसा खर्च करू नका. त्यापेक्षा तोच पैसा अनाथ आश्रमात द्या. जुन्या रूढी-परंपरांना आणि अंधश्रद्धा ठेवणाऱ्या अनेक पद्धतींना आळा घालण्यासाठी आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न कवी रमेश जाधव सरांनी केलेला आहे. आज अंत्यविधी वर किती तरी लोक पैसा खर्च करतात. तो न करता त्याचा उपयोग समाजासाठी करावा अनाथ आश्रमाला तोच निधी देण्यात यावा असे कवीला वाटते.

                 हल्ली शिक्षणाचा मांडलाय बाजार 
                डोनेशनचे आकडे ऐकून पालक झाले बेजार...!!

              सत्य परखडपणे मांडणारे कवी रमेश जाधव सर म्हणतात आज गल्लीबोळामध्ये शाळा काढून शिक्षणाचा बाजार मांडलाय.खाजगी दुकाने शाळाचं नवरूप घेऊन ठाण मांडून बसल्या आहेत. स्वार्थापोटी गोरगरीब जनतेला लुबाडत आहहेत. एल.के.जी पासून पालक प्रवेश घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहून भली मोठी फी भरून आपल्या मुलाला शाळेत पाठवत आहेत. इतकेच नाही तर पुन्हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी संस्थाचालकाच्या घशात भरमसाठ पैसा ओतून डिग्र्या घेत आहेत. पुढे तेच पालक लग्नाच्या बाजारात शिक्षणाचा सर्व पैसा वसूल करतात.त्याच्या स्वरूपात अशी अशी टीका केली आहे. आणि ती रास्तच आहे. आज खासगी संस्थांची फीस गगनाला भिडली आहे. तिच्याकडे पाहून भल्याभल्या लोकांचे होश उडून जातात. दोन दोन लाख एका एका वर्षाची फीस आहे. अशा शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मानसिकतेला जर आळा घालायचा असेल तर सर्वांनी त्याचा विचार करावा. असे कवी आवर्जून सांगतो आहे.

           कवी रमेश जाधव यांच्या कविता सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या, समाजहित जपणाऱ्या,मनांची गुंफण करणाऱ्या, हळव्या मनास आधार देणाऱ्या,अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणाऱ्या, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या, वास्तवाचे भान ठेवणाऱ्या, गैरसमजाचे जाळे दूर करणाऱ्या, वृद्धा विषयी सहानुभूती असणाऱ्या, पोलिसांविषयी आदर असणाऱ्या, मनाशीच मनाचे नाते सांगणाऱ्या....सर्व कविता अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत. बंद हृदयाची स्पंदने खोलत जाणा-या आहेत.
        प्रत्येक मानवी मनाने मनातूनच वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे..कवी रमेश जाधव सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा....!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 16 December 2020

कधी उघडेल शाळा...!!

 *कधी उघडेल शाळा*

कधी जाणार कोरोना
कधी उघडेल शाळा
गेले वर्ष हे निघून
येते आठवण बाळा....!!

शाळा पडलिया ओस
नाही करमत आता
येते याद चिमण्यांची
जेव्हा शाळेत मी जाता...!!

केल्या बोलक्या ह्या भिंती
पण लागत नाही लळा
डोळे डोकावून पाही
कधी फुलेल हा मळा....!!

पाखरांची किलबिल
कधी ऐकाया येईल
कधी येतील पाखरे
कधी कोरोना जाईल....!!

वाट पहाते मॅडम
कधी लेकरं येतील
माझी चिमणी पाखरं
हसतील नाचतील....!!

नाही करमत आता
जिव झाला खूप बोरं
कानी येतो तो आवाज
किलकिलणारी पोरं.....!!

खरं सांगू का बाळांनो
मज लागलाय लळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा....!!

कधी वाजेल ती घंटा
आई म्हणे पळा पळा
चिमुकल्या पावलांनी
कधी फुलेल हा मळा....!!

जरी ऑनलाईन शाळा
नाही ती रे खरी मजा
कोरोनाचा हाहाकार
वाटे जिवालाच सजा...!!

थोडा धीर धर बाळा
एक दिवस येईल
जसा आला तसा बघा
असा कोरोना जाईल....!!

खाली खाली वर्गखोल्या
मज बोलतीया शाळा
कुठं हरवली बाळं
माझ्या घेवून ये बाळा....!!

सारे उदासवाने हो
कधी उघडेल ताळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

अशी मायेची माणसं...!!

अशी मायेची माणसं


अशी मायेची माणसं
कुठं गेलीत निघून
जीव कासावीस होई
फोटो तयांचा बघून....!!

कोण फिरवील हात
मन येतसे भरून
कोण करील गं लाड
गेले दिवस सरून......!!

उसावल्या त्या नात्यांना
कोण शिवून देईल
कसे स्वार्थाने भरले
कधी समज येईल.....!!

कसा ओढतोय जीव
आईवडीलांचा फार
किती खाऊनिया खस्ता
सोसलासा सारा भार ....!!

नाही वेळ कुणा आज
नाही राहिले ते प्रेम
बदलली ती माणसं
सारे झाले आता सेम....!!

काळवेळ बदलला
आपुलकी रे दिसेना
नात्यानात्यांतच तेढ
माणुसकी ना वसेना...!!

नशिबाचा खेळ सारा
जन्मदाते हिरावले
येई सदा आठवण
डोळे आज पाणांवले....!!

अशी मायेची माणसं
पुन्हा कधी भेटतील
साचलेल्या दुःखासही
कधी कवेत घेतील...!!

किती देऊ आर्त हाक
कधी परत येणार
दुरावल्या या जिवाला
कधी जवळ घेणार.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

Tuesday, 15 December 2020

बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे- "धाडसी राम"

 *बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे "धाडसी राम"*

         बुलढाणा जिल्ह्यातील प्राध्यापक देवबा पाटील सर यांची धाडसी राम ही बाल कादंबरी नुकतीच वाचनात आली. या बालकादंबरीच्या मुखपृष्ठावर धाडसी असणाऱ्या मुलांचे चित्र म्हणजेच राम चित्र आहे.बालपणी जर मुलांना धाडसाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा सांगितल्या किंवा बालकथा संग्रह,कादंबरी वाचण्यास दिली तर उद्याचे भावी नागरिक,उद्याची भावी पिढी जी आज बालके आहेत.त्यांना मोबाईलच्या दुनियेतून थोडेसे बाजूला सारून वाचावयास दिले तर नक्कीच भावी पिढीमध्ये धीटपणा, खंबीरपणा,धाडस येईल यात शंकाच नाही. या कादंबरीची द्वितीय आवृत्ती २३ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झाली. या कादंबरीचे प्रकाशन कादंबिनी प्रकाशन,जळगांव यांनी केले असून त्याची ४८ पुष्ठे आहेत.याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण यातील प्रसंग आणि रामच्या धाडसाच्या कथा लाखमोलाच्या आहेत.
             लेखक,कवी,शिक्षक असा त्रिवेणी संगम असणारे प्राध्यापक देवबा पाटील यांची एकूण बत्तीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक साहित्याला नानाविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भौतिक शास्त्राच्या बी.एस.सी अभ्यासक्रमाची २१ इंग्रजी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या "धाडसी राम" या बालकादंबरीला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व सौ कुसुमावती भीमराव जाधव बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीवर प्राध्यापक देवा पाटील यांची निवड झाली आहे. 
            छत्रपती शिवरायांना जिजाऊ मॉंसाहेबांनी बालपणी शूरवीरांच्या, पराक्रमाच्या,शौर्याच्या, रामायण महाभारतातल्य कथा सांगितल्या त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर बनले.जगात शूर वीर म्हणून ओळखले जातात. इतकेच नाही तर एका वीर पुरुषाची आई म्हणून साऱ्या जगाला जिजाऊ माँसाहेब ठाऊक आहेत. अगदी त्याप्रमाणेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसाला निर्जीव खेळणे किंवा टेडि देण्यापेक्षा धाडसी राम सारखे बालकादंबरी भेट दिले तर मुलांना वाचनाची गोडी लागेल.  आज-काल काही मुलं आई-वडील घरी नसले की घरात पण जात नाहीत.भितात.. भीती वाटते असं म्हणतात. स्वप्नात रडतात, बोलतात इत्यादी विचित्र प्रकार घडतात.आजच्या काळातील लहान मुलांना तर पारंपारिक खेळच माहिती नाहीत. सुरपारंब्याचा खेळ, लपंडाव, विटी दांडू खेळणे,लगोरी खेळणे असे किती तरी खेळ कालबाह्य होत चालली आहेत कारण घरातले लहान मुलं टीव्हीवरील कार्टून्स मोबाईल वरील गेम्स मध्येच गुंतलेली आहेत. मैदानी खेळ,व्यायाम, कुस्ती,दंडबैठका इ.गोष्टीकडे  मुलांना व पालकांना वेळच नाही. म्हणून पालकांनी जागृत होण्याची, आपल्या मुलांच्या आरोग्याकडे, त्याच्या व्यायामा कडे ,त्याच्या खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल मुलांची आई म्हणते झाडावर चढू नकोस पडशील. पडशील हा शब्द उच्चारून) भीती घालून दिल्यामुळे खरंच भ्यायला लागते आणि मग पुन्हा तो झाडावर चढण्याचा प्रयत्न  करत नाही शहरातल्या तर बहुतांश मुलांना झाडावर चढता येत नाही.
           या बाल कादंबरीतला राम सारंगपूर गावचा असून त्याची आई राधाबाई व वडील शामराव हे फार परोपकारी वृत्तीचे असतात.कोणालाही संकटात मदत करणारे, आदर्श कुटुंब होते. रामच्या बालपणी खरोखरच रामला चांगले वळण लावण्यासाठी रामचे आई-वडील खूप प्रयत्न करायचे. आई शूरवीरांच्या,शिवरायांच्या गोष्टी कथा सांगायची,संस्कारक्षम गाणी,कविता ,श्लोक पाठ करून घ्यायची त्यामुळे रामचे शब्द सुधारू लागले.बुद्धी तल्लख होत.गेली रामची आई जास्त शिकलेली नव्हती परंतु रामचा घरचा अभ्यास पूर्ण करून घ्यायची. रामच्या वडिलांचे ही गावातल्या शाळेत चांगले योगदान असायचे.
            चाणाक्ष धाडसी रामचे वडील शामराव आणि पारंपारिक व्यायामाची गोडी लावण्यासाठी रामला योगासने प्राणायाम दंड-बैठका,सूर्यनमस्कार,धावणे इत्यादी गोष्टींमध्ये पारंगत केले. धावण्यांमध्ये तर राम कोणालाच ऐकत नसे. शरीर चपळ बनण्यासाठी राम खूप व्यायाम करू लागला. ग्रामीण भागातला राम आई-वडिलांसारखंच परोपकारी वृत्तीचा होता. इतकेच नाही तर खूप संवेदनशील मनाचा होता एकदा शेतातील कपिला गायीचे वासरू रामला लंगडताना दिसले. छोट्याशा वासराच्या खांद्यावरून पोटावरून हात फिरवत फिरवत रामने हळूच वासराच्या खुरात शिरलेला काटा काढला त्यामुळे प्राणिमात्राविषयीचे रामचे प्रेम प्रेम दिसून येते.एकदा राम शेतातील हौदात पडला तेव्हा तेच वासरू उडी मारून रामचा जीव वाचवतो. त्यानंतर रामला पोहणे शिकण्याची उत्कंठा वाढत जाते. आणि राम चांगल्या पट्टीचा पोहणारा होतो सारंगा नदीच्या शेजारी काही बायका धुणं धुण्यासाठी गेल्या असताना त्यातील एका बाईचे मुल नदी शेजारी खेळता-खेळता पाय घसरून नदित पडते. आणि बुटकुळ्या खात असते.त्यावेळी प्रसंगावधानी राम पळण्यात चपळ असलेला पळत जाऊन त्या मुलाचे प्राण वाचवतो अशा धाडसी रामचे गावात सर्वत्र कौतुक होते.
             एक वेळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले . पळत सुटणाऱ्या चोराला पकडण्यासाठी राम एक युक्ती करतो. आणि त्या व्यक्तीमुळे चोराला पकडले जाते त्यामुळे संपूर्ण गाव रामचे कौतुक करतात हा किस्सा लहान मुलांसाठी खूप धाडस निर्माण करणारा व पुढील गोष्टी वाचण्यासाठी उत्कंठा निर्माण करणारा आहे.एखाद्या लहान मुलाने कसे राहावे त्याने कोणकोणते खेळ खेळावेत यासाठी ही बालकादंबरी म्हणजे धाडसी वृत्तीचा जणू खुराकच आहे.
            रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवरून गोफणीने दगड मारून चोरांना पिटाळून लावणाऱ्या राम व त्याचे सर्वच किस्से कौतुक करण्यासारखे आहेत‌.इतकेच नाही तर गुणवत्ता झालेल्या माकडांना पिटाळून लावण्यासाठी राम नी केलेली भज्याची युक्ती खूप प्रशंसनीय आहे जे काम गावातील भल्याभल्यांना जमले नाही ते काम धाडसी राम करून दाखवतो.गावच्या पाण्यात टाकीत विष टाकणारा माणूस फक्त त्यामुळे कसा पकडतो.असे रामच्या अनेक किस्से बालकांची उत्कंठा वाढवणारे व वाचनाला गोडी लावणारे आहेत.
           वेदपुरच्या डोंगरात राम व त्याचे सवंगडी धबधबा पाहण्यासाठी जातात तिकडे माणसांची वर्दळ मुळीच नव्हती.तितक्यात अतिरेकी येऊन बंदुकीचा धाक दाखवून राम व त्याच्या मित्रांना अतिरेक्यांची टोळी पकडून नेते. एका अंधारकोठडीत हात-पाय बांधून डांबून रामला टाकतात. रात्र झालेली असते मुलांना भूक लागून व्याकुळ झालेले असतात तेव्हा राम ने केलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे.रामने आपल्या तोंडाने दुसऱ्या मुलाच्या हाताची दोरी सोडून एकमेकांच्या दोऱ्या सोडून मुलांचा मनोरा करून त्यावर चढून राम बंद कोठडीच्या झरोक्यातून बाहेर पडतो रात्रभर चालत चालत पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतो पहाट होण्याअगोदर पोलिसांना सोबत घेऊन राम त्याच्या मित्राकडे पोहोचतो पोलिसांनी चौफेर वेढा  घालून पळवलेल्या सर्व मुलांना सुखरूप सुटका करतात सर्व मुलांच्या जीवात जीव आला पण पोटात कावळे ओरडत होते पोलीस इन्स्पेक्टरने ५० बिस्कीटचे पुढे नेले होते ते सर्व मुलांना थर्मास मधला चहा आणि बिस्कीट खायला देतात ही बातमी सारंगपूर गावामध्ये वाऱ्यासारखी पसरते.सगळे धाडसी रामचे कौतुक करतात व त्याच्या स्वागतासाठी वाट पाहत असतात तितक्यात पोलिसांची गाडी गावात येते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसतो तेवढाय इस्पेक्टर येतात.धाडसी रामजी खूप कौतुक करतात आणि राम चे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले जाईल अशी घोषणा करतात.
       आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी "धाडसी राम"ही बाल कादंबरी वाचली तर नक्कीच विद्यार्थ्यांना दुसऱ्याला मदत करण्याची भावना वाढीस लागेल आणि आपली सुद्धा भावी पिढी मोबाईलच्या महाजालात न पडता धाडसी  बनेल यात शंकाच नाही त्यासाठी सर्व पालक शिक्षक यांनी अशी पुस्तके मुलांना भेट म्हणून द्यावीत. प्राध्यापक देवबा पाटील यांचा साहित्यिक प्रवास असाच अविरतपणे चालू राहावा यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा

*समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयत्री*
*कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे*
जिल्हा प.प्राथ. शाळा कोकलगाव 
*तालुका -जिल्हा वाशिम*

Saturday, 12 December 2020

जगण्याचे सामर्थ्य देणाऱा काव्यसंग्रह म्हणजे-आयुष्याच्या पानावर.

 जगण्याचे सामर्थ्य देणारा काव्यसंग्रह म्हणजे- आयुष्याच्या पानावर*

      पुण्याचे ज्येष्ठ कवी अरुण पुराणिक यांचा नुकताच प्रकाशित झालेला "आयुष्याच्या पानावर" हा काव्यसंग्रह वाचनात आला. कवी अरुण पुराणिक हे हाडाचे शिक्षक भावी पिढी घडवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे, सेवानिवृत्ती नंतर २८ वर्षांनी म्हणजे वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यावर कवितेच्या प्रेमात पडले. हे फार महत्वाचे आहे. आयुष्यात जे कांही अनुभव आले त्यातूनच अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन आयुष्याची पानं उलगडत आपले अनुभव शब्दांच्या माध्यमातून कवितेच्या रूपात मांडणारे कवी अरुण पुराणिक यांच्या कविता माणसाला संकटा समोर हतबल न होता जगण्याचे सामर्थ्य देऊन जातात.
        संग्रहाचे मुखपृष्ठ खूप विचार करायला लावणारे पण वास्तवाचे सत्य दर्शन करणारे आहे.त्यावर एक रिकामी खुर्ची आहे आणि खिडकीत दोन पक्षी आहेत. पक्षी कसला तरी वीचार करत खिडकीतून बाहेर डोकावत आहेत. मानवाचे आयुष्य ही असेच असते. प्रत्येकाला एक दिवस आपली खुर्ची सोडावी लागते.प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावाच लागतो हे अंतिम सत्य आहे.
            कवी अरुण पुराणिक यांनी अनेक संकटांचा सामना करत साहित्य क्षेत्रामध्ये वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर कवितासंग्रह काढणारे पहिलेच कवी असावेत. आयुष्य संपत आल्यानंतर आयुष्याच्या पानांवर कडू-गोड,सुख-दुखत आठवणी, त्याग,विरह, प्रेम आलेले सर्व अनुभव प्रत्येक पानावर उमटवत गेले. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २०सप्टेंबर २०२० ला आर्या प्रकाशन पुणे यांनी केले असून या काव्यसंग्रह मध्ये एकूण ६० कविता आहेत. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्राध्यापक विजय काकडे पुणे यांची असून या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे.पण यातली प्रत्येक कविता खुप आशयघन व मानवाला जगण्याचे सामर्थ्य देणारी आहे.या काव्यसंग्रहाची सुरुवात गणरायाला शब्द सुमने अर्पण करून ते थेट विसावा घेई पर्यंत आहेत.

            विचारात देव | देव आचारात |
            देवा आधारात | कल्याणात ||

     या वरील अभंगाच्या ओळीतून देव कोठे आहे? असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर देव माणसाच्या विचारात आहे. देव माणसाच्या आचारात आहे. देव माणसांत आहे. देवळाबाहेर जर एखादा मुलगा भुकेने व्याकूळ होऊन बसला असेल आणि  त्याच मंदिरात लोकं देवावर दुधाचा अभिषेक करत असतील तर त्याला काही अर्थ नाही. खरा देव हा माणसात लपला आहे. ते ओळखा आणि अडचणीत असलेल्या माणसांला आधार द्या. तरच देव तुम्हांला पावेल. त्यातच तुमचे कल्याण आहे... असे कवीला वाटते.

           चारा चोचीत पिलांच्या चिमणी देई.
           गोठ्यात वासरांना चाटतात गाई 
           उपमा कशाची देऊ वात्स्ल्यमूर्ती आई...!!

        जशी चिमणी आपल्या पिलांसाठी रानावनात भटकून चोचीत चारा आणते. तशाच गोठ्यातल्या गाई व ममत्वपूर्ण आपल्या वासरांना चाटतात.अगदी त्याप्रमाणेच आपणाला जन्म देणारी आई वात्स्ल्याची खरी मूर्ती आहे. या वात्स्ल्यमुर्ती आईला कशाची उपमा देऊ ? आईचे उपकार कधीही न फिटणारे आहेत. या वरील ओळींमधून कवींनी मर्मदर्,शी प्रेमरूपी वात्सल्याचे दर्शन घडवले आहे. संवेदनशील मनाचा कवी अप्रतिम शब्दरचना करूणरसात काव्य करतो.

               स्थायिभाव हा अविरत सेवा
               भक्कम पाया आदर्श विचारांचा 
               शस्त्र म्हणून घेतले सदविचारा
               शिक्षक असा मी समाज घडविता...!!

              प्रत्येक माणसांचा एक स्थायीभाव असतो. त्यात प्रेम,राग, हेवा,मत्सर,आपुलकी, जिव्हाळा,त्याग, सेवा इत्यादी गुण माणसांच्या ठायी असतात. पण कवि अरुण पुराणिक यांचा स्थायीभाव म्हणजे अविरत सेवा हे त्यांचे व्रत आहे. हा गुण त्यांच्या ठायी ठासून ठासून भरलेला आहे. त्यांच्या आयुष्याचा भक्कम पाया म्हणजे त्यांचे आदर्श विचार. त्यांच्या जोरावर ते आयुष्याची पाने अलगदपणे पलटवीत आहेत. सदविचारांना कवीने शस्त्र म्हणून हाती घेतले आहे. ज्या माणसांच्या ठायी सद् विचार आहेत तो मनुष्य कधीही पराभूत होऊ शकत नाही. ते एक शस्त्र आहे. सद्गुणांचे शस्त्र ज्याच्या हाती असेल तो कधीच भरकटणार नाही.गुन्हे करणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही. सद् विचारांच्यांच वाटेने जाणार आणि हा बदल फक्त एक शिक्षक करू शकतो. असाच मी एक शिक्षक आहे. समाज घडविणारा असे कवी मोठ्या अभिमानाने सांगतो.

               बहारदार हरित वृक्ष
               देतात प्राणवायू 
                त्यांच्याच कृपेने 
               लाभते मानवास आयु....!!

                 हरित वृक्ष माणसाला प्राणवायू देतात. त्याच बरोबर पाने, फुले-फळे,अनेक औषधे देतात. हरित वृक्ष नसते तर मानवाला ऑक्सिजन मिळाले नसते. त्यासाठी सर्वांनी वृक्ष लावायला पाहिजे. त्यांचे जतन, संगोपन, आणि संवर्धन केले पाहिजे.त्याच्याच कृपेने मानवाला हे आयुष्य मिळाले आहे असे कवीला वाटते.निसर्गावर भरभरून प्रेम करणारा कवी आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो.
          कवी अरुण पुराणिक यांच्या कविता निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या,वेळेचे महत्व सांगणाऱ्या,देशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या,क्रांतिकारकांबद्दल ऋण व्यक्त करणाऱ्या, माणसांत  देव शोधायला सांगणाऱ्या, देवावर श्रद्धा असणार्‍या,बहिणींशी नाते जोडणाऱ्या,मित्रत्वाचे प्रेम सांगणाऱ्या,कर्तव्यनिष्ठा, साहित्य व संस्कृती जपणाऱ्या, त्यागी जीवन जगणाऱ्या, संकटावर मात करून नव्या उमेदीने जगण्याचे सामर्थ्य देणाऱ्या कविता थेट काळजाला भिडणा-या आहेत. आयुष्य कसं जगावं यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे आयुष्याच्या पानावर.

    कवी अरुण पुराणिक यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा...!!

समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६८६६३२५७