Sunday, 6 December 2020

तिमीरातुनी तेजाकडे नेणारा महाकाव्यसंग्रह म्हणजे- "समतेचे महाकाव्य"*

*तिमीरातुनी तेजाकडे नेणारा महाकाव्यसंग्रह म्हणजे- "समतेचे महाकाव्य"*

       भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ५००० कवितांचा देशातील सर्वात मोठा आणि महान ग्रंथ म्हणजे "समतेचे महाकाव्य"होय. याचा पहिला खंड नुकताच वाचनात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता इतिहास अखंड जगाला ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे. महामानव डॉ.बाबासाहेबांना मानवंदना देणारा,स्तुत्य उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. हा उपक्रम प्रशासकीय अधिकारी, कवी, पत्रकार, शिक्षक व नागरिक या सर्वांनी राबविलेला उपक्रम म्हणजे समतेचे महाकाव्य हा ग्रंथ जेंव्हा हाती आला माझा माथा नकळत झुकला आणि प्रणाम करून कपाळाला लावला.मी फार भाग्यवान आहे. की माझी कविता या महान ग्रंथात समाविष्ट झाली. या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा का होईना होता आले हे मी माझे भाग्यच समजते.
          समतेचे महाकाव्य या महान काव्यसंग्रहाचा पहिला खंड याचे मुखपृष्ठ अतिशय देखणे त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र त्यावर सुवर्णाक्षरांनी जणू लिहिलेले समतेचे महाकाव्य असे नाव अतिशय देखणे आणि दुहेरी कव्हरचे मुखपृष्ठ असून याची पहिली आवृत्ती १४ एप्रिल २०२० रोजी १४ ठिकाणी प्रकाशित करण्यात आली. या महाकाव्यसंग्रहाचे प्रकाशन सुज्योन अॅग्रो एन्टरप्रायझेस कोथरुड,पुणे येथे झाले असून मूल्य फक्त ६०० रूपये आहे, पण यातील अर्थगर्भित रचना दशलाखमोलाच्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे विषमता आणि अन्याय जाळून टाकण्यासाठी पेटलेला एक धगधगता अग्निकुंडच. देशातले सर्वात जास्त शिक्षण घेणारे, अनेक डिग्र्या पदव्या घेणारे, संविधानाचे शिल्पकार, पुस्तक प्रेमी,पुस्तकांसाठी घर बांधणारे, न्याय,समता,बंधुता पेरणारे, ग्रंथप्रेमी,विश्वरत्न बाबासाहेबांचा इतिहास म्हणजे तिमिरातुनी तेजाकडे नेणारा तेजोमय प्रकाश -महाकाव्य संग्रह म्हणजे "समतेचे महाकाव्य" होय.डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देणारा स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाची मूळ संकल्पना जिल्हाधिकारी राजेश खवले साहेब यांनी मांडली. ती मूर्त रूपात साकारण्यासाठी उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, तहसीलदार विजय लोखंडे,जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे, तहसीलदार प्रताप वाघमारे,ज.वि. पवार प्राध्यापक डॉ. भास्कर पाटील यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा महान ग्रंथ.
          समतेचे महाकाव्य या ग्रंथांचा हा पहिला खंड यात एक हजार कवितांचा समावेश आहे.असे एकूण पाच खंड तयार करण्याचा मानस वरील सर्व प्रशासकीय अधिकारी यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय खूप मोठा,विशाल, व्यापक आहे आणि तो काव्यरूपात मांडणे हे फार मोठे जिकिरीचे आणि आव्हानात्मक आहे.एखादे  ग्रंथ जे सांगू शकत नाही ते विचार एक कविता सांगू शकते. इतकी ताकद काव्यमय रुपात असते. या काव्यसंग्रहाला शुभेच्छा माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील, माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,माननीय संजय धोत्रे, अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर,पालकमंत्री माननीय बच्चू कडू,मा.खासदार भावनाताई गवळी,या. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब,दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ इत्यादी मान्यवरांच्या शुभेच्छा आहेत.
        हजारो वर्षापासून गुलामगिरी मध्ये कितपत पडलेल्या समाजाला जागं करून त्यांना गुलामगिरीची जाणीव करून देऊन अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे,गुलामगिरीच्या शृंखला तोडून,न्यायाचे,समतेचे गीत गाण्यासाठी हातातल्या लेखणीची तलवार करून लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर सर्व राज्यातून कवितांची सलामी देण्यात आली आहे.

   जयभीम, जयभीम दलितांच्या नाथा
   माणुसकीच्या देवा तू आमचा त्राता....!!

        या मंगेश पाडगावकरांच्या ओळी थेट काळजात शिरणाऱ्या आहेत.त्यांनी महामानवाला माणुसकीचा देव म्हटले आहे. तूच आमचा त्राता आहेस. तूच आमचा त्रास कमी करणारा आहेस अशी हाक दिली आहे.

     भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना
    आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना...!!

         या ओळीतून सुरेश भट यांनी भिमरायाला आपल्या शब्दांची शब्द सुमने अर्पित केली आहे. त्यांनी मानवंदना आपल्या शब्दांतून दिली आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. आज आमच्या अंतरातून ही मानवंदना देत आहोत. असे कवी म्हणतो आहे.

      जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मला भीमराव |  
      गुलामगिरीच्या या चिखलात | रुतून बसला का ऐरावत ||

          या अण्णाभाऊ साठे यांच्या ओळी काळजाला स्पर्शून जाणा-या आहेत. मला भीमरायांनी सांगून गेले. जग बदलायचे असेल तर तुला घाव घालावे लागेल तरच या गुलामगिरीच्या चिखलातून तू बाहेर पडू शकशिल.नाहीतर एखादा हत्ती चिखलात कसा बसतो? तसा तु ही बसशिल.. इतकी ताकद शब्दांची आहे.दुष्कृत्यांचा मूकनायक, झुंजार तू भीमा, युगंधरा,आव्हान,हे महामानवा, तुझ्या सावलीत वावरताना, वादळातील दीपस्तंभ,रमा थापते भाकर, भिमाचे विचार, भीमा तुझ्या जन्मा ने बाळा, संघर्ष पाण्यासाठी ,भिमसुर्या,आमची मशाल, तो प्रवर्तक,वाचून मोठे व्हा ! भारतीय संविधान, विश्वरत्न, ज्ञानाचा झरा, प्रकाश दीप,मुके बोलू लागले अशा अनेक कविता काळजाला थेट भिडणा-या आहेत.
         डॉ. बाबासाहेबांचा अखंड प्रवास सांगणाऱ्या, सागरापेक्षा विशाल असणा-या आहेत.हा  प्रवास काव्यात व्यक्त करणे हे साधे काम नाही. कवी फ. मु. शिंदे म्हणतात मुळात कविता करणे इतकी साधी गोष्ट नाही. एखादी घटना गोष्टीत सांगणे सोपे पण कवितेत मांडणे तेवढे सोपे नाही. जेव्हा आभाळ फाटते तेव्हा कादंबरीचा जन्म होतो. जेव्हा जमीन फाटते तेंव्हा कथेचा जन्म होतो. आणि जेव्हा काळीज फाटते तेव्हा कवितेचा जन्म होतो... अशा तब्बल पाच हजार कवितांचा संकल्प खरंच कौतुकास्पद आहे. प्रशंसनीय आहे.प्रत्येक घरात असावा व आग्रहाने वाचावाच असा ग्रंथ हा (काव्यसंग्रह) म्हणजे "समतेचे महाकाव्य" होय. पुढील खंडासाठी खूप खूप शुभेच्छा....

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Sunday, 29 November 2020

स्त्री मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे-गाठी ऋणानुबंधाच्या...

 *स्त्री मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे- गाठी ऋणानुबंधाच्या*


       प्रा. सौ संगीता पवार (काळणे) विदर्भ महाविद्यालय बुलढाणा यांचा "गाठी ऋणानुबंधाच्या" हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. संगीता पवार हे नांव महाराष्ट्रातल्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठी माणसाला परिचयाचा आहे. सौ संगीता ताईंचे मराठी नेट-सेट चे पेपर प्रकाशित असून मराठी विषयाच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पाठमोर्‍या शरीराने उभी असलेली स्वमग्न स्वतःच्याच विश्वात रममाण होणारी,स्वतःचा शोध घेणाऱ्या स्त्रीचे अतिशय सुंदर चित्र रेखाटलेले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चिन्मय प्रकाशन औरंगाबाद यांनी केले असून त्याचे मूल्य फक्त शंभर रुपये आहेत.पण यातल्या प्रत्येक कविता या प्रत्येक स्त्रियांच्या मनाच्या वेध घेणाऱ्या आहेत. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी यांच्या लाभलेल्या आहेत.
          हळव्या मनाची कवयित्री आपल्या भावनांचे बंध शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करते. ज्या मातीत जन्मलेल्या समाजाशी असलेले ऋणानुबंध कवयित्री आपल्या शब्दांतून व्यक्त होते. शब्द हेच प्रत्येक स्त्री मनाची खरी ताकद असते. अभिव्यक्त होण्यासाठी आणि त्याच शब्दांच्या साहाय्याने हृदयाची शाही करून प्रेमाच्या लेखणीने कवियत्री लिहिण्याचा प्रयत्न करते.ईश्वराने सर्वात सुंदर व अधिक परिश्रम करून बनवलेली कलाकृती म्हणजे स्त्री... तिच्या भावना, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, उदारता, वीरता, श्रमप्रतिष्ठा, मान,मर्यादा या सर्व गोष्टी भरभरून दिल्या आहेत. संसाराचा गाडा हाकत दोन हात करण्याची तयारी, तेवढी ताकत सहनशीलता स्त्रीयांमध्ये खूप असते. स्वतःचा संसार सुखाचा व्हावा यासाठी छोट्या-छोट्या असणा-या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे तिला वाटत असते. मुलीचे लग्न होऊन मुलीची जेव्हा स्त्री होते तेव्हा तिच्यावर अनेक जबाबदार्‍या येऊन पडतात त्यातही तिचं मन कुठेतरी नवर्‍याने आपल्याला वेळ द्यावा. आपलं कौतुक करावं असं तिला वाटत असतं.

       कर्तव्य करण्यात
       व्यवहार करण्यात 
       अखंड बुडालेला तू 
       आणि तुझा अमूल्य वेळ
       काळजी करू नकोस
       मागत नाही मी....!!

               पतीवर घरातल्या अनेक जबाबदाऱ्या असतात. नवरा-बायको जरी संसार रथाची दोन चाकी असले तरी घराची संपूर्ण जबाबदारी पुरुषावर असते. अनेक महत्वाची काम तोच करत असतो. आणि या कामाच्या व्यापात मध्ये त्याच्याकडे तिच्यासाठी द्यायला वेळ कमी पडतो. हळव्या मनाची कवयित्री म्हणते तू काळजी करू नकोस. तुझा अमुल्य वेळ मी मागत नाही...मी मलाच माझी समजूत घालीन तू तुझे कर्तव्य पूर्ण कर.
         
          बाई किती गं
        धैर्याची नी धीराची तू 
       उगाच नाही तुला 
        पृथ्वीची उपमा देत....!!

                  "स्त्री" म्हणजे सहनशक्ती. स्त्रियांचा जन्म झाल्यापासून अनेक गोष्टी तिला सहन कराव्या लागतात.. स्त्रियांना धैर्याने राहावा लागते. प्रत्येक गोष्ट तिलाच समजून घेऊन घरातल्या प्रत्येकाची काळजी करत असते ती. म्हणजे स्त्री म्हणून स्त्रीला पृथ्वीची उपमा देण्यात आलेली आहे...

           म्हणतात ना पुरुष कर्ता 
           संसाराचे ओझे वाहतो सर्वदा 
           म्हणून का त्यांनी फाशी घ्यावी?
          सर्व कर्ज आणि ओझी
           तुझ्यावर सोडावी?
           तरी तू उभी राहतेस 
           न खचता जगण्याचे बळ एकवटून
           सरकारच्या मदतीशिवाय
           नातेवाईकांच्या वशिल्याशिवाय
           पिलांना नवी उभारी देत आणि 
           कर्जाचा डोंगर पेलत
           तेव्हा का नाही कुठे ऐकू येत
          एका शेतकरी स्त्रीचा आत्महत्या?
          खरंच बाई तू धीराची गं...!!

                  पुरुष घराचा आधारस्तंभ.घराचा कर्ता जरी म्हणून ओळखला जातो तरी सा-या संसाराचा भार घरातल्या पुरुषावर असतो.म्हणून का त्याने कर्जाला घाबरून फाशी का घ्यायची ? सर्व कर्ज मागे बायकोच्या डोक्यावर ठेवून जेव्हा घरधनी निघून जातो. तरी सुद्धा त्या घरातील ती स्त्री पती मरण पावला म्हणून आपली मुलं वाऱ्यावर सोडून देत नाही. समाज तिला जगू देत नाही. नातेवाईक कोणी मदतीला धावत नाही. तरीसुद्धा ती डगमगत नाही. कर्जाचा डोंगर घेऊन काबाडकष्ट करून जगते आणि आपल्या पंखाखाली आपल्या मुलांना घेऊन त्यांना माय आणि बापाचे दोघांचे प्रेम देण्याचा प्रयत्न करते. अशी कितीतरी उदाहरणं आज समाजात पाहायला मिळतात. तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलं का कर्जाला कंटाळून एका शेतकरी स्त्रीने आत्महत्या केल्याचं? नाही ना नाहीच करू शकत. कारण ती खूप धीराची आहे. धाडसी आहे. आपले लेकरं दुसऱ्याच्या जीवावर टाकून जाणे तिला पसंत नसते म्हणून ती लढत राहते तिची लढाई.तीच अगदी एकटी असूनपण असे कवयित्रीला वाटते.
           संवेदनशील मनाच्या कवयित्रीला समाजातील प्रत्येक घटकाची जाणीव आहे. गरीबी, दुःख पाहून तिचं मन हळहळते. स्वातंत्र्याला अर्थ काय?, कर्जबाजारी, आंतरजातीय विवाह,शेतकऱ्यांचे जीवन, आत्महत्या इत्यादी कविता काळजाला स्पर्श करणा-या आहेत. तर प्रेमभाव, चित्तचोर, भिंत,तूच सांग, सुकुमार कळी, गुंता, गोंधळ, प्रेम या कवितेच्या माध्यमातून मनातले प्रेमभाव व्यक्त करणाऱ्या आहेत. नात्यातला गोडवा प्रेमाची थाप, आपुलकी, निष्ठा जपत घरातल्या जबाबदाऱ्या पेलत शब्दांचे शब्दांना माधुर्यात व्यक्त होणं कवयित्रीला फार सुरेखपण जमतं.नव्हे तिची ती कलाच आहे. निसर्गाने तिला दिलेलं वरदानच आहे.या काव्यसंग्रहात एकूण साठ कविता आहेत. प्रत्येक कविता ही स्त्री मनाला स्पर्शून जाणाऱ्या व जणू त्या कांही आपल्याच आहेत.अशा वाटणाऱ्या आहेत. प्रत्येक स्त्रीयांनी व्यक्त होण्यासाठी शब्दांचा सहारा घेणे फार गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे....

      कवयित्री सौ.संगीता पवार यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Saturday, 28 November 2020

तरूणांवर शिवसंस्कार पेरून आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे - शिवगर्जना

 *तरुणांवर शिवसंस्कार पेरून आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे - शिवगर्जना*

         मराठी तरुणांच्या मेंदूत शिव संस्कार पेरून त्यांना आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे -शिवगर्जना हा शिवकवी- ईश्वर मते सरांचा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. शिव कवी ईश्वर मते हे मुळातच एक सैनिक शिवरायांच्या विचारांचा पाईक असलेला सच्चा दिलाचा देशभक्त कवी... केंद्रीय पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत,पण वाचनाची अत्यंत आवड असल्यामुळे आणि देशभक्ती, गझल, शिव कविता आणि विद्रोह हा जणू त्यांच्या रक्ता रक्तात भिनला आहे.थोर इतिहास संशोधक मा.म. देशमुख, डॉ. आ.ह.साळुंके सर,या.अॅड. पुरूषोत्तम खेडेकर साहेब,मा.अशोक राणा, डॉ.जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला हा कवी आहे.
            शिवगर्जना या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब शिवरायांना परकीय सत्ता उखडून टाकण्यासाठी एक एक गड काबीज करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी, शिवरायांना प्रेरित करणारे चित्र आहे.मावळ्यांसह गडावरचे सुंदर चित्र त्यावर ढाल-तलवार ,ढालीवर स्वराज्याचा सिंह म्हणजे छत्रपती शिवराय अख्ख्या जगाला शूरवीर म्हणून विश्ववंदनीय असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय देखणे असे मुखपृष्ठ असून बघताक्षणीच वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे असेच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पंचफुला प्रकाशन औरंगाबाद चे डॉ. बालाजी जाधव सर यांनी केले आहे. तर याची प्रथम आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवजन्म उत्सवाच्या दिवशी प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाची किंमत फक्त ७० रुपये आहे,पण त्यातल्या कविता या दशलाखमोलाच्या आहेत. प्रत्येक घरातल्या लहान बालकापासून ते तरुणांपर्यंत जर हा काव्यसंग्रह वाचला तर त्याचा मन मेंदू आणि मस्तक जगातल्या कोणत्याच स्त्री कडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. ना इतरांनाही वाईट नजरेने बघू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही, गुलामगिरी सहन करणार नाही. अशी शिवविचारांचे गुट्टि( बाळकडू) या काव्यसंग्रह मध्ये दिली आहे. खेड्यात राहणाऱ्या शिवकवि ईश्वर मते यांच्यावर संत तुकोबारायांच्या अभंगाचा प्रभाव पडला आणि त्यातूनच शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची रुजवणूक झाली. त्यांनी खूप मोलाचे साथ देणारे शिवश्री संतोषदादा गव्हाणे पाटील व त्यांना कौतुकाची थाप देणारे त्यांचे मित्र शिवश्री नारायण प्रल्हाद काळबांडे कोकलगाव तसेच शिवश्री संदीप गोटे सर तोंडगाव यांची साथ मिळाली.
     
       देशरक्षण्या समर्थ आम्ही 
       विजयाचा एक अर्थ आम्ही 
       शिवनिष्ठेचे बळ आम्हांला
       रणांगणावर शर्थ आम्ही 
       जग अवघे अदबीने झुकते 
        शान अशी शिवतख्ताची
        इतिहासाला माहित आहे 
        धमक मराठी रक्ताची....!!

                 गुलामगिरीच्या शृंखला तोडून मोगलशाही, पातशाही, निजामशाही,आदिलशाहीला गाडून रयतेचे समतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा व त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या प्राणप्रिय मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास जगाला ठाऊक आहे. आजही आम्ही मावळे आजच्या काळातले शूर सैनिक तुमचा आदर्श मनात ठेवून सीमेवर रक्षण करतो.तुमच्या शिव निष्ठेचे बळ आज आम्हाला पुरेसे आहे.प्राण गेला तरी हरकत नाही पण आम्ही डगमगणार नाही. रणांगणावर जीवाची बाजी लावून आजही अवघे जग आम्हा भारतीयांना पुढे अदबीने झुकते. अशी शान माझ्या शिवरायांच्या शिवतख्ताची आहे.हे इतिहासालाही ही माहित आहे आणि जगाला ही माहित आहे.अशी धमक आमच्या मराठी रक्ताची अशी शिवगर्जना आपल्या काव्यातून करणारा करणारा शिवकवि हा फक्त कवी नसून तो एक सच्चा दिलाचा शिवरायांचा मावळा आजच्या काळातील देशाचे रक्षण करणारा सैनिक आहे.

            विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावणारी
            मेंदू मधल्या मनुवादाला खिंडार पाडणारी
          आम्ही गर्जना शिवगर्जना, शिवगर्जना, शिवगर्जना...

               विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावून फोडून टाकू इथल्या प्रत्येक मेंदू मधल्या मनुवादाला खिंडार पाडून मनुवाद संपवून टाकण्यासाठी मन आणि मेंदूतील घाण बाजूला सारण्यासाठी मी शिवगर्जना करीत आहे. असे कवी म्हणतो.

           ऊठ मर्दा धरतीच्या पुता लेखणीची तलवार कर
           शिवशाहीचा वारसा रयतेचा तू उद्धार कर...!!
            दुःख मुक्तीचा पथ ज्ञानाचा 
           सत्यशोधक आणि विज्ञानाचा 
           भटगिरी बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर प्रहार कर..
           उठ मर्दा धरतीच्या पुता लेखणीची तलवार कर
           शिवशाहीचा वारसा रयतेचा तू उध्दार कर...!!

              आजच्या तरुण मावळ्यांना कवी ऊठ मर्दा या धरतीच्या पुता म्हणजेच या धर्तीच्या लेकरा उठ तुझ्या हातातल्या लेखणीला तू तलवार कर. आज प्रत्यक्ष तलवार घेऊन लढायचे नाही. तर तुझ्या हातातल्या लेखणीने अन्यायावर वार कर. तुला शिवशाहीचा वारसा आहे. तुलाच रयतेचे रक्षण करायचे आहे. तूच रयतेचा रक्षण करू शकतोस असे आव्हान आपल्या तरुणांना करीत आहेत. इतकेच नाही तर तुला जीवनात दुःख मुक्त व्हायचे असेल तर ज्ञानाचा मार्ग स्वीकार. ज्ञानाच्या प्रकाशाने अंधकारमय जीवन नष्ट कर.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो त्यासाठी तुला सत्यशोधक वृत्तीचा आणि विज्ञानाचा स्वीकार कर. भटगिरी बुवाबाजी लाथाडून टाक. त्याची मूठमाती कर आणि अंधश्रद्धा जाळून टाक तेव्हाच तू पुढे जाशील असे वैचारिक बाळकडू पिलेला कवी तरुणांना म्हणतो.
 
               कसे घडले कसे लढले स्वराज्याचे शिखर चढले
               प्रेरणा जिजाऊ स्वातंत्र्याची मावळे वादळासही भिडले
           चारही दिशांना गणीम चार ते 
             कष्टकरी लाचार होते
             कुण्याही बळीचा आधार नव्हता 
             शिव कुळाचे उघडे एकच द्वार होते 
             जिजाऊंचा छायेत शिवबा संगे मावळे वाढले
             प्रेरणा जिजाऊ स्वातंत्र्याची मावळे वादळासही  भिडले....!!

         गुलामगिरीच्या बेड्या संपविण्यासाठी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी बाल शिवबाला अगदी बालपणापासूनच युद्धनीतीचे धडे दिले. शस्त्रे चालवण्याची कला अवगत करण्यासाठी जिजाऊंने स्वतः हातात तलवार घेऊन तलवारबाजी करणे, भालाफेक करणे,पळत्या  घोड्यावर बसणे, झाडावर चढणे अशा अनेक गोष्टींचे शिक्षण बालपणीच दिले गेले. छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासूनच खोऱ्यातल्या सवंगड्यांसह स्वराज्याची प्रतिज्ञा करीत आणि स्वातंत्र्याची ज्वाला प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयी उसळत होती. त्यासाठी स्वराज्याचा भक्कम पाया आधार राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची प्रेरणा होती.त्याकाळात सर्वत्र परकिय स्त्रियांचा अन्याय माजलेला होता. हे जिजाऊ माँसाहेबांनी ओळखून स्वराज्याची ज्योत पेटवली.चारही बाजूंना गनिमांचा अन्याय वाढला होता. कष्टकरी जनता, रयत लाचार होती. रयतेला कोणाचा आधार नव्हता. फक्त शिव कुळाचे एकच द्वार दिसत होते. रयतेचे हाल जिजाऊंना पाहवत नव्हते. म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी गनिमांना संपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सिंहाला जन्म दिला. आणि रयतेच्या सुखासाठी लोककल्याणकारी राज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वप्न पूर्ण केले छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई न हरता आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वराज्याचे रक्षण केले. असा जाज्वल्य इतिहास कवीच्या शब्दांशब्दांतून घुमतो आहे.
         मावळ्यांची पोर, प्रतापगडाच्या पायथ्याशी, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाले,रामशेजचा पराक्रम अशा अनेक मावळ्यांच्या शौर्याची गाथा आपल्या कवितेतून तरुणांसमोर ठेवणारा हा तीस-पस्तीशीतला हा तरूण आपल्या लेखणीच्या माध्यमातून तरुणांना जागा करतो आहे. माझा जन्मच परिवर्तनासाठी झाला आहे. शिवचरित्र हे एक औषध आहे. तो प्रत्येकाने प्यायलाच हवे. शाहु, फुले, आंबेडकरांचे आपण वारसदार आहोत.क्रांतीविना आमचे जगणेच काय? अशा परखड शब्दांच्या माध्यमातून कवी व्यक्त होतो.

         लाथ मारा मनुवादाला काय आवकता भोंदूत
         शिवरायांच्या मावळ्यांनो शिवतत्त्व होता मेंदूत...!!

     या वरील ओळीत मनुवादाला लाथ मारून गाढून टाका. बुवाबाजी,भोंदूबाबा सोडून द्या, शिवरायांच्या मावळ्यांनो आता तरी जागे व्हा. पाखंडी, ढोंगी लोकांपासून सावध होण्यासाठी शिवतत्व तुमच्या मेंदूत ओता. असे शिवकवि- ईश्वर मते तळमळीने तरुणांना ठणकावून सांगतो आहे. कोणाचीही प्रस्तावना घेणारा हा देशप्रेमी सैनिक शब्दांशब्दांतून इतिहासाच्या शौर्याची गाथा प्रत्येक तरुणांच्या मेंदूत शिरण्यासाठी आपल्या लेखणीची तलवार करून देश रक्षणाचे पवित्र कार्य सीमेवरती करत ५७ कवितांची तोफ शिवगर्जना च्या रूपात तरुणांसमोर मांडतो. असा परिवर्तनवादी विचार प्रत्येकाने अंगीकारण्यासाठी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी, आणि नवीन इतिहास घडवण्यासाठी जुन्या इतिहास माहीत असावा लागतो यासाठी प्रत्येक तरुण,बालक-पालक यांनी आवर्जून हा ग्रंथ (काव्यसंग्रह) वाचावा असाच आहे.

        शिवकवि -ईश्वर मते यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शिवशुभेच्छा...

समिक्षिका,लेखिका,संपादिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६८६६३२५७

Tuesday, 24 November 2020

'स्त्रीशक्तीची जाणिव करुन देणारा काव्यसंग्रह म्हणजे'_"आभाळ पेलताना"

 *स्त्रीशक्तीची जाणिव करुन देणारा काव्यसंग्रह म्हणजे-आभाळ पेलताना*

       सौ सुमनताई व्यंकटराव पवार चाकुर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद (माहेर व्हंताळ) येथील ग्रामीण भागातली कवयित्री यांचा 'आभाळ पेलताना' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ स्त्रीमनाला ध्येयाचे पंख लावून उंच आकाशात भरारी घेणारे आहे. त्या पुढे आभाळ ठेंगणे वाटावे असेच साजेसे चित्र साकारले आहे. स्त्री मनाला स्फूर्ती देणारे असेच चित्र आहे. पहिला जीवनाच्या वाटेवर आणि दुसरा आभाळ पेलताना प्रकाशक काव्यमित्र प्रकाशन पुणे,राजेंद्र श्रीमंत सगर यांनी प्रकाशित केलेला देखणा काव्यसंग्रह. मलपृष्ठावर सुमन ताई यांचा अल्पपरिचय तर अंतरंगी प्रेरणास्थान त्यांचे पती व्यंकटराव  पवार,अभिप्राय राम सदानंद सनातन (माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर )व डॉक्टर नीला सत्यनारायण यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहाची पहिली प्रथमावृत्ती ११ मार्च २०१८ ला प्रकाशित झाली.
        ग्रामीण भागातली कवयित्री संसार गाडा सांभाळून जेमतेम अकरावीपर्यंत शिक्षण झालेली पण मनातले भाव कागदावर उमटवत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत सर्व महिलांना प्रेरणा देणारा काव्यसंग्रह तयार झाला. सुमन ताईंना बालवयापासूनच गायनाची आवड असल्याने कवितेला चालना मिळाली. गायन आणि कविता एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्याला गाण्याचा छंद असतो त्याच्या मुखात कविता खेळत असते फक्त त्याला शब्दालंकाराचा साज चढवून शब्दबद्ध करता आली पाहिजे.

               "स्त्री शिक्षणाचा पाया रोवुनी
              पुण्यात पहिली शाळा काढूनी
              कष्ट घेतले फुले कुटुंबानी
             आदर्श घ्यावा सावित्रीचा
              उध्दार झाला स्त्रीजातीचा
              उगवला दिवस तव जयंतीचा...!!"

            विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक पहिलीच कविता सुमंनताईंनी शब्दांजली अर्पण केली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणा-या फुले दांपत्यांनी अपार त्रास सहन करत पुण्यात आनेक शाळा काढल्या असून त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. आय.पी.एस ते आय.ए.एस पर्यंत आणि विमान चालकापर्यंत महिलांनी बाजी मारली आहे. प्रगतीचे पंख लावूनी जणूकाही आभाळ पेलत आहेत. असे कवयित्रीला वाटते अशा थोर सावित्रीचा आदर्श प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे सावित्रीमाईमुळेच स्त्री जातीचा उध्दार झाला असे कवयित्रीला वाटते.

            टी.व्ही आला घरोघरी 
            अभ्यासाला आळस करी
            नव युवकांना नम्र विनंती 
            अभ्यासावर लक्ष द्या जास्ती...!!

         आज प्रत्येक घरात टीव्ही किंवा मोबाईलच्या आहारी लहान मुले-मुली गेलेली दिसत आहेत. आई-वडील दोघेही सर्विसला असतात. मुले शाळेतून लवकर घरी येतात आणि टी.व्ही.च्या समोर बसतात. सर्व चॅनल्स कार्टूनचे लावून बसतात वाचन आणि अभ्यास याकडे आजची पिढी काळजीपूर्वक लक्ष देत नाही म्हणून कवयत्री नम्र विनंती करते की अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

      सारा संसार स्त्रियाविणा
       कसा भासे उदास 
       तुझ्याविना कोण फिरविल 
       मायेचा हात 
       क्षणाची पत्नी ग तू
       अनंत काळाची माता 
       उमलण्याआधीच कळीचा 
        घोट का गं घेता?

                संवेदनशील मनाच्या कवयित्रीला  मुली गर्भातच मारण्याचं दुःख होतं सारा संसार स्त्रीयांमुळेच फुलतो. स्त्रीया नसणाऱ्या घराकडे पाहवले पण जात नाही.ना त्या घराला चैतन्य राहत नाही. स्त्रीशक्तीला ओळखा. स्त्री ही एका क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत काळाची माता असते. तिच्यामुळेच घराला घरपण येतं. घर अंगण फुलून  येतं. तिच्यामुळे सर्वांना मायेचा हात फिरतो तिची अनेक रूपे आहेत. ती कोणाची पत्नी, तर कोणाची आई, कुणाची बहीण तर कुणाची मावशी, कोणाची आत्या तर कोणाची मामी तर कोणाची आजी अशा अनेक रूपात स्त्री दिसते. मग तिला उमलण्याआधीच त्या कोवळ्या मुलीचा घोट का घेता? तिला गर्भातच का मारता?  असा सवाल आपल्या लेखणीतून कवयित्री कळकळीने करते.

          दोन मनाचे मिलन,पडले लग्नाचे बंधन 
          पती पाहिजे पण सासू-सासर्‍यांची अडचण
           माय लेकराची नाळ कोण तोडू शकत नाही
           आज कालच्या मुलींना काहीच कसे कळत नाही
           नाटकी सोंगे करून असे काही जमत नाही...!!

               आज कालच्या मुलींना नवरा पाहिजे पण सासू-सासरे म्हणलं की नको वाटतं.मुलगी माहेर सोडून सासरी गेल्यावर सासर हेच माहेर बनतं पण काही मुलींना सासू-सासरे नकोसे वाटतात. चार-सहा महिने झाले की लगेच सासू-सासऱ्यांचा पासून विभक्त राहतात. माय लेकराची नाळ तोडून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात किंवा शहरात जाऊन राहतात आणि तिथेच आपला संसार थाटतात.सासू-सासरे अडचण वाटतात मग त्यांना कोणी वृद्धाश्रमात पाठवतात म्हणून कवयित्री म्हणजे आजकालच्या मुलींना काहीच कसं कळत नाही. नाटकी सोंगे करून काही जमत नाही ...अशा ओळीतून विभक्त राहणाऱ्या मुलींना आपल्या ओळीतून कवयित्रीने चांगलेच फटकारले आहे.

          स्वतः सासू-सासर्‍यांची सेवा करणारी कवयित्री खूपच हळव्या मनाची आहे. त्यांनी रेशीम धागा या कवितेतून भावा बहिणीचे उत्कट प्रेम, नात्यांचे महत्त्व सांगितले आहे,तर मजेशीर भारुड सुद्धा वाचावंसं वाटतं, हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवणारा संवाद पण छानच रचला आहे. पूर्वी आजोळी किती धम्माल मस्ती होती हे दिस आजोळीचे  या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.तर बलसूर वळण रस्त्यावर कडदोरा गावचे भाविक एका भजनासाठी जात असताना अपघातात मरण पावतात त्यांच्याबद्दल शब्दांची सुमनांजली आपल्या काव्यातून अर्पण करणारी कवयित्री हळव्या मनाची नक्कीच आहे. या काव्य संग्रहातल्या सर्व रचना प्रेम, संस्कार, वळण लावणाऱ्या, आपुलकीची ओळख असणाऱ्या, मनाला यशाचे  पंख लावून गगन भरारी घेणाऱ्या आहेत. या पुस्तकाचे मूल्य फक्त शंभर रुपये आहे.पण यातल्या कविता खूप प्रेरणादायी आहेत.
        कवयित्रीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

    समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशीम
मो.९७६७६६३२५७

Sunday, 22 November 2020

अंतर्मनाला स्पर्श करणारा काव्यसंग्रह म्हणजे- अंतर्मन....