Friday, 8 April 2022

संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी

*संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी*

      उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध लेखक,प्राध्यापक एम. ए. मराठी, सेट नेट, पी.एच.डी. प्राप्त प्राध्यापक डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी सर यांचा आठ ते दहा वर्षाचा संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी नुकताच वाचनात आला. डॉ. दीपक सूर्यवंशी सर हे मराठवाड्यातील नामांकित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित आहेत. प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांनी २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने रंगनाथ तिवारी या सदर विषयावरील सखोल संशोधनासाठी पी.एच.डी. बहाल केली. फक्त पदवी मिळविण्याकरिता अनेकजण संशोधन करणारे भरपूर मिळतात. पण एका लेखकाचा अभ्यास जगाला माहित व्हावा या उदात्त हेतूने दुसऱ्या लेखकावर लिहिणारे अत्यंत दुर्मिळच आहेत. लेखक प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सरांनी संशोधनाची शिस्त पाळूनही लेखकावर प्रचंड निष्ठा ठेवून अभ्यासपूर्ण संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. सूर्यवंशी सरांनी एका व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलाच आहे पण त्यांच्या साहित्यविश्वाचाही चिकित्सक अभ्यास देखील केल्याने नवीन पिढीला व्यक्ती आणि वाॾमय ग्रंथ रंगनाथ तिवारी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरला आहे.
          रंगनाथ तिवारी या ग्रंथाचे प्रकाशन अरुणा प्रकाशन लातूर यांनी केले असून या ग्रंथाची प्रथमावृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली सुंदर व सुरेख मुखपृष्ठ सरदार जाधव औरंगाबाद यांनी लेखक रंगनाथ तिवारी व त्यांचे साहित्य खूप सुंदर पणे रेखाटले आहे. या ग्रंथाला प्रस्तावना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, लातूर यांची लाभली असून पाठराखण प्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव यांनी केली आहे. या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनुदान देऊन सहकार्य केल्याबद्दल ग्रंथ अधिक मोलाचा ग्रंथ वाटतो. या ग्रंथाचे मूल्य केवळ ३५० रुपये असून व्यक्ती आणि वांॾमय त्यादृष्टीने अधिक तोलामोलाचा आहे. प्रत्येक चिकित्सक व अभ्यासू व्यक्तीने आवर्जून वाचावा आणि प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असावा असाच आहे.
           या ग्रंथाचा विषय असलेले रंगनाथ तिवारी हे हिंदीबरोबरच मराठीतील प्रतिभाशाली लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. १९७० ते ८० च्या दशकात त्यांनी लेखनास प्रारंभ केला. सलग तीन दशके रंगनाथ तिवारी यांनी साहित्याची सेवा अखंडपणे केली. रंगनाथ तिवारी हे मुलत: मराठीभाषिक नसले तरी त्यांनी मराठीतून विपुल प्रमाणात लिहिले पण मराठी लेखकाकडून उपेक्षितच राहिले. रंगनाथ तिवारी यांनी कथा, कादंबरी, नाटक आणि स्फुटलेखन करून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण सहा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात रंगनाथ तिवारी यांचे व्यक्तिमत्त्व आणि वांड़मयीन प्रवास त्यांच्या जीवनाची जडणघडण अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून मुलाखत घेऊन, त्यांच्या सानिध्यात राहून सांगितली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, पार्श्वभूमीवर त्यावर झालेले संस्कार यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती ही खऱ्या अर्थाने त्याच्या सभोवतीच्या पर्यावरणाची निर्मिती असते.
        रंगनाथ रामदयाल तिवारी यांचा जन्म २१ जानेवारी १९३३ रोजी सोलापूर येथे संस्कृती संपन्न अशा मारवाडी कुटुंबात झाला. यांचे मूळ घराणे राजस्थानातील. तेंव्हाचे राजस्थान आजच्या इतके प्रगत नव्हते. पाऊस नसल्याने शेती पिकत नव्हती. त्यामुळे रोजगाराच्या शोधात हे कुटुंब सोलापूर येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. रंगनाथ तिवारी बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान. त्यांना वाचन, संगीत, क्रिकेट याची खूप आवड होती. रंगनाथ तिवारी यांचा पिंडच मुळात शिक्षकाचा त्यामुळे क्लार्कची नोकरी सोडून देऊन शिक्षक झाले. अभ्यासाचा व्यासंग वाढतच होता. संपल्या सुरावटी, देवगिरी, बिलावल ही रंगनाथ तिवारी यांची कादंबरी. याचबरोबर उत्तम पुरुष एक वचन, मौनाची महासभा, गुरुदेव, बेगम समरू, अनन्वय, काया, परकाया असे अनेक साहित्य प्रसिद्ध आहे. मराठी कादंबरी विश्वात मैलाचा दगड ठरलेला वज्राघात, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत या ऐतिहासिक कादंबर्‍या, परंपरेतील बेगम समरू ही रंगनाथ तिवारी यांची महत्त्वाची कादंबरी बहुचर्चित कादंबरी ठरली आहे.
          डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचा वांड़मय प्रकाराची सुंदर ओळख करून दिली आहे. लेखकाने रंगनाथ तिवारी त्यांच्या कादंबरी लेखनाची प्रमुख बलस्थाने नोंदवली आहे. कथानक, वातावरण, प्रसंग निर्मिती, निवेदन शैली, पात्र, संघर्ष आणि भाषा इत्यादी घटकांच्या माध्यमातून रंगनाथ तिवारी यांच्या कादंबरी लेखनाचा व्यापक आढावा लेखकाने घेतला आहे. रंगनाथ तिवारी यांची ऐतिहासिक कादंबरी बेगम समरू यामध्ये स्त्री जीवन किती शोषित, पीडित होते. हे खूप मार्मिकपणे मांडले आहे. याशिवाय स्वधर्म, स्वसंस्कृती, हट्टी आणि स्त्रीत्वाचा अहंकार असलेली मुत्सद्दी, राजकारणी, शारीरिक भूक आणि वखवखलेली क्रूर आणि तेवढीच प्रेमातुर अशी स्त्री जीवनाची नानाविध रूपे त्यांच्या कादंबऱ्यांमधून उभी राहतात. रंगनाथ तिवारी यांच्या उत्तम पुरुष एक वचन या कादंबरीत ताई,उमा, हौसा आणि मावशी या स्त्री व्यक्तिरेखा जागीरदार यांच्या गडीतील निजाम कालीन स्त्री जीवनाचे वास्तव प्रस्तुत व्यक्तिरेखा मधून रंगनाथ तिवारींनी समर्थपणे मांडले आहे. १९४७ नंतर मराठवाड्यात रझाकारांनी धुमाकूळ घातला. त्यांचे संवेदन गर्भ चित्रण रंगनाथ तिवारीने प्रस्तुत कादंबरीतून केला आहे.
        डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचे जीवन, जीवन संघर्ष, शिक्षण त्यांची जडणघडण त्यांचे वांड़मयीन प्रेरणा, त्यांची मुल्यदृष्टी त्यांचे चौफेर व्यासंग, त्यांच्या वांड़मयीन व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व, त्यांचे कादंबरीलेखन, मराठी वाड्मयातील कादंबरीचे अनेक प्रकार, ऐतिहासिक कादंबरीचे विशेष, क्रूर राजकारण, धार्मिक जीवन, स्त्री जीवनाचे दर्शन, साहित्यातील कलाविष्कार, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे चित्रण, त्यांची कथा लिहिण्याची विविध वैशिष्ट्ये यावर सूक्ष्मपणे डॉ.प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी संशोधनात्मक चिकित्सा केली आहे.
       एकाच व्यक्तीवर व त्यांच्या वाड़मयीन प्रवास सर्वांसमोर मांडण्याचा कौतुकास्पद प्रवास म्हणजे रंगनाथ तिवारी हा व्यक्ती आणि वांड़मय ग्रंथ खरंच सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे. सदरील ग्रंथ वाचताना लेखक आणि दहा वर्षे केलेली चिकित्सा जाणवल्याशिवाय राहत नाही. डॉ. दीपक सूर्यवंशी सरांची लिखाण करण्याची वेगळी हातोटी या ग्रंथामध्ये दिसून येते.
        प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!

समीक्षिका/ लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो. 9767663257

No comments:

Post a Comment