Sunday, 18 April 2021

*जगाचा पोशिंद्याला सुखी ठेवण्यासाठी विठुरायाला साकडे घालणारा कविता संग्रह म्हणजे "विठू माऊली की विठोबा!"*

 Date: 15 Apr 2021

*जगाचा पोशिंद्याला सुखी ठेवण्यासाठी विठुरायाला साकडे घालणारा कविता संग्रह म्हणजे "विठू माऊली की विठोबा!"*

       महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्या विठू माऊलीची पूजा केली जाते. त्या विठू माऊलीला कुणब्याच्या आयुष्यात एक वेगळे स्थान आहे. ते वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहात दिसते. अशा वातावरणातून लहानाचा मोठा झालेला अर्थात कुणब्याच्या घरात जन्माला आलेले मलकापूर, अकोल्याचे कवी गणेश शिवराम भाकरे यांचा चौथा कवितासंग्रह "विठुमाऊली की विठोबा!" हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय सुंदर समर्पक नावाला साजेसे घाम गाळणाऱ्या शेतकरी राजाचे, हाती विळा व एका खांद्यावर कुदळ घेऊन विठ्ठला सारख्या बळीराजाचे देखणे चित्र रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शब्ददीप प्रकाशन, अकोला यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती २४ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १७० रुपये असून यात या सर्वच कविता विठुरायाच्या चरणी साकडे घालणाऱ्या आहेत.
              शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले कवी गणेश भाकरे यांचा पहिला कवितासंग्रह "मी" दुसरा कवितासंग्रह "आसवांची शाई" याला महाराष्ट्रातून १४ विविध पुरस्कार मिळाले आहेत. तिसरा कवितासंग्रह प्रकाशाचा दिवा बालकवितासंग्रह झाला.याला महाराष्ट्रातून विविध १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असा हाडाचा कवी असणारा पण रेमंड लिमिटेड छिंदवाडा डिव्हिजन या नामांकित कंपनीत कामाला असून हे साहित्याचा छंद जोपासणारे आहेत. कवी गणेश भाकरे यांच्या साहित्यावर प्रेम करणारा साहित्यीक गोतावळा, गाव मातीतीलं गणगोत, हाताच्या बोटावर मोजता न येण्यासारखी आहेत. एका नामवंत कंपनीत कामाला असूनही कवी गणेश भाकरे यांचे चार कवितासंग्रह दर्जेदार स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे यांच्या किशोर मासिकातून सलग २९ महिने प्रकाशित झाल्या.अनेक पुरस्कार मिळाले यावरून साहित्यावरचे त्यांचे नितांत प्रेम व आस्था दिसून येते.
              शेतकऱ्या बद्दल अत्यंत जिव्हाळा, आपुलकी, प्रेम असणारे कवी गणेश भाकरे यांनी शेतकऱ्याचं जगणं-मरणं शेतकऱ्याचे कष्ट, कष्टकरी लोकांच्या व्यथा, विठुरायाशी संवाद साधत विठुरायाच्या चरणी साकडे घालत देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या जवान सैनिक व घाम गाळून देश जगवणा-या जगाचा पोशिंदा म्हणजेच बळीराजाला अर्पण केले आहेत. कवी गणेश भाकरे यांच्या सर्वच कविता माणसाला जगायला शिकवणाऱ्या, माय बापाला  पांडुरंग रूपात पाहणाऱ्या, शेतकऱ्याला कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, लबाडांची बिंग फोडणाऱ्या, थकल्या देहाचं जीन सांगणाऱ्या, अभंगातून विठुरायाला विनवणी करणाऱ्या,गावाची महती सांगणाऱ्या, कुणब्याची महती सांगणाऱ्या, जीवनाचा वेध घेणाऱ्या, संस्कार पेरणाऱ्या, शेतकऱ्यांना प्रति आदर व्यक्त करणाऱ्या, आईची महती सांगणाऱ्या, जगाचं दुःख, दारिद्रय, शेतकऱ्याचे गा-हाणं अभंगातून विठ्ठलाला सांगणाऱ्या सर्वच कविता काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत.

       वार्ता कळताच मित्रा आलं डोळ्यांत रे पाणी
       कसा टाळूनिया गेला सांग शेवटच्या क्षणी
       चिंबचिंब आसवांनी केले ओलेचिंब घावं 
       पोटासाठी आलो होतो मित्रा सोडूनिया गाव
       जुन्या आठवणी झाल्या साऱ्या पापणीत गोळा 
        तुझी माझी आठवली  मित्रा गावातली शाळा,....!!


      मित्रांवर अतोनात प्रेम करणारा कवी गणेश भाकरे यांचा मित्र अचानक सोडून गेलेल्या भावना वरील ओळीतून दाटून आलेल्या दिसतात. मित्राचा विरह दिसून येतो. मित्र गेल्याचे दुःख वरील ओळी ओळीतून व्यक्त होते. दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळी मित्राचा फार मोठा आधार असतो. जगात मित्राला खूप मोठे स्थान आहे. आपण प्रत्येक गोष्ट कोणालाही सहज सांगू शकत नाही पण मित्रांकडे शेअर करु शकतो. अशी हक्काची जागा म्हणजे मित्र. सदैव सोबत असणारा मित्र शेवटच्या क्षणी अचानक निघून गेल्याने कवी गणेश भाकरे यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पोटासाठी शहरात आलेला मित्र म्हणजे कवी गणेश भाकरे यांचा मित्र गावातच होता पण शहरात आलेल्या हळव्या मनाच्या कवी गणेश भाकरे यांना बालपणीच्या आठवणी मनात गोळा झाल्या दोघांही मित्रांची एक शाळा आठवली आणि मित्रावरचे उत्कट प्रेम वरील ओळीतून दिसून येते.

        शेणा-मातीच्या घरात झाला अन्नाविना अंत 
        सांग लाडक्या विठ्ठला तुला का नाही रे खंत...!!

      गरीबी फार वाईट असते ज्यानं गरिबी भोगली त्यालाच गरिबीचं महत्व कळतं.परिस्थिती फार वाईट असते. गरिबीला पण मन असतं पण दररोज तो मन मारून जगत असतो. गरिबाला आहे वाटतं आपण चांगलं काम चांगले केले पाहिजे. कपडे चांगले घालावे ,चांगले राहावे पण गरीबाची बीड एकाही त्याला सुटू देत नाही आपल्या देशात श्रीमंत -गरीब अशी साखळी निर्माण झाली आहे.श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो आहे.आणि गरीब आणखी गरीब होत जातोय. गरीब व श्रीमंत यांच्यामधली दरी फार मोठी आहे. गरीब गरिबाला रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते. भूक जगू देत नाही.गरिबी मरु देत नाही ...!! अशी काहीशी अवस्था असते गरीबाच्या घरी शेणा मातीच्या घरात अन नसल्यामुळे अंत झाला विठ्ठला तू सर्वांचा मायबाप आहेस तुला त्याची खंत नाही का रे असा खडा सवालही कवी गणेश भाकरे यांनी पंढरीच्या विठ्ठलाला केला आहे

           "राहू दे तुझी रे 
            कृपा आम्हावर 
             देऊननिया सर 
                .....पावसाची....!!

              वरील अभंगाच्या ओळीतून विठुरायाच्या चरणी शेतकऱ्यासाठी साकडे घालणारा संवेदनशील मनाचा कवी गणेश भाकरे म्हणतो आहे. कवी गणेश भाकरे यांनी विठ्ठलाला हात जोडून विनंती केली आहे खूप पाऊस पाड तुझी कृपा आम्हावरी राहू दे. अशी हाक दिली आहे. शेतकऱ्याचा आयुष्यात पावसावर पाऊस अवलंबून असतं पाऊस नाही झाला तर अवर्षणाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याला दुसरे काही वैभव नको असतं. फक्त त्याचे हिरवे रान बघितलं की शेतकरी राजा आनंदाने डोलतो. शेतकरी विठुरायाच्या चरणी फक्त चतकोर भाकरीची भूक मिटवण्यासाठी विनंती करतो तरी गणेश भाकरे शेतकऱ्याचे पुत्र असल्याने शेतकऱ्याचं जगणं-मरणं शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या शब्दात दाटून येतात.

           "कुण्या कवितेत मांडू
           दुःख आयुष्याच माझं
            कशी लेकरांना झाली 
            माय जन्मदाती ओझं!"

            वरील अष्टाक्षरी तून कवी गणेश भाकरे यांनी आजच्या काळातील मुलांना जन्मदात्री कशी ओझी वाटत आहे याची खंत वरील ओळीतून व्यक्त केली आहे. जी आई पोटच्या लेकराला नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात ठेवते. जन्मल्यानंतर बाळाला सतरा धारा दूध पाजते, लेकरासाठी आयुष्यभर मरमर करते,राब राब राबते हाडाची काड करते. लेकरू शिकावं म्हणून पदराला शंभर गाठी मारते. तीच माय घरात उपाशी झोपते. कांही मुलं तर लग्न झाले की आई-वडिलांना वेगळं काढून देतात किंवा सरळ वृद्धाश्रमात ठेवतात. अशा निष्ठुर झालेल्या मुलांसाठी आईचे महत्व,आईच दुःख, वेदना , कवी आपल्या काव्यातून जड अंतकरणाने मांडतो.

         बांधावर नाही | आधाराला बाप 
         कोणी दिला शाप | असा मला...!!

       वरील अभंगाच्या  ओळीतून बाप नसल्याचे दुःख शेतकरी पुत्राने छान मांडली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या डोईवर वर बापाचे छत्र हरवतो तो अभागी मुलगा बांधावर गेला की त्याला त्याचा बाप आठवतो बापाचा वीर जीवघेणा वाटतो म्हणून तो देवालाच कुणी शाप मला दिला म्हणून आपल्या कवितेतून व्यक्त होतो.
         विठोबा या काव्यसंग्रहातील सर्वच कविता थेट काळजाला जाऊन भिडतात.तातल्या बर्‍याच कविता शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहेत.तर काही कविता शहरात राहायला गेलेल्या पोराच्या आठवणीने डोळ्यांत पाणी येणाऱ्या गावाकडच्या मायबापाच्या आहेत. बऱ्याच कविता विठ्ठलाची संवाद साधणाऱ्या , विठ्ठलाच्या चरणी साकडे घालणारे आहेत, तर काही कविता आणि शिष्य दुष्काळ विरह शेती ,शेतकरी यांच्याशी निगडित आहेत .तरी गणेश भाकरे यांना त्यांच्या आईला जे दुःख पटकन समजते ते दुःख विठुरायाला का समजत नाही?  तूच सांग विठोबा तुला काय म्हणून "विठू माऊली की विठोबा" अशा शब्दात कवी व्यक्त होतात आणि पांडुरंगा चरणी साकडे घालतात... साऱ्या जगाचा तुच निर्मितीकार आहेस.म्हणून काव्यरूपी हाक देतात . तूच दुसऱ्यांचे दुःख नाही सकर म्हणून विठुराया चरणी प्रार्थना करतात.
      कवी गणेश भाकरे यांच्या विठुमाऊली की विठोबा हा काव्यसंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे कवी गणेश म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

No comments:

Post a Comment