Thursday, 2 July 2020

कृषितज्ञ वसंतराव नाईक...

Date: 30 Jun 2020

*कृषीतज्ञ -वसंतराव नाईक*

   महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व कृषीतज्ञ वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ मध्ये महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव राठोड असे होते.परंतु त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी गहुली खेडे वसविले होते. पुढे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजेच पुढारी झाले. चतुरसिंग यांचा मुलगा फुलसिंग यांना राजूसिंग व हाजूसिंग अशी दोन मुले झाली.  हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले .वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे खेड्यात झाले. पुढील शिक्षण अमरावतीमध्ये घेऊन नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून पदवी घेतली व नंतर एल. एल. बी.ही पदवी मिळवली. विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची छाप पडली होती.
       १९४३-४७ मध्ये पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. १९४६ मध्ये पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.१९५२-५६ मध्ये पहिल्या निवडणुकीत ते मध्यप्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. १९५६ नंतर राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबईच्या द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात १९५७ मध्ये कृषिमंत्री झाले. १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. पण कन्नमरावांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने १९६३ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.या पदावर त्यांनी बारा वर्षे काम केले या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
                प्रथमत: त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल? याकडे लक्ष दिले. रोजगार हमी योजना याचे बरेचसे श्रेय वसंतरावांना जाते.नव्या शेती तंत्राला चालना देण्यात आली, संकरित बी बियाणे वाटप बरोबरच, पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेला प्रोत्साहन देण्यात आले, पशुपालन, कुक्कुटपालन उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आले,कृषी विद्यापीठाची स्थापना, कृषिमालाच्या भावावर नियंत्रण, एकाधिकार धान्य खरेदी,शेतीमालाला किंमत ई.यासाठी धोरण आखण्यात आले. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले. त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन खूप व्यवहारी होता. शेतीविषयक त्यांना तळमळ होती. दारूच्या हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचार विनिमय करून सोडवत. त्यांना शेती व शिक्षण या दोन गोष्टीत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या विशेषत: पाझर तलाव व वसंत बंधारा त्याच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते 20 फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज व सवलती देण्यात आल्या. शेतीक्षेत्रातील वसंतराव नाईक यांचे योगदान अतुलनीय आहे. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहणार आहे. वसंतराव नाईक यांच्या कार्याला मानाचा मुजरा... 
विनम्र अभिवादन...


लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा
कोकलगाव
ता.जि.वाशिम.

No comments:

Post a Comment