Monday, 10 January 2022

स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे ती अशीच आहे

 *स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे ती अशीच आहे*

     ती च्या मनातील घालमेल फक्त तीच जास्त ओळखू शकते. एका स्त्रीच्या मनातले भाव, शब्दमाधुर्य,प्रेमरसाने बहरत जाऊन, ती च्या काव्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहतो. असाच एक काव्यसंग्रह म्हणजे 'ती अशीच आहे'  कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी यांचा एक काव्यसंग्रह.मी आजपर्यंत प्रातिनिधिक काव्यसंग्रह अनेक वाचले पण दोन कवयित्रीचे संयुक्तिक काव्यसंग्रह प्रथमच माझ्या वाचनात आले. दोन भिन्न व्यक्तींचे विचार एकत्र जुळणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद व खऱ्या मैत्रीचे प्रतीक आहे. आजकाल आपण पाहतो बऱ्याच मैत्रिणी या शॉपिंग पुरत्या,पार्टीपुरत्या  किंवा इतर कार्यक्रमापुरत्या असतात. पण दोन भिन्न जिल्ह्यातल्या कवयित्री एकत्र येऊन काव्यसंग्रह काढतात. ती च्या शोधात म्हणजे स्त्रीच्या जीवनावर आधारित विचार यांचा सुरेख संगम जिथे जुळून येतो तिथे खरोखर माझे कर आपोआप जुळतात.
       'ती अशीच आहे' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परिस पब्लिकेशन पुणे यांचे असून मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी स्त्री (ती) चे कर्तव्यदक्ष असणारे हात व त्या झाडावर बसलेली ती चिमणी काढलेले बोलके चित्र बघताक्षणीच काव्यसंग्रह वाचनाची गोडी वाढवते. या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रकाशित झाली असून मुल्य केवळ दीडशे र१५०/ असले तरी ती चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे? ते शेवटी मनाला पटते. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना धनंजय मुळे भंडारा व विष्णू संकपाळ यांची लाभली आहे.

        ती अशीच आहे
        फुलापेक्षाही नाजुक 
         नारळासारखे कठीण
         पण आतून कोमल 
         रागामागेही जिचे अतुट प्रेम आहे
         भांडूनही जी हक्काने हवे ते मागून घेते.

            निसर्गाने स्त्रियांना अद्भुत शक्ती प्रदान केली आहे. स्त्रियांच्या स्त्रियांना जेवढी सहनशक्ती दिली आहे तेवढेच संवेदनशील मन ही तिच असतं.ती जेवढी फुलासारखी नाजुक आहे. तेवढीच बाहेरून नारळासारखी कठीण आहे. पण आतून खूप कोमल आहे. मायेचा सागर आहे. पुराणात पुरातन काळापासून स्त्रीला खूप महत्त्व आहे. तिच्या रागा मागेही अतूट प्रेम दडलेलं असतं. एखादी स्त्री आपल्या मुलाला एक चापट जरी मारली तरी दिवसभर तिला रुखरुख लागून राहते की मी उगाच चापट मारली. तिची माया अगाध आहे. तिचं मन अगदी लहान मुलाप्रमाणे निरागस आहे. ती नसली तर ती च्या अस्तित्वाच्या खुणा घरभर पसरलेल्या असतात. ती जितकी धांदरट आहे तितकीच समजदार आहे. ती च्या मनाचा ठाव कोणालाही घेता येणार नाही. अशी परमेश्वराची ती खास निर्मिती आहे.
        स्त्रियांच्या जबाबदाऱ्या, ती च्यावर लादलेली बंधने, तिचा कणखर करारी बाणा, ती चं उदार असणारं अंतःकरण, तिचे निरागस भाव, घरासाठी समर्पित होणारी ती, ती च्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, ती च्या शिवाय तो नाही, तिच्यावर होणारा अन्याय, ती ची होणारी उपेक्षा, ती चा संघर्ष, ती च्या आयुष्याची जडणघडण, ती ने खाल्लेल्या खस्ता,तीचे कष्ट, मेहनत, ती ची जिद्द, ती चं सौंदर्य, ती च फुलपाखरासारखं भिरभिरणारं मन,ती चा तो स्पर्श, ती चा तो आपुलकी भाव, अनेक नात्यात गुंफिली जाणारी ती, आयुष्याचा खडतर प्रवासाची ती सोबतीन, अशा सर्वांगाने व्यापून गेलेली ती, ती च्याविषयीचे उत्कट भाव कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मिता नानवटकर यांनी "ती अशीच आहे" यातून व्यक्त केल्या आहेत.

        खुल्या आभाळाखाली निर्भय अन् 
        उघड्यावरचा संसार मी थाटला आहे 
        कष्टाने पेटलेल्या चुलीवरती कधी 
        मी माझाच हात भाजला आहे.

             वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबांना किती कष्ट सोसावे लागतात. किती खस्ता खाव्या लागतात. हे फक्त गरिबांना माहिती असतं. गरिबांना घरादाराचा आधार नसला की खुलं खुल्या आभाळाखाली कसली भीती नाही आणि उघड्यावरचा संसार त्यांनी थाटलेला असतो. कष्टाने पेटलेल्या चुलीवर गरिबांचा हात भाजतो. अशी व्यथा मी कामगार बोलतोय कवितेतून संवेदनशील मनाच्या कवयित्री चित्रा पगारे यांनी मांडली आहे.

          भेटी साजनाचा ह्रदयात ध्यास आहे
         डोळ्यात आसवांचा पाऊस खास आहे
         ओढ अनामिक आता ध्येयात गुंतलेली 
          दरवळतो भोवताली तुझा सुवास आहे.

          कवयित्री नीता नानवटकर यांनी वरील शेर आनंदकंद या वृत्तपत्रातील लिहीला असून त्यांनी स्त्रीला साधणार्‍या साजनाच्या भेटीची ओढ, त्याच्या आठवणी व साजनाच्या प्रेमाचा दरवळणारा सुवास गझलेतून व्यक्त केला आहे.कवयित्री मीता नानवटकर यांच्या गझलेचा वेगळाच थाट या काव्यसंग्रहाला मखमली लेस लावून जातो. स्त्रियांचं जगणं.. जगता-जगता होणारी परवड, तिचे स्वातंत्र्य, तिची ती बंदिस्त अवस्था, ती चर्या साठी धडपडणारी ती सावित्री, सावित्रीचे ते कार्य, सावित्री मुळे झालेली स्त्री जातीची प्रगती, तिने घेतलेली गरुड झेप, ती च्यातली ती समर्पण करणारी वृत्ती, ती ची विरह भावना, ती चे प्रेम करणारी ती कळी, तिच्यावर लादलेली अनेक बंधनं  झुगारून देऊन ती ने केलेला तो प्रवास हे सारे काही कवयित्री मिता नानवटकर यांनी अगदी सुरेखपणे मांडले आहे.

        पेलून संकटांना मी वाकणार नाही
        वाटेत आयुष्याच्या मी थांबणार नाही

        चाखून वेदनांना पाहील धाडसाने 
        डोहात आसवांच्या मी वाहणार नाही....!

            कवयित्री मीता नानवटकर यांनी एक स्त्री संकटावर कशी मात करते? अनेक संकटं झेलण्याचे धाडस स्त्रीमध्ये असते. आयुष्याच्या वाटेवर ती कधीच थांबत नाही. संकटसमयी सुद्धा स्त्री वेदनेने व्याकुळ न होता धाडसाने समोर जाते.इतकेच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला तरी आसवांचा डोहात मी वाहणार नाही. अशी खंबीर स्त्री म्हणजे 'ती ती अशीच आहे'  ईश्वराने स्त्रीचे मन जरी हळवे बनवले असले तरी ती ला धाडसी सुद्धा बनवले आहे. परमेश्वराची खास कलाकृती म्हणजे स्त्री 'ती अशीच आहे'.
           कवयित्री चित्रा पगारे व मीता नानवटकर या दोघींच्या कवितेचा संयुक्तिक काव्यसंग्रह स्त्री म्हणजे ती. ती च्या अस्तित्वाचा शोध घेणारा असल्याने रसिकांच्या, वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. कवयित्री नीता नानवटकर यांच्या अनेक गझल खूप काही सांगून जातात. वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या, तिचं जगणं,खूलनं,फुलनं, ती च अस्तित्व व्यक्त करणाऱ्या कविता सरळ काळजाला जाऊन भिडणा-या अशाच कविता या काव्यसंग्रहात आहेत. काही कविता सामाजिक भान जपणाऱ्या तर काही कविता प्रकाश टाकणा-या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण 80 कविता असून अत्यंत उत्कृट दर्जाच्या आहेत.
        कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 31 December 2021

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन




 

Tuesday, 28 December 2021

वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन

 *वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन*

      महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे सादरीकरण दिनांक 21 डिसेंबर रोजी रिसोड रोड, लाखाळा वाशिम. येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉ.ज्ञानेश्वर नागरे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम) मार्गदर्शक डॉ.सुलक्षणा पवार मॅडम (अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक नवोपक्रम), परिक्षक श्री शिवशंकर मोरे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री जगदीश करडे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री रोकडे सर (प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय वाशीम) यांनी जिल्ह्यातील नवोपक्रम स्पर्धेतील पात्र शिक्षकांच्या सादरीकरणाच्या परीक्षणाचे काम पाहिले. 
          सन 2021- 22 या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील  नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याकडून राज्यातून उपक्रमशील शिक्षकांकडून नवोपक्रम शासन स्तरावर मागवले जातात. नवनवीन उपक्रम व शिक्षकांची कल्पकता या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिसून येते. अशा उपक्रमांची यादी राज्यस्तरावरून (SCERT)पुणे यांच्याकडून डाएट कडे येते. यात प्रथम फेरीत निकषानुसार स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्राथमिक गटांमध्ये एकूण 13 व माध्यमिक स्तर एक असे 14 नवोपक्रम सादर झाले होते. पहिल्या फेरीची निवड होऊन प्राथमिक गटातून सात शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड झाली. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एकूण आठ शिक्षकांच्या नवोक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण झाले. त्यामध्ये पाच मुद्यांना धरून सात मिनिटांमध्ये सादरीकरण करावयाचे होते. परीक्षकांनी गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
               प्राथमिक गटातून श्री.रंजीत जाधव, मानोरा यांनी प्रथम मानांकन प्राप्त केले तर वाशिम पंचायत समिती मधील आरती गंगावणे यांनी दुसरा आणि मीनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कारंजा येथील कु. नीता तोडकर व मुरलीधर जाधव कारंजा यांना उत्तेजनार्थ मानांकन मिळाले. माध्यमिक गटातून संजय धांडे, रिसोड यांनी प्रथम मानांकन मिळवले.  प्रज्ञा देवळीकर कारंजा व संध्या पिंजरकर, मंगरूळपीर यांनी सहभाग घेतला. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि जिंकलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
          जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव केंद्र तोंडगाव पंचायत समिती वाशिम येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी नागराळे या त्यांच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत असतात.याही वर्षी त्यांनी गणित विषयावर आधारित नवोपक्रम SCERT pune यांच्याकडे सादर केला होता.या उपक्रमाचे सादरीकरण २१डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते.त्यात मिनाक्षी नागराळे वाशिम यांच्या उपक्रमास तृतीय मानांकन मिळाले.स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.गट शिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिंदे साहेब व केंद्रप्रमुख विलास गोटे सर,शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन वाकुडकर सर व केंद्रातील तसेच वाशिम पंचायत समिती मधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश सुर्वे (जिल्हा समुपदेशक डायट वाशिम) यांनी केले तर तंत्रज्ञान टेक्निकल श्री विश्वंभर आळणे (विषय सहाय्यक डायट ) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास कडाळे (अधिव्याख्याता )स्वाती ढोबळे (डायट, वाशिम)श्रीमती संजीवनी दारोकार (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) श्रीमती स्मिता इंगळे (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) आदींनी अथक परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.विश्वंभर आळणे सरांनी मानले. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Friday, 3 December 2021

बापलेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

*बाप-लेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

         आपण आजपर्यंत आई मुलींच्या नात्यावर अनेक कविता वाचल्या. मायलेकींचे ही भरपूर साहित्य प्रकाशित झाले पण बाप लेकीच्या कविता प्रथमच माझ्या वाचनात आल्या. दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्रात दररोज बाप लेकीच्या कविता प्रकाशित व्हायच्या आणि मी त्या दररोज आवर्जून वाचायचे. प्रत्येक कविता काळजाला स्पर्शून जायची आणि लेकीविषयीचे प्रेम उत्कट व्हायचं.साहित्याचे गाढे अभ्यासक कवी, लेखक प्रकाश जडे सर यांच्या बापलेकीवरच्या कविता खरच बाप-लेकीचे नाते किती अतूट असते हे सांगून जातात. लेकीने बापाच्या गळ्याला मारलेली मिठी तीच लेक सासरी जाताना बापाच्या जीवाची होणारी घालमेल कळते. हे सारे प्रकाश जडे यांच्या कवितेत आविर्भूत आहे. प्रत्येक कविता वाचताना अंतकरण भरून येते आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात.
        सोलापूर जिल्ह्याचे कवी प्रकाश जडे यांचा वात्सल्यसूक्त  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिगंबर दगडू भगरे यांनी जानेवारी २०२१ मध्ये प्रथमावृत्ती प्रकाशित केली असून मुखपृष्ठावर बापलेकीचा हात धरून चाललेले  पाठमोरी असलेले बोलके चित्र काव्यसंग्रह वाचण्याची उत्कंठा वाढवते.मलपृष्ठावर महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगरच्या डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांनी पाठराखण केली आहे. पहिल्या पानावर लेकीने बापाला मारलेली घट्ट मिठी चित्र प्रणोती पोद्दार यांनी रेखाटलेली मनाला अधिक भावून जाते. या पुस्तकाचे मुल्य केवळ 120 रुपये असून यातली प्रत्येक कविता काळजाला भिडणारी आहे.
      साहित्याचे गाढे अभ्यासक व स्वाभिमानी छावा या दैनिक वृत्तपत्राचे सहसंपादक, संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.हाडाचा शिक्षक असल्यामुळे त्यांना अनेक साहित्यिक व शैक्षणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री प्रकाश जडे सर खरं तर विज्ञानाचे विद्यार्थी असून ते साहित्याचे वारकरी पण आहेत.ते आपल्या कवितेतून अधिक उत्कटपणे व्यक्त होतात.वात्सल्यसूक्त या काव्यसंग्रहात एकूण 52 कविता एकाच विषयावर आहेत. बाप लेकीच्या नात्याला शब्द फुलांनी फुलवीत नात्यांची घट्ट वीण एकेका ओळींमधून गुंफीत जाणारा कवी म्हणजे प्रकाश जडे सर होय.
        लेकी विना 
       का घर असते?
       निरर्थक होते 
       जिणे बापाचे...!!

       अगदी कमी शब्दात भावपूर्ण, अर्थ गर्भित, सखोल अर्थ दडलेल्या वरील ओळीतून बापाचा लेकीसाठी तुटणारा जीव, लेकीवरचे अतोनात प्रेम, उत्कट प्रेमभावना, वात्सल्याचा निर्मळ झरा, शब्दांशब्दांतून पाझरतो आहे. संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे सर लेकीविना घर घर राहात नाही. ज्या घरात लेक नाही त्या बापाचे जगणे निरर्थक होते. त्या बापाच्या जीवनाला काही अर्थच नाही लेक वंशाची पणती असते. माहेर आणि सासर अशा दोन्ही घरात प्रकाश देणारी लेक बापाचा जीव की प्राण असते. लेक बापाच्या आयुष्याची कविताच असते असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतात.

              लेक म्हणजे
               उंबराचं फूल
               नुसतीच
               भूल ....!

                लेक माझी
                लाखात एक 
                काळजात मेख 
                सोनियाची...!!

                आईची
                 येता सय
                 लेक होते 
                 माझी माय....!!

       वरील ओळीतून लेक म्हणजे उंबराचं फूल नुसतीच भूल अशी मनाला भुरळ पाडणाऱ्या ओळी बापावरुन जीव ओवाळून टाकणाऱ्या लेकीची महती कवी विशद करण्याचा प्रयत्न करतो. लाखात एक जणू सोन्याची मेख अशा सुवर्णमयी शब्दांमध्ये लेकींच्या नात्याला गुंफणारा कवी प्रकाश जडे यांचे लेकीवरचे अतोनात प्रेम दिसून येते. आईची आठवण येता क्षणी लेक माझी माय होते. खरोखर लेकीचे निरागस प्रेम ज्याला लेख आहे. त्याला चांगल्या प्रकारे अनुभवता येते. मी आज पर्यंत मायलेकी वरच्या अनेक कविता वाचल्या, लिहिल्या पण आहेत पण बाप लेकी वरच्या कविता  प्रकाश जडे सरांचे लेकीवरचे प्रेम, त्यांच्या  कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. स्पर्श करणा-या आहेत.बापलेकी वरच्या कविता माझ्या प्रथमच वाचनात आल्या असल्यामुळे लेक नसल्याची हुरहूर स्वस्थ बसू दिली नाही. वात्सल्यसूक्त बाप-लेकीचे नाते दृढ करणारा कवितासंग्रह माझ्या मनाला खूप भावला सर्व रसिक वाचकांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह...

           लेक आपली असली तरी 
           लेकीचं घर आपलं नसतं
           बऱ्याच वेळा 
           लेकीचे घर लेकीच नसतं...!

           आपल्या अंगणातील वेल 
            दुसऱ्याच्या बांधावर
            मोहरताना, फुलताना, फळताना
            दुरूनच पाहायचे असते
            कधी डोळ्यांचे बांध फुटले तरी
            मनाचे बांध रेटता येत नाहीत 
            मागे-पुढे..!!

        लहानपणी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेक कधी मोठी होते बापालाच कळत नाही. तिच्या नाजूक पैंजणाचा आवाज, तिचे बोबडे बोल, बाप काळजात साठवून ठेवतो. एक दिवस प्रत्येक लेकीला तिच्या नवऱ्याच्या घरी जावं लागतं पण जेव्हा लेक सासरी जाते तेव्हा ती परक्याची होते.तिचं घर आपलं नसतं. बऱ्याच वेळा लेकीचं घर लेकीचं नसतं. बापाच्या घरासारखी सत्ता नवऱ्याच्या घरी नसते वडिलांच्या घरासारखं स्वातंत्र्य नसतं. प्रत्येक गोष्टीवर मर्यादा येतात हे वास्तव.  प्रकाश जडे सर आवर्जून सांगितल्याशिवाय राहत नाही. आपल्या अंगाणातील वेल दुसऱ्याच्या बांधावर मोहरताना, फुलताना, फळताना लेकीला बापाने दुरूनच पाहावा लागते. ती माहेरी आली तरी दोन दिवसाची पाहुणी म्हणूनच येते. आणि चिमणी सारखी परत उडून जाते. बापाच्या डोळ्याचे बांध फुटले तरी बापाच्या मनाचा बांध काही अडवता येत नाही. बापाला सर्वात जास्त त्रास लेक बापाचं घर सोडून जाते तेंव्हा होतो. बाप आतल्याआत रडत असतो. त्याला मोठ्यांनीही रडता येत नाही कारण तो बाप असतो. लेकीचा आधारवड असतो. 
       वात्सल्यसूक्त हा आगळावेगळा बाप लेकीच्या नात्यावर प्रकाश टाकणारा प्रकाश जडे सर यांचा कवितासंग्रह वाचकाच्या थेट काळजाला भिडणारा आहे. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे वाचले वात्सल्यसूक्त होय.
          कवी प्रकाश जडे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Thursday, 21 October 2021

गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी मा.राजेशजी खवले साहेब यांचे समाजासाठी करू काही या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

 https://youtu.be/h9O1rJ6UBsM