Tuesday, 28 December 2021

वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन

 *वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन*

      महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे सादरीकरण दिनांक 21 डिसेंबर रोजी रिसोड रोड, लाखाळा वाशिम. येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉ.ज्ञानेश्वर नागरे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम) मार्गदर्शक डॉ.सुलक्षणा पवार मॅडम (अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक नवोपक्रम), परिक्षक श्री शिवशंकर मोरे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री जगदीश करडे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री रोकडे सर (प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय वाशीम) यांनी जिल्ह्यातील नवोपक्रम स्पर्धेतील पात्र शिक्षकांच्या सादरीकरणाच्या परीक्षणाचे काम पाहिले. 
          सन 2021- 22 या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील  नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याकडून राज्यातून उपक्रमशील शिक्षकांकडून नवोपक्रम शासन स्तरावर मागवले जातात. नवनवीन उपक्रम व शिक्षकांची कल्पकता या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिसून येते. अशा उपक्रमांची यादी राज्यस्तरावरून (SCERT)पुणे यांच्याकडून डाएट कडे येते. यात प्रथम फेरीत निकषानुसार स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्राथमिक गटांमध्ये एकूण 13 व माध्यमिक स्तर एक असे 14 नवोपक्रम सादर झाले होते. पहिल्या फेरीची निवड होऊन प्राथमिक गटातून सात शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड झाली. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एकूण आठ शिक्षकांच्या नवोक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण झाले. त्यामध्ये पाच मुद्यांना धरून सात मिनिटांमध्ये सादरीकरण करावयाचे होते. परीक्षकांनी गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
               प्राथमिक गटातून श्री.रंजीत जाधव, मानोरा यांनी प्रथम मानांकन प्राप्त केले तर वाशिम पंचायत समिती मधील आरती गंगावणे यांनी दुसरा आणि मीनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कारंजा येथील कु. नीता तोडकर व मुरलीधर जाधव कारंजा यांना उत्तेजनार्थ मानांकन मिळाले. माध्यमिक गटातून संजय धांडे, रिसोड यांनी प्रथम मानांकन मिळवले.  प्रज्ञा देवळीकर कारंजा व संध्या पिंजरकर, मंगरूळपीर यांनी सहभाग घेतला. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि जिंकलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
          जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव केंद्र तोंडगाव पंचायत समिती वाशिम येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी नागराळे या त्यांच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत असतात.याही वर्षी त्यांनी गणित विषयावर आधारित नवोपक्रम SCERT pune यांच्याकडे सादर केला होता.या उपक्रमाचे सादरीकरण २१डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते.त्यात मिनाक्षी नागराळे वाशिम यांच्या उपक्रमास तृतीय मानांकन मिळाले.स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.गट शिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिंदे साहेब व केंद्रप्रमुख विलास गोटे सर,शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन वाकुडकर सर व केंद्रातील तसेच वाशिम पंचायत समिती मधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश सुर्वे (जिल्हा समुपदेशक डायट वाशिम) यांनी केले तर तंत्रज्ञान टेक्निकल श्री विश्वंभर आळणे (विषय सहाय्यक डायट ) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास कडाळे (अधिव्याख्याता )स्वाती ढोबळे (डायट, वाशिम)श्रीमती संजीवनी दारोकार (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) श्रीमती स्मिता इंगळे (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) आदींनी अथक परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.विश्वंभर आळणे सरांनी मानले. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Friday, 3 December 2021

बापलेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

*बाप-लेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

         आपण आजपर्यंत आई मुलींच्या नात्यावर अनेक कविता वाचल्या. मायलेकींचे ही भरपूर साहित्य प्रकाशित झाले पण बाप लेकीच्या कविता प्रथमच माझ्या वाचनात आल्या. दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्रात दररोज बाप लेकीच्या कविता प्रकाशित व्हायच्या आणि मी त्या दररोज आवर्जून वाचायचे. प्रत्येक कविता काळजाला स्पर्शून जायची आणि लेकीविषयीचे प्रेम उत्कट व्हायचं.साहित्याचे गाढे अभ्यासक कवी, लेखक प्रकाश जडे सर यांच्या बापलेकीवरच्या कविता खरच बाप-लेकीचे नाते किती अतूट असते हे सांगून जातात. लेकीने बापाच्या गळ्याला मारलेली मिठी तीच लेक सासरी जाताना बापाच्या जीवाची होणारी घालमेल कळते. हे सारे प्रकाश जडे यांच्या कवितेत आविर्भूत आहे. प्रत्येक कविता वाचताना अंतकरण भरून येते आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात.
        सोलापूर जिल्ह्याचे कवी प्रकाश जडे यांचा वात्सल्यसूक्त  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिगंबर दगडू भगरे यांनी जानेवारी २०२१ मध्ये प्रथमावृत्ती प्रकाशित केली असून मुखपृष्ठावर बापलेकीचा हात धरून चाललेले  पाठमोरी असलेले बोलके चित्र काव्यसंग्रह वाचण्याची उत्कंठा वाढवते.मलपृष्ठावर महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगरच्या डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांनी पाठराखण केली आहे. पहिल्या पानावर लेकीने बापाला मारलेली घट्ट मिठी चित्र प्रणोती पोद्दार यांनी रेखाटलेली मनाला अधिक भावून जाते. या पुस्तकाचे मुल्य केवळ 120 रुपये असून यातली प्रत्येक कविता काळजाला भिडणारी आहे.
      साहित्याचे गाढे अभ्यासक व स्वाभिमानी छावा या दैनिक वृत्तपत्राचे सहसंपादक, संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.हाडाचा शिक्षक असल्यामुळे त्यांना अनेक साहित्यिक व शैक्षणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री प्रकाश जडे सर खरं तर विज्ञानाचे विद्यार्थी असून ते साहित्याचे वारकरी पण आहेत.ते आपल्या कवितेतून अधिक उत्कटपणे व्यक्त होतात.वात्सल्यसूक्त या काव्यसंग्रहात एकूण 52 कविता एकाच विषयावर आहेत. बाप लेकीच्या नात्याला शब्द फुलांनी फुलवीत नात्यांची घट्ट वीण एकेका ओळींमधून गुंफीत जाणारा कवी म्हणजे प्रकाश जडे सर होय.
        लेकी विना 
       का घर असते?
       निरर्थक होते 
       जिणे बापाचे...!!

       अगदी कमी शब्दात भावपूर्ण, अर्थ गर्भित, सखोल अर्थ दडलेल्या वरील ओळीतून बापाचा लेकीसाठी तुटणारा जीव, लेकीवरचे अतोनात प्रेम, उत्कट प्रेमभावना, वात्सल्याचा निर्मळ झरा, शब्दांशब्दांतून पाझरतो आहे. संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे सर लेकीविना घर घर राहात नाही. ज्या घरात लेक नाही त्या बापाचे जगणे निरर्थक होते. त्या बापाच्या जीवनाला काही अर्थच नाही लेक वंशाची पणती असते. माहेर आणि सासर अशा दोन्ही घरात प्रकाश देणारी लेक बापाचा जीव की प्राण असते. लेक बापाच्या आयुष्याची कविताच असते असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतात.

              लेक म्हणजे
               उंबराचं फूल
               नुसतीच
               भूल ....!

                लेक माझी
                लाखात एक 
                काळजात मेख 
                सोनियाची...!!

                आईची
                 येता सय
                 लेक होते 
                 माझी माय....!!

       वरील ओळीतून लेक म्हणजे उंबराचं फूल नुसतीच भूल अशी मनाला भुरळ पाडणाऱ्या ओळी बापावरुन जीव ओवाळून टाकणाऱ्या लेकीची महती कवी विशद करण्याचा प्रयत्न करतो. लाखात एक जणू सोन्याची मेख अशा सुवर्णमयी शब्दांमध्ये लेकींच्या नात्याला गुंफणारा कवी प्रकाश जडे यांचे लेकीवरचे अतोनात प्रेम दिसून येते. आईची आठवण येता क्षणी लेक माझी माय होते. खरोखर लेकीचे निरागस प्रेम ज्याला लेख आहे. त्याला चांगल्या प्रकारे अनुभवता येते. मी आज पर्यंत मायलेकी वरच्या अनेक कविता वाचल्या, लिहिल्या पण आहेत पण बाप लेकी वरच्या कविता  प्रकाश जडे सरांचे लेकीवरचे प्रेम, त्यांच्या  कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. स्पर्श करणा-या आहेत.बापलेकी वरच्या कविता माझ्या प्रथमच वाचनात आल्या असल्यामुळे लेक नसल्याची हुरहूर स्वस्थ बसू दिली नाही. वात्सल्यसूक्त बाप-लेकीचे नाते दृढ करणारा कवितासंग्रह माझ्या मनाला खूप भावला सर्व रसिक वाचकांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह...

           लेक आपली असली तरी 
           लेकीचं घर आपलं नसतं
           बऱ्याच वेळा 
           लेकीचे घर लेकीच नसतं...!

           आपल्या अंगणातील वेल 
            दुसऱ्याच्या बांधावर
            मोहरताना, फुलताना, फळताना
            दुरूनच पाहायचे असते
            कधी डोळ्यांचे बांध फुटले तरी
            मनाचे बांध रेटता येत नाहीत 
            मागे-पुढे..!!

        लहानपणी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेक कधी मोठी होते बापालाच कळत नाही. तिच्या नाजूक पैंजणाचा आवाज, तिचे बोबडे बोल, बाप काळजात साठवून ठेवतो. एक दिवस प्रत्येक लेकीला तिच्या नवऱ्याच्या घरी जावं लागतं पण जेव्हा लेक सासरी जाते तेव्हा ती परक्याची होते.तिचं घर आपलं नसतं. बऱ्याच वेळा लेकीचं घर लेकीचं नसतं. बापाच्या घरासारखी सत्ता नवऱ्याच्या घरी नसते वडिलांच्या घरासारखं स्वातंत्र्य नसतं. प्रत्येक गोष्टीवर मर्यादा येतात हे वास्तव.  प्रकाश जडे सर आवर्जून सांगितल्याशिवाय राहत नाही. आपल्या अंगाणातील वेल दुसऱ्याच्या बांधावर मोहरताना, फुलताना, फळताना लेकीला बापाने दुरूनच पाहावा लागते. ती माहेरी आली तरी दोन दिवसाची पाहुणी म्हणूनच येते. आणि चिमणी सारखी परत उडून जाते. बापाच्या डोळ्याचे बांध फुटले तरी बापाच्या मनाचा बांध काही अडवता येत नाही. बापाला सर्वात जास्त त्रास लेक बापाचं घर सोडून जाते तेंव्हा होतो. बाप आतल्याआत रडत असतो. त्याला मोठ्यांनीही रडता येत नाही कारण तो बाप असतो. लेकीचा आधारवड असतो. 
       वात्सल्यसूक्त हा आगळावेगळा बाप लेकीच्या नात्यावर प्रकाश टाकणारा प्रकाश जडे सर यांचा कवितासंग्रह वाचकाच्या थेट काळजाला भिडणारा आहे. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे वाचले वात्सल्यसूक्त होय.
          कवी प्रकाश जडे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Thursday, 21 October 2021

गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी मा.राजेशजी खवले साहेब यांचे समाजासाठी करू काही या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

 https://youtu.be/h9O1rJ6UBsM

Saturday, 16 October 2021

मिनाक्षी पांडुरंग नागराळे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न


*जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न होय*

     स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,ज्ञानाचा दीप लावणाऱ्या क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आलेख जगाला एक महाग्रंथाची ओळख करून देणारा (संदर्भग्रंथ )महाग्रंथाची निर्मिती प्रेरणा राजेश खवले यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,लेखक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे चालवलेला उपक्रम म्हणजे क्रांतिरत्न जगातल्या अनमोल रत्ना पैकीच एक रत्न होय.
       शिक्षणाचे बीजारोपणपन करणारे फुले दांपत्य यांचे कार्य आद्वितीय आहे. 'फुले असुनी काठी वेचिले' या उक्तीप्रमाणे आयुष्यभर इतरांसाठी झटणारे,त्याग,समर्पण करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्रातून १९४ लेखकांनी लिहिलेले लेख या महा ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.या ग्रंथाचे प्रकाशक वर्षा चिमणकर अकोला, मुद्रक- सुरज कार्ड, नागपूर, मुखपृष्ठ सचिन थेटे, रेखाचित्र रवींद्र शिरसागर यांची आहेत. या ग्रंथाचे मार्गदर्शक विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस.से.नि.) तथा प्रधान सचिव तामीळनाडू व अशोक गेडाम (उपजिल्हाधिकारी) सेवानिवृत्त हे आहेत तर निर्मिती मंडळ प्रकाश अंधारे( विशेष कार्यकारी अधिकारी) प्रताप वाघमारे (तहसीलदार )नागपूर, विजय लोखंडे (तहसीलदार आकोला ) अतुल दोड (खनिकर्म अधिकारी औरंगाबाद )राहुल तायडे (तहसीलदार नांदुरा) विनय गोसावी (उपजिल्हाधिकारी जळगाव) इ. आहेत.१००० पानांचा महाग्रंथ तयार करण्यासाठी एका प्रतिसाठी आठशे रुपये खर्च हा फक्त छपाईसाठी लागला आहे. प्रत्येक घरातली स्त्री शिकली पाहिजे म्हणून आयुष्यभर त्याग करणाऱ्या फुले दांपत्याच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला माहित होण्यासाठी प्रत्येक घरात हा महाग्रंथ असला पाहिजे. हा महाग्रंथ येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे.या ग्रंथाच्या मुख्य संपादक डॉक्टर पुष्पा तायडे, सहसंपादक डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ. सतीश पावडे, डॉ.चंद्रकांत सरदार, सतीश दामोदर , प्रकाश अंधारे आहेत. फुले दाम्पत्याने दांभिक रुढी परंपरेला छेद देऊन, अंधश्रद्धेची मूठमाती करून, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, बाल हत्या, बालविवाह प्रतिबंधक कायदा करून, विधवांना स्वावलंबनाचे धडे गिरवायला शिकवून, विधवांचे केशवपन थांबवून, स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करून, शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरता या ग्रंथाची निर्मिती झाली. त्यामुळे क्रांतिरत्न हे जगातील अनमोल रत्न पैकी एक रत्न आहे असे म्हणावे लागेल. या महान ग्रंथनिर्मितीस अनेक मंत्री, खासदार, आमदार व अनेक विद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू इत्यादी जणांच्या शुभेच्छा  लाभल्या आहेत. महाराष्ट्रातील थोर प्राध्यापक, लेखक,कवी,पत्रकार, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्कृष्ट लेख निवडून घेतले आहेत या ग्रंथांमध्ये सुरुवातीला महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम व सावित्रीआईचा संपूर्ण जीवनक्रम दिलेला आहे. त्यानंतर लेखकांची अनुक्रमणिका यादी देण्यात आली आहे.
          स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्री आईची खंबीर साथ होती म्हणून फुले दाम्पत्यांने समाजातल्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत यासाठी अहोरात्र मेहनत करून अनेक समाजोपयोगी कामे केलीत. अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली.समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण हेच ध्येय गाठले. समाजातल्या स्त्रिया शिक्षित करण्यासाठी अनेक अन्याय सहन केले पण आपल्या मार्गांवरून तसूभरही हलले नाहीत. विधवा पुनर्विवाह घडवून आणले, विधवा केशवपन,बाल प्रतिबंधक कायदा बनवला.  विधवा आत्महत्या थांबवून, शंभर विधवा गरोदर मातांची बाळंतपणे स्वतःच केलीत. इतकेच नाही तर प्लेगच्या साथीमध्ये अनेकांना जेवण मिळत नव्हते तेंव्हा स्वतः अन्नछत्र चालवले. अशा महान क्रांतीज्योतीस खरं तर भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यायला हवा आहे पण ती एक शोकांतिकाच ठरली आहे. आज सावित्री ज्योतिबा मुळेच अनेक स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेताना दिसत आहेत. क्रांतिरत्न या महान ग्रंथामुळे समाजाला व येणाऱ्या भावी पिढीला एकाच ठिकाणी फुले दाम्पत्यांच्या कार्याची ओळख एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल यात शंकाच नाही. या महान ग्रंथ निर्मिती साठी झटणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे  मनापासून अभिनंदन... आज पर्यंत सावित्री- ज्योती यांच्या जीवनावर आधारित १००० पानांचा  महाग्रंथ कुठेही प्रकाशित झाला नाही. या ग्रंथाची द वर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. त्यासाठी सर्व टीमचे अथक प्रयत्न चालू आहेत. असा महान ग्रंथ प्रत्येक घरातल्या प्रत्येकाकडे असायलाच हवा. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०२१  रोजी या ग्रंथाचे १३१ ठिकाणाहून एकाचवेळी प्रकाशन होणार आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा....!!
            ग्रंथ हवा असल्यास मा. प्रकाश अंधारे सर यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधू शकता
मोबाईल नंबर- 8484906992
     क्रांतिरत्न म्हणजे सावित्रीआई आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आलेख जगासमोर मांडणारा एकमेव महाग्रंथ होय.

      कलेक्टर ते तहसीलदार
      यांनी केले अथक प्रयत्न
      साऊज्योतिस अभिवादन करण्या
       निर्मिले महाग्रंथ क्रांतिरत्न....!!

समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७