Tuesday, 22 June 2021

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈 आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈 सात रंगांनी सजावे सुखदुःखाचे सोबती मायबाप नित्य पुजावे...!! शांततेचा रंग पांढरा संयमाने सदा रहावे त्याग,समर्पण चित्ती कधी जीवनात पहावे...!! आकाशाचा निळा रंग विशाल ह्रदयासम असावे सागराचे अवखळ पाणी झ-यासम खळखळावे....!! हिरवा शालू नेसून बसली सुंदर दिसते वसुंधरा ओंजळभर दाणे टाकत शेतकरी पोशिंदा खरा....!! विठुराया चरणी साकडे घालून करते नित्य प्रार्थना सर्वांना सुखी ठेव देवा तव शांती मज मिळेल मना...!! पिवळा रंग उठून दिसतो चाफ्यात मिश्रित भावतो नानाविध रंग निसर्गाचे चल इंद्रधनुत दावतो....!! ॠतूप्रमाणे रंग सजती आयुष्यातील इंद्रधनुष्य शोध माणसाच्या कामी पडावे आयुष्याचा घे खरा बोध....!! *मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

चिमणी पाखरं या शैक्षणिक साहित्यीक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

Saturday, 19 June 2021

माझ्या कविता

Friday, 11 June 2021

ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा ललितलेख संग्रह म्हणजे गाई गेल्या राना..

 *ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा ललितलेख संग्रह म्हणजे -गाई गेल्या राना*

   अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील लेखक रवींद्र जवादे सर यांचा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा हा ललित लेखसंग्रह आहे.या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गाई रानात जातानाचे मालकासहचे दृश्य दिसत आहे.असे देखणे सुंदर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून प्रकाशन शब्ददिप प्रकाशन मुर्तीजापुर अकोला यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी याची प्रथमाआवृत्ती प्रकाशित केली आहे. या पुस्तकात एकूण 20 ललित लेख ग्रामीण संस्कृतीची ओढ लावणारे आहेत. प्रस्तावना वाशिम चे ख्यातनाम कादंबरीकार जेष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांची लाभली असून पाठराखण अशोक कोतवाल यांनी केली आहे. या पुस्तकाचे मुल्य केवळ २२० रुपये असले तरी सर्व ललित लेखन गावच्या मातीची ओढ लावणारी आहेत.
         प्रसिद्ध लेखक श्री रवींद्र जवादे यांचे यापूर्वी 'ऋतुगंध' व *दिवेलागण ह्या*  दोन ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले असून दिवेलागण या ललितलेख संग्रहाला महाराष्ट्रातून आत्तापर्यंत अकरा पुरस्कार लाभले आहेत. दिवसभराचे एक जगणं एक स्थीर वर्तुळ यात आलेला आहे जगणं कुणाचेही असो गाईचं ,बाईचं ,माणसाचा त्याला सुख दुःखाचे अनेक व्यामिश्र पदर असतात.त्यातील ललित लेख महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिवाळीअंक मासिक पक्षी तसेच अनेक वर्तमान पत्राच्या पुरवण्या मधून प्रकाशित झालेले आहेत.
                  पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये एक तरी गाय असायची.अनेकांच्या घरी गोकुळ नांदत असावं जणू ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी गोठ्यातल्या गाईच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आज सकाळच्या समयी संपूर्ण घरभर, गोठा गावभर,ऐकू यायचा, धारा काढताना चा आवाज घरातील थोरामोठ्यांची चाललेली कामाची लगबग, गायीला ढुसण्या देणारे वासरू , दूध पिताना चे दृश्य आणि गाय घरमालकाच्या हाताला जिवेन चाटणारा उमाळा अंगणी पडणारा प्राजक्ताचा सडा, दारात काढलेली सुंदर टिपक्याची रांगोळी,समोर तुळशीवृंदावनात लावलेल्या अगरबत्तीचा घरभर पसरणारा सुवास त्या दारात बसलेल्या मोत्या आणि दुधाची चरवी हातात घेऊन आई घरात आल्या बरोबर मधोमध दोन पायाच्या आत घुटमळणारी मांजर हे सारं काही आजच्या काळात हळूहळू लोप पावत चालले आहे. पाऊस रुपयाचा येतो या ललित लेखांमध्ये पावसाचे अतिशय सुंदर असे वर्णन कवी रवींद्र जवादे सर यांनी केले आहे. पावसाच्या आगमनाने सुगंधित झालेली माती हिरवेगार फुटणारे कोवळे  गवत कुरणे रस्त्याच्या दुतर्फा, बाजूने डोलणारी रानफुलं, अंगणात फुलून आलेला मोगरा, ढगाआड लपलेला चंद्र, सार मनाला भुरळ घालणार आहे.
         
         कशाला काशी जातो रे बाबा 
         कशाला पंढरी जातो ?
          संत सांगती ते ऐकत नाही 
          इंद्रियांचे ऐकतो 
           कोंबडे बकरे खातो रे बाबा 
            कशाला पंढरी जातो?

       ग्रामीण भागात मंदिरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये भजनाचा वेग वाढलेला असतो. त्या भजनाच्या ओळी संतांनी सांगितलेल्या खूप काही सांगून जातात. वरील ओळीतून कोंबडे बकरे खातो आणि कशाला पंढरीला जातो? असा खडा सवालही वरील ओळीतून गाडगे बाबांनी केला आहे. अशा परिवार परिवर्तनवादी विचारांच्या भजनातून ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो. ग्रामीण भागातली शुद्ध,मोकळी हवा संध्याकाळचे गंध वातावरण, गावातल्या गोठ्यातल्या गायी हंबरणा-याचा आवाज, सायंकाळी मंदिरामागे चालणारा हरिपा,गाईचं दूध पिणारे वासरू,गवताचा गुळचट वास, अंगणातल्या तुळशीसमोर आईने लावलेल्या दिव्याचा प्रकाश, शांत मोकळे आकाश सांज काळोखात पसरणाऱ्या मोगर्‍याचा सुवास हे सार सांज ये गोकुळी या ललित लेखसंग्रहात अगदी हुबेहूब डोळ्यासमोर चित्र उभे राहतो.
          आषाढात पडणारा पाऊस घननीळ दिसणारा आभाळ त्याचे झोके घेणारा अल्लड वारा , कोकिळेची सुंदर धून, मातीचा सुगंध दरवळलेला अमृतासारखे पडणारे पावसाचे थेंब. चिंब पावसात मनसोक्त भिजणारी मुलं हे सारं अगदी जसेच्या तसे नभ उतरू आलं या ललित लेखात पाहायला मिळतं ग्रामीण भागातले लेखक रवींद्र जवादे यांनी खूप बारकाईने गाव कुसाच्या ग्रामीण भागातल्या आठवणींना उजाळा देणारे क्षण हुबेहूब पुणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोराचं सुंदर देखणेपण रानात नाचला मोर या ललित लेखात खूप सुंदर पद्धतीने लेखक रवींद्र जवादे सरांनी रेखाटले आहे निसर्गाने मोराला भरभरून दिलेल्या देखणं रूप म्हणजे एक वरदान म्हणजे मोराचा देखणं रूप रंग त्याच्या मोरपिसां-राचा सुरेख रंग कधी अधि मोराचा देखणं रूप त्याच्या जीवावर बेतलं .आजही ग्रामीण भागात माळरानी एक कटाक्ष टाकला किंवा भटकंती केली तर नजरेला मोर पडतातच पावसाळ्यात मात्र मोर जास्त दिसू लागतात असं सुंदर वर्णन लेखकांनी केलेलं आहे.
        लेखक रवींद्र जवादे सरांच्या लेखणीला तोड नाही. प्रत्येक लेख अगदी साधी सोपी पण रसाळ मधुर गोड भाषाशैलीमुळे हा ललितलेख संग्रह संपेपर्यंत हातातून सोडून देऊ नये असच  वाटल्याशिवाय रहात नाही. निस्सीम निसर्गप्रेमी , पशू प्रेमी असलेले संवेदनशील मनाचे लेखक रवींद्र जवादे सर यांनी सुंदर ललित लेख संग्रह लिहिण्यासाठी निसर्गाने खरे दान त्यांना दिले आहे. यात शंकाच नाही ग्रामीण भागातल्या कौलारू घरात पावसाळ्यात पडणारे पावसाचे थेंब,थेम्बाना पकडण्यासाठी भांडे लावण्यासाठी चाललेली धावपळ, पावसाळी रात्र, वाढलेला गारवा, पेटवलेली शेकोटी अंगणाने व घराणे दिलेला जिव्हाळा हे सारे इवलसं घर या ललित लेखसंग्रहात न दिसून येते. ऊन वाऱ्यापासून बचाव करणाऱ्या घराचं कौतुक रवींद्र जवादे सरांनी सुरेखपणे मांडले आहे. 'सर्पाची लागण' या ललित लेखांमध्ये ग्रामीण भागातल्या रानात बांधावर सर्पाची जोडी अचानक दिसल्याने गावकरी चिंतित पडलेली असतात हे खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे.
           लेखक रवींद्र जवादे यांची साधी सरळ भाषा आणि सर गाने निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी वाचकाला भुरळ पाडणारी आहे. ग्रामीण भागातल्या संस्कृतीची ओळख करून देणारी, झऱ्याप्रमाणे खळखळणारी लाभली आहे. शब्द माधुर्य व शब्द सौंदर्याने भरभरून नटलेली असल्याने मन उल्हसित करणारी आहे. गायी गेल्या राणा या ललित लेखसंग्रहात पशुपक्षी आणि मानवी जीवन यांची चित्तवेधक वर्णन वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते . गाई गेल्या राहा ललित लेख संग्रह म्हणजे ग्रामीण लोकसंस्कृतीचा उत्कृष्ट आविष्कारच आहे रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या भाव गर्भित प्रसंगाने वाचक कधी आनंदी होतो तर कधी अस्वस्थ होतो बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहून गावातील लोकांनी बिबट्याला मारण्यासाठी काढलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वाचकाच्या अंगावर शहारा आणणा-या आहेत.
        आजच्या इंटरनेटच्या धावत्या काळात हरवून बसलेलं मामाचं पत्र आज खेड्यावर सुद्धा येत नाही. पूर्वी खेड्यापाड्यात पोस्टमास्टर सायकल वर गावोगाव फिरून पत्र वाटप करायचा त्या पत्राची अनामिक ओढ, मायेचा ओलावा, जिव्हाळा, आपुलकी गोडी पत्रातले ते शब्दधन व्हाट्सअप व इंटरनेटच्या आजच्या काळात पार हरवून गेल्याची खंत कवी रवींद्र जवादे यांनी अगदी सुंदर सुरेखपणे मांडली आहे कवी रवींद्र जवादे पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा

 समीक्षिका /लेखिका/ कवयित्री/ शिक्षिका 
कु.मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 27 April 2021

सुखदुःखाच्या वाटा म्हणजे बाभळीचा काटा

 *सुखदुःखाच्या वाटा म्हणजे - बाभळीचा काटा*

       प्रत्येक मनुष्य सुखासाठी झटत असतो आणि सुख शोधत असतो.सुखाच्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहात असतो. खरंतर सुखाचा मार्ग खूप खडतर असतो त्यातून ही स्वतःच्या जिद्दीने, प्रयत्नाने, दुःखाचे काटे तुडवित, अपयशाचे अडथळे खात शेवटी सुखा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, गझलकार,गायक, शिक्षक असणारे विजय वडवेराव यांचा काव्यसंग्रह "बाभळीचा काटा" नुकताच वाचनात आला. अतिशय देखणे मुखपृष्ठ माय चुलीवर भाकरी थापत आहे. समोर लहान मुल अंगात फक्त चड्डी घालून माय समोर बसले आहे. त्याची गरीबी जणूकांही मुलाच्या अंगाला बाभळीच्या काट्यांप्रमाणे टोचत आहे. असे सुंदर मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून परीस पब्लिकेशन यांनी याची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १५० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता जीवनाशी समरस होत काळजाला भिडणा-या,अडथळे ओलांडून यशाकडे नेणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची पाठराखण लोककवी प्रशांत मोरे यांनी केली आहे.
          स्वतःच्या जीवनावर अत्यंत प्रेम करणारा, गरिबीचे चटके अतिशय जवळून सोसणारा, सुखदुःखाच्या वाटा तुटवित यशाचा मार्ग शोधणारा,झोपडपट्टीत राहून सुद्धा आकी व आबा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतून तळमळून अभ्यास करून शिक्षकी पेशात पदार्पण करणारा, हाडाचा पण संवेदनशील मन असणारा कवी विजय वडवेराव यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. यापूर्वी त्यांचा "वेशीवरचा दगड" हा काव्यसंग्रह महाराष्ट्रात बऱ्यापैकी नावारूपाला आला आहे. "बाभळीचा काटा" हा कविता संग्रह म्हणजे वेदनादायी अनुभूतीचे भकास माळरान त्यातच एक नाजूक  रंगीबेरंगी फुलबाग सुद्धा आहे.
    
              तू गं गुलाबाच फूल 
              मी गं बाभळीचा काटा 
               माझं जगणं फाटकं
               तुझ्या मखमली वाटा...

                तुझं पिढ्या न पिढ्याचं
                बागायती गं शिवार
                माझ्या गावकुसापोटी
                सदा भुकेचं निखारं

             वरील ओळीतून कवी प्रियेसीला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत आहे. गुलाबाचं फुल सर्वांनाच आवडतं पण त्याचे काटे कोणालाच आवडत नाहीत त्यामुळे कवी आपल्या काव्यातून प्रियेसीला म्हणतो तू गुलाबाचे फुल आहेस तर मी बाभळीचा काटा आहे. माझं जगणं फाटकं आहे. माझी परिस्थिती नाजूक आहे. तुझ्या जीवनाची मखमली वाट आहे. तू पिढ्यानपिढ्या गर्भश्रीमंत आहेस. तुझ्या शेतात बागायती शिवार आहे. तर माझं घर गावकुसाबाहेर आहे.त्यात भुकेचे निखारे आहेत. आणि तेच माझं वास्तव आहे. मनापासून प्रेम करणार्‍या वेड्या मनाच्या कवीला गरीब श्रीमंतीची दरी दिसते. आणि हळव्या मनाचा कवी आपल्या शब्दात मांडताना दिसतो आहे.

                कानी तव्याच्या गाताना 
                माय भाकरीच गाणं 
                 साऱ्या घराच्या भुकेचं 
                 झुले चुलीला तोरण

                 जीव लावाया पिठाला 
                 तिनं सारता काकण 
                  उभ्या आभाळात घुमे
                  तीच भाकरी थापणं....!!

           ग्रामीण भागातली माय चुलीवर जेव्हा भाकरी थापते तेंव्हा तिच्या हातातील काकणाचा आवाज भाकरीच गाणं गातो.साऱ्या घराच्या भुकेचं तिच्या चुलीला तोरण जणू लावला आहे.भाकरी करताना माय पीठ मळताना तिने पिठाला किती जीव लावलेला आहे. तिच्या हातातल्या काकणाला मागे सारत आवाज आणि तीच भाकरी थापणं आभाळात घुमत आहे. एका एका भाकरीसाठी माय किती हाताला चटके  जणू तिच्या हातावर गोंदन केल्याप्रमाणे तरीही अख्ख्या जगाची भूक भागविण्यासाठी माय भाकरी थापत राहते अशी माईचं व भाकरीचं गाणं व ऋण व्यक्त करणारी कविता वाचकाच्या अंतर्मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. संवेदनशील मनाचा कवी विजय वडवेराव यांची प्रत्येक कविता सुखदुःखाची सरमिसळ आहे. त्यात आनंद, दुःख, वेदना विरह,त्याग इत्यादी स्पष्ट दिसतो.

         बाप माझा हाय विठू 
          माई रखुमाई खरी 
          पांडुरंगा सांग मग 
          मी का पहावी पंढरी? 

           कसा राबतोय माझा 
           बघ बाप हा शिवारी 
           टपटप घाम वाजे 
           जसा मृदूंग गाभारी....!!

           आई वडिलांवर अतोनात प्रेम करणारा कवी विजय वडवेराव स्वतः च्या बापाला विठ्ठलाच्या रूपात पाहतो. माझा बाप विठू आहे. आणि माझी आईच रखुमाई आहे. माझ्या घरीच विठ्ठल रुख्माई असताना मी पंढरीला का जावं? असा खडा सवालही त्यांनी वरील ओळीतून व्यक्त केला आहे. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देवाने घरातच देवासमान आई-वडील प्रत्येकाला दिले आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देवाची खोटी भक्ती करणाऱ्या ढोंगीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन कवी विजयरावांनी कवितेच्या माध्यमातून घातले आहे. माझा बाप शेतात कसा राबराब राबतो. कष्ट करतोय. माझ्या बापाच्या घामाचा टपटप आवाज विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मृदंग वाजल्याप्रमाणे वाजतो आहे. साऱ्या जगाचा देव जरी पंढरपूरचा पंढरी असेल पण माझा देव माझ्या घरी आहे. माझा बाप स्वतः उपाशी राहून जगाला भाकरी देतो. अशा शब्दांत आपल्या अंतर्मनातील भावना कवीने व्यक्त केल्या आहेत.

          वेदनेच्या चिखलात 
          मूळ धरते कविता 
          ज्याचं काळीज जिवंत 
          त्याला कळते कविता....!!

         वरील ओळीतून कविता म्हणजे काय असते? कविता म्हणजे फक्त अक्षरे किंवा शब्दच नाहीत तर जेंव्हा मनुष्याला खूप दुःख होते, वेदना होते, तेव्हा कवितेचा आपोआप जन्म होतो. त्याच्या हृदयात कविता जन्माला येते. आणि त्याचं काळीज जिवंत आहे. त्यालाच ती कविता कळते. संवेदनशील मनाचा व्यक्तीलाच कवीच्या भावना सहज कळतात. जेंव्हा आपले नातेवाईक, सगेसोयरे सर्वांनी साथ सोडतात तेंव्हा कवीच्या सोबत कविता सुद्धा वनवास भोगले सारखी जगते. जर एखादा कवी एकटा पडला असेल तर त्या कवीला जीव कविता लावते. आणि त्याच्या अंगाखांद्यावर छान कविता खेळते. असे इतकं कवितेचे अनन्यसाधारण महत्त्व कवीच्या जीवनात आहे.
         निसर्ग सौंदर्य, सौंदर्यदृष्टी, साद घालणारा हळवं मन, सखी, प्रियेसी, आई-वडील, सुख-दुःख, गंधाळली रात, कवीनं भोगलेला वनवास, पाऊस, पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, बापाचा विरह, शेतकऱ्यांचे दुःख, कष्ट, बळीराजाचचे दुःख हे सार कवी विजय वडवेराव यांनी आपल्या काव्यातून मुक्तपणे तर काही गेय प्रकारात हळुवारपणे व्यक्त केले आहे. त्यामुळे विजय रावांची प्रत्येक कविता काळजाचा ठाव घेत पुढे जाते. गरिबीचे चटके भोगणारा कवी विजय वडवेराव यांनी अपार मेहनत, जिद्द, कष्ट, शिकण्याची हौस, गरिबी, दुःख हे सारे सोबतीचे प्रवासी घेऊन शिक्षक, गायक, कवी, लेखक ते गझलकार पर्यंतचा सारा प्रवास सुखदुःखाच्या वाटा तुडवित उदयाला आला आहे. "बाभळीचा काटा" प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा कवितासंग्रह आहे. कवी विजय वडवेराव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समीक्षिका /लेखिका/शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता.जि. वाशिम
मो.9767663257