Friday, 10 April 2020

"एका विषाणूने शिकवलं"....!

 *"एका विषाणूने शिकवलं...."*

        आज संपूर्ण जगामध्ये कोरूना covid 19 या विषाणूने थैमान घातले आहे.चीन,अमेरिका, इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. मोठमोठ्या प्रगत राष्ट्रांमध्ये भरपूर प्रमाणात सुख-सुविधा दवाखाने असून सुद्धा हा महाभयंकर आजार आटोक्यात यायला बराच वेळ लागतो आहे. भारतासारख्या देशात लवकरच लॉकडाउन केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. तरीसुद्धा प्रत्येक नागरिकांनी "मीच माझा रक्षक" म्हणून घरात थांबावयाचे आहे. तरच आपण या महामारी विरुद्ध लढा देऊ शकतो. आणि हा महाभयंकर आजार आटोक्यात आणू शकतो.
             आज पहिल्यांदा असे झाले आहे की संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी (पुढे वाढतील ही) जागेवर थांबला आहे. आज सारे प्राणी, पक्षी मुक्तपणे बाहेर निसर्गात संचार करताना दिसतात. पण दुर्दैवी गोष्ट आहे की मनुष्यप्राणी मात्र घरात कोंडून घेतला आहे.आणि ते फार गरजेचे, महत्त्वाचे आहे. सर्वांनी बाहेर जाणे काटेकोरपणे टाळले पाहिजे.तरच आपण निशस्त्र होऊन या कोरोना विरुद्ध लढा देऊ शकतो आणि त्याला हरवू शकतो.
            निसर्गात फार मोठी ताकद आहे.आज वर्षानुवर्षे होत असलेली नैसर्गिक हानी आता भरून निघत आहे. असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. आपण पाहतो कित्येक वर्ष झाली रस्त्यावर गाड्यांचा साम्राज्य, होणारा गाड्यांचा धूर, वाढते प्रदूषण, कारखाने, गर्दी माणसांची वेगळी आणि वाहनांची वेगळी, बाहेर मोठ्या शहरात जीव गुदमरल्यासारखा वाटायचा पण या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व वातावरण कसे छान,प्रसन्न, स्वच्छ झाले आहे.मोठमोठ्या शहरांमध्ये स्वच्छ वातावरण झाले. नाही कसला धूर, ना दमट हवा, दमट वातावरण नाही,ना  कसले व्यसन, ना कुठले हॉटेल्स उघडे, ना हॉटेल्समध्ये पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी. आज मोठ्या शहरांमध्ये लोक जीवाच्या आकांताने खेडे गावाकडे धाव घेत आहेत.स्वार्थापोटी आई-वडील खेडेगावात सोडून श्रीमंतीची हाव उराशी कवटाळून मृगजळासारखी स्वप्न पाहणारी लोकं शहराकडे धाव घेणारी सुसक्षित मंडळी आज अचानकपणे गावाची आठवण आली आणि गावाकडे निघून आली आहेत.सर्वजण गावी येऊन आई-वडिलांसोबत घरात कुटुंबासमवेत जगताना दिसताहेत हे सारे एका विषाणूने शिकवलं....
            आयुष्यभर पैशासाठी मरमर करणारा माणूस जागेवरच थांबला. आता मानवाला कळून चुकलं की जीवन जगायला खूप काही लागत नाही. फार कमी गरजा आहेत मानवाच्या ...तसं पाहिलं तर अन्न,वस्त्र, निवारा या तीनच मुख्य गरजा आहेत पण खोट्या दिखाव्यापोटी अति पैसा कमावण्याच्या नादात मोठे उद्योगधंदे,कारखाने उभे करण्यासाठी पर्यावरणाशी, निसर्गाशी अन्याय मानवाने केला आहे. मोठी जंगले शेती नष्ट करून त्यावर दहा-वीस मजली  मोठमोठ्या इमारती सिमेंटच्या उभ्या केल्या आहेत. आज केवढी मोठी बंगले ओस पडली आहेत. शहरात कोरोना येईल आणि आमच्या जीवाला धोका होईल हे ओळखून आज ग्रामीण भागात लोकांनी धाव घेतली आहे. आणि हा बाहेरून येणारा रोग आज काही अंशी ग्रामीण भागात सुद्धा पोहोचला आहे.
         ग्रामीण भागात शहरी भागाइतका मोठा धोका नाही. ग्रामीण भागातला शेतकरी आजही शेतीची कामे करतोय. आणि देशाला पुरेल असा धान्य पिकवतो.तोच जगाचा खरा पोशिंदा आहे माझा बळीराजा... काबाडकष्ट करतो आहे. देवाच्या रूपात आज रस्त्यावर पोलीस, डॉक्टर्स, नर्स उभे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून... या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस सज्ज आहेत.ज्या मंदिराला जरी कुलूप लागली असली तरी मंदिराच्या ट्रस्ट या संस्था अशा या कोरोनाला  हरविण्यासाठी कोटी ने मदतीचा हात देत आहेत. मोठे अभिनेते, उद्योगपती, दानशूर लोक,खेळाडू या चांगल्या कार्यासाठी सर्वोत्परी मदतीचा हात देत आहेत... हे सारे एका विषाणूंनी शिकवलं....
        आज कितीतरी लोक घरात बसून चांगल्या कामाची सुरुवात करीत आहेत. मुलाबाळांची कमी होत चाललेला संवाद धावत्या युगात सोबत पाळणारा माणूस आणि आईवडिलांसोबत बायकोसोबत वेळ घालवीत आहे. मायेने पाहण्याचा दृष्टीकोण या विषाणूने शिकवला आहे.किती पुरुष मंडळींनी या सुट्ट्या छान उपयोग केलेला दिसतो आहे. प्रत्येकाची वेगवेगळी कला बाहेर पडताना दिसते....
         बऱ्याच जणांनी या लॉकडाऊन च्या काळात घराची स्वच्छता,नीटनेटकेपणा करून घर स्वच्छ, छान ठेवले आहेत. कितीतरी जणांनी रोज नवनवीन पदार्थ करून आपल्या बच्चेकंपनीला आई-वडिलांना पत्नीला खाऊ घातले आहेत. काही जणांनी बगीच्या सुंदर करण्याचा, बाग काम करण्याचा प्रयत्न केला आहे... बाहेरचे हॉटेलमधले पिझ्झा बर्गर नूडल्स हे सर्व खाणे बंद होऊन साधेच घरच्या घरी पदार्थ आवडीने खात आहेत. जिभेचे चोचले पैसे उधळून बंद झाले आहे.
         इतर वेळेस मॉलमध्ये, कपड्याच्या दुकानात, शॉपिंग सेंटर वर हॉटेलवर भरगच्च दिसणारी लोक आज घरात घुसून बसली आहेत. कितीतरी पैसा खर्च करणारे लोक आज त्यांच्या खिशातला एक रुपयाही हल्ला नाही. ना कसला खर्च नाही तर बऱ्याच जणांना पगारही पुरायचा नाही आणि चैनीसाठी कर्ज काढणाऱ्या लोकांना आळा बसला आहे आज लोकांना पैसा हे साधन आहे हे कळाले आहे.. साध्य होणार  मुळीच नाही... आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे हेच खरे सत्य आहे.... तू जीव जपण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे काही हातावरच्या बोटावर मोजण्याइतकी लोक सोडली तर सर्वजण लॉकडाऊनचा नियम पाळत आहेत.इतर राज्यातले जे मजूर लोक लोक अडकून पडले आहेत. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक लोक समोर येऊन माणुसकीचे दर्शन घडवताना दिसताहेत मदतीचा हात देताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण मनोमन प्रार्थना करीत आहे की हे देशावरचे संकट टळू दे अशी आर्त हाक ईश्वराला देत विनंती करीत आहे...
              एकंदरीत मानवाचा वाढता अतिरेक कमी झाला आहे. कुठेतरी ब्रेक लागला.खर्च कमी झाला.गरजा कमी झाल्या. साध्यासाध्या आधारासाठी दवाखान्यात पळणारी लोक घरच्या घरीच काळजी घ्यायला लागली आहेत.रिकाम्या वेळेत पेंटिंग,चित्रकला ,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करता येऊ लागल्या. फोर व्हीलर, टू व्हीलर, बसेस रात्रंदिवस पळणाऱ्या गाड्या जाग्यावर थांबल्या आहेत.मनुष इतरांपेक्षा स्वतःची काळजी घ्यायला लागला हे सारे एका विषाणूने शिकवलं......
             गावाला जाऊन मोकळं वातावरण,आपली माणसं, गावाकडची नाती गोती, गावाकडची माती इत्यादीची  नाळ जोडता आली.इतिहासात आतापर्यंत कधीही न थांबलेला पूर्ण भारत एका जाग्यावर थांबला. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये आपुलकीची, भावना वाढीस लागली आहे एकमेकांची काळजी करण्यासाठी संवाद साधू लागली आहेत.अचानक मरण डोळ्यांना दिसताना आपुलकी स्नेह माया प्रेम वाढले आहे. एकमेकांना मदतीची भावना निर्माण झाली डॉक्टर्स, नर्स, पोलीस इत्यादीच्या रूपात देव दिसायला लागला आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे गजबजलेले शहर नकोशी वाटणारी गर्दी,निर्मनुष्य रस्ते बरे वाटायला लागली आहे हे सारं एका विषाणूंनी शिकवलं....!!

©️®️ *लेखिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे*
*वाशिम*

Wednesday, 8 April 2020

स्वातंत्र्यदेवता...स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ माँसाहेब...

 Date: 5 Jan 2020

*स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ मासाहेब*

        जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी.... या उक्तीप्रमाणे  राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या पूर्ण विश्वामध्ये एक कर्तबगार स्त्री म्हणून ओळखल्या जाते जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नांव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव होते. जिजाऊंना अगदी लहान वयात मध्येच वयाच्या दहाव्या वर्षी सर्व शिक्षणामध्ये पारंगत झाल्या होत्या. त्यांना अनेक भाषा त्याकाळी अवगत होत्या. सर्व युद्धकलेचे शिक्षण जिजाऊनी घेतले होते. अख्या विश्वामध्ये एका वीर पुरुषाची वीर आई म्हणून राजमाता जिजाऊ माँसाहेब ओळखले जातात.... जिजाऊंना युद्ध शिक्षण, राजनीति, भाषा, अनेक खेळ, समाजशास्त्र, अर्थशास्त्र युद्धशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रात पारंगत केले होते.  जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला....
           त्या काळामध्ये महाराष्ट्रावर आदिलशहा, निजामशहा यांच्या स्वा-या होवून लढाया होत होत्या.तो काळ फार अंधाधुंदीचा होता.जिकडे तिकडे स्वैराचार माजला होता.स्त्रीया सुरक्षित नव्हत्या,ना रयत सुरक्षित होती...ते रयतेवर जुलूम करायचे.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित घर नव्हते. सगळीकडे अन्याय माजला होता.हे सर्व पाहून जिजाऊंना सतत वाटायचे आपले स्वराज्य निर्माण करायचे....शहाजी राजांची साथ होतीच. बाल शिवबाला अगदी लहान वयापासूनच जिजाऊंनी  शूरवीरांच्या,रामाच्या, महाभारताच्या ,भिमाच्या, अभिमन्यू च्या कथा सांगितल्या. न्याय-निवाडा कसं करायचं छत्रपती शिवरायांना जिजाऊ सांगत असत इतकंच नाही तर त्यांना अगदी लहान वयापासून झाडावर चढणे, दांडपट्टा फिरवणे, भाला फेकणे धावत्या घोड्यावर बसणे,तलवारबाजी चालवणे इत्यादी युद्ध कलेमध्ये निपून करण्यासाठी जिजाऊ मासाहेब स्वतः शिवरायांना शिकवायच्या... त्यांचे शिक्षण त्यांना येणाऱ्या सर्व भाषा याकडे सुद्धा लक्ष द्यायच्या अगदी लहान वयापासूनच न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शिवबांना गादीवर बसवायच्या.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत....एवढेच नाही तर जिजाऊ मासाहेब शिवबांना म्हणायच्या भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र..... श्रीरामचंद्रांनी दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधव यांचे पूर्वज श्रीकृष्ण त्यानेसुद्धा दुष्ट कंसाचा ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तु सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उद्देशाने शिवरायांना हुरूप यायचा... रामकृष्ण,भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण सुद्धा लढावे त्यांनी दुष्टाचा नाश केला तसा आपण सुद्धा करावा आणि प्रजेला सुखी करावे आपण न्यायी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटायचे आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे....
             शहाजीराजे निजामशाहीत लढाया करत वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानगा शिवबा शिकत होता. शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते त्यांनी बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना संस्कृतमध्ये तरबेज केले. त्याचबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात मावळे ठेवले अंदाधुंदी चा काळ संपला आणि जिजाऊ शिवराय शिवनेरीच्या मातीत बाल शिवबा खेळत जिजाऊ पुण्यात राहू लागल्या आसपासच्या लोकांना ते समजले आणि त्या लोकांना मोठा धीर आला. जिजाऊनी सर्व लोकांना जवळ बोलावून दिलासा दिला. अनेक लोक पुण्यामध्ये येऊ लागले आणि शेतावर जाऊ लागले जिजाऊनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागले गाव लोकांनी गजबजू लागले अंधश्रद्धेच्या भीतीने लोकांनी गाव सोडून गेलेले होते पुण्यामध्ये काही कर्मट लोकांनी एका विशिष्ट जागेवर पहार रोवून त्याला फाटकेतुटके खेटर, फाटका झाडू बांधून टाकले होते. याशिवाय जाहीर दवंडी दिली होती की या भूमीवर कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निर्वंश होईल. अशी अंधश्रद्धा त्या काळामध्ये पसरवली गेली होती. या धार्मिक दहशतवादाला व अंधश्रद्धांना जिजाऊंनी प्रथम लाथ मारली....सोबत तरुण मावळ्यांची पोरं एकत्र करून ती पहार जिजाऊने उपटून फेकले आणि त्याच जागेवर सोन्याचा नांगर लावून ती जागा ताब्यात घेतली.... आणि या जागेवर लाल महाल बांधला अंधश्रद्धांना फाटा देणाऱ्या कर्मकांडांना लाथाडून अंधश्रद्धेमध्ये अडकवून ठेवणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला... राजमाता जिजाऊंनी त्या काळामध्ये अनेक स्त्रिया पतीचे निधन झाले की त्याच चितेमध्ये उडी मारून आपला जीव द्यायच्या.... सती जात होत्या अशा स्त्रियांना सती जाण्यापासून विरोध केला त्यांना रोखलं आणि अशा स्त्रियांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या मुलाबाळांत घालवण्यासाठी आवाज उठवला...प्रचार सुरू केला अशा लोकांचे उद्बोधन केलं....कोणाला ही पती वारल्यानंतर जास्त गरज ही आधाराची,मायेची असते हे समजून सांगितले....कितीतरी बहिणींना त्यांच्या मनाविरुद्ध सती जायला भाग पाडणा-या भटांचा खरपूस समाचार घेतला..आणि कितीतरी लहान मुलांना त्यांची आई मिळवून देत अशा अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा अशा गोष्टींना थारा न देता अशा गोष्टींचा प्रखर विरोध करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ ह्या त्या काळातील एक धाडशी, धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री म्हणून आदर्श आहेत. त्या काळांमध्ये अंधश्रद्धा लाथाडून दिली नसती तर कदाचित आजचे पुणे शहर हे त्या जागी कधीच बसले नसते. एक शापित भूमी मधून राहिले असते बाल शिवबाला तयार करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी सर्व प्रकारचे बळ एकत्रित केले अनेक किल्ले घेण्यासाठी बाल शिवबांना प्रवृत्त केलं एक-एक किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंचा विचार घ्यायचे आणि त्या अनुषंगाने लढाया करायचे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ म्हणायच्या "स्वराज्याची किल्ले ही आपली खाजगी मालमत्ता नाही" याची प्रखर जाणीव त्यांनी करून दिली जिजाऊने राजनीतीचा अवलंब करून शहाजीराजांची मुक्तता केले आणि स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं" असं शिवाजी महाराजांना सांगितलं स्वराज्य निर्मितीसाठी कोणतेही नाते, कोणतीही भिंत नाही स्वराज्य निर्मिती हे जिजाऊंचे एकमेव स्वप्न ठरले होते. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊंनी निर्माण केला होता. अशा प्रचंड जिद्दीची व करारी बाण्याची जिजाऊ  स्वराज्यनिर्मितीसाठी तयार झाली. शिवबा तयार नसते तर स्वतःच्या हाती तलवार घेऊन जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली असती. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊ माँ साहेबांच्या मध्ये होता एकवटला होता. त्यासाठी त्यांनी राजनीतीचा अवलंब करून स्वराज्याचा पसारा वाढवत गेल्या. सर्वांचे सहकार्य मिळावे म्हणून शिवबाचे एकूण आठ विविध कुटुंबात वैवाहिक संबंध जोडले.... त्यामुळे आठ शूरवीर घराणे भोसले घराण्यांशी जोडले गेले पुण्याच्या नैऋतेला 64 किलोमीटर वर कानद खो-यात तोरणा किल्ला जिंकला आणि याच किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले....
          अफजल खानाच्या भेटीसाठी शिवबास प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत पाठवणा-या जिजाऊ ह्या खरंच एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून अख्ख्या विश्वाला वंदनीय अशाच आहेत त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा अफजलखानाला कडून जर तुला काही दगाफटका झाला तर आम्ही बालशंभूला गादीवर बसून राजकारभार करेन. इतकी धाडसी,कर्तुत्वान स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही.

        "हीच जिजाऊ जीच्या प्रेरणेने उजळे स्वराज्यज्योती   
         हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती"

       याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये व बाल संभाजींना घडवण्यामध्ये त्यांना आकार देण्यामध्ये राजमाता वीर माता जिजाऊ मासाहेबांचा हात आहे वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी पन्हाळगडावर बुधभुषण नावाचा संस्कृत,राजकीय सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ लिहिला शंभूराजांनी एकूण चार ग्रंथ लिहिले एवढा प्रचंड बुद्धिमान भाषापंडित शूरवीर,करारी, मुत्सुद्दी, बुद्धिवान, निर्व्यसनी, जिद्दी छत्रपती संभाजीराजे तयार केले त्यांना सर्व शिक्षण माँसाहेब जिजाऊंनी दिले एवढेच नव्हे तर आपली नातसून म्हणजेच महाराणी येसूबाई यांना सुद्धा धर्मनीती, राजनिती,संस्कृत, युद्धनीती या सर्व बाबीवर या सर्वांचे शिक्षण जिजाऊंने दिले होते. छत्रपती संभाजी राजांनी नखशिक, सातसतक नायिकाभेद या तीन ग्रंथांची रचना केली. शंभुराजासारखा आदर्श, कवी,साहित्यिक,पहिली तोफ निर्माण करणारा, शूरवीर, पराक्रमी,मुद्सुदी ,एकही लढाई न हारणारा, आदर्श राजा शोधुनही सापडणार नाही....
        अशा साहसी,धाडसी, कर्तृत्ववान , वेळप्रसंगी हाती तलवार धरून अन्यायाचा प्रतिकार करणा-या आदर्श मातेचा आदर्श समस्त स्त्रीयांनी घेण्यासारखा आहे....
माँसाहेब जिजाऊ जयंती च्या सर्वांना मनःपूर्वक शिव शुभेच्छा.....

*लेखिका/ कवयित्री -कु. मीनाक्षी विजयाई पांडुरंग नागराळे, वाशिम*

माझा परिचय-कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम.... कवयित्री, शिक्षिका, लेखिका,संपादिका...

 Date: 31 Oct 2019
Subject: माझा परिचय

*परिचय*
*स्वतःचे नाव* *-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*शाळेचे नाव-जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा. कोकलगाव*
*तालुका*-वाशिम*
*जिल्हा*-वाशिम*
*मोबाईल नं*-9767663257
*शिक्षण-M.A.D.ED..D.S.M*

🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका,लेखिका, संपादिका, कवयित्री म्हणून राज्यभर ओळख🔷️
🔷️विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून गावात ओळख🔷️
🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही म्हणून राज्यस्तरीय विविध उपक्रमाचे आयोजन🔷️

*🌈शाळेत राबवत असलेले*
*उपक्रम-🌈*
🛌🛏🛌Ⓜ💲🅿🛌🛏🛌

🔶️लोकसहभागातून शाळा व सर्व वर्ग डिजिटल केले.
🔷ज्ञानारचनावादी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी.
🔷प्रत्येक वर्गात कॉम्प्युटर.एल.इडीद्वारे अध्ययान अध्यापन उपक्रम. 
🔶पहिलीचा वर्ग जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नसेल असा मोडेल क्लास तयार केला. 
🔷विध्यार्थ्यांना रायटिंग टेबलची सोय.
🔶प्रत्येक वर्गात वाचन कोपरे.
शाळेच्या प्रांणागनात  वाचन कट्टा.
🔷२०००पुस्तकचे वाचनालय.
🔶तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहायाने कॉम्प्युटर .प्रोजेक्टर द्वारे अध्ययन अध्यापन.
🔷गणिताचे संगीतमय पाडे.
🔶 गणिताची सूत्रे उखाण्याच्या रूपाने पाठांतर.
🔷हसत खेळत इंग्रजी उपक्रम.
🔶परिपाठात विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण 
🔷शैक्षणिक सहल.
🔶 FANCY ड्रेस स्पर्धा.
🔷वार्षिक स्नेहसंमेलन /आनंदोत्सव
🔶प्रवेश उत्सव 
🔷कचऱ्रयापासून खात निर्मिती.
🔷आदर्श इंग्रजी हिंदी मराठी परिपाठ.
🔶झकास T.V.
🔷१०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती.
🔶१०० टक्के विध्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप.
🔷स्पोकन इंग्लिश .
🔶पहिली फोकस क्लास
🔷पाचवी शिष्यवृती नओदय ज्यादा तासिका.
🔶अभ्यासात मागे असलेल्या मुलांना वैयक्तीक मार्गदर्शन .
🔷️विविध उपक्रमाद्वारे अध्यापन 
🔶️दररोज नवनवीन उपक्रम घेवून जिल्ह्यातून उपक्रमशिल     तंत्रस्नेही ग्रुपवर कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे. 
🔷️कला,कार्यानुभवमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे.
🔶️विद्यार्थ्यांचे उमलती फुले हे बालकाव्य संग्रह प्रकाशित करून जिल्ह्यातील पहिले बालकाव्य म्हणून घेतली पत्रकार बंधूनी नोंद....
🔷️गणित विषयात अब्ज पर्यंत संख्यावाचन 
🔶️शाब्दीक कोडे,जनरल नाॅलेज इ.पुरेपूर सराव
🔷️बालआनंद मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन
🔶️ माझे मिनाक्षी पी नागराळे नावाचे युट्यब चॅनलद्वारे 
अध्यापन अध्ययन पध्तीच्या वेगवेगळ्या ट्रीक्स 
🔷️प्रत्यक्ष मतदान करून लोकशाही व मतदानाचा अनुभव विद्यार्थ्यांना देणे.
🔶️किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन 
🔷️लेक वाचवा अभियाना द्वारे विशेष काव्यातून जनजागृती 

..

  *🌈साहित्य क्षेत्रातील कामगिरी🌈*

*प्रकाशित झालेले पुस्तकाचे नाव*-
1) *चिमणी पाखरं*  (बालकवीता संग्रह)
2) *उमलती फुले*  (विद्यार्थ्यांचे बालकविता संग्रह संपादन करून जिल्ह्यातला पहिला बालकाव्य संग्रह ठरला) 11मार्च 2019
3) *माणुसकीचा झरा* प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
4) *स्वराज्याचे मावळे* 
5) *माझी शाळा माझे उपक्रम*  पुस्तक प्रकाशनाच्या  वाटेवर आहे....
6)*थोर क्रांतिकारक...प्रकाशनाच्या वाटेवर*
7)दैनिक लोकमत मध्ये 12 जानेवारी 2018 ला जिजाऊ जयंतीनिमित्त *मातृतिर्थ-अखंड उर्जास्तोत्र* हा  लेख प्रकाशित झाला आहे.
8)काव्यमय दिनदर्शिका मध्ये *मला वाटते*
ही कविता प्रकाशित
9)आम्ही सावित्रीच्या लेकी विशेषांकामध्ये
*आम्ही सावित्रीच्या लेकी* ही कविता प्रकाशित...
10) मराठवाडा मुक्तिसंग्राम मराठवाडा विशेषांकामध्ये  *माझी आई* ही कविता प्रकाशीत
11) शिवकाव्य संग्रहात  *शिवाजी राजा*
ही कविता प्रकाशित
12)गाडग्यातली अमृतवाणी मध्ये  *संत
 गाडगेबाबा*  ही कविता प्रकाशित...
13)"दारूची नशा" ही कविता तेजोमय या साप्ताहिकातून प्रकाशित
14) लोकमत मध्ये  *शेतकरी राजा*  ही कविता प्रकाशित
15) स्टोरी मिरर 52 कविता प्रकाशित
16) लवकरच "परिवर्तनवादी चारोळ्या" चारोळी संग्रह प्रकाशना च्या वाटेवर.
17) स्वतःच्या 3000 च्या वर कविता वेगवेगळ्या प्रकारातील केलेल्या आहेत.
18) वयाच्या 12 व्या वर्षापासून कविता लेखनाचा छंद आहे....
19)राजस्तरीय  *शिवारातील कविता*  संग्रहात *"बाप"* नावाची कविता प्रकाशित ...
20) राजस्तरीय "माय मराठी" महाकाव्य ग्रंथात  *माय मराठी* कविता प्रकाशित....
 21) जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह प्रकाशन केल्याबद्दल मा.शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांच्या हस्ते सन्मान....
22) दरवर्षी जिजाऊ जयंतीनिमित्त लेख वाशिम मध्ये सकाळ पेपरला प्रकाशित झाला...
23) 500 च्या वर ई प्रमाणपत्र उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट पर्यंत राज्यस्तरीय मिळालेले आहेत...
24) शिवजयंतीनिमित्त शिवाजी राजा ही कविता प्रकाशित...
25) अनेक स्पर्धामधून रोख पारितोषिके मिळवले...
26)मा.शरदचंद्ररावजीसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 60 ओळींचा कविता....
सहभाग प्रमाणपत्र मिळाले पण आजपर्यंत जेवढे प्रमाणपत्र मिळाले त्या सर्व प्रमाणपत्रापैकी सर्वात मोठे प्रमाणपत्र...
27) प्रा.बी.टी, चव्हाण सर(प्रा.शिक्षणाधिकारी) यांचे अभिनंदनीय पत्र 
28)जागतिक महिला दिनानिमित्त शेकडो महिलांच्या उपस्थितीत गावातील दारूबंदीचा ठराव घेऊन गावातील दारूची दुकाने बंद करून लोकांची मने परिवर्तन केलीत..
29) शिवजयंतीनिमित्त 108 ओळींची कविता करून शिवरायांना मानाचा मुजरा...
30)बचत गटाचे महत्व सांगून बचत गट करण्यास मदत करणे.
31) शाळेतल्या किशोरवयीन मुलींना आरोग्य व मासिक पाळी बद्दल विशेष मार्गदर्शन करणे. 
32)जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा लोकवर्गणीतून केली.व लोगसहभाग व शिक्षकांच्या आर्थिक मदतीतून शाळेची रंगरंगोटी करणे.
33)  राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रशांत वाघ सर यांच्या घर वास्तूशांती निमित्त 180 कवितांमधून घर ही कविता सर्वोत्कृष्ट क्रमांका ने विजेती अहमदनगर येथे सन्मानित...34) स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांच्या हस्ते "स्वराज्याचे मावळे" पुस्काचे प्रकाशन... 
35) डहाणू मित्र मुंबई या वृत्तपत्रात "माती", "चला सबल करूया लेकीना","असे असावे जीवन", "गडकिल्ले", अशा अनेक कविता प्रकाशित....
36)स्वाभिमानी छावा सोलापूर या वृत्तपत्रात माझी "भाग्य उजळले तुझे" आणि "अत्याचार" ही कविता प्रकाशित....
37) राजमाता जिजाऊ हा लेख जिजाऊ विशेषांकात प्रसिद्ध...
38) "शेतकरी जगला पाहिजे" पुस्तक समीक्षण स्वाभिमानी छावा सोलापूर या दैनिकात प्रकाशित...
39) ऑनलाईन १००० च्या वर प्रमाणपत्र आजपर्यंत प्राप्त झाले....
40)"क्रांतिरत्न" या १००० पानांचा महाग्रंथात खरी विद्येची देवता लेख प्रकाशित....
41)५००० कवितांचे समतेचे महाकाव्य या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता प्रकाशित...
42) स्वताच्या ब्लॉगवर अनेक लेख, उपक्रम, कविता प्रकाशित...
*==========================================*

 🔷️मला मिळालेले पुरस्कार🔷️

*1) 2009 मध्ये पंजाबराव देशमुख शिक्षक संघटने तर्फे *राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..*

*2) *आम्ही सावित्रीच्या लेकी*  राज्यस्तरीय आदर्श *कवयित्री पुरस्कार* पुणे येथे सन्मानित करण्यात आले...2015*

*3) मराठा सेवा संघातर्फे *राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार* 2009 मध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले...*

4) *आम्ही सावित्री च्या लेकी राज्यस्तरीय उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका* *पुरस्काराने सन्मानित करण्यात आले* .2018*

*5) ग्रामस्थांनाकडून आदर्श शिक्षिका सन्मान...जि.प.शाळा.सुकळी येथे.2016*

*6) पं.स वाशिम येथे तंत्रस्नेही व उपक्रमशिल शिक्षिका सन्मान शिक्षण विभाग 2018..*

*7) राज्यस्तरीय महाकाव्य स्पर्धेत उत्कृष्ट क्रमांकांनी सन्मानित केलं...स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून सन्मानित*

*8)ऑनलाईन रोख पारितोषिके प्राप्त*

*9) सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय,तृतीय ते उत्तेजनार्थ असे 500 च्या वर प्रमाणपत्र*

*10)स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित शोधनिबंध लिहीला त्याचा राज्यातून प्रथम क्रमांक...नागपूर रामकृष्ण मठ धंतोली येथून प्रमाणपत्र व रोख रक्कम मिळाली आहे...*

*11)डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेतर्फे ग्रंथभेट देवून*
*"आदर्श शिक्षिका" म्हणून सन्मानित केले...दि.21-9-2018*

*12) राजस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेत टाॅप टेन मध्ये आल्याने लातूर येथे सन्मानित...*

*13) अभिजात मराठी शिक्षक परिषदेतर्फे निवडक 1072 कवितामधून १०१ कवितामध्ये निवड झाल्याबद्दल अमरावती येथे सन्मानित 2018*

*14)लठ्ठे ज्यु.काॅलेज ऑफ एज्युकेशन इन आष्टा ता.वाळवा  जि. सांगली येथील माजी आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित* 2019

*15)सेवक सेवाभावी संस्था, जळगाव तर्फे "राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार 2019)*

*16) ९२ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे  "बाप" या कवितेची निवड झाल्याबद्दल सन्मानित...* 2019

*17) स्वकतृत्वावर विश्व निर्माण करणा-या महिलांना प्रेरणा फाऊंडेशन, ठाणे तर्फे  राज्यस्तरीय  *"रणरागिनी पुरस्कार"* ठाणे2019* 

*18) राजस्तरीय नारीरत्न पुरस्कार सहारा एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन तर्फे परभणी येथे 24 मार्च 2019*

*19)महाराष्ट्र शिक्षक अॅडमिन पॅनल तर्फे वाशिम जिल्ह्यातून आदर्श शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने औरंगाबाद येथे होणार सन्मानित...31 मे 2019 पुरस्कार जाहीर*

*20)मराठा सेवा संघातर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका म्हणून सन्मानित*

*21)डाॅ. पंजाबराव देशमुख शिक्षक (वाशिम)संघटनेतर्फे आदर्श शिक्षिका म्हणून ग्रंथभेट देवून सन्मानित*

*22) राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धेत "घर" ही कविता   सर्वोत्कृष्ट विजेती झाल्याबद्दल अहमदनगर येथे सन्मानित...*

*23) चिमणी पाखरं व उमलती फुले हा बालकाव्य जिल्ह्यातील पहिला बालकाव्य ठरल्याबद्दल शिक्षण सभापती गोळे साहेबांच्या हस्ते वाशिम जिल्हा परिषेमार्फत सन्मानित....

24) राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारिरत्न पुरस्कार, नागपूर 

25) आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेमध्ये गुणवंत आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित...२२ फेब्रुवारी २०२०

  🔷️*आवड व छंद*🔷️
*खास आवड/छंद-1 कविता लिहीणे,
*अॅमबाॅस पेंटींग,ग्लास पेंटींग,रिमझिम पेंटींग*
*रोज एक उपक्रम घेणे*
*शैक्षणिक साहित्य तयार करणे...*
*रांगोळी काढणे,मेहंदी काढणे*
*ओळख करून घेणे*
*शैक्षणिक विडीओ तयार करणे*
*शैक्षणिक साहित्य निर्माण करणे*
*शिकणे आणि शिकविणे...*
*विद्यार्थ्यांना सर्व क्षमता प्राप्त होईपर्यंत नवनवीन प्रयोग व विविध उपक्रम घेणे*
*ऑनलाईन तंत्रस्नेही कार्यशाळा घेणे*
*ऑनलाईन उपक्रम घेणे*
*कला,कार्यानुभव या विषयावर आधारीत कलाकुसरीचे साहित्य स्वतः करणे व विद्यार्थ्यांकडून करवून घेणे*
*विद्यार्थी हेच दैवत या उक्तीप्रमाणे शाळेतला एक एक मिनीट विद्यार्थ्यांसाठी खर्च करणे*
*दरवर्षी आई किंवा वडील नसलेल्या एका विद्यार्थ्याला दत्तक घेणे*
*स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांच्या उपयोगी साहित्य देवून साजरा करणे*

सत्य....

 Date: 7 Apr 2020

*सत्य*


    माणुसकी हीच खरी सेवा आणि सत्य हाच खरा धर्म मानवाचा असला पाहिजे. सत्य हे प्रखर सूर्यासारखे तेज असते.सत्याला नेहमी तेजाचे वलय असते. सत्य कधीच आयुष्यात हरत नाही आणि झाकले ही जात नाही. एखादी व्यक्ती जर सत्याला झाकत असेल तर ती फक्त कांही काळापुरतीच झाकल्या जाऊ शकते. एक ना एक दिवस सत्य हे समोर येतच असते. जसे की एखाद्या विस्तवावर काही क्षणानंतर राख दिसायला लागते आणि त्या राखेला जर फुंकर मारली तर त्यावरचा विस्तव दिसतो अगदी त्याच प्रमाणे सत्य हे फक्त विस्तवा सारखे असते फक्त कांही कालावधी करिता ते धुळीने झाकले जाते पण कायमसाठी दबले जात नाही.आज आपण पाहतो बऱ्याच घरांमध्ये मोठी माणसंच खोटे बोलताना दिसतात त्यांचं पाहूनच लहान मुलं सुद्धा अनुकरण करत असतात ज्या घरांमध्ये एखादा पालक त्यांच्या मुलाला म्हणत असेल की  बाबा घरात नाहीत म्हणून सांग असं फोनवर मुलाला बोलण्यासाठी सांगितलं जातं आणि मग त्या वेळेला मुलाला आश्चर्य वाटतं की बाबा खोटं का बोलताहेत पण वडिलांच्या मर्जी खातर ते लहान मूल खोटे बोलून जातं पण खोटं बोलताना असं सांगतो "की बाबा म्हणतात बाबा घरात नाहीत म्हणून सांग" आणि लगेचच सत्य हे उघड होतं असतं म्हणून सत्य हे फार दिवस झाकले जात नाही...
         आपल्यावर केवढे मोठे ही संकट आले आणि कसली ही जर वेळ आली तर माणसांनी सदैव खरेच बोलले पाहिजे.. सत्यच बोलले पाहिजे एक खोटं झाकायला अनेक वेळा खोटे बोलावे लागते.पण या ख-या खोट्याच्या नादात माणसाची पार वाट लागते..हे सुद्धा आपणाला समजायला हवं....एखादी व्यक्ती खोटी बोलली हे जेव्हा समोरच्या व्यक्तीसमोर सिद्ध होतं तेव्हा दोन कानसुलीत मारल्यागत..सण...सण..आवाज झाल्यागत वाटतं...शेवटी खरे खोटे च्या नादात.. विश्वास उडून गेला की कांहीं खरंच नसते...एकदा खोटं बोलणारा,लबाड अशी जर प्रतिमा तयार झाली तर कितीही खरं बोला...ते नेहमी मग खोटंच असत्यच वाटायला लागतं...लांडगा आला रे...गोष्टीसारखी गत होते... दररोज लांडग्याची भिती घालणारा मेंढपाळ मुलगा खोटं बोलवून लोकांना फसवत असतो आणि एक दिवस त्याच्या खोट्या  बोलण्याला लोक़ विश्वासच ठेवत नाहीत आणि खरंच एक दिवस असा येतो...की खरोखर लांडगा येतो आणि सर्व शेळ्या खावून जातो..त्या मेंढपाळ मुलाच्या बोलण्यावर लक्ष देत नसतं... आणि मेंढपाळाच्या सर्व शेळ्या एक दिवस लांडगा खावून घेतात.... मेंढपाळाच्या  खोटेपणामुळे त्याच्या सर्व शेळ्या लांडग्यानं खावून खाल्या....
      कांहीं लोकं वय लपवण्यासाठी,वय कमी करून सांगतात..काय उपयोग कर बाबा त्या वयाचा... त्यापेक्षा एक कामं करा... खोटं बोलूच नका...खोटेच बोलले नाही तर लपवणृयाचा प्रश्नच नाही ना....

      आयुष्याच्या कपड्याला
     सत्याची झालर
     कष्टाची किनार
     जर आयुष्याला 
    लावली तर.....
    आयुष्याचं सोनं
    नक्कीच होणार....!!

          सत्याची ताकद ही हजार पटीने जास्त असते...सत्य नेहमी बलवान असते...जसे आपण सुर्याचे किरण झाकू शकत नाहीत.अगदी तसेच सत्य ही झाकू शकत नाही..सुर्याच्या किरणांइतकेच प्रवावी सत्य असते.... कांहीं वेळा सत्यालाच खूप त्रास होतो.म्हणून आपण कधीच वाम मार्गाने जायचे नाही....अपयश आले तर हरायचे नाही....

       सत्य हाच देव
       सत्य हाच भाव
       सत्य हीच पुजा
       सत्य हेच शिव...!!

       सत्याच्या मार्गाने जाणारा माणूस कधीच संकटात सापडत नाही.सत्य हाच देव आहे...वाममार्गाने कमवलेला पैसा,धन,टिकत नसते...तोच पैसा प्रामाणिकपणे कमवले तर तो टिकतो,व पुरतोही....जो सत्याची पुजा करतो त्यालाच शिव प्राप्त होते....सत्याचं पारडं हे कधीही जडच असते...
       "चला धरूया सत्याची कास
       सत्यानेच मग होईल विकास"

      *©️®️लेखिका/ कवयित्री कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे , वाशिम*

"स्वराज्याचे मावळे" तरूणांना स्फुर्ती देणारा काव्यसंग्रह...समीक्षण श्री.सुदाम साळुंके सर

Date: 26 Mar 2020

*"स्वराज्याचे मावळे"* तरूणांना स्फुर्ती व प्रेरणा देणारा काव्यसंग्रह.....

=====================
               शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी.     
     "स्वराज्याचे मावळे " 
या शीर्षकाखाली शिवछत्रपतींच्या तीस  जिगरबाज शूर मावळ्यांच्या शौर्याचे व पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे.    
 वाशिमच्या अजिंक्य प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे.      
    मुखपृष्ठावर सिंहासनारुढ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ व
सोबत भगव्या पताका हाती घेतलेले स्वराज्याचे मावळे रेखाटले आहे. तर मल पृष्ठावर मीनाक्षी ताईंनी आपल्या कार्याचा परिचय चित्रीत केला आहे. 
       वाशिम जिल्ह्यातील या कवयित्रीने " स्वराज्याचे मावळे "  या  काव्यसंग्रहातून प्रत्येक मावळ्याच्या व्यक्तिवैशिष्टयांचे व त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे अप्रतिम वर्णन केले आहे. 
 " स्वराज्य रक्षक संभाजी " या मराठी ऐतिहासिक  मालिकेचे मुख्य अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे   यांनी  आपल्या संदेशात म्हटले आहे, समाजाला माहित नसणाऱ्या ३० मराठा , मुस्लिम शूर मावळ्यांचा इतिहास आपण   "स्वराज्याचे मावळे " या काव्य संग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवणार असल्याबद्दल मिनाक्षीताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.
     प्रस्तुत काव्यसंग्रहाला चित्रपट निर्माते कवी , लेखक , समिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व  असलेले   श्री. संदीप राक्षे  सर यांनी प्रस्तावना  लिहीली आहे. 
   या काव्य संग्रहाचे एक आगळे वेगळे वैशिष्टये म्हणजे यामध्ये शिवरायांच्या जीवनात त्यांच्या लहानपणापासून जीवनभर त्यांच्याशी एकनिष्ठेने राहून आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या प्रत्येक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहातून केले आहे. 
   या काव्य संग्रहातून कवयित्री मीनाक्षीताई यांनी स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील  ३० मावळ्यांना अतिशय मानाचे स्थान देवून यथोचित वर्णन केले आहे. " हर हर महादेव , छ्त्रपती शिवाजी महाराज की " अशा घोषणा दिल्या की आज ही अंगात नव चैतन्य संचारते . त्याच गर्जना देत या मावळ्यांनी शिवरायांच्या साथीन इतिहास घडविला . मावळा म्हटल की घोडयावर स्वार झालेला कमरेला तलवार , पाठीला ढाल असणा-या सरदाराचे चित्र डोळ्यांपुढ उभे राहते . 
           या कवितेचे प्रथम पुष्प स्वराज्यासाठी बलिदान देणारा शूर योध्दा प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवा काशिदचे गुंफले असून शेवटचे पुष्प बेलसरच्या लढाईत मर्दुमकी गाजवणाऱ्या समशेर बहाद्दर बाजी सर्वेराव जेधे यांच्या पराक्रमाचे काव्य पुष्प गुंफले आहे .
      होता जिवा म्हणून वाचला  शिवा अशी ओळख असलेल्या कुस्तीवीर जिवा महाला, आग्ऱ्याच्या कोठडीतील मदारी व  हिरोजी फर्जंद. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणत ज्याने सिंहगडावर पराक्रम गाजवणाऱ्या शूर वीर  तानाजीचे , शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ , औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या संताजी - धनाजी, समुद्र किनारी दरारा असणाऱ्या कान्होजी आंग्रे, घरदार , जमीन विकून रायगड किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदलकर ,संभाजी राजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या कवी कलश यांचे वर्णन काव्यातून केले आहे.

    वेशांतर करी । नकला हो करी।
    बोलण्यात भारी । पडतसे।।

    या वरील ओळींमध्ये बहिर्जी नाईकांची चपळाई लपली आहे..शत्रूच्या समोर त्यांच्या सैनिकात वेशांतर करून जरी बहिर्जी घुसले तरी शत्रूला ते समजत नसे...इतके पटाईत सराईतपणे वेशांतर करून शत्रूच्या छावणीत घुसून खडानखडा माहिती काढणारे बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते...

      शेवटचा श्वास । लढत राहिले ।
      शौर्याने लढले । संताजीही ।

या अभंग प्रकारात ओवलेल्या उक्तीप्रमाणे आपल्या जिवाजी पर्वा न करणारा,स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे धनाजी व संताजी यांनी फार त्वेशाने, शौर्याने शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले...केवढी ती निष्ठा आणि केवढे ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर,जिवाला जीव देणारे मुठभर मावळ्यांना एकत्र घेवून लढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सा-या विश्वाला वंदनीय,पुजनीय व स्फुर्ती देणारे आहेत...

       वीर, शूरवीर , झुंजार,रण झुंजार  , सरनोबत, समशेर बहाद्दर , रांगडागडी , पैलवान, गुप्तहेर , प्रति शिवाजी असे प्रत्येक शुराचे वर्णन आपल्या काव्यमय उपाधीने करून त्यांच्या कार्याचे वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे. या काव्यसंग्रहामधील स्वराज्याच्या मावळ्यांचे रसमय वर्णन काव्यांजली , अभंग, मुक्त छंद, अष्टाक्षरी या काव्यरचना प्रकारांमध्ये केले आहे. 
 प्रत्येकाकडे "स्वराज्याचे मावळे " हा काव्यग्रंथ  असावा व तो अवश्य वाचावा असे मला वाटते. 

स्वराज्याचे वीर I वीर शौर्यगाथा ॥
टेकविते माथा I मिनाक्षीचा ॥

         या काव्यपंक्ती मधून कवयित्री मिनाक्षी ताईंनी आपला या शूर वीरांबद्दल आदर व्यक्त केला आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांना इतिहास जेवढा शिकवावा आणि मिनाक्षी ताईचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे... महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलांदा इतिहासावर काव्य रचले गेले आहे.याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे...प्रत्येक शाळेत व घराघरात बालकांच्या हातात असावे असेच हा "स्वराज्याचे मावळ" हा काव्यसंग्रह आहे...

   मिनाक्षीताईंबद्दल दोन शब्द
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे या एक आदर्श शिक्षिका असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. 
  मिनाक्षीताई नागराळे आमच्या राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या ONLY SUPER ACTIVE समुह प्रशासक आहेत. गेल्या ४/५ वर्षापासून त्या समुहामध्ये काम करत असून त्यांनी  अनेक ऑनलाइन कार्यशाळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना तंत्रज्ञानाचे धडे शिकविले आहे. त्या आमच्या समुहाच्या ONLY SUPER ACTIVE  तंत्रस्नेही प्रशासक असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे (साळुंके) पाटील यांना या संग्रहानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा  ! 


 --- श्री. सुदाम नारायण साळुंके सर
           तंत्रस्नेही  शिक्षक
             समुह प्रमुख - 
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
प्रशासक - प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र 
  कोपरगाव , जि. अहमदनगर 
    मो. 8830334810